Tuesday, December 28, 2010

पण तुमचं आमचं सेम नसतं..

प्रेम म्हणजे प्रेम असतं पण तुमचं आमचं सेम नसतं..

कॊलेजच्या शेवटच्या वर्षी मी प्रेमात पडल्याची मला खात्रि झाली होती आणि ती माझ्या मित्रांना पण असेल असं मला वाटत होतं. मी माझ्या आठवणींवर जोर दिला तेंव्हा असं लक्षात आलं की, हे सगळे मागच्या वर्षी म्हणजे दुस-या वर्षी सुरु झालेलं होतं. एका दिवशी माझा शर्ट आणि तिचा टॊप सेम टु सेम डिझाईनचा होता, काही मित्रांनी त्यावरुन चिडवलं आणि मनातल्या त्या कोमल प्रेमाच्या भावना वाढीस लागल्या. आमच्या कॊलेजातलं वातावरण फार मोकळं वगॆरे नव्हतं पण मुलं+मुली अशा शाळेच्या वातावरणातुन इथे आलेला मीच होतो, बाकी माझ्या ग्रुपचे सगळे फक्त मुलांच्या शाळेतुन आलेले होते.

प्रॆक्टिकल वगॆरे आम्ही एकत्रच असायचो तरी सुद्धा फार बोलणं वगॆरे नव्हतंच, फक्त समोर बसणं, कधीतरी फाईल, सबमिशन या वरुन बोलणं व्हायचं तेवढंच. तरी पण असं वाटायचं की आता जे मला वाटतंय तेच तिला पण वाटत असणार आहे. अशा विचारात एक वर्ष कसं गेलं ते कळालंच नाही. त्या वेळी १४ फेब्रुवारी पेक्षा १४ नोव्हेंबरलाच अजुन जास्त महत्व होतं निदान आमच्या लेखी तरी. नाही म्हणायला मी एकदा आमच्या वर्गातल्या सगळ्या मुलींना आमच्या घरी नाष्ट्याला बोलावलं होतं, ती पण आली होती.

त्यादिवशी त्या सगळ्यांना सोडायला गेल्यावर गेलाबाजार दोस्तीचा तरी विषय काढायचा असा माझा विचार होता, पण ते सोलापुरातले रस्ते, रहदारी छे सगळंच माझ्या नशीबाच्या विरोधात होतं. हात हलवत आणि पायडल मारत परत आलो घरी. पण तिस-या वर्षी मात्र एकदा घरुन कॊलेजला जाताना तिच्या रस्त्यावरुन गेलो होतो, बरोबर तो रस्ता आधी ब-याच वेळा पाहुन ठेवलेला होता, दोघंही सायकलवर, नव्हं एकाच नाही आपल्या आपल्या, मागुन जात असताना सायकल जरा जोरात दामटली आणि तिच्या बरोबर जाउन तिला विचारलं, मुझसे दोस्ती करोगी?

आणि काय सांगु मंडळी माझा अंदाज कधी नव्हे ते बरोबर आला, अगदी मनकवडी होती ती, लगेच माझ्या मनातलं ओळखुन बोलली ती हं............... नाही. आज लक्षात येतंय की हिंदीतुन विचारलेल्या माझ्या प्रश्नाला तिनं दिलेलं मराठी उत्तर हे सध्या गाजणा-या भाषाप्रश्नाचं मुळ आहे. तिनं नाही म्हणल्याबरोबर मी ज्या स्पीडनं सायकल चालवली म्हणता की विचारयाची सोय नाही. त्या वर्षी कॊलेज संपताना आमच्या कडे स्क्रॆपबुक भरायची फॆशन होती, त्यात सगळ्यांच्या म्हणजे सगळ्या मुलींच्या स्क्रॆपबुकात एकच ओळ लिहिलेली होती - छोटीसी ये दुनिया पहचाने रास्ते हॆ तुम कही तो मिलोगे कभी तो मिलोगे तो पुछेंगे हाल....

नंतर त्यातल्या काही भेटल्या काही आजपर्यंत कधीच नाहीत, कधी भेटतील माहित नाही. आज जर तिनं हे वाचलं तर तिच्या पण मनांत त्या आठवणी उभ्या राहतील तशाच आणि एक रात्र जाईल अर्धवट झोपेत अर्धवट जागेत, तिची आणि माझी पण.

आज वाटतं जे मी केलं ते प्रेम नव्हतंच ते फक्त आकर्षण होतं, प्रेम तर अजुन होतंय, मी अजुन पर्यंत माझ्यावरच्या प्रेमातुनच बाहेर पडत नाहिये तर दुस-या कोणावर काय प्रेम करणार आहे.

हर्षद

वाचकांना नम्र विनंती बरा वाईट जो असेल तो प्रतिसाद द्यावा.

Wednesday, December 22, 2010

गणपतीला वाजली थंडी

हो ह्या वर्षी म्ह़णजे गेल्या कित्येक दशकांत थंडी पडली नसल्यासारखी जाहिरात चालली आहे, या वर्षी पुण्यात थंडी पडल्याची. आज संध्याका़ळी स्टार माझा या चॅनेलवर बातम्यामध्ये या संदर्भात एक बातमी पाहिली.
पुणे येथील सारसबाग तेथे असलेल्या प्रसिद्ध गणपती मंदिरातील गणपतीच्या मुर्तीला गेल्या दहा वर्षांपासुन थंडिच्या मोसमात, चक्क लोकरीचे स्वेटर व टोपी घालतात म्हणे. एक दोन नाही तर चांगले आठ दहा सेट आहेत तेथे. तिथले पुजारी सांगत होते की या दिवसांत देवाला अभिषेक पण गरम पाण्याचा असतो.
यामुळे देव व माणुस या मधलं अंतरच मिटुन जातं आहे असं वाटतं, माणसानं जरुर प्रयत्न करावा देव व्हायचा आणि व्हावं देखिल त्याला ना नाही, पण देवाला असं सामान्य माणसाच्या पातळीला आणुन बसवावं याचं वाईट वाटतं.
हा प्रकार पण अंधश्रद्धेचाच किंवा अतिश्रद्धेचा प्रकार वाटतो मला.


Wednesday, December 15, 2010

न पटणारे शब्द..... भाग ०१


न पटणारे शब्द....
मला हे शब्द बाजीप्रभुंचे असतील असं वाटत नाही, अगदी कितीही काव्य अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार केला तरी सुद्धा.
सरणार कधी रण प्रभो तरी हे
कुठ्वर साहु घाव शिरी
बाजीप्रभुंचा इतिहास पुन्हा लिहावा ह्याची गरज नाही,त्या महात्म्याला माझे कोटि कोटि दंडवत. महाराजांना विशाळगडाकडे पाठ्वुन दिल्यानंतर मागुन येणा-या विजापुरी सेनेचा नायनाट करण्यासाठी घोडखिंडीसारख्या अतिशय अवघड ठिकाणाची निवड करणा-या त्या सेनानीच्या मनात असे विचार येणंच शक्य नाही. त्या रात्रिच्या त्या गोंधळात या अशा ठिकाणाची माहीती डोक्यात ठेवुन आणि तिचा असा योग्य वापर करण्याची बुद्धिमत्ता असणारी व्यक्ति असा पळपुटा विचार करणंच शक्य नाही.
पन्हाळ्याच्या वेढ्यातुन निघाल्यावर घोडखिंडितुन महाराजांना पुढे पाठवायचा निर्णय जेंव्हा बाजीप्रभुंनी घेतला असेल, तेंव्हाच त्यांना व बरोबर असलेल्या बांदल सेनेला आपले भविष्य माहित होतंच. ही लढाई अनपेक्षित नव्हतीच, जाणुन बुजुन समजुन उमजुन अंगावर घेतलेले हे रण होतं.
महाराज घोडखिंडीतुन निघाल्या पासुन ते विजापुरी सेना तेथे पोहोचेपर्यंत कितिसा वेळ मिळाला असेल त्या महाविरांना विचार करायला, आणि जो मिळाला असेल त्यात त्यांची एकच विचार केला असेल, आज माझ्या तलवारीनं किती मुंडकी उडवेन, किती हात पाय तोडेन. त्यातच काही जुनी वॆरं पण असतीलच. इथं काही मुत्सद्दीपणा वगॆरे पणाला लागायचाच नव्हता. काही दिवसांपुर्वी प्रतापगडाच्या पायथ्याला जे महानाट्य घडलं होतं ते आता मागं पडलं होतं, आज फक्त होणार होता तो रणमर्दिनी महिषासुरमर्दिनीला प्रसन्न करण्यासाठी शतमुंड किंवा सहस्त्रमुंड अभिषेक. होतं ते फक्त एकच ध्येय येणारा गनिम कापुन ठेवायचा.
माझा राजा सुरक्षित होईपर्यंत लढत राहायचं होतं पण ते झाल्यावर सुद्धा जिवंत राहण्याची शक्यता नव्हतीच, छे तो विचार नव्हताच कोणाच्या मनांत. उभा राहिलेली प्रत्येकजण दहा विस जणांना मारुन मरण्यासाठीच उभा होती. फक्त वाट पहात होते ते त्या विजापुरी सेनेची. गनिम आला की तोडायचा बास एवढेच, आपण तुटेपर्यंत त्याला तोडायचा. एकच ध्यास एकच आज्ञा होती मारा मारा आणि मारा. तो हरामखोर सुडाने पेटुन उठलेला गनिम या जागेच्या पुढे जाता कामा नये.
अफजलखानाच्या वधानंतर विजापुर दरबार सुद्धा पेटुन उठला होता, त्यांची ही शक्ती काही कमी नव्हती, जेवढी विरता मर्द मराठ्य़ांत होती तेवढीच त्यांच्यात पण होती. येणा-या लाटा या वादळीच असणार होत्या. आपल्या एका मोठ्या सरदारचा कत्ल आणि आता पन्हाळ्याचा वेढा या अशा पावसाळी रात्री तोड्णे ह्यांचं आश्चर्य ओसरेपर्यंत त्या विजापुरी सेनेला एक मोठा दिलासा मिळाला होता, या सगळ्यामागचा म्होरक्या सिवाजी पकडला गेला होता, पण हाय रे कंबख्त हे काय तो पण नकली. आणि हे समजल्यावर ते शांत थोडेच बसणार होते. शत्रुला नेस्तनाबुन करण्याच्या भावनेपेक्षा पुन्हा पुन्हा होणा-या या अपमानांचा बदला त्या सेनेला घ्यायचा होता. अपमान आणि सुडानं पेटलेली विजापुरी सेना आपल्यावर चालुन येणार आहे याची पुर्ण कल्पना बाजीप्रभुंना व त्यांच्या बरोबरीच्या मावळ्यांना होतिच.
मारु आणि नंतर मरु ही तयारी बाजीप्रभुंनी आपल्या साथिदारांची करुन घेतलीच असेल त्या मिळालेल्या थोड्याश्या वेळांत. मग तोच महाप्रतापी लढवय्या हे असं म्हणेल का ? नाही कधीच नाही.
क्रमश :

Tuesday, December 14, 2010

फिटे अंधाराचे जाळे (छायाचित्रे)

फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश
या ओळी मी दोन वर्षांपुर्वी काढ्लेल्या छायाचित्रांच्या माध्यमातुन सादर करीत आहे.










फिटे अंधाराचे

Monday, December 6, 2010

बहरला पारिजात दारी...

सत्यभामा राजवाड्याच्या गच्चीवर उभी होती , सकाळची सगळी कामं झाली, पुजा, नॆवेद्य वगॆरे, आज सगळं अगदी वेळेत झालं त्यामुळं मन कसं प्रसन्न होतं. बाहेर नुकताच हिवाळा सुरु होवुन काही काळ लोटल्यानं येणारा थोडासा निवांतपणा होता. किंचित धुकं आणि त्यातच द्वारकेतल्या घराघरातुन येणा-या धुरामुळे निर्माण होणारी तरल चित्रं पाहता पाह्ता अचानकच तिची नजर त्याच्याकडे गेली.

जेंव्हा हे एकदा स्वर्गातुन परत येताना याच्या फुलांची माळ घालुन आले होते, तेंव्हा पासुन माझं मन त्याच्या साठी फार झुरत होतं. नंतर एक दोन वेळा यांच्याकडे विषय काढला, पण छे आमचं कोणि ऎकेल तर शपथ. मग मी पण शेवटचं अस्त्र उचललं. त्या दिवशी स्वारी महालात आल्यावर पद्स्पर्श केला आणि आत निघुन आले. हे आलेच मागे मागे, आणि मग चांगले प्रहर दोन प्रहर समजावत होते, पण मी सुद्धा काही कमी नाही, एक शब्द बोलले नाही. पण काय सांगु अस्सा मनकवडा स्वभाव आहे म्हणुन सांगु यांचा. काही म्हणजे काही लपवता येत नाही मलातरी यांच्यापासुन. पण त्या दिवशी कबुल करुनच घेतलं मी सुद्धा.

काही दिवसांतच ज्यावर स्वर्गलोक फार मिजास करत होता, तो होय तोच तो पारिजात आमच्या, म्हणजे माझ्या अंगणात वाढु लागला. त्याला मी स्थान पण असं दिलं होतं की मुद्दाम तिला दिसावं की पारिजात स्वर्गानंतर फक्त माझ्याकडेच आहे, बाकी कुठेच नाही. पण जसा जसा तो वाढला आणि फुलु लागला काहि तरी वेगळंच व्हायला लागलं..

बहरला पारिजात दारी...
फुले का पडती शेजारी...

प्रेम असल्याशिवाय का कोणि हे असलं वेडं साहस करेल का ? सांगा ना, प्रत्यक्ष देवाधिदेव ईंद्राच्या उद्यानातुन त्याचाच अतिप्रिय व्रुक्ष घेउन यायचा हे काय साधं सुधं काम नव्हे.आता लोक काय म्हणायचे ते म्हणुदेत पण तरी ही यांचं प्रेम माझ्यावरच जास्त आहे. सगळे द्वारकावासी जरी तिला मोठी म्हणत असले तरी मला काही नाही, कारण यांचा जेवढा माझ्यावर जिव आहे, तेवढा कुणावरच नाही. पण कधि तरी संध्याकाळी मनांत आषाढ घनांसारखं मळभ दाटुन येतं आणि मनांत खोलवर झालेला घाव पुन्हा टोचायला लागतो. कधि तरी कॊमुदिनी चेष्टेत मला म्हणते, आता उठावं पट्टराणि आणि मग वाटतं हा राजवाडा, हा संसार, ही संपत्ती आणि त्यावर मुकुट्मणि असा हा पारिजात हे सगळं माझं तरी पण तिच का पट्टराणी, मी का नाही?

माझ्यावरती त्यांची प्रिती...
पट्टराणी जन तिजसी म्हणती...
दुख: हे भरल्या संसारी....

कधी कधी यांच्या लहानपणाच्या गोष्टी सांगतात ना यशोदाआई की हे म्हणे त्यांना चिडवायचे, दहि लोण्यासाठी खोटं बोलायचे. गोकुळांत जवळपास सगळ्या घरांत दुध, दहि आणि लोणि चोरुन झालं होतं. पण म्हणे गवळणी तक्रार घेउन आल्या की त्यांच्या नाही तर बलरामभावोजींच्या मागे लपुन राहायचे. अगदी  अस्सा साळसुदपणाचा आव आणायचे की आलेल्या गवळणीपण तक्रार सोडुन यांचं कॊतुक करायच्या. अरे हो अजुन सुद्धा हे तसेच करतात की काय, म्हणजे बघा मी समोर दिसले की मी सुंदर, जवळची , प्रेमाची आणि बोलणं तर अस्सं गोड की बस्स. या गोड गोड बोलण्यांत मला फसवत तर नाहीत ना ? माझ्यावर प्रेमाचं नाटक तर करीत नाहीत ना? मी पण तशी थोडी भोळसट्च आहे. ह्यांच्या थोड्याश्या गोड बोलण्याला सुद्धा भुलुन जाते, नको आता या पुढे हे असं होवु द्यायचं नाही असं नेहमी बजावते मनाला.पण काय हे समोर दिसले की सगळे संकल्प संपतात.
असेल का हे नाटक यांचे ...
मज वेडीला फसवायचे...
कपट का करिती चक्रधारी...

ते सगळं असेल तसं असु दे आता ह्यांच्या मागे लागुन हट्टाने मी हा पारिजात आणुन माझ्या अंगणात लावला, तो बहरला, चांगला फुलांनी लगडला, सगळं माझ्या मनासारखं झालं होतं. द्वारकावासी काय माझ्यापेक्षा तिला जास्त मान देतात ते पण मी सहन करते आहे, ह्यांची तिच्यावर जास्त माया आहे, असेल.पण आता तर हे काय बाई हद्दच झाली अन्यायाची, कित्ती म्हणुन सहन करायचं माणसानं. आपली माणसं तर बाजु बदलतातच पण आता या निसर्गानं सुद्धा तिचीच बाजु उचलुन धरावी. पारिजात आणवला मी, लावला माझ्या अंगणात, वाढवला मी, फुलवला मी एवढेच काय या वा-याला मी त्या फुलांचा स्वर्गीय सुगंध त्याच्या अंगाखांद्यावर खेळवायला दिला तर हा क्रुतघ्न सगळी फुलंच तिच्या अंगणात नेउन टाकतो.


का वारा ही जगासारखा...
तिचाच झाला पाठीराखा...
वाहतो दॊलत तिज सारी...

बहरला पारिजात दारी...
फुले का पडती शेजारी...


हर्षद.

Sunday, December 5, 2010

मिंटीच्या जन्मस्थानी..

मिंटीच्या जन्मस्थानी....

गेल्या शुक्रुवारी  म्हणजे ३ डिसेंबारला टिम फियाट ईंडिया व फियाट ईंडिया च्या वतीने, सर्व फियाट्च्या गाड्या वापरणा-यांसाठी फियाट्च्या रांजणगांव येथील फॆक्टरीच्या भेटीचा कार्यक्रम योजला होता. माझी एखाद्या गाडी बनवणा-या कारखानाल्या भेट देण्याची पहिलीच वेळ होती.पुढ्च्या महिन्यांत माझी मिंटी दोन वर्षांची होईल,त्या आधीच तिच्या जन्मस्थानी जाणं ही तिच्यासाठी एकप्रकारे तिच्या वाढदिवसाची भेट्च होती.

शुक्रुवारी सकाळी मी मिंटी मधुन व शांतिश त्याच्या मल्टिजेट मधुन बालेवाडी जवळच्या हॊटेल विट्स मध्ये पोहोचलो. तिथे आधिच बरेच पुंटो व लिनिआ आलेल्या होत्या. थोड्याच वेळात येणा-या घुं॓॓॓॓॓॓॓॓॓ आवाजाने प्रगल्भ भंडारीच्या आगमनाची वर्दी दिली. मग आम्ही अमोघला भेटलो, अमोघ टिफिईं चा पुण्यातला कोऒर्डिनेटर आहे. त्याच्या चेह-यावर लग्नाच्या कार्यालयांत मुलीच्या मामाच्या चेह-यावर असतात तसे भाव होते, काय हे किती उशीर, अजुन व-हाड (मुंबई टिफिईं चा ग्रुप) कसं नाही आला अजुन वगॆरे.

माझी व शान्तिश च्या पेलियो














आत मध्ये सगळ्यांसाठी नाष्टाची व्यवस्था केलेली होती, तिथेच टिफिईंचे टि-शर्टस पण मिळत होते, आम्ही नाष्टा करताना चेतन हिरेमठ पण आले, नंतर मुंबईच्या ग्रुप बरोबर संजीव हरिकांत पण आला. चला आमचा पॆलिऒचा ग्रुप पुर्ण झाला होता. इथेच फियाट्ची पुंटो स्पोर्टस ९० एचपी सुद्धा आणली होती. निघायच्या आधी फियाट ईं. चे सिओ ओ श्री. राजिव कपुर यांच्याशी भेट झाली. आपल्या कंपनीचे वाहन विकत घेणा-यांसाठी त्या कंपनीचा सर्वोच्च अधिकारी येतो ही गोष्ट खुप मोठि आहे, या साठी श्री. राजीव कपुर व टिम फियाट ईंडिया यांना धन्यवाद.

साडेन उ ला विटस मधुन निघालो, ते बाणेर - शिवाजी नगर - बंड गार्डन- येरवडा - वाघोली - शिक्रापुर मार्गे साडेअकराच्या सुमारास रांजणगावला फियाट्च्या कारखान्यात हा सगळा फियाट मेक गाड्यांचा ताफा पोहोचला. माझ्या माहिती प्रमाणे साधारण ७० ते ८० गाड्या होत्या एकुण.


माझी मिंटी  फियाट कारखान्यात

कारखान्यांत आत गेल्यावर थोडीशी माहीती व चहा/कॊफी/थंडपेय घेउन झाल्यावर एकुण जमलेल्यांचे दोन ग्रुप करण्यांत आले. त्या पॆकी आमचा ग्रुप पहिल्यांदा पॊवर्ट्रेन म्हणजे कारचे गिअर बॊक्स व ट्रान्समिशन ड्राईव्ह जिथे बनतात तो विभाग पाहायला गेला. तिथे फियाटच्या उपस्थित अधिका-यांनी अतिशय उत्तम प्रकारे व सर्वांना समजेल अशा पद्धतीने सर्व तांत्रिक माहीती सांगितली. आज पहिल्यांदा गिअर टाकतो म्हणजे काय होतं ते कळत होतं, गाडी चालवताना जेंव्हा ईंजिन ३००० आरपिएम ला फिरत असतं आणि मी सहज चवथ्या गिअर वरुन पाचव्या गिअर वर जातो, तेंव्हा खाली काय काय होत असतं याची कल्पना आली. विशेष म्हणजे हा विभाग त्याच्या सध्याच्या परिस्थितित शक्य आहे तेवढा स्वयंचलित आहे. आज गिअर बॊक्स व ईंजिन तयार करण्याच्या बाबतीत फियाट हे जगात अग्रगण्य आहेत, त्याचे कारण हा विभाग पाहिल्यावर समजतं. कुठेही रंग, तेल किंवा कशाचेही डाग नाहीत, उगीचच आरडाओरडा नाही, कसला गोंधळ नाही, प्रत्येक जण आपल्या नेमुन दिलेल्या मशिनवर फक्त लक्ष ठेवतो आहे, काम मशीनच करते आहे हे द्रुश्य खुप छान वाटलं.

या नंतर आमचा ग्रुप कार असेंब्ली प्लॆंट मध्ये गेला. आता खरंच गाडिच्या कारखान्यांत आल्या सारखं वाटत होतं. प्रत्यक्ष गाडी बनताना पाहणं हा एक खुप सुखद अनुभव आहे. या विभागांत सुद्धा जवळपास ४० टक्के काम हे रोबो करतात. प्रत्येक भाग आपोआप बेल्ट वरुन ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी येतो आणि रोबो त्यांच्या ठरलेल्या पद्धतीने तो पार्ट एकमेकांना जोडतात, सगळं काही अतिशय शिस्तबद्ध चाललेलं असतं. छोट्याशा स्क्रु पासुन ते पुढच्या/मागच्या काचा, टायर, ईंजिन सर्व काही पुढे पुढे चालत जाणा-या असेंब्ली लाईन वर जोडलं जात होतं. आम्ही पुर्ण विभाग फिरुन येईपर्यंत जवळपास ३ गाड्या पुर्ण होवुन बाहेर टेस्टींग व शेवटच्या क्वालिटी निरिक्षणासाठी तयार झाल्या होत्या. सध्या इथे फियाट्च्या पुंटो. लिनिआ व टाटाच्या मांझा या गाड्यांचं उत्पादन होतं.

आता पोटात भुक लागल्याची जाणिव होत होती, त्यामुळे सगळे जण त्यासाठी पुन्हा सकाळच्या एकत्र जमलेल्या ठिकाणी आलो. जेवणाची सोय देखिल अतिशय छान केलेली होती. जेवण झाल्यावर सर्व उपस्थित ग्राहक व फियाट्चे उच्च अधिकारी यांच्या मधील गप्पांचा एक अनॊपचारिक कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमाला सुद्धा श्री. राजीव कपुर स्वत: उपस्थित होते, त्यांच्या छोट्याश्या व छान भाषणानंतर एक छोटासा प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला. या मध्ये श्री. रवि भाटिया यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरं दिली. यानंतर दोन अतिशय सुखद आश्चर्याचे अनुभव सर्व उपस्थितांना आला. फियाट तर्फे सर्वांना दोन भेटी देण्यांत आल्या. एक म्हणजे फियाट्च्या ५०० या लक्झरी कारच्या आकाराचा अतिशय सुंदर माउस व सर्व गाद्यांसाठी टाकी फुल्ल होईपर्यंत इंधन, अगदी मोफत. सकाळ पासुन चाललेल्या छान पाहुणचाराचा असा शेवट कोणिच कल्पिला नव्हता.

मग ऒपचारिक गोष्टी पार पाडुन आम्ही परतीच्या मार्गाला लागलो.
माझी, शान्तिश व संजीव च्या पेलियो


हा सर्व कार्यक्रम अतिशय उत्तमरीत्या आयोजित केल्याबद्दल प्रथम टिम फियाट ईंडिया व फियाट ईंडियाचे अतिशय आभार. अशा प्रकारे आपल्या ग्राहकांना मान व अतिशय उत्तम सेवा देणारी फियाट ईंडिया ही भारतातली ऒटोमोबाईल क्षेत्रातली   नक्कीच एकमेव कंपनी असावी.




हर्षद

जगणं म्हणजे खाणं - मु. पुणे ०१ - भाग -०२

जगणं म्हणजे खाणं - मु. पुणे ०१ - भाग -०२

सदर्न स्पाइस

मागच्या वेळी सदर्न स्पाईस मधील जेवणा बद्दल बोललो होतो, तर आज नाष्ट्याविषयी.
येथे इतर उडुपी हॊटेल प्रमाणे मुख्यत: दक्षिण भारतीय पदार्थच मिळतात, पण त्यात ही वेगळेपणा आहे. इथे विशेष आहे ते चटण्यांचं. वेगवेगळ्या आणि मुबलक. उडिदाची चटणी तर वेगळी वाढतच नाहीत, एका वाडग्यात भरुन टेबलवर ठेवलेली असते,घ्या हवी तेवढी. अजुन एक खास पदार्थ म्हणजे लाल तिखट किंवा मसाला न घालता केलेलं सांबार. याच्या पिवळ्या रंगावर जाउ नका, चव घेउन पहा. ही खास चव बहुधा फक्त हळद, हिंग, कडिपाला आणि मोहरी /मेथि दाणे एवढयाचीच असते.

बाकी इडली,मेदुवडे,डोसे असतातच, पण त्या बरोबरच बॊम्बे उत्तप्पा हा प्रकार थोडासा पिझ्झाच्या जवळ जाणारा असतो. मस्त कांदा उत्तप्पा खरपुस भाजलेला,त्यावर लावलेली दाळ्य़ांची चटणी व बटाट्याची भाजी. हे सगळे लावुन त्यावर भरपुर लोणि लावुन हा उत्तप्पा दोन्हि बाजुनी पुन्हा खरपुस भाजला जातो आणि मग तुमच्या समोर येतो तो सांबार व चटणी सोबत. पण या उत्तप्प्याचीच चव एवढी सुंदर असते की त्या बरोबर काहि नसेल तरी चालेल.

साधा उत्तप्पा किंवा डोसा घेतला तर आल्याची चटणी जरुर मागुन घ्या, या झणझणीत चटणी बरोबर शिळा ब्रेड पण छान लागेल इतकी ही चटणी चांगली असते. अजुन एक खास बात म्हणजे की, दक्षिण भारतीय स्वयंपाकाच्या पद्धती प्रमाणे प्रत्येक पदार्थावर बाहेरुन घातलेली फोडणी, ती पण उड्दाच्या दाळिची. ह्या फोडणीत केलेलं उप्पीट, ज्याला इकडे उपमा म्हणतात व बटाट्याची भाजी ह्या पण चवीला पुण्यातील इतर तथाकथित उडुपी हॊटेल पेक्षा कितितरी छान लागतात.

रविवारी थोडंसं निवांतच उठावं, आवरुन इथं यावं आणि भरपुर नाष्टा करुन सरळ अलका किंवा मंगलाला जाउन एक पिक्चर पाहावा किंवा बाल्गंधर्व नाहीतर यशवंतराव चव्हाणला एखादं नाटक पहावं आणि पुन्हा दुपारी इथेच जेवायला यावं हा कार्यक्रम दोन महिन्यांत एकदा तरी होतोच.

तर मग मंडळी केंव्हा जातांय वॆशाली व रुपाली सोडुन एकदा वेगळं पण खरंखुरं साउथ इंडियन खायला.

हर्षद.

Thursday, December 2, 2010

जगणे म्हणजे खाणे - मु. पुणे. - ०१

नमस्कार आणि  अतिशय  धन्यवाद आपणा सर्वांना.
काल माझ्या ब्लॉग पहाणा-यांची  संख्या १००० ओलांडून गेली. हां फार मोठा भाग नाही पण मी जे काही लिहिले  ते इतक्या लोकानी वाचल याचा आनंद आहे. या पुढेही मी असेच लिहित राहेन आपण वाचत राहावे ही नम्र विनंती. 


या निमित्ताने माझ्या गा आणि खा पैकी खा वर आज लिहितोय. 
पुणे हे माझ्यासारख्या खाणा-यांचे शहर म्हणून प्रसिद्द आहेच, या  मालिकेत मी काही माझ्या आवडत्या होटल्स बद्दल लिहिणार आहे. मानून मालिकेचे नाव आहे जगणे म्हणजे खाणे - मु. पुणे. - ०१ 


काही व्याखा - खर्च - हां नेहमी दोन व्यक्तींसाठीच असेल आणि तो सुद्धा पोटभर म्हणजे  खुर्चीतून उठायला अंमल जड़ होइल एवढे ( डायेट मात्रा गुणिले 3 (किमान))  
नाश्ता- न्याहारी व चहा / कोफी 


तर मंडळी आजचं होटल आहे - सदर्न स्पाइसेस -
पत्ता - होटल आनंद कर्वे रोड च्या लेन मध्ये - शारदा सेंटर कड़े जाताना डावीकडे. 
प्रकार - प्युअर  व्हेज.   ---  वेळ - सकाळी ७ ते रात्रि ११ पर्यन्त. 
खाण्याचे प्रकार - नाश्ता व जेवण दोन्ही.  ---  मालक - श्री प्रसाद (माझ्या माहिती प्रमाणे)
खर्च - नाश्ता - रु ६० व जेवण रु १३०.
तर या तांत्रिक माहिती नंतर मुख्य विषयाकडे येवू,


ही जागा होटल पेक्षा ही मेस जास्त आहे. मुख्य मेनू  राईस प्लेट आणि ती सुद्धा फक्त राईस प्लेटच, उगाच ग्राहकांची मागणी म्हणून १/२ एमएम पेक्षा पातळ दोन चपाती वगेरे नाटक नाहित. आतल्या काउंटर वर पेसे देऊन कूपन घेतली की मोकळ्या टेबल मागच्या खुर्चीवर जाउन बसले की ५-६ कप्पे असलेली ताटं समोर येतात. त्यांत चटणी,भाजी, दाळ, दही वाटी व बोब्बी, म्हणजे फिंगर्स वाढले जातात. तो पर्यन्त आपण आजुबाजुला  पाहतो, इतर  गिर्हाईक बहुतेक आंध्रचे आणि बहुतेक टेक महिंद्रा वाले.  (मला पहिल्यांदा हे त्यांचेच केंटिन वाटले होते.)  तेवढ्यात वाढपी एका मोठ्या टोपल्यातुन घेउन छोट्या टोपल्याने भात वाढतो आणि त्यानंतर दूसरा त्यावर सांबार किंवा रस्सम. हवे असेल तर हे दोन्ही वाटीत पण मिळेल पण भाताच्या मानाने त्या खुपच छोट्या आहेत, अगदी आनंद / सुयोग वगेरे कार्यालयात श्रीखंड किंवा बासुन्दिला देतात ना तेवढ्याच. असो एखादा पक्का पुणेरी श्री.कोवेगे ना सांगुन मला पुण्याबाहेर काढायचा( आणि माझ्या कंपनीला माझी फार गरज आहे हो, दया करा तिच्यावर). आता चमचा वगेरे विसरा व हाताने तो भात कालवा आणि सुरु करा, चव अगदी  सेम तू सेम आंध्रा जेवणाची.  सांबाराचे कोतुक करे पर्यंतच भात संपला तर पुन्हा घ्या आणि यावेळी  रस्सम घ्या. याची ही चव भन्नाट आहे. जोडीला हिरव्या टोमिटोची लाल काळी चटणी, वांगे किंवा कोबीची भाजी व दही. पण दही आत्ताच न खाता शेवटी मद्राशी पद्धतीने पुन्हा भात घेउन त्यात दही व वरून थोड़े पाणी घालून ताक भात खाऊन बघा, त्यात थोड़ी पुड चटणी घाला एका अतिशय सुन्दर जेवणाची तेवढीच सुन्दर सांगता. 


इथल्या नाश्य्त्याबद्दल पुढच्या भागांत.
आपल्या प्रतिक्रिया जरुर नोंदवा.


हर्षद 

Tuesday, November 30, 2010

चांदोमामा.

आमच्या घराच्या खिडकीतुन घेतलेली ही चंद्राची काही छायाचित्रे.

हां एक दोन वर्षा पुर्वीचा, चंद्र थोडा तरुण असतानाचा फोटो.
हर्षद 




भाग -२ भुलेश्वर - एकदा जा नक्कीच...

पहिल्या भागाच्या प्रतिसादासाठी अतिशय धन्यवाद. काही फोटो राहले होते, ते तेंव्हा फार महत्वाचे वाटले नाहीत म्हणुन ते टाकले नव्हते, ते आता टाकत आहे. सर्वांना आवड्तील अशी अपेक्षा आहे.
हेमाड्पंती बांधकामाचा पुरावा या खांबांचा जोड पाहा,त्यात कोठेही काही भरलेले नाही.

या देवळांतच गर्भग्रुहाच्या बाजुला अश्या खोल्या आहेत, ज्या मध्ये विविध देवांची स्वतंत्र मंदिरे होती.

या आहेत,मंदिरात आत गेल्या गेल्या उजवीकडे असणा-या पाय-या,जे काही आहे ते या पाय-यांच्या वर आहे.

मंदिरात आत गेल्या गेल्या जी ओसरी आहे हे तिचं छत.

आणि हे एक आश्चर्यच होतं निदान माझ्यासाठी तरी,शंकराच्या मंदिरात चक्क शेषशायी विष्णुची प्रतिमा आणि मंदिर. हे जर चांगल्या अवस्थेत असतं ना तर...

त्याच वरच्या मंदिराचा जबळुन घेतलेला फोटो.

आता भुलेश्वरला जाणा-यांची संख्या वाढेल असं वाटतंय 
हर्षद 

Saturday, November 27, 2010

कट्यार काळजांत घुसली

किंचित मंद उजेड, दोन बॆठका, एक तसबिर,मागच्या कोनाड्यात मुरलीधराची मुर्ती आणि कुणाची तरी कुठेतरी जायची तयारी  चालु आहे.  अरे हि तर उमा, घर सोडायची तयारी करते आहे. हो पण तिच्यावर हे घर सोडायची वेळ का यावी? जाउन विचारावं का?  नको ही मोठ्या घरची माणसं आपण आपलं थोडं हातभर अंतर राखुनच रहावं. हे काय दिवाणजी पण आले, म्हणजे नक्की काहीतरी झालंय त्याशिवाय अशा मोठया हुद्द्यावरची माणसं सहजासहजी दिसत नाहीत होत हो.

थांबा थोडं इथंच आणि पाहु काय आहे प्रकार तो. काय ! छे छे हे कसं होईल, अशक्य असं कसं झालं. म्हणजे आता मला संगीत्तातलं काही कळत नाही पण पंडित भानुशंकर म्हणजे विश्रामपुरची शान होते, ते हरले कालच्या मॆफलित,आणि ते ही खानसाहेबांकडुन.

होय मित्रांनो, मी कट्यार काळजांत घुसली बद्दल बोलतोय. काल गेलो होतो पाहायला, बालगंधर्वमध्ये. यातली पदं माहित होतीच पण प्रत्यक्ष नाट्क पाहायचा योग काल आला, राहुल देशपांडेंनी खानसाहेबाची भुमिका केली आहे. आता नाटक दोन अंकी आहे, म्हणजे आधि किती मोठं होतो मला माहित नाही पण मोठं असावं असा अंदाज.

संगीत नाटक ही संस्था जिवंत राहिली पाहिजे, त्यासाठी या आमच्या पिढितली जे कलाकार उभे आहेत त्यापॆकी राहुल देशपांडे एक, त्याबद्दल त्यांचे अतिशय धन्यवाद व अभिनंदन. बाकी खेळ चांगला झाला. इतर कलाकारांची नावे काही लक्षात राहिली नाहीत, म्हणजे मध्यंतरात आम्ही वडे खायला गेलो होतो ना त्यामुळं थोडं चुकलंच.

सदाशिवची भुमिका करणारा अभिनेता पण खुप छान म्हणत होता पदं, खास करुन शेवटचं, खानसाहेबांनी अर्धवट ठेवलेलं ’ सुरत पियाकी’ जेंव्हा तो पुर्ण करतो ना ते अतिशय सुंदर म्हणलं.

तो आणि राहुल, या दोघांच्यात पदं म्हणताना होणा-या हालचाली आक्रमक होत्या, ही शास्त्रिय गायकांची पद्धत असते की संगीताची जादु माहित नाही, कारण माझे पण हात आपोआप हलत होते. मध्यंतरात काही जुन्या (म्हाता-या) पुणेकरांकडुन अंतु बर्वा आणि रावसाहेबांसारख्या प्रतिक्रिया ऎकायला मिळाल्या त्या अशा -

पुर्वी पदं पुर्ण म्हणायचे,ऎकलीत आम्ही, आता सगळे शॊर्टकट मारता आहेत.
राहुल वाटतो थोडा थोडा आमच्या वसंतरावांसारखा,पण तेजोनिधि गावं ते आमच्या अभिशेकीबुवांनीच हो.

मनांत म्हणलं, ह्यांना रथ पुढं सरकतोय याचं कॊतुक नाही तर त्याच्या वेगाबद्दलच शंका, असो उद्या आम्ही पण कुमार शानु आणि सुनिधिच्या गाण्यांबद्दल असेच बोलु,कोणि सांगावं.

बाकी माझ्यासारख्या ऒफिसला येताजाता कानाला इअरफोन लाउन हि गाणी ऎकणा-या साठी ती प्रत्यक्ष ऎकणे हा एक खुप छान योग होता. पार ’ लागी करेजवां’, ३ वेगवेगळ्या प्रकारानी गायलेलं ’ घेई छंद मकरंद’, ’ या भवनातील’ ’तेजोनिधि लोहगोल’,’ मध्येच आलेली रागमाला आणि शेवटचं ’ सुरत पियाकी’ ते ही दोन वेळा, एकदा खानसाहेबांच्या कडुन आणि नंतर सदाशिवाकडुन, म्हणजे आनंदाच मेळाच होता.

राजकवींची विनोदाची पखरण अतिशय उत्तम, त्या कलाकारानं अतिशय छान भुमिका केली आहे,’ आपल्या प्रेमळ परवानगीने आपला मुका’ हा द्वयर्थी संवाद लक्षात राहतो.

माझ्या स्वभावाला अनुसरुन काही तांत्रिक गोष्टी खटकल्याच, पंडितजी आणि खानसाहेब दोघांच्या तसबिरी तसबिर न वाटता फोटो वाटत होते. नेपथ्य थोडं अजुन सावरायला हवंय, विशेषत: हवेलीतल्या पाय-या रंगवायल्या हव्यात. तसेच, विंगेतुन येणारा प्रकाशामुळे कलाकार येण्याआधीच त्याची सावली रंगमंचावर येते,ह्या काही बाबी. खानसाहेबांचे दोन पुतणॆ प्रत्येकवेळी तानपुरा ठेवुन जाताना जी गडबड करतात तेंव्हा तो पडतो की काय वाटतो,त्याचं काहीतरी पाहायला हवं.

सदाशिव हवेलीत बद्री म्हणुन वावरतोय हे फक्त संवादातुनच सुचित केलं जातं हे थोडं खटकतं.तसेच राहुल देशपांडेंचा मेक अप ही जरा भडक वाटतो, केस सगळे काळे असताना डोळ्याखाली एवढि काळी वर्तुळं बरोबर वाटली नाहीत. अर्थात ही माझी मतं आहेत.

पण एकुणच या संगीत नाटकांच्या सुवर्ण काळात न जन्मल्याचा पश्चाताप जास्तच होतो आहे.

Thursday, November 25, 2010

भुलेश्वर - एकदा जा नक्कीच...


भुलेश्वर बरेच दिवस मनांत होतं पण होत नव्हतं शेवटी जुलॅ महिन्यात एका रविवारी जमवलंच. मी,अश्विनी,आई व ह्रुषीकेश होके मिंटी मँ सवार, निघालो. वारजे ते यवत साधारण १ तास लागतो.
यवतच्या अलीकडे - पूण्याकडुन सोलापुर कडे जाताना, उजवीकडे एक कालव्याच्या बाजुने रस्ता आत जातो, तोच रस्ता भुलेश्वरकडे जातो. एकदा उजवीकडे वळलं की सतत एक टेलिफोन टॉवर दिसत राहतो. तोच आपल्याला गाठायचा असतो हे लक्षात ठेवा. खबरदारी या गोष्टीची घ्यावी लागते की, शेवटचा घाट हा फार अवघड आहे, फक्त एक म्हणजे एकच चार चाकी जाउ शकते.
आता मंदिरा बद्दल - हे एका टेकडीवर असलेल्या पठारावर आहे. बाहेरुन मंदिर मोठ्या वाड्यासारखे दिसते. उन्हातुन आत गेलात तर वाटेल की समोर मुर्ती पण नाही आणि सग़ळा अंधार आहे. या अंधाराला थोडे डोळे सरावले की डाव्या बाजुला पहा एक दिड फुटी या मापाच्या ४ पाय-या आहेत.
त्या चढुन वर गेलात की मग आधी लक्ष जातं ते या नंदीकडे. अतिशय रेखीव्,प्रमाणबद्ध खुप मोठा आहे.
आता डोळे या पुढच्या मंदिरच्या भव्यतेच्या तयारीत असतांत्,आणि ती अशी आहे. मी फार लिहित नाही या छायाचित्रांनाच बोलु देत.
हे नक्षीदार खांब
हे छत तोलुन धरणारे गंधर्व (बहुधा, जाणकारांनी खुलासा करावा)
ही पिंड, ह्या पिंडीच्या खाली पुन्हा पिंडी आहेत, तसेच या पिंडीला असणा-या छिद्रातुन भुंगे बाहेर येउन त्यांनी यवन सॅन्याला पळबुन लावल्याच्या कथा हे पुजारी सांगतीलच.
आणि हे मंदिरातल्या नक्षीकामाचे असंख्य नमुन्यांपॅकी काही..
ही स्त्री गणेशाची प्रतिमा आहे, आम्ही पहिल्यांदाच प्रत्यक्ष पाहिली.
आणि ही बहुधा स्त्री कार्तिकेयाची (जाणकारांनी खुलासा करावा)
संपुर्ण मंदिराची, म्हणजे गर्भग्रुहाची बाहेरची भिंत अशा नर्तकींच्या मुर्तींनी नटवलेली आहे.
हे शिल्प गंगावतर्णासारखं वाटलं मला (पुन्हा तेच जा.खु.क.)
या जाळ्या अखंड दगडात कोरलेल्या आहेत.
सुरुवातीला भेटलेल्या नंदीचे जवळुन घेतलेले छायाचित्र
काही खांबावर अशा नर्तकी आहेत.
मंदिरात काही मॅथुन शिल्पं ही असावीत्,त्यातली काही पुन्हा लावण्याचा प्रयत्न केलेला आहे.
हे मुळ मंदिर संपुर्ण दगडी आहे, तर बाहेर्च्या बाजुला पेशव्यांनी या मंदिराचा मातीच्या बांधकामांत जिर्णोद्धार केलेला आहे.
पाउस पडायला सुरुवात झाल्यानं त्याची छायाचित्रे काढता आली नाहीत.
आपणां सर्वांना नम्र विनंती आहे की, पुण्यात असाल तर ३-४ महिन्यांत एकदा आणि नाहीतर जंव्हा याल तेंव्हा भुलेश्वरला जरुर भेट द्या.
हर्षद.

Monday, November 22, 2010

आज अचानक गाठ पडे ..

काही वर्षे झाली त्याचा शोध घेणं सोडुन दिल्याला, शाळेत असताना  विवेकानंद आणि काही इतर जणांची पुस्तकं वाचुन मनाचे विचार एकदम प्रग्लभ वगॆरे झाले असं वाटलं होतं आणि आयुष्याकडे पाहण्याचा द्रुष्टिकोनच बदलला होता. त्यात भर म्हणुन पुढच्या शिक्षणासाठी गावातल्या सिद्धस्वामी मंदिराची शिष्यव्रुत्ती मिळालेली आणि त्या साठी त्यांच्याच संस्थेच्या कॊलेजात जावं लागलं. तिथल्या त्या सकाळ संध्याकाळच्या प्रार्थना,ध्यान या मुळं तर सामान्य जीवनाबद्दलचं आकर्षणच नाहीसं झालं अशी वेळ आली होती.

शिक्षण संपलं आणि शेजारच्याच गावांत नोकरीवर रुजु झालो. द्र्र शनिवारी रविवारी गावाला यायचो, आई, बाबा व मोठी बहीण यांच्या सोबत दोन दिवस मजेत जायचे आणि परत नोकरीच्या गावी आल्यावर त्या सगळ्या गोष्टी फोल वाटायच्या. सहा महिन्यांतच आईनं मोहिनीचं, म्हणजे माझी मोठी बहीण, तिचं लग्न ठरल्याचं सांगितलं. मनांत विचार आला, बहुधा माझ्या नोकरी साठिच थांबले होते. पण जास्त काही विचार करेपर्यंत आणि बाबांबरोबर बोलायच्या आधी मोहिनी ताईचं लग्न झालं देखील. ती सासरी गेली आणि थेट दुस-या दिवशीपासुन आईचं ’ आत्ता मला होत नाही रे काम’ सुरु झालं. म्हणलं लग्नात तर छान होतं सगळं आणि एक दिवसांतच हे काय झालं.

मार्गशीर्ष संपला आणि नोकरीच्या गावावरुन परत गावी आलो की, मुलींच्या पत्रिका व फोटो दाखवणं सुरु झालं. बाबा या बाबतीत सगळं आईच्या मार्फत बोलणं करायचे. मनाचा ओढा, जीवन ध्येय, मानवी जीवनाची क्षणभंगुरता  वगॆरे गोष्टी आईलाच समजणं अवघड होतं त्यामुळं ते तिनं बाबांना सांगायचा काही संबंधच नव्हता, आणि दोन तीन वर्षे मी त्या परमात्यामाचा अभ्यास करत राहिलो आणि माझं लग्न फक्त आई बाबांच्या बोलणी, उपदेश यांचा भाग होवुन राहिलं. पण आइ अचानक गेली, त्या दुखा:त आणि बाबांच्या आणि मोहिनिच्या भावनात्मक बोलण्यापुढे माझं काही उपाय चालले नाहीत.पुढ्च्याच महिन्यांत माझं लग्न ठरलं आणि दोन महिन्यांत झालं सुद्धा.

मिनाक्षी दिसायला खुप सुंदर नव्हती पण ती आणि निसर्ग माझं मन संसारात रमवायला पुरेसं होते. लग्नानंतर महिनाभरात माझी बदली थोडी लांब झाली आणि ख-या अर्थानं मी आणि मिना संसारी झालो.

पण आज, हे काय समजण्याच्या पलीकडचं काहीतरी होतं आहे,

आज बहुधा सप्तमी असावी, बाहेर चंद्र फार मोठा नव्हता, एक दोन अवकाळी पाउस झालेले, हवेतला उष्मा कमी झालेला नाही, त्यामुळं खिडक्या उघड्या टाकुनच झोपलेलो, ज्या विषयसुखाची निर्भत्सना करायचो, ज्याला ह्या मर्त्य शरीराचे लाड म्हणुन कमी लेखायचो तेच लाड करुन आणि करुन घेउन या शरीराला निवांतपणा आलेला होता, खिडकीतुन मधुनच येणारी वा-याची चुकार झुळक मला दिलासा देत होती तर मिनाची अर्धवट समाधानी झोप चाळवत होती. तिच्या थोड्याश्या हालचालींनी काही वेळापुर्विच्या आणि त्याआधीच्या आठवणी जाग्या होत होत्या. झोप पण लागत नव्हती, जाग पण नव्हती. डोळा मिटतोय असं वाटलं की झुळुक यायची आणि मिनाच्या हाताची माझ्या खांद्यावरची पकड उगाचच घट्ट व्हायची.


आणि त्यातच, ओशोंनी वर्णन केलेली समधीवस्था अनुभवतोय की काय काहीच समजेना.

आज अचानक गाठ पडे ..
भलत्या वेळी भलत्या मेळी ..

अशीच एक वा-याची लहर आली, हळुच डोळे उघडले आणि कुस बदलुन मिनाला थोडं जवळ ओढावं असा विचार केला पण पुढं प्रत्यक्ष तोच उभा दिसला समोर, हो तोच तो ज्याच्या कितिक रुपांची, त्याच्या स्तुतींची पारायणं केली होती. तोच परमेश्वर, जगनियंता, गुढ वलयात आणि मंद प्रकाशात तोच होता होय नक्की.

नयन वळविता सहज कुठेतरी....
एकाएकी तुच पुढे....

आणि एकदम शहारलं सगळं अंग, मनाचा आणि मेंदुचा संबंध संपुन त्या दोन्हीच्या जागा आत्म्यानं घेतली होती. डोळे उघडले आणि त्याच क्षणी त्याच्या माझ्या मधले सगळे पडदे नाहीसे झाले काही क्षणांकरिता. मी त्याच्यात मिसळुन जातो आहे असं वाटलं. हे काय दिसतंय आपल्याला, हे खरं आहे का ते जे काही क्षणापुर्वी आपण अनुभवत होतो ते खरे होतं. माझी झोप आता उडाली होती. सगळ्या संवेदना जणु एकच जाणिव करुन देत होत्या. तेच हे आणि हेच ते. द्वॆत अद्वॆताचा फरक आणि एकात्मापणाची भावना बंधमुक्त होवुन सगळं त्या गुढ विलयामध्ये विलुप्त होत होतं.
दचकुनि जागत जीव निजेतुन...
क्षणभर अंतरपट उघडे...

त्याच वेळी मिनाचा हात पुन्हा खांद्यावर विसावला, पुन्हा विचार एका अद्वॆताकडुन दुस-या अद्वॆताकडे जाउ लागले. काही क्षणांआधिचं आम्हा दोघांचं अद्वॆत खरं की आता येणारा त्या अनादि नादाचं आणि माझं अद्वॆत खरं. पुस्तकातुन श्री. परमहंसांना असा अनुभव आला होता हे वाचलं होतं, पण मला ही तो यावा. एका क्षणांत मी माझी तुलना श्री.परमहंसांबरोबर करीत होतो तर दुस-या क्षणी माझ्या मिनाच्या हातातील बांगड्या माझ्या खांद्यावर रुतल्याची जाणिव होत होती.

गुढ खुण तव कळुन न कळुन .....
भांबावुन मागे पुढे .....

वाटलं हेच ते ब्रम्ह ज्याला भेटण्याची आपल्याला अतीव इच्छा होती, उत्कटता होती, त्याचा शोध घ्यायचा होता. हिच ती निसर्ग शक्ती जि आपल्याला खुणावत होती, आवाहन करीत होती. बहुधा माझ्या आणि मिनाच्या अद्वॆतच या परम अद्वॆतात परावर्तित होत होतं. अहं चा अहं ब्रम्हास्मि होत होता. प्रक्रुति आणि पुरुष यांच्या सर्वव्यापी रुपात आम्ही पोहोचलो होतो असं वाटत होतं. पण मला त्या गुढ विलय़ांत एकरुप व्हायचं होतं, त्या शक्तीला सर्व काही द्यायचं होतं, आणि हीच वेळ होती ती, दुसरी कोणतीही नाही.

गारुड झाल्यासारखा मी उठलो आणि पलंगावरुन उतरुन त्या प्रकाशाकडे जाणार तेवढ्यात मिनाचा आवाज आला, अहो खिडकी बंद करा ना जरा, गारवा सुट्लाय, पाउस पडतोय कुठेतरी, आणि तो चंद्र सुद्धा ....., वाटलं तिला सांगावं सगळं आणि निघावं, त्या दिव्या ज्योतीत मिसळुन जावं. पण तिचं ते ’ चंद्र सुद्धा म्हणुन छान हसुन संकोचुन त्या कुशीवर वळणं आणि वळताना चमकलेला मंगळसुत्रातला काळा मणि.

निसटुन जाई संधीचा क्षण .....

सदा असा संकोच नडे....

आज अचानक गाठ पडे ..

भलत्या वेळी भलत्या मेळी...


हर्षद.

Tuesday, November 2, 2010

हे सुरांनो चंद्र व्हा

हे गाणे मी पहिल्यांदा कॉपी पेस्ट्च्या वयांत ऎकलं, म्हणजे १७-१८चा असताना. दुरदर्शन वर बहुधा आरती पाटिल अश्या नावाची कोणी गायिका होती. आता नाव नक्की आठवत नाही, पण त्या काळांत गाणं जास्त लक्षात राहिलं ते त्या गायिकेच्या दिसण्यामुळं, तिचा चेहरा आणि तिची तवला वाजवणा-या कडं पाहतानाची नजर, त्या नजरेत एक प्रकारचा धाक होता किंवा अधिकार होता.

हे गाणं चारच ऒळींचं, अगदि टिपीकल नाट्यसंगीत, थोडेसेच शब्द आणि त्या बरोबरच्या सुर, आलाप, तानांच्या नाना हरकती. नाट्यसंगीत हा प्रकारच असा आहे की इथे मुळच्या रागदारीचे सुर, आलाप वगॆरे त्या थोड्याश्या शब्दांना जिवंत करतात की, मुळच्या सारेगमला हे शब्दांचं आवरण एवढं सुंदर बनवतं,की माझ्यासारख्या शास्त्रीय संगीताबद्दलच्या अगाढ अज्ञानी माणसाला सुद्धा हे संगीत नितांत सुंदर आणि जवळचं वाटतं.

तिचं झालं आहे भांडण जिवलगाबरोवर आणि तो निघुन गेला आहे. प्रेम हे असंच असतं प्रेमाच्या एका विशिष्ट काळांत कमालीची ऒढ,आपलेपणा ह्या गोष्टी स्वामित्वांत कधी बदलतांत कळत देखिल नाही,आणि त्यात ती गायिका,जेंव्हा त्याच्या प्रेमांत धुंद नसेल तेंव्हा सप्तसुरांच्या बर्षावात चिंब भिजणारी आणि भिजवणारी. खरंतर तो तिच्या आयुष्यांत येण्यापुर्वी हे सुरच तिचे जिवलग होते, पण आता तो ही आहे.

आज झाले काय की त्याला भेटायची वेळ टळुन गेली आणि तिला झाला उशिर तिचा रियाझ लवकर न संपल्यामुळं. गुरुजी म्हणाले देखिल कि आज तुझा आवाज जास्तच छान लागला होता, आणि त्या कॊतुकांत थोडा उशिर झाला खरा. पण त्याच्यातल्या पुरुषाला एवढं कारण पुरेसं होतं आणि तो चिड्ला निघुन गेला. मग आता अचानक एक पोकळी जाणवते आहे. मग हि पोकळी भरायला तिच्या मदतीला तिचे मित्र सुरच उभे नाही राहिले तर नवलच. कालिदासांच्या जवळ जसा मेघ होता तसा हिच्याकडं सुर होते, हक्काचे अगदी हुकुमत होती त्यांच्यावर. पण आता तर तो खुप दुर गेला असेल ते सुर पोहोचतील त्या पेक्षा खुप लांब.

तिला वाटलं की त्याच्या चिडण्याचं कारण पण हेच सुर होते, म्हणुन त्यांच्यावर पण चिडावं त्यांना रागवावं. तसं यावेळी राग काढायला जवळचं कुणीतरी हवंच होतं. तुमच्यामुळं तो गेला ना आता मी तुमच्यावर कशि रागावते ते पहाच. तिच्या रागाची कल्पना येउन सुर तिला म्हणाले बघ बाई आम्ही तुझे मित्र आता या क्षणी तुझ्या रागानं आम्हालाही दु:ख होतं आहे, आमची काही मदत होत असेल तर सांग करु आम्ही जेवढं जमेल तेवढं. अशा क्षणी तिला केवढा आधार वाटला या शब्दांचा. कोरड्या पडलेल्या विहिरीत एका कोप-यातुन अलगद एखादा झरा फुटावा आणि खालच्या तापलेल्या खडकाला त्यानं क्षणार्धात थंड करावं अगदी स्वताची वाफ झाली तरी त्याची पर्वा न करता तसं वाटलं तिला.

या जुन्या, न रागावणा-या मित्रांना तिनं मनापासुन धन्यवाद दिले आणि सांगितलं

हे सुरांनो चंद्र व्हा

तो गेला आहे लांब कुठेतरी काही ठावठिकाणा नाही, म्हणुन तुम्हीच आता चंद्र व्हा आणि तुमच्या चांदण्यांचे कोष बनवुन त्यांना माझ्या प्रियकराकडे पाठवा.सुर अगदी आनंदानं तयार झाले हे करायला पण, पण चंद्र होणं त्यांना समजलं, तो कुठं आहे ते पाहणं पण समजलं ठिक, मग हे चांदण्यांचे कोष कशासाठी गं? सुर असलं ते सुद्दा तिचे मित्रच होते त्याच्या ही आधिपासुनचे, थोडा त्याच्या बद्दल राग त्यांनाही होताच.

वाट एकाकी तमाची, हरवलेल्या माणसाची,

ती म्हणाली , अरे सुरांनो तुम्ही दॆवी आहांत,स्वयंभु आहांत पण तो तसा नाही. तो साधा माणुस आहे आणि आता तर चिड्लेला, रागावलेला. एकदा का राग आला ना की मग ओळखीच्या वाटा पण अनोळखी वाटायला लागतात, जवळची माणसं दुरची वाटतात, सगळा अंधार होतो,काही म्हणजे काही कळत नाही, अशावेळी आपलंच कोणितरी लागतं रे वाट दाखवायला. आज कितीतरी दिवसांनी त्याला भेटायचं होतं आणि त्यामुळं तर आज विरहिणि गातांना मी तुमच्या जवळ आले होते. मग तो चिडला गेला निघुन कुठेतरी एकटाच रागाच्या अंधारात, आणि या रागाच्या अंधारात तो नेहमीच्या वाटा देखिल चुकत असेल, कारण वाटा कधिच चुकत नसतांत, चुकतांत ती आपलीच माणसं, मग त्यांना परत नको का आणायला, सांगा बरं.

बरसुनि आकाश सारे अम्रुताने नाहवा

तेंव्हा आता तुम्हि चंद्र व्हा आणि तुमच्या चांदण्या या सा-या आकाशांत विखरुन टाका, जसा आषाढातला मेघ बरसतो ना तसंच आज तुमचं हे चांदणं बरसुद्या. तुमच्या या बरसणा-या चांदण्यांच्या अम्रुतधारांनी त्याला नाहवुन टाका, मग त्याचा राग शांत होइल आणि त्याला त्याची परतीची वाट ओळखु येउ लागेल.

Thursday, October 28, 2010

आत्महत्या

आत्महत्या ----

का करावी वाटते आत्महत्या, आणि ते सुद्धा वयाच्या २० -२२व्या वर्षी. 

जमलेले सगळे झालेल्या घटनेला अतर्क्य, अकल्पित वगॆरे म्हणत होते, पण आदर्शला का वाटलं असेल 

या मार्गानं जावं असं, असतील काही समस्या, प्रश्न आणि जटिल पण असतिल तरी हे पाउल घेण्याआधी सगळे इतर मार्ग संपल्याची खात्री केली होती त्यानं ? 

कोणि नसेल का भेटला त्याला जसा पार्थाला भगवान भेटला, आता मान्य कि पार्थ आत्महत्या करायला चालला नव्हता , पण एका क्षत्रियानं युद्ध नाकारणं म्हणजे आत्महत्याच होती की एका प्रकारे.त्याला आमक्लेश झाला होता किंवा होत होता,पण भदवदगीता ऎकुन त्याचा आत्मक्लेश दुर झाला.पण या मझ्या मित्राच्या बाबतीत असं म्हणणं बरोबर ठरेल का  कि त्याचा आत्मक्लेशच त्याच्या आत्महत्येला कारणीभुत ठरला.

दारु सिगारेट वगॆरे होतं पण व्यसन होईल इतकं नाही, एक दोन प्रेम प्रकरणं सुद्धा होऊन गेली आहेत. 

मी आता विचार करतो आहे, मी त्याच्या क्रुष्ण व्हायला हवं होतं का ? मी होऊ शकलो असतो का क्रुष्ण,सांगु शकलो असतो त्याला आमच्या दोघांच्या आयुष्यापुरती गीता ? करु शकलो असतो का त्याचा आत्मक्लेश दुर ज्यामुळे त्याने अशा प्रकारे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला नसता ?

असे बरेच प्रश्न आता पडत आहेत माझ्या मनाला पण मेंदु म्हणतो अरे वेड्या जर असं समजलं असं की त्याच्या दुखाचं कारणच तु आहेस तर, तर काय केलं असतंस? त्याची माहिती असलेली प्रेम प्रकरणं ठिक आहे पण असं समजलं असतं की तो कस्तुरी वरच प्रेम करतो आहे तर, मग तुझ्यातल्या क्रुष्णानं काय केलं असतं? उगाच नसतं विचार करु नकोस. काल पर्यंत तो होता आणि आता नाही हेच एकमेव आणि अंतिम सत्य आहे आणि तुला ही हेच ..........

क्रमश...

Thursday, October 21, 2010

मी मज हरपून

गा, मी सुरुवातीला सांगितल्या प्रमाणे माझी एक आवडती क्रिया.
माझा आवाज़  काही फार चांगला वगैरे नाही, वरचा सा खालचा ध हे मला समजत नाही. परन्तु ऐकतोय ती गाणी चांगली की वाईट हे समजते.

मला गाण्यातील स्वर आणि तालाच्या आधी, त्यातले शब्द भावतात. शब्दांच्या केलेल्या हरकती , खेळ यां कड़े माझे जास्त लक्ष जाते.  अनूप ज. यांचे भजन '' हे मैंया मोहि मैं नहीं माखन खायो'' याचे उत्तम उदहारण. सुरुवातीचे हे मैंया मोहि मैं नहीं माखन खायो आणि आता आई ऐकतच नाही अजुन तिला संशय आहे असे लक्षात आल्यावर झालेला बदल हे मैंया मोहि मैंनेही माखन खायो, हा बदल जेंव्हा समजतो तेंव्हा हे शब्दच सुर आणि तालाच्या सुन्दर कव्हर मधला मुद्देमाल आहे हे लक्षात येते.

आज लिहितोय ते मराठी मधील '' मी मज हरपून बसले ग '' या गाण्यात ही, पहिली दोन कड़वी शृंगार रसावर आधारित आहेत, गाणे बहुधा राधेला मनात कल्पुन असावे, अतिशय सुंदर गाणे आहे. पहिली दोन कडवी राधा तिच्या आणि कृष्णाच्या शृंगाराबद्दल सांगते आहे तिच्या सखीला, हो सखिलाच कारण तिच्या साठीच तर आहे तो सुरेख ग आणि आशा भोसलेंचा  आवाज. या गाण्यांत तर स्वत: श्रीरंग ही  या आवाजाला राधेचाच समजला असता.

' साखर झोपे मध्येच अलगद प्राजक्तासम टिपले ग ' ,  मी ५वी  - ६वीत असल्यापासून प्राजक्ताची फुले माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत, म्हणून ' प्राजक्तासम टिपले ग ' याचा याची देहि याची डोळा आणि याची हाती अनुभव आहे. आणि त्यात भर घातली ती चंद्रशेखर गोखालेंच्या कवितेनं
प्राजक्ता झाडावरुन ओघलतो
त्याच्या आवाज होत नाही
याचा अर्थ असा नाही की
त्याला इजा होत नाही ,
असो विषयांतर फार झाले,  प्राजक्ता  आणि  गोखले हे सगळे स्वतन्त्र विषय आहेत.

दुस-या  कडव्यात  राधेला दिव्याची वात आणि गज-यातून मोकळ्या होउन पसरलेल्या मोगा-याच्या  कोमेजल्या कळ्या  या सारख्याच  वाटताहेत.  एकीकडे पहाटेच्या मंद वा-याने होणारी  वातीची थरथर  तर दुसरीकडे तीच थरथर राधेत जागवतो आहे श्रीरंग.  राधेच्या या हालचालीनी  श्रीरंगाला पण  जाग आली आणि त्याने जो स्पर्श केला राधेला, त्या सुख स्वप्नात तिला वाटले की आपण  कालिंदी काठी असलेल्या झोक्यावर आहोत काय पण श्रीरंगाचा  स्पर्श आहे हे समजल्यावर तिला प्रथम लज्जेची जाणीव झाली पण नंतर त्या लज्जेतुन बाहेर येतांच ती उमलली आणि मग ती त्या झोक्यांवर झुलू लागली.

गाण्या मधल्या तिस-या  कडव्या तील' त्या नभ श्यामल मिठीत नकळत बिजलिसम लखलखले ग ' या ओळी भर उन्हाळ्यातच काय पण रिपरिप येणा-या पावसांत सुद्धा डोळ्यांसमोर  धुवांधार पावसाची  चित्रे  उभा करतात.
एवढ्यात बहुधा कुणाच्या तरी येण्याची चाहुल लागते आणि राधा लगेच आपल्या सखीला या शृंगार जालातुन बाहेर  काढताना म्हणते ''दिसला मज तो देवकी नंदन ', संपलच सारे  शृंगारचा पासून सपशेल फरकत आणि चक्क आता श्रीरंगा वरून राधा एकदम देवकी नंदन  पर्यंत  येउन पोहोचते.

 ज्या श्रीरंगाने राधेला प्राजक्तासम टिपलं ,  ज्याच्या श्वासांनि  ती थरथरली, ज्याच्या स्पर्शानी ती लाजली, उमलली आणि    झुलली, त्याच्या मिठीत बिजलीसम लखलखली पण, आता सांगताना मात्र कशी सांगते आहे  त्या लखलख प्रकाशांत दिसला तो कोण,  तो नभ शयामल श्रीरंग नाही, राधा म्हणते  '' दिसला मज तो देवकी नंदन , अन मी डोळे मिटले ग ''

या राधे कृष्णाच्या सुन्दर गीतांने मी या लेखन प्रकारची सुरुवात केली आहे आणि माझ्या क्षमते नुसार पुढे ही विविध गीतां बद्दल लिहेन.

धन्यवाद

माझा आणि तुमचा
हर्षद,

Tuesday, October 19, 2010

kahi aathvani

आताशा माझे पिल्लू ३ वर्षे १० महिन्यांचे आहे, कधी अड़ते कधी पड़ते. कधी त्याला समजावतो कधी रागावतो.
हे त्याच्या वागन्या पेक्षा माझ्या मूड वर जास्त अवलंबून असते.  नंतर उगाच विचार करतो बाबा पण असेच काही करायचे ना.

लहानपणी मी एकदा घरात काहीतरी माझ्या मनासारखे झाले नाही म्हणून चिडून बसलो होतो आणि मग घर सोडायला निघालो होतो, फकत बाबांची वाट पाहत होतो. अशासाठी की बाबा येउन माझा प्रश्न सोडवू शकतील अशी आशा होती. बाबा आले शालेतुन आणि घराबाहेर पाय-यावर बसून माझ्या बरोबर बोलत होते १० च मिनिटे. काय बोलले ते आता आठवत नाही पण ते जे काही होते बहुधा तोच माझ्या आयुष्याचा बेस झाला आहे.

मुंजित वडिलांना गुरु मानून जो गुरुमंत्र देतात ना हे त्या पेक्षा ही पवित्र आणि गंभीर होते, बाबा मला बहुधा आमच्या परिस्थिति बद्दल सांगत असावेत असे वाटतेय. मला समजले की नाही माहित नाही पण माझा राग मात्र शांत झाला होता.
आज पण गोंधळ झाला की आपोआप तो कोड excute होतो आणि गोष्टी सोप्या वाटायला लागतात.

आज मी बाप झाल्यावर माझ्या बाबांबद्दल विचार करतो तेंव्हा आपसुकच डोळे भरून येतात, मग वयामागे आणि वेळेमागे गेलेल्या आणि तिथेच अड़केल अशी भीती असणा-या मनाला पुन्हा वर्तमानात आणताना कष्ट होतात

हर्षद.

Sunday, October 17, 2010

Ga aani Kha

गा आणि खा , मराठीतील दोन सर्वात छोटी पण सर्वात महत्वाची क्रियापदे.
मला माझ्या आयुष्याचे सगळे खेळ समजावून सांगणारे, आणि आता मी सांगेन तुमच्या ही.

माना किंवा नको नो इश्यु पण हेच पाहिले आणि अंतिम सत्य आहे

इंग्लिश मध्ये म्हणे आय ऍम हे सगळ्यात छोटे अर्थपूर्ण वाक्य आहे, असो बापडे. आमच्या माय मराठीत मात्र गा आणि खा  ही क्रियापदे जवळ पास सगळे आयुष्य व्यापतात.  अर्थ काय अनर्थ सगळे यांतच येते.

माझ्या ब्लॉग वर तुम्हाला काही दिवसातच मेनू कार्ड पहायला मिळेल, आर्डर देण्यासाठी नहीं तर आर्डर कैंसल करण्यासाठी,
अशी जी तुम्ही कधी दिलीच नव्हती. चायाला जोडाक्षरे लिहायला जास्त वेळ  लागतो आहे. सुधारणा होइल ही अपेक्षा मी आणि तुम्ही दोघेही ठेवू म्हणजे बाई ठेवतात तसे , लफडी अशी असतात की कधी निस्तरता येत नाहीत.

पण अशी लफडी नसतील तर आयुष्य शर शय्येवर ( असले जड़ शब्द मला चालत नाहीत पण माझेच वजन .... असो हा वेगला विषय आहे) पडलेल्या  भीष्मा  सारखे होइल. दिरेक्टोर आपण पण कुणी ऐकतच नाही.

चला क्रमश करतो,  काय आहे  ल ला ळ करायचे अजुन जमत नाही.

आज दसरा कागदावरुन नेट वर सीमोलंघन करत आहे.

माझा आपला आणि कुणा कुणाचा

हर्षद.