Tuesday, May 24, 2011

स्टेट ऑफ द आर्ट - भाग ४

स्टेट ऑफ द आर्ट - भाग ४


आता माझे हात थरथर कापत होते, मी डिग्री पुर्ण करुन गावी आल्यावर आजोबांनी गावजेवण दिलं होतं तेंव्हाचा तो फोटो होता माझ्या लॅपटॉप वर त्यातला फक्त हेम्याचा चेहरा दिसत होता, कम्युनिकेटरला. कपाळावर, हातावर घाम आला होता, काय होतंय तेच सुचत नव्हतं, समजत नव्हतं. लहानपणापासुन आखाडाच्या विहिरीच्या देवीबद्दल आणि नंतर आजीबद्दल ब-याच गोष्टी ऐकलेल्या होत्या, त्या सगळ्या डोक्यात घुमायला लागल्या. तेवढ्यात पुन्हा कम्युनिकेटर अ‍ॅक्टिव्ह झाला आणि आता लिहिलेलं होतं ’ भ्याला का काय बे, मी हेम्याय.आखाडाच्या हिरितच हाय गेली २-३ वर्षे मुकाम.दुपारी लईच गलका आला आखाडात, म्हनुन वर आलो तर तु दिसला आखाडाची मोजणी चाललेली, मग ध्यानात आलं समदं का वाटण्या चाललेल्या आहेत.’
मी प्रेताहुन पण जास्त थंडगार झालो होतो, हाता पायाला मुंग्या आल्या होत्या, कोरड्या ओठावरुन जीभ फिरवुन पुढं काय लिहिलं जातंय ते वाचायला लागलो, तो मजकुर असा होता ’ हिरीतुन निघुन झाडाकडं यायलो तर जाम वडला गेलो एक्दम ,काय ध्यानातच नाय आलं, समजे समजे पर्यंत हितं आलो’
हे फारच विचित्र होतं,डोक्याच्या पलीकडचं. आता थोडं थोडं नॉर्मल होत होतो, एवढा वेळ मी शांत बसल्यानं सगळे अस्वस्थ झालेले होते, मंद्याचा आवाज आला ’ काय बे पुन्हा सुरु का हिशोब का पाढे शिकवु आता तुला.एवढे सगळे मोठे समजावुन सांगतेत ते काय चुलीत का सगळं, का पुण्याहुन आला म्हणजे लई जास्त कळतय तुला’ मी मंद्याकडं पाहिलं, आधीच तो माझ्यापेक्षा अंगानं डबल आणि त्यात आता चिडलेला आणि त्यात हा गोंधळ, त्याला कसाबसा उत्तरलो ’ होय हिशोब करतोय, थांबा जरा, काहितरी घोळ आहे.
स्क्रिनवर पुढचे शब्द उमटले ’ ते काय पांढरं होतं आन त्यावर एक दिवा लुक लुक करायला व्हता, तिथं पत्तर आलो आन झाडाला धरावं धरावं म्हनस्तोवर कायतर धक्का बसला एकदम आतच गेलो त्या पांढ-याच्या, काय कळेना काय समजेना, आखाडाचि व्हिर बि अमासेला अशीच अंधारी असतिय, कधि मधी आज्जी येती वर तवा बरं वाटतंय, नायतर एकला असलो ना का लय भ्या वाटतंय तितं.’
तितं, अरे माझी इथं बोबडी वळत होती, समोर जिवंत मंद्याची घाई चाललेली आणि आत हा गप्पा मारत होता, प्रवास वर्णन करत होता. रात्रिचे ९ वाजत आलेले आणि लॅपटॉपचि बॅटरी पण संपत आलेली, माझी तर शॉर्टच झाली होती. सगळ्यांना ऐकु जाईल अश्या आवाजात कसंबसं बोललो ’ मला जरा बरं वाटत नाही, अ‍ॅसिडिटी पण झालीय आणि जरा लुज मोशन पण होत आहेत दुपारपासुन, आपण उद्या सकाळी पुन्हा बसु आणि संपवु सगळं एकदमच, चालेल ना अण्णा.’ हे ऐकलं तसा मंद्या आणि गण्या भडकले,’ ते काय नाय, काय तो निकाल आत्ताच लावा आणि कांडकं मोडुन मोकळं करा, एका रातीतनं काय दुनिया इकडची तिकडं व्हायली का काय रे भाड्या, अर्धा तास त्यात डोकं घालुन बसलायस अन आता का उगा नाटकं करतोस रं?’ पुन्हा मंद्याच्या प्रश्न आला.
मी काहि बोलणार, तेवढ्यात अण्णांचा आवाज आला ’ मंद्या, तुच म्हणतोस ना इकडची दुनिया तिकडं होत नाही एका रात्रित, मग राहुदे उगा वाद वाढवु नका, आजची बैठक बास,उद्या सकाळी मात्र १० ला बसु आणि जेवणापर्यंत सगळं आटोपुन टाकु, गण्या तुझ्या बायकोला उद्यासाठी चांगली गव्हाची खिर अन चपात्या करायला लाव, सगळं व्यवस्थित होईल अन पाहुणे जातील तोंड गोड करुन. काय रे हर्षद ठिक ना बाबा, चला. मग जग्गनाथा निघतो रे मि. गण्या चल मला सोड बाबा घरापर्यंत तुझ्या कमांडर मधुन, मोटरसायकल वर काय जमणार नाय मला रात्रीचं.’ गण्या, जरा मंद्यापेक्षा थोडा शांत होता, तो उठुन गेला अण्णांबरोबर आणि हॉलमध्ये आता फक्त मि, शकुताई, आत्या, मंद्या आणि जग्गनाथ काका उरलो, आणि हो माझ्या खांद्यावर बॅग होति, त्यात लॅपटॉप होता त्यात हेम्या होता. पटकन उठुन मंद्याकडं न पाहता सरळ आमच्या खोलीकडं निघालो, तसा मंद्या बोलला ’ हर्ष्या, जुलाब लागलेत ना, धाकल्या बरोबर ओवा देतो पाठवुन, चावुन गिळ आणि पाणी पी ग्लासभर, झोप अर्धा तास अन मग ये जेवायला, वाट बघतोया सारी जण, आन हो आपली गडि माणसाची ताटं उचलल्यावर बाया जेवणार हायत, तुमच्यावानि नाय, मांड्याला मांडि लावुन बसले लग्नात बसल्यासारखं हरघडी.’
मी आणि शकुताई खोलीत आलो, मी एकदम अंग सोडुन दिलं पलंगावर आणि डोळे मिटुन पडुन राहिलो, शकुताईचा आवाज आला ’ काय रे काय होतंय तुला, जुलाब तर होत नाहित, चांगला सहा ते दहा बसुन होतास की बैठकीत, आणि आठवड्यात तिन वेळा हे आणि तु जाउन बसता तिथं राज गार्डनला तेंव्हा नाही वाटतं होत अ‍ॅसिडिटी, आजच झाली ती, सगळं पटकन संपलं असतं, हिशोब झाले असते, उद्या संध्याकाळ पर्यंत कॅश देतो म्हणाला होता ना मंद्या, तर तुला नस्त्या भानगडिच फार’ एवढं बोलुन शकुताई निघुन गेली, मग पुन्हा लॅपटॉप चार्जिंगला लावला आणि चालु केला, अपेक्षेप्रमाणे सगळ्यात आधी कम्युनिकेटर चालु झाला ’ च्यायला बंद कशाला केलं बे उगा, तिच्यायला त्या आखाडाच्या व्हिरित बि अंधार अन हितंबी तेच’ अक्षरं उमटली स्क्रिनवर, मी घाबरत घाबरत टाईप केलं, कॅन यु सी मी? ’, थोड्या वेळानं रिप्लाय आला, ’ एवडं इंग्रजी आलं असतं ना तर कदीचा वळसंग सोडुन गेलो असतो, तुजा बाप याला कारण हाय, तुला ठेवलं नेवुन सोलापुरला अन आम्हि इतंच खपलो बाबाच्या हाताखाली शेतात. दहावि कशी बशी करु दिली नशिब आमचं’
मी पण आता रोमन लिपीत मराठी सुरु केलं ’ मि दिसतोय का तुला ’ ’ नाय, मला कोणी बि दिसत नाय, दिसतय ते फक्त आत्मा, आता शरिराचा म्हव नाय -हायला हर्श्या. मंद्या,भरत कोळ्याच्या पोरीला घेउन निजायचा ना आखाडाच्या खोपटात तेंव्हा लय वाटायचं, भाड्याला धरावं अन ह्यानम्हनुन आपटावं तिथंच, अरं माझं लग्न तिच्यासोबतच ठराचं व्हतं, पन ह्याचं हे असलं समजलं कोळीकाकाला अन त्याच दिशी रातीला त्यानं फास घेतला शेतातल्या बाभळीला, च्यायला झाड तरं असं बाराचं बघ, माणुस मेला असंल नसंल, दिलं सोडुन खाली धाडदिशी, कोळी काका फासानं गेला का पडुन गेला कुणाला कळलं नाय, फक्त मी आणि आजी होतो तिथ, पण काय करता नाय आलं रे आम्सानी.’ आता त्याच्या कथेत मि गुंतलो होतो, सहज विचारलं, ’ का रे का नाही गेला तुम्ही वाचवायला?’ -त्यावर उत्तर आलं ’ इसरला का काय इतक्यात, अरे माळकरी होता रं तो, जोवर आत्मा शरिरात अस्तोय तोवर आमाला काय पण चान्स नव्हता, आणि खरं सांगतो कोळिकाका स्मशानात नेला तरि मेला नव्हता, उगा हट्टानं नाकात कापुस घातला अन मारला तिथं त्याच्या पोरानं.
तेवढ्यात खोलिचा दरवाजा उघडला अन मंद्याचा धाकटा मुलगा आत आला, एका वाटित ओवा आणि पाणि ठेवलं, थोडं वाकुन लॅपटॉप पाहिला अन पळुन गेला. मी हेम्याला सांगितलं ' मी मशीन चालुच ठेवतो आहे, एक वर्ड फाईल उघडुन ठेवतो, तुला काय सांगायचं आहे ते तिथं सांग. जेवुन येतो मी आता’ एवढं बोलुन ओवा खिडकितुन बाहेर टाकला पाणि पिउन बाहेर आलो, समोर अंगणात गण्या अन मंद्याची पोरं खेळत होती, धाकटा नव्हता त्यात. तिथंच एका खुर्चीवर बसुन त्यांचा खेळ पहायला लागलो, तेवढ्यात मंद्याचं धाकटं पोरगं आईला हाताला धरुन ओढत बाहेर घेउन आलं, आलं ते ओरडतच ’ ते बघ त्या खोलित काका हाय काका, माझा काका आलाय, त्या खोलीत. आत कॉटवर काका आलाय काका...


Print Page

Monday, May 9, 2011

स्टेट ऑफ द आर्ट - भाग ३

स्टेट ऑफ द आर्ट - भाग ३
लगेच नित्याला फोन लावला.’ नित्या, जाम लोच्या झालाय, अरे मशीन पुर्ण गंडलंय, काही कळत नाही, परवा आलो की डायरेक्ट घरीच येतो, तिथंच काय ते अपडेट वगैरे घेउन ये.’ एका दमात सगळं सांगितलं, त्यावर नित्याच्या एकच प्रश्न ’ **घाल्या, तुला कोणी सांगितलं होतं सरकारी मशीन घेउन जायला, इथं आधीच लफडे झालेत त्यानं, नेमकं तु घेउन गेलास आणि एचोनं इन्वेंटरी मागितली, कसातरी गप बसवलाय त्या रामकुमार चोप्राला आणि त्यात तु हे काहीतरी सांग नविनच,ये लवकर आणि ते काय झालं का मोजणी बिजणी?’
मी बोललो ’हो झालंय सगळं, आता संध्याकाळी बैठक आहे घरीच, आणि तु पण घरीच रहा नाहीतर जाल लगेच अप अ‍ॅंड अबोव करत, मग तुला काही कळायचं नाही मी काय बोलतोय ते, समजलं का आणि मिळणारे पैसे फक्त लोन प्रिपेमेंटला वापरायचेत, नाहीतर इथंच शकुच्या नावानं चांगली दहा वर्षाची एफडी करुन ठेविन.’ माझा आवाज जरा धमकावण्याचाच होता. ’ हां जसं काय तुमचे बंधु बसलेतच नोटा घेउन, झाल्या वाटण्या की घ्या मोजुन इथंच, माझ्याशी बोलल्याशिवाय काहीही फायनल करु नका,’ एवढं बोलुन त्यानं फोन कट केला. मी मनात म्हणलं, एवढं होतं तर यायचं रजा टाकुन, उगा तिथं बसुन ऑनसाईटसारखं गप्पा मारणार फुकाच्या. अजुन एक दोन वेळा लॅपटॉप चालु बंद करुन पाहिला, दरवेळी तेच होत होतं, म्हणुन मग बंदच केला आणि बाहेर आलो.
मंद्याच्या पोरानं हाक मारल्यावर किचनमध्ये आलो, मंद्याच्या बायकोनं भजी,पोहे,सांजा आणि चहा केला होता. शिकलेल्या तशा बेताच्याच पण मंद्या आणि गण्याच्या बायका भारी होत्या. आता बोलु नये असं पण दिसणं,वागणं,बोलणं आणि कामाला पण पुढं, हिशोबात चुक नाही की स्वयंपाकात, त्यामानानं आमचं प्रकरण जरा नाजुकच होतं, एकतर पुण्यात वाढलेलं आणि वडिल पहिल्या पिढीचे संगणक अभियंता, जेंव्हा सॅम पित्रोदा राजीव गांधीना शिकवायचा कॉम्प्युटर तेंव्हा हे दिवसाला ४-५ दुरुस्त करायचे आणि बिघडवायचे इथं पुण्यात. मग नंतर कुठुन तरी तैवानचा एक पत्ता भेटला, तिथं २-३ वर्षे काढली आणि परत आले ते ४ दिवसांत ३ प्लॅट खरेदी करायलाच.
खाउन भाच्या पुतण्यांशी बोलुन जरा बसेपर्यंत गावचे पाटील, जग्गनाथ काका आणि बाकीची मान्यवर मंडळी आली. ज्या हॉलमध्ये बसायचं होतं तिथं सगळी तयारी केली होती. या गर्दीत माझ्या बाजुनं उभं राहील असा एक जग्गनाथ काकाच होता बाकी कुणाशी फार संबंधच ठेवला नव्हता, त्याची कमतरता आता जाणवत होती. नमस्कार चमत्कार झाले, सगळी लोकं बसली. गावात एक रिटायर्ड मामलेदार आहेत ते मुख्य होते बैठकीचे, सरकारी माणुस आयुष्य कायद्यातच गेलेला म्हणुन मान मोठा होता त्यांचा,बिराजदार अण्णा त्यांचं नाव. आजोबांची पण बरीच घसट होती त्यांची.
मी, शकु आणि जग्गनाथ काका एका बाजुला तर गण्या, मंद्या आणि आत्याची मुलं दुस=या बाजुला बसले होते . ’अरे सुकाळिच्यानो, द्युत खेळायला बसला का काय बे, बायका नागवायच्या का काय एकमेकाच्या इथं, बसले समोरासमोर मांड्या उघड्या टाकुन. व्हा एकीकडं. पंच मंडळी बसा एका साईटला आणि जग्गनाथ तु का तिकडं रे, उगा शिंगं मोडुन वासराच्यात, इथं ये माझ्याबाजुला. गावात मी मोठा असलो ना तरी घरात तुच रे. दिवाळी पाड्व्याला तुझ्याच पायाला लागतात की रे हे मंद्या, गण्या आंघोळी करुन, मग लाज नाही वाटत आता त्यांच्यात बसायला जाउन.’ बिराजदार अण्णांचा एवढा दम ऐकुन जग्गनाथकाका मध्ये जाउन बसला आणि आम्ही पण सगळे एका बाजुला झालो आणि जग्गनाथ काकाच बिराजदार अण्णांशी कानडीत काहीतरी बोलणं सुरु झालं.
पुढचे तीन तास्र, बरीच वादावादी, रुसवे,फुगवे आणि पार आई बहिणीवरुन शिव्या देउन झाल्या, अगदी शकु,मायाआत्या समोर असल्यातरी कोणी तोंडं बंद ठेवली नाहीत. शेवटी एक सर्वसंमत तोडगा निघाला. एकुण जमिनिचे जग्गनाथ काका,आत्या.मंद्या,गण्या, मी आणि शकु असे सहा वाटे करायचे ठरले आणि मी, शकु, आत्या तिघंही गावात राहणार नव्हतो त्यामुळं आमच्या वाटच्या जमिनी गण्या व मंद्यानं विकत घ्यायच्या व आम्हाला पैसे देउन मोकळं करायचं ठरलं. आता प्रश्न आला जमिनिच्या किंमतीचा, बाकी सगळ्या जमिनीचे भाग सगळ्यांना मान्य होते, फक्त आखाडाचा सोडुन. मी आणि शकु गावापासुन लांब होतो त्यामुळं आम्ही दोघं अण्णा बिराजदार ज्या रेटला हो म्हणतील त्याला हो म्हणायचं असा सेफ गेम खेळत होतो, जेंव्हा प्रश्न आखाडाचा आला तेंव्हा मात्र जग्गनाथकाकांनी एकदम विरोधी पवित्रा घेतला. तिथुन जाउ घातलेला हायवे आणि विहीरचं पाणि हे दोन फार अवघड मुद्दे होते. पुन्हा बरेच वाद झाले. मग आधी झालेल्या वाटपाचे हिशोब करुन मग पुन्हा आखाडाबद्दल बोलायचं ठरलं,दोन तीन वेळा चहा झाला होता त्यामुळं बरीच जण जाउन मोकळं होवुन आले.
मी परत येउन पाह्तो तर शकु माझा लॅपटॉप घेउन बसली होती ते बघुन मी ओरडलोच ’ ए बये ते का आणलंयस इथं, आधीच बिघडलंय ते’ शकु म्हणाली ’ अरे एवढे हिशोब काय हाताने करणार आहेस, सत्तावीसचा सोड सहाचा तरी पाढा पाठ आहे का तुला?, मी तसाच पुढं जाउन लॅपटॉप घेतला, लॉगईन विंडो पर्यंत येउन थांबलं होतं, आता सेफ शटडाउन करायचं तरी लॉगईन करणं भाग होतं, ते केलं आणि सगळं व्यवस्थित चालु झालं, अर्धा जीव भांड्यात पडला, २-३ मिनिटं वाट पाहिली, विचित्र काही झालं नाही. मग एक्सेल चालु केलं, समोरचे जमिन हिशोबाचे कागद घेउन नव्या फाईलमध्ये डिटेल टाकले, सवयीने १० मिनिटात सगळे फॉर्म्युला टाकुन एक फायनल शीट तयार झाली. आता फक्त जमिनिचे रेट टाकले की लगेच सगळ्यांचे किती पैसे किती जमिनी सगळं लगेच समोर येणार होतं,
’ अरे हर्षद, दाखव रे काय करतोस रे, माझ्या पुतण्याकडं पण आहे असला कांट्युपर, तो दाखवत असतो सिद्धीविनायक, साईबाबा वगैरे’ अण्णांचा आवाजा आल्यावर त्यांच्याकडं गेलो, त्यांना दाखवलं काय केलंय ते. माणुस सरकारीच,हिशोव म्हणले की कागदावर असु देत का स्क्रिनवर लगेच समजुन घेतले आणि हसुन माझ्या पाठीवर थाप मारली ’बेस्ट, एवढं शिकल्याच्या घराला काहीतरी उपयोग झाला आज’ असं म्हणुन माझ्या शिक्षणाची इज्जतच काढली. मी तिथंच बाजुला बसुन राहिलो. सगळे आल्यावर अण्णांनी फक्त महत्वाच्या माणसांनाच बसायला सांगितलं’ इथुन पुढं पैशाची बोलणी आहेत,उगा गावगप्पा नाहीत, जे पैसे देणार आहेत का घेणार आहेत ते आणि २ पंच एवढेच इथं थांबा, बाकीचे निघा गप घराकडं’, अण्णांचा आवाज ऐकुन बरीच मंडळी निघुन गेली, त्यात मंद्या आणि गण्याचे दोन तीन मित्र होते, ते गेल्यानं मला खुप बरं वाटलं. आता सगळे जवळ जवळ बसलो होतो. मंद्या कागदावर आणि मी लॅपटॉपवर एक एक रेट टाकत होतो. पहिला रेट टाकला रु. दिड लाख एकर, दुसरा अडीच लाख असं करत करत १२ जमिनींचे रेट टाकुन झाले फक्त आखाड उरला होता. एवढ्यांचा हिशोब केला, माझ्या आणि मंद्याच्या हिशोबाला जेवढा वेळ लागला तेवढाच जास्त फरक रकमेत होता. मंद्यानं सांगितलेले आकडे ऐकुन मी चिडलोच कारण स्क्रिनवर दिसणारे आकडे फार जास्त होते. जग्गनाथकाकांनी मंद्याच्या हिशोब तपासला, बरोबर होता. मी शकुला बोलावलं तिनं पुन्हा एकदा पाहिलं तर सगळीकडे रेट मध्येच फरक होता. मी थोडा खजील झालो आणि पुन्हा एकदा रेट टाकायला सुरुवात केली, रेट टाकला की बदलायचा म्हणुन पुन्हा सगळ्या सेल चेक केल्या, तरी तेच. मग सगळे डिटेल्स दुस-या शीटवर, दुस-या फाईलमध्ये टाकुन पाहिले तरी तेच होत होतं.
शेवटी मी पण कागदावरचे हिशोब चेक करायला सुरुवात केली. थोडा ताण दिल्यावर सगळं आठवलं गणित आणि दहा मिनिटात जमलं देखील. तरी पुन्हा एकदा चेक करावं म्हणुन लॅपटॉप हातात घेतला तर एक कम्युनिकेटर विंडो उघडलेली होती आणि त्यात इंग्लिश मध्ये मराठी टाईप केलेला मेसेज होता ’ jaminike ret far kami sangatahet doghe aani to bhadkhvu anna pan tynna samil aahe, phasu nakos ' (जमिनिचे रेट फार कमी सांगताहेत दोघं आणि तो भाडखाउ अण्णा पण त्यांना सामील आहे . फसु नकोस’) इथं तर नेट नव्हतं त्यामुळं नितिननं पिंग करणं शक्यच नव्हतं मग हे कोण आहे पिंग करणारं, लॅपटॉप खाली ठेवुन काही दिसेना म्हणुन वर उचलुन घेतला आणि जवळुन पाहिलं. कम्युनिकेटरला लॉग इन केलेलं होतं - एच माडके आणि बाजुला फोटो होता.......................... हेम्याचा.
Print Page

Wednesday, May 4, 2011

स्टेट ऑफ द आर्ट - भाग २


स्टेट ऑफ द आर्ट - भाग २

दुपारी पंचायत ऒफिसमधलं काम झालं, नकाशे, सात-बारा घेउन झाल्यावर तलाठी का कोण आणि मोजणि करणारे दोन -तीन जण यांना सोबत घेउन निघालो. भर दुपारी उन्हात चालायचं माझ्याकडनं झालं नसतंच म्हणुन शेवटी जेंव्हा आखाडावर पोचलो, तेंव्हा मी झाडाखाली बसायचं ठरवलं, तलाठी पण बसले माझ्याबरोबर. आखाडाचे बांध कधी बांधुन घेतलेले नाहीत त्यामुळं इथं मोजणीला जवळपास निम्मं गाव आलं आहे. मी आपला, लॅपटॉप उघडुन हिशोब करत बसलो होतो, किती एकर जमीन, काय भाव आहे, मला किती मिळतील, कर्जाचं प्रिपेमेंट किती होईल. तेवढ्यात तलाठी जवळ आले. ’तु कुठं असतोस म्हणे आता, पुण्यात हिंजवडीला का?’ पुणे आणि आय्टि म्हणजे हिंजवडी हे एक पक्कं समीकरण झालंय आता. ’ नाही माझं ऑफिस कर्वे रोडला आहे, शारदा सेंटर’ मी तुटक उत्तर दिलं. ’ हां ते देशपांडॆनं बांधलेलं की, माहित आहे ती जागा कशी मिळवली त्यांनी ते’ इति तलाठी साहेब. पुढचा प्रश्न ऐकुन मात्र मी हादरलो एकदम ’ तुमच्या या लॅपटॉप मध्ये ते सविता का कविताभाभी तसलं नाही का काही?, काय आहे अजुन एक तास तरी जाणार ह्या गवतातुन मोजणी करायला, काय करणार इथं बसुन.’ आयला ही असली मागणी होईल असली मी अपेक्षाच केली नव्हती.’ नाही, नाही ओ, तसलं काही नाही माझ्याकडे, त्याला इंटरनेट लागतंय, इथं कुठलं कनेकश्न?’, पण तलाठी तो तलाठीच होता, त्यानं खिशान हात घालुन टाटा फोटॉन काढलं आणि म्हणाला ’असलं कसलं ओ तुम्ही आय्टि वालं माझा भाचा तर नुस्तं एमेस्सिआय्टि झालाय तरी पण ते पिडिफ आणुन देतंय आणि तुमच्याकडं नाही, काय उपयोग तुमचा. जाउ दे हे लावा, गावात टावर झाल्यापासुन एकदम फुल्ल स्पिड चालतंय हे’

हे प्रकरण चालु करुन दिलं की तलाठी जरा आमच्याबाजुनं वळॆल या शहरी समजुतीनं मी त्याचं फोटॉन घेतलं, तलाठ्यानं त्याच्या खिशातुन एक डायरी काढली, तिच्या एक पानावर युजर आयडि व दुस-याच पानावर पासवर्ड होता, आणि खरंच लगेच नेट सुरु झालं, मी क्रोम चालु करुन लॅपटॉप त्यांच्याकडे दिला, तसा तलाठी म्हणाले ’ खालीच ठेवा, आधीच हवा गरम, मग हे पण गरम होणार आणि बघणार पण गरमच, आणि किती चालेल बॅटरी का मध्येच खल्लास होतीय.?’ ’ चालेल एक दिड तास तरी’ मी म्हणालो. तसं तलाठ्यांनी सुरु केलं, सरकारनं संगणक प्रशिक्षण देउन एक प्रकाराने सोयच करुन ठेवली आहे. मग थोडा मोकळा वेळ होता म्हणुन मोजणी चालु होती तिकडं गेलो. इंजिनियरींगच्या पहिल्या वर्षाला कंपलसरी मोजमापाला गेलो होतो त्यानंतर टेप, फुट, मीटर या काहीतरी मोजायच्या गोष्टी आहेत हे विसरलोच होतो, घर घेताना यामुळं केवढा घोळ झाला होता, स्के.फुट च्या ऐवजी स्के. मीटर चे हिशोब केले होते. १५-२० मिनिटं उन्हात फिरलो, आता उन्हं सहन होईना म्हणुन परत येत होतो तोच तलाठ्यांचा आवाज आला, जरा जोरातच ’ ओ, माडके आय्टिवाले, हे काय झालंय बघा एकदम, काय काय आलंय बघा एकदम.’ मी पळायलाच लागलो, कारण इथं सर्व्हरला जोडलेलं नसल्यानं दोन दिवसात अ‍ॅंटीव्हायरस आणि मालवेअर अपडेट झालेले नव्हते आणि आज यानं काहीतरी साईट उघडुन राडे  केलेले असणार नक्की. त्यापेक्षा माझ्याकडे होत्या त्या पिपिटी दाखवलेल्या परवडल्या असत्या, असं वाटायला लागलं.

झाडाखाली आलो, ठोके वाढलेले  उन्हातनं आणि गरम शेतातुन पळत येउन, त्यातच हे नविन टेन्शन. पाह्तो तो काय, ७-८ वर्ड, १०-१२ एक्सेल, ४-६ आयई आणि एक डिबगिंग विंडो ओपन झाली होती. हे पाहुन मी पण भंजाळलो जाम, आणखी एक घोळ झाला होता माझी सॅलरी स्लिप ओपन झाली होती  पिदिएफ रिडर मध्ये आणि तिच सगळ्यात वर होती, तलाठी बहुधा तिच वाचत असणार, आणि पैसे म्हणलं की याचं डोकं नको तिथं चालायला सुरु होणार होतं. मग पटापट सगळं बंद केलं, पण ऑफिसचं कम्युनिकेटर काही केल्या बंद होईना, अगदी अल्ट+कंट्रोल+डिलीट करुन केलं तरी. पहिल्यांदा फोटॉन बंद करुन नेट बंद केलं मग विंडोज बंद केलं, पुन्हा सुरु होतंय का ते पाहिलं तर सुरु होताना नेहमीपेक्षा जास्त व्हायब्रेशन जाणवले. विंडोज सुरु व्ह्यायला नेहमीपेक्षा दुप्पट वेळ लागला आणि प्रचंड स्लो झाला होता लॅपटॉप. राईट क्लिक करुन रिफ्रेश करावं म्हणलं तर मोजुन १ मिनिट काही झालंच नाही.

तलाठ्यांकडं जरा रागानं पाहात मी पुन्हा सगळं बंद केलं आणि म्हणालो ’ या असल्या साईटमुळंच हे प्रॉब्लेम येतात सगळीकडं’ ’ असेल असेल, पण आमच्या घरी तर आम्ही सगळा पिक्चर पाह्तोय की एकदा पण काय होत नाही असलं’ तलाठी उत्तरले. पण तेवढ्यात बाकी सगळी मंडळी परत आल्यानं विषय तिथंच थांबला, मोजणी कारकुन, शेजारी आणि मंद्या सगळे परत आले. मोजणी कारकुनांनी कसले कसले नकाशे, उतारे आणि जुनी कागदपत्रं तलाठ्याला दाखवली आणि ते दोघं बोलत बोलत एका बाजुला गेले. मंद्यानं मला बाजुला बोलावलं आणि म्हणाला’ बरं केलंस, त्या भाड्याला इथंच बसवुन ठेवलंस, १५००० दिलंत मोजण्याला, तु ५००० दे त्यातले, मागचा भरत्याचा माळ १२-१४ फुट आत नेलाय उत्तर पुर्वेला, असं पण भरत्या गेल्यापासुन टॅंकर तिथुनच ये जा करत होते, टायरच्या निशाण्या दाखवल्या आणि नोटा दाखवल्या की गप्प झाला तो मोजण्या.’ मला जरा हसुच आलं, हे टायरच्या निशाण्यांचं लॉजिक जर पुण्यात पार्किंगला लावता आलं असतं तर मी आख्या पार्किंगमधुन माझी गाडी फिरवली असती टायरला पेंट लावुन.

मग तलाठ्यानं जो द्यायचा होता तो फायनल मोजमापाचा कागद दिला, मंद्या आणि तो त्याच्या गाडीतुन गेले आणि आम्ही बाकीचे घरी आलो. आता संध्याकाळी बैठक बसेपर्यंत निवांत होतो, म्हणुन खोलीत जाउन लॅपटॉप लावला चार्जिंगला आणि सुरु केला. सुरु लगेच झालं सगळं पण हात सुद्धा लावला नाही तोच ५-८ वर्ड फाईल ओपन झाल्या, सगळ्या रिकाम्या. मग त्यानंतर २-३ एक्सेल आणि शेवटी कमांड विंडो. पुन्हा अल्ट+कंट्रोल+डिलीट , पण पुन्हा तेच. विचार केला, तलाठ्यांनं जाम भारी लफडं केलेलं दिसतंय, तेंव्हा हे परवा पुण्यात गेल्यावर द्यावं नित्याकडं, फक्त ऑफिसच्या सिस्टिमला जोडण्यापुर्वी काहीतरी करावं लागेल, नाहीतर नसती पंचाईत.


Sunday, May 1, 2011

स्टेट ऑफ द आर्ट - ०१


स्टेट ऑफ द आर्ट - ०१

आज जरी मी तुम्हाला पुण्यात दिसत असलो तरी मी खेड्यातलाचं आहे. सोलापुरहुन अक्कलकोट्ला जाताना वळसंग नावाचं गाव आहे तिथला मी.पणजोबा इथं आले बिड-नांदेडकडुन आणि तिथंच सेटल झाले. या सगुण, साकार उंची ५’१०", वजन ७२ कि असणा-या मनुष्य देहाला माझ्या एकुलत्या एका आत्यानं ठेवलेलं नाव आहे हर्षद आज त्याचं हॅरी केलंय माझ्या लेकीच्या मामाच्या एकुलत्या एक बहिणिनं.आणि माडके या आडनावामुळं ऒफिसातले सगळे मला हॅम म्हणतात.

तर, आज मी चाललो आहे गावी, म्हणजे एक अतिशय महत्वाचे काम आहे.पाडव्यानंतर आठवड्यातच आजोबा गेले,आणि त्यानंतर आमचे जवळपासचे आणि लांबचे सगळे नातेवाईक गोळा झाले गेल्या दोन महिन्यात.अगदि बरोबर ओळखलंत. प्रश्न संपत्तीचाच आहे. मी, शकुंतला- माझी बहीण, जग्गनाथ काका, मोरया काकाची मुलं, मायाआत्या आणि बाबांची आत्या. असे, सगळे जण गोळा झाले होते. यापुर्वी जेंव्हा वाटणीचा विषय निघाला तेंव्हा आजोबांनी एका खोलीत बंद करुन घेतलं आणि हजारेंसारखं उपोषण सुरु केलं.

पण आता हे सगळं निस्तरणं भाग होतं, माझी आणि शकुताईची गरज होती, होमलोन प्रिपेमेंट करण्याची, जग्गनाथ काकांचा कर्ता मुलगा दोन वर्षापुर्वी अपघातात गेला, त्यामुळं त्यांना त्यांच्या म्हातारपणाची तरतुद करुन हवी होती. मोरया काकाची मुलं, गेली बरीच वर्षे गावातलं सगळं सांभाळत होती, मायाआत्या दसरा दिवाळीला जाउन येउन होती, आत्याआजी कडं बरीच जुनी कागदपत्रं होती, त्यांची भिती ती बाबा आणि काकांना नेहमीच घालायची, हेच काम तिची मुलं आणि आता नातु पुढं चालवत होते.

हे बघा आलं आमचं गावातलं घर, छे हो वाडा बिडा नाही हा. हेमंत,गणेश आणि मंदारनं बांधलंय हे २ वर्षापुर्वी, त्याच्या बांधकामाच्या वाळु सप्लायरबरोबर भांडुन येतानाच हेमंतला , म्हणजे जग्गनाथकाकाच्या मुलाला अपघात झाला, त्याची बुलेट सरळ धडकली होती ट्रकला का टॅंकरला आणि खेळ खल्लास. त्याचं लग्न ठरलेलं होतं तेंव्हा. नंतर २-३ महिने काका वेड्यागत झाला होता,इथं पुण्यात माझ्याकडंच होता. सुरुवातीला अनुष्कानं थोडि किरकिर केली, पण लांबवरच्या फायद्याची कल्पना दिल्यावर छान केलं माझ्या बायकोनं. मलाच काय तिच्या मम्मीडॅडीना पण कॊतुक वाट्लं.

तर तेच हे घर, गण्या,मंद्यानं आणि हेम्यानं त्यांच्यासाठी एक एक,आजोबांना एक,एक देवघर,एक किचन दोन हॉल आणि पाहुण्यांसाठी म्हणुन ४ अशा मजबुत मोठ्या मोठ्या १२-१३ खोल्या काढल्यात. आमचा भाग तसा दुष्काळीच,पण आमच्या आखाडाच्या विहिरिला पाणि असते कायम. आजोबांनी त्याकाळी सगळ्या प्रथा मोडुन गावच्या ब्राम्हण आणि लिंगायत जंगमांशी भांडुन आजीच्या हातुन विहिरीचं काम सुरु केलं होतं, त्यावेळी आजी ७ महिन्याची गरोदर होती, दोन महिन्यात आत्याचा जन्म आणि विहिरीला पाणि लागणं एकाच दिवशी झालं, तेंव्हा पासुन आजी त्या विहिरिला आपली बहिण मानायची. त्या विहिरिच्या भिंतीत एक कोनाडा आहे,ज्यात एक देविच्या आकाराचा दगड आहे. आजि दररोज तिथंच पहाटे अंधारात आंघोळ करायची,आणि विहिरिची पुजा करुन घरी यायची. दुष्काळी भागात एवढं मोठं घर झालंय ते या विहिरिच्या पाण्याच्या जीवावर, मंदारनं ६ वर्षात एकाचे तीन टॅंकर केलेत ते या आखाडीच्या विहिरीला पाणि आहे म्हणुन.

ज्या संपत्तीबद्दल बोललो ना ती तशी काही फार नाही. आमच्याच गावाच्या शिवारात आमच्या बापजाद्यांनी मिळेल तिथं मिळेल तशी जमिन घेउन ठेवली आहे, म्हणजे एकुण तेरा ठिकाणि मिळुन सतरा एकर जमिन आहे. सगळ्यात मोठा तुकडा, स्वामी मळा, इथं कधी काळी स्वामी समर्थ थांबले होते म्हणे. हा स्वामि मळा सलग ५ एकर आहे , बाकी गावाच्या सगळ्या दिशेला जवळ,लांब,ऒढ्याजवळ, कोरडी अशी सगळ्या प्रकारची जमीन आहे. गावातले लोक म्हणतात, गावात कुणिकडुन पण या माडक्याच्याच जमिनीतुनच यावं लागतंय, ते खरंच आहे’ ह्यात माझ्या बाबांचं काहीच कर्तुत्व नाही, शेवटची जमिन खरेदी केलेली होती आजोबांनी.आखाडाची, २ एकराचं रान ओढ्यापासुन ६ किमी लांब, म्हणुन त्यात काढलेली विहिर. त्या रानात माणसं राबली ती फक्त त्या विहिरीसाठिच, नंतर त्या रानात आम्ही कधी काही लावल्याचं मला तरी आठवत नाही. गवत मात्र जाम यायचं तिथं पण आम्ही काही कसली नाही कधी ती जमीन. मी सातवी नंतर सोलापुरला हरिभाईला आलो आणि डायरेक्ट ड्ब्लुआयटीतुन डिग्री झाल्यावरच परत गावाला गेलो. मग पुण्यात आलो, श्रि मॉड्युलर मध्ये वर्षभर मार्केटिंग केलं, नंतर तिथल्या साहेबाबरोबर दिशा जॉईन केलं, दोन वर्षानी विप्रो आणि आता युनीइन्फो मध्ये  आहे.

विप्रोतला हार्डवेअर मधला सहकारी नितिन माझा मेव्हणा झाला,दोन्ही बाजुनं,  म्हणजे मी अनुष्काच्या, त्याच्या बहिणिच्या प्रेमात पडलो आणि तो शकुंतलेच्या माझ्या बहिणिच्या. एक महिन्याच्या आत दोन्ही लग्नं उरकली. गेल्या वर्षी दोघांनी एमायटि जवळ ओम पॅरेडाईज मध्ये दोन प्लॅट घेतलेत. नितिन पण आता माझ्या बरोबरच आहे आयटि सिस्टिम एडमिन मध्ये.

आज मी आणि शकु दोघंच गावी आलो आहोत. आता दुपारी पंचायत ऒफिसमध्ये जायचं आहे, तलाठी का कोण येणार आहे, मग मोजणी आहे म्हणे शेताची. मग वाटणी संध्याकाळी घरातच होणार आहे. जग्गनाथकाकाचा यात मुख्य भाग असेल. तसं तर गण्या आणि मंद्यापण गावात वजन मिळवुन आहेत. पण काय होतंय ते सांगता येत नाही. कारण अशा वाटण्यात सिनियर सिटिझनच्या मताला फार महत्व देतात असं ऐकलंय. आज मोठा प्रश्न आहे तो आखाडाच्या माळाचा कारण तिथं काही पिकवलं नसलं तरी नवीन हायवे  त्याच्याबाजुनं जाणार अशी चर्चा आहे. आणि त्या विहिरीच्या बाजुला एक मोठं हॉटेल काढलं तर जाम पैसे मिळतील. आज पर्यंत दुर्लक्ष केलेला तो आखाडाचा तुकडा आता महत्वाचा ठरला आहे.