Tuesday, December 28, 2010

पण तुमचं आमचं सेम नसतं..

प्रेम म्हणजे प्रेम असतं पण तुमचं आमचं सेम नसतं..

कॊलेजच्या शेवटच्या वर्षी मी प्रेमात पडल्याची मला खात्रि झाली होती आणि ती माझ्या मित्रांना पण असेल असं मला वाटत होतं. मी माझ्या आठवणींवर जोर दिला तेंव्हा असं लक्षात आलं की, हे सगळे मागच्या वर्षी म्हणजे दुस-या वर्षी सुरु झालेलं होतं. एका दिवशी माझा शर्ट आणि तिचा टॊप सेम टु सेम डिझाईनचा होता, काही मित्रांनी त्यावरुन चिडवलं आणि मनातल्या त्या कोमल प्रेमाच्या भावना वाढीस लागल्या. आमच्या कॊलेजातलं वातावरण फार मोकळं वगॆरे नव्हतं पण मुलं+मुली अशा शाळेच्या वातावरणातुन इथे आलेला मीच होतो, बाकी माझ्या ग्रुपचे सगळे फक्त मुलांच्या शाळेतुन आलेले होते.

प्रॆक्टिकल वगॆरे आम्ही एकत्रच असायचो तरी सुद्धा फार बोलणं वगॆरे नव्हतंच, फक्त समोर बसणं, कधीतरी फाईल, सबमिशन या वरुन बोलणं व्हायचं तेवढंच. तरी पण असं वाटायचं की आता जे मला वाटतंय तेच तिला पण वाटत असणार आहे. अशा विचारात एक वर्ष कसं गेलं ते कळालंच नाही. त्या वेळी १४ फेब्रुवारी पेक्षा १४ नोव्हेंबरलाच अजुन जास्त महत्व होतं निदान आमच्या लेखी तरी. नाही म्हणायला मी एकदा आमच्या वर्गातल्या सगळ्या मुलींना आमच्या घरी नाष्ट्याला बोलावलं होतं, ती पण आली होती.

त्यादिवशी त्या सगळ्यांना सोडायला गेल्यावर गेलाबाजार दोस्तीचा तरी विषय काढायचा असा माझा विचार होता, पण ते सोलापुरातले रस्ते, रहदारी छे सगळंच माझ्या नशीबाच्या विरोधात होतं. हात हलवत आणि पायडल मारत परत आलो घरी. पण तिस-या वर्षी मात्र एकदा घरुन कॊलेजला जाताना तिच्या रस्त्यावरुन गेलो होतो, बरोबर तो रस्ता आधी ब-याच वेळा पाहुन ठेवलेला होता, दोघंही सायकलवर, नव्हं एकाच नाही आपल्या आपल्या, मागुन जात असताना सायकल जरा जोरात दामटली आणि तिच्या बरोबर जाउन तिला विचारलं, मुझसे दोस्ती करोगी?

आणि काय सांगु मंडळी माझा अंदाज कधी नव्हे ते बरोबर आला, अगदी मनकवडी होती ती, लगेच माझ्या मनातलं ओळखुन बोलली ती हं............... नाही. आज लक्षात येतंय की हिंदीतुन विचारलेल्या माझ्या प्रश्नाला तिनं दिलेलं मराठी उत्तर हे सध्या गाजणा-या भाषाप्रश्नाचं मुळ आहे. तिनं नाही म्हणल्याबरोबर मी ज्या स्पीडनं सायकल चालवली म्हणता की विचारयाची सोय नाही. त्या वर्षी कॊलेज संपताना आमच्या कडे स्क्रॆपबुक भरायची फॆशन होती, त्यात सगळ्यांच्या म्हणजे सगळ्या मुलींच्या स्क्रॆपबुकात एकच ओळ लिहिलेली होती - छोटीसी ये दुनिया पहचाने रास्ते हॆ तुम कही तो मिलोगे कभी तो मिलोगे तो पुछेंगे हाल....

नंतर त्यातल्या काही भेटल्या काही आजपर्यंत कधीच नाहीत, कधी भेटतील माहित नाही. आज जर तिनं हे वाचलं तर तिच्या पण मनांत त्या आठवणी उभ्या राहतील तशाच आणि एक रात्र जाईल अर्धवट झोपेत अर्धवट जागेत, तिची आणि माझी पण.

आज वाटतं जे मी केलं ते प्रेम नव्हतंच ते फक्त आकर्षण होतं, प्रेम तर अजुन होतंय, मी अजुन पर्यंत माझ्यावरच्या प्रेमातुनच बाहेर पडत नाहिये तर दुस-या कोणावर काय प्रेम करणार आहे.

हर्षद

वाचकांना नम्र विनंती बरा वाईट जो असेल तो प्रतिसाद द्यावा.

Wednesday, December 22, 2010

गणपतीला वाजली थंडी

हो ह्या वर्षी म्ह़णजे गेल्या कित्येक दशकांत थंडी पडली नसल्यासारखी जाहिरात चालली आहे, या वर्षी पुण्यात थंडी पडल्याची. आज संध्याका़ळी स्टार माझा या चॅनेलवर बातम्यामध्ये या संदर्भात एक बातमी पाहिली.
पुणे येथील सारसबाग तेथे असलेल्या प्रसिद्ध गणपती मंदिरातील गणपतीच्या मुर्तीला गेल्या दहा वर्षांपासुन थंडिच्या मोसमात, चक्क लोकरीचे स्वेटर व टोपी घालतात म्हणे. एक दोन नाही तर चांगले आठ दहा सेट आहेत तेथे. तिथले पुजारी सांगत होते की या दिवसांत देवाला अभिषेक पण गरम पाण्याचा असतो.
यामुळे देव व माणुस या मधलं अंतरच मिटुन जातं आहे असं वाटतं, माणसानं जरुर प्रयत्न करावा देव व्हायचा आणि व्हावं देखिल त्याला ना नाही, पण देवाला असं सामान्य माणसाच्या पातळीला आणुन बसवावं याचं वाईट वाटतं.
हा प्रकार पण अंधश्रद्धेचाच किंवा अतिश्रद्धेचा प्रकार वाटतो मला.


Wednesday, December 15, 2010

न पटणारे शब्द..... भाग ०१


न पटणारे शब्द....
मला हे शब्द बाजीप्रभुंचे असतील असं वाटत नाही, अगदी कितीही काव्य अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार केला तरी सुद्धा.
सरणार कधी रण प्रभो तरी हे
कुठ्वर साहु घाव शिरी
बाजीप्रभुंचा इतिहास पुन्हा लिहावा ह्याची गरज नाही,त्या महात्म्याला माझे कोटि कोटि दंडवत. महाराजांना विशाळगडाकडे पाठ्वुन दिल्यानंतर मागुन येणा-या विजापुरी सेनेचा नायनाट करण्यासाठी घोडखिंडीसारख्या अतिशय अवघड ठिकाणाची निवड करणा-या त्या सेनानीच्या मनात असे विचार येणंच शक्य नाही. त्या रात्रिच्या त्या गोंधळात या अशा ठिकाणाची माहीती डोक्यात ठेवुन आणि तिचा असा योग्य वापर करण्याची बुद्धिमत्ता असणारी व्यक्ति असा पळपुटा विचार करणंच शक्य नाही.
पन्हाळ्याच्या वेढ्यातुन निघाल्यावर घोडखिंडितुन महाराजांना पुढे पाठवायचा निर्णय जेंव्हा बाजीप्रभुंनी घेतला असेल, तेंव्हाच त्यांना व बरोबर असलेल्या बांदल सेनेला आपले भविष्य माहित होतंच. ही लढाई अनपेक्षित नव्हतीच, जाणुन बुजुन समजुन उमजुन अंगावर घेतलेले हे रण होतं.
महाराज घोडखिंडीतुन निघाल्या पासुन ते विजापुरी सेना तेथे पोहोचेपर्यंत कितिसा वेळ मिळाला असेल त्या महाविरांना विचार करायला, आणि जो मिळाला असेल त्यात त्यांची एकच विचार केला असेल, आज माझ्या तलवारीनं किती मुंडकी उडवेन, किती हात पाय तोडेन. त्यातच काही जुनी वॆरं पण असतीलच. इथं काही मुत्सद्दीपणा वगॆरे पणाला लागायचाच नव्हता. काही दिवसांपुर्वी प्रतापगडाच्या पायथ्याला जे महानाट्य घडलं होतं ते आता मागं पडलं होतं, आज फक्त होणार होता तो रणमर्दिनी महिषासुरमर्दिनीला प्रसन्न करण्यासाठी शतमुंड किंवा सहस्त्रमुंड अभिषेक. होतं ते फक्त एकच ध्येय येणारा गनिम कापुन ठेवायचा.
माझा राजा सुरक्षित होईपर्यंत लढत राहायचं होतं पण ते झाल्यावर सुद्धा जिवंत राहण्याची शक्यता नव्हतीच, छे तो विचार नव्हताच कोणाच्या मनांत. उभा राहिलेली प्रत्येकजण दहा विस जणांना मारुन मरण्यासाठीच उभा होती. फक्त वाट पहात होते ते त्या विजापुरी सेनेची. गनिम आला की तोडायचा बास एवढेच, आपण तुटेपर्यंत त्याला तोडायचा. एकच ध्यास एकच आज्ञा होती मारा मारा आणि मारा. तो हरामखोर सुडाने पेटुन उठलेला गनिम या जागेच्या पुढे जाता कामा नये.
अफजलखानाच्या वधानंतर विजापुर दरबार सुद्धा पेटुन उठला होता, त्यांची ही शक्ती काही कमी नव्हती, जेवढी विरता मर्द मराठ्य़ांत होती तेवढीच त्यांच्यात पण होती. येणा-या लाटा या वादळीच असणार होत्या. आपल्या एका मोठ्या सरदारचा कत्ल आणि आता पन्हाळ्याचा वेढा या अशा पावसाळी रात्री तोड्णे ह्यांचं आश्चर्य ओसरेपर्यंत त्या विजापुरी सेनेला एक मोठा दिलासा मिळाला होता, या सगळ्यामागचा म्होरक्या सिवाजी पकडला गेला होता, पण हाय रे कंबख्त हे काय तो पण नकली. आणि हे समजल्यावर ते शांत थोडेच बसणार होते. शत्रुला नेस्तनाबुन करण्याच्या भावनेपेक्षा पुन्हा पुन्हा होणा-या या अपमानांचा बदला त्या सेनेला घ्यायचा होता. अपमान आणि सुडानं पेटलेली विजापुरी सेना आपल्यावर चालुन येणार आहे याची पुर्ण कल्पना बाजीप्रभुंना व त्यांच्या बरोबरीच्या मावळ्यांना होतिच.
मारु आणि नंतर मरु ही तयारी बाजीप्रभुंनी आपल्या साथिदारांची करुन घेतलीच असेल त्या मिळालेल्या थोड्याश्या वेळांत. मग तोच महाप्रतापी लढवय्या हे असं म्हणेल का ? नाही कधीच नाही.
क्रमश :

Tuesday, December 14, 2010

फिटे अंधाराचे जाळे (छायाचित्रे)

फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश
या ओळी मी दोन वर्षांपुर्वी काढ्लेल्या छायाचित्रांच्या माध्यमातुन सादर करीत आहे.










फिटे अंधाराचे

Monday, December 6, 2010

बहरला पारिजात दारी...

सत्यभामा राजवाड्याच्या गच्चीवर उभी होती , सकाळची सगळी कामं झाली, पुजा, नॆवेद्य वगॆरे, आज सगळं अगदी वेळेत झालं त्यामुळं मन कसं प्रसन्न होतं. बाहेर नुकताच हिवाळा सुरु होवुन काही काळ लोटल्यानं येणारा थोडासा निवांतपणा होता. किंचित धुकं आणि त्यातच द्वारकेतल्या घराघरातुन येणा-या धुरामुळे निर्माण होणारी तरल चित्रं पाहता पाह्ता अचानकच तिची नजर त्याच्याकडे गेली.

जेंव्हा हे एकदा स्वर्गातुन परत येताना याच्या फुलांची माळ घालुन आले होते, तेंव्हा पासुन माझं मन त्याच्या साठी फार झुरत होतं. नंतर एक दोन वेळा यांच्याकडे विषय काढला, पण छे आमचं कोणि ऎकेल तर शपथ. मग मी पण शेवटचं अस्त्र उचललं. त्या दिवशी स्वारी महालात आल्यावर पद्स्पर्श केला आणि आत निघुन आले. हे आलेच मागे मागे, आणि मग चांगले प्रहर दोन प्रहर समजावत होते, पण मी सुद्धा काही कमी नाही, एक शब्द बोलले नाही. पण काय सांगु अस्सा मनकवडा स्वभाव आहे म्हणुन सांगु यांचा. काही म्हणजे काही लपवता येत नाही मलातरी यांच्यापासुन. पण त्या दिवशी कबुल करुनच घेतलं मी सुद्धा.

काही दिवसांतच ज्यावर स्वर्गलोक फार मिजास करत होता, तो होय तोच तो पारिजात आमच्या, म्हणजे माझ्या अंगणात वाढु लागला. त्याला मी स्थान पण असं दिलं होतं की मुद्दाम तिला दिसावं की पारिजात स्वर्गानंतर फक्त माझ्याकडेच आहे, बाकी कुठेच नाही. पण जसा जसा तो वाढला आणि फुलु लागला काहि तरी वेगळंच व्हायला लागलं..

बहरला पारिजात दारी...
फुले का पडती शेजारी...

प्रेम असल्याशिवाय का कोणि हे असलं वेडं साहस करेल का ? सांगा ना, प्रत्यक्ष देवाधिदेव ईंद्राच्या उद्यानातुन त्याचाच अतिप्रिय व्रुक्ष घेउन यायचा हे काय साधं सुधं काम नव्हे.आता लोक काय म्हणायचे ते म्हणुदेत पण तरी ही यांचं प्रेम माझ्यावरच जास्त आहे. सगळे द्वारकावासी जरी तिला मोठी म्हणत असले तरी मला काही नाही, कारण यांचा जेवढा माझ्यावर जिव आहे, तेवढा कुणावरच नाही. पण कधि तरी संध्याकाळी मनांत आषाढ घनांसारखं मळभ दाटुन येतं आणि मनांत खोलवर झालेला घाव पुन्हा टोचायला लागतो. कधि तरी कॊमुदिनी चेष्टेत मला म्हणते, आता उठावं पट्टराणि आणि मग वाटतं हा राजवाडा, हा संसार, ही संपत्ती आणि त्यावर मुकुट्मणि असा हा पारिजात हे सगळं माझं तरी पण तिच का पट्टराणी, मी का नाही?

माझ्यावरती त्यांची प्रिती...
पट्टराणी जन तिजसी म्हणती...
दुख: हे भरल्या संसारी....

कधी कधी यांच्या लहानपणाच्या गोष्टी सांगतात ना यशोदाआई की हे म्हणे त्यांना चिडवायचे, दहि लोण्यासाठी खोटं बोलायचे. गोकुळांत जवळपास सगळ्या घरांत दुध, दहि आणि लोणि चोरुन झालं होतं. पण म्हणे गवळणी तक्रार घेउन आल्या की त्यांच्या नाही तर बलरामभावोजींच्या मागे लपुन राहायचे. अगदी  अस्सा साळसुदपणाचा आव आणायचे की आलेल्या गवळणीपण तक्रार सोडुन यांचं कॊतुक करायच्या. अरे हो अजुन सुद्धा हे तसेच करतात की काय, म्हणजे बघा मी समोर दिसले की मी सुंदर, जवळची , प्रेमाची आणि बोलणं तर अस्सं गोड की बस्स. या गोड गोड बोलण्यांत मला फसवत तर नाहीत ना ? माझ्यावर प्रेमाचं नाटक तर करीत नाहीत ना? मी पण तशी थोडी भोळसट्च आहे. ह्यांच्या थोड्याश्या गोड बोलण्याला सुद्धा भुलुन जाते, नको आता या पुढे हे असं होवु द्यायचं नाही असं नेहमी बजावते मनाला.पण काय हे समोर दिसले की सगळे संकल्प संपतात.
असेल का हे नाटक यांचे ...
मज वेडीला फसवायचे...
कपट का करिती चक्रधारी...

ते सगळं असेल तसं असु दे आता ह्यांच्या मागे लागुन हट्टाने मी हा पारिजात आणुन माझ्या अंगणात लावला, तो बहरला, चांगला फुलांनी लगडला, सगळं माझ्या मनासारखं झालं होतं. द्वारकावासी काय माझ्यापेक्षा तिला जास्त मान देतात ते पण मी सहन करते आहे, ह्यांची तिच्यावर जास्त माया आहे, असेल.पण आता तर हे काय बाई हद्दच झाली अन्यायाची, कित्ती म्हणुन सहन करायचं माणसानं. आपली माणसं तर बाजु बदलतातच पण आता या निसर्गानं सुद्धा तिचीच बाजु उचलुन धरावी. पारिजात आणवला मी, लावला माझ्या अंगणात, वाढवला मी, फुलवला मी एवढेच काय या वा-याला मी त्या फुलांचा स्वर्गीय सुगंध त्याच्या अंगाखांद्यावर खेळवायला दिला तर हा क्रुतघ्न सगळी फुलंच तिच्या अंगणात नेउन टाकतो.


का वारा ही जगासारखा...
तिचाच झाला पाठीराखा...
वाहतो दॊलत तिज सारी...

बहरला पारिजात दारी...
फुले का पडती शेजारी...


हर्षद.

Sunday, December 5, 2010

मिंटीच्या जन्मस्थानी..

मिंटीच्या जन्मस्थानी....

गेल्या शुक्रुवारी  म्हणजे ३ डिसेंबारला टिम फियाट ईंडिया व फियाट ईंडिया च्या वतीने, सर्व फियाट्च्या गाड्या वापरणा-यांसाठी फियाट्च्या रांजणगांव येथील फॆक्टरीच्या भेटीचा कार्यक्रम योजला होता. माझी एखाद्या गाडी बनवणा-या कारखानाल्या भेट देण्याची पहिलीच वेळ होती.पुढ्च्या महिन्यांत माझी मिंटी दोन वर्षांची होईल,त्या आधीच तिच्या जन्मस्थानी जाणं ही तिच्यासाठी एकप्रकारे तिच्या वाढदिवसाची भेट्च होती.

शुक्रुवारी सकाळी मी मिंटी मधुन व शांतिश त्याच्या मल्टिजेट मधुन बालेवाडी जवळच्या हॊटेल विट्स मध्ये पोहोचलो. तिथे आधिच बरेच पुंटो व लिनिआ आलेल्या होत्या. थोड्याच वेळात येणा-या घुं॓॓॓॓॓॓॓॓॓ आवाजाने प्रगल्भ भंडारीच्या आगमनाची वर्दी दिली. मग आम्ही अमोघला भेटलो, अमोघ टिफिईं चा पुण्यातला कोऒर्डिनेटर आहे. त्याच्या चेह-यावर लग्नाच्या कार्यालयांत मुलीच्या मामाच्या चेह-यावर असतात तसे भाव होते, काय हे किती उशीर, अजुन व-हाड (मुंबई टिफिईं चा ग्रुप) कसं नाही आला अजुन वगॆरे.

माझी व शान्तिश च्या पेलियो














आत मध्ये सगळ्यांसाठी नाष्टाची व्यवस्था केलेली होती, तिथेच टिफिईंचे टि-शर्टस पण मिळत होते, आम्ही नाष्टा करताना चेतन हिरेमठ पण आले, नंतर मुंबईच्या ग्रुप बरोबर संजीव हरिकांत पण आला. चला आमचा पॆलिऒचा ग्रुप पुर्ण झाला होता. इथेच फियाट्ची पुंटो स्पोर्टस ९० एचपी सुद्धा आणली होती. निघायच्या आधी फियाट ईं. चे सिओ ओ श्री. राजिव कपुर यांच्याशी भेट झाली. आपल्या कंपनीचे वाहन विकत घेणा-यांसाठी त्या कंपनीचा सर्वोच्च अधिकारी येतो ही गोष्ट खुप मोठि आहे, या साठी श्री. राजीव कपुर व टिम फियाट ईंडिया यांना धन्यवाद.

साडेन उ ला विटस मधुन निघालो, ते बाणेर - शिवाजी नगर - बंड गार्डन- येरवडा - वाघोली - शिक्रापुर मार्गे साडेअकराच्या सुमारास रांजणगावला फियाट्च्या कारखान्यात हा सगळा फियाट मेक गाड्यांचा ताफा पोहोचला. माझ्या माहिती प्रमाणे साधारण ७० ते ८० गाड्या होत्या एकुण.


माझी मिंटी  फियाट कारखान्यात

कारखान्यांत आत गेल्यावर थोडीशी माहीती व चहा/कॊफी/थंडपेय घेउन झाल्यावर एकुण जमलेल्यांचे दोन ग्रुप करण्यांत आले. त्या पॆकी आमचा ग्रुप पहिल्यांदा पॊवर्ट्रेन म्हणजे कारचे गिअर बॊक्स व ट्रान्समिशन ड्राईव्ह जिथे बनतात तो विभाग पाहायला गेला. तिथे फियाटच्या उपस्थित अधिका-यांनी अतिशय उत्तम प्रकारे व सर्वांना समजेल अशा पद्धतीने सर्व तांत्रिक माहीती सांगितली. आज पहिल्यांदा गिअर टाकतो म्हणजे काय होतं ते कळत होतं, गाडी चालवताना जेंव्हा ईंजिन ३००० आरपिएम ला फिरत असतं आणि मी सहज चवथ्या गिअर वरुन पाचव्या गिअर वर जातो, तेंव्हा खाली काय काय होत असतं याची कल्पना आली. विशेष म्हणजे हा विभाग त्याच्या सध्याच्या परिस्थितित शक्य आहे तेवढा स्वयंचलित आहे. आज गिअर बॊक्स व ईंजिन तयार करण्याच्या बाबतीत फियाट हे जगात अग्रगण्य आहेत, त्याचे कारण हा विभाग पाहिल्यावर समजतं. कुठेही रंग, तेल किंवा कशाचेही डाग नाहीत, उगीचच आरडाओरडा नाही, कसला गोंधळ नाही, प्रत्येक जण आपल्या नेमुन दिलेल्या मशिनवर फक्त लक्ष ठेवतो आहे, काम मशीनच करते आहे हे द्रुश्य खुप छान वाटलं.

या नंतर आमचा ग्रुप कार असेंब्ली प्लॆंट मध्ये गेला. आता खरंच गाडिच्या कारखान्यांत आल्या सारखं वाटत होतं. प्रत्यक्ष गाडी बनताना पाहणं हा एक खुप सुखद अनुभव आहे. या विभागांत सुद्धा जवळपास ४० टक्के काम हे रोबो करतात. प्रत्येक भाग आपोआप बेल्ट वरुन ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी येतो आणि रोबो त्यांच्या ठरलेल्या पद्धतीने तो पार्ट एकमेकांना जोडतात, सगळं काही अतिशय शिस्तबद्ध चाललेलं असतं. छोट्याशा स्क्रु पासुन ते पुढच्या/मागच्या काचा, टायर, ईंजिन सर्व काही पुढे पुढे चालत जाणा-या असेंब्ली लाईन वर जोडलं जात होतं. आम्ही पुर्ण विभाग फिरुन येईपर्यंत जवळपास ३ गाड्या पुर्ण होवुन बाहेर टेस्टींग व शेवटच्या क्वालिटी निरिक्षणासाठी तयार झाल्या होत्या. सध्या इथे फियाट्च्या पुंटो. लिनिआ व टाटाच्या मांझा या गाड्यांचं उत्पादन होतं.

आता पोटात भुक लागल्याची जाणिव होत होती, त्यामुळे सगळे जण त्यासाठी पुन्हा सकाळच्या एकत्र जमलेल्या ठिकाणी आलो. जेवणाची सोय देखिल अतिशय छान केलेली होती. जेवण झाल्यावर सर्व उपस्थित ग्राहक व फियाट्चे उच्च अधिकारी यांच्या मधील गप्पांचा एक अनॊपचारिक कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमाला सुद्धा श्री. राजीव कपुर स्वत: उपस्थित होते, त्यांच्या छोट्याश्या व छान भाषणानंतर एक छोटासा प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला. या मध्ये श्री. रवि भाटिया यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरं दिली. यानंतर दोन अतिशय सुखद आश्चर्याचे अनुभव सर्व उपस्थितांना आला. फियाट तर्फे सर्वांना दोन भेटी देण्यांत आल्या. एक म्हणजे फियाट्च्या ५०० या लक्झरी कारच्या आकाराचा अतिशय सुंदर माउस व सर्व गाद्यांसाठी टाकी फुल्ल होईपर्यंत इंधन, अगदी मोफत. सकाळ पासुन चाललेल्या छान पाहुणचाराचा असा शेवट कोणिच कल्पिला नव्हता.

मग ऒपचारिक गोष्टी पार पाडुन आम्ही परतीच्या मार्गाला लागलो.
माझी, शान्तिश व संजीव च्या पेलियो


हा सर्व कार्यक्रम अतिशय उत्तमरीत्या आयोजित केल्याबद्दल प्रथम टिम फियाट ईंडिया व फियाट ईंडियाचे अतिशय आभार. अशा प्रकारे आपल्या ग्राहकांना मान व अतिशय उत्तम सेवा देणारी फियाट ईंडिया ही भारतातली ऒटोमोबाईल क्षेत्रातली   नक्कीच एकमेव कंपनी असावी.




हर्षद

जगणं म्हणजे खाणं - मु. पुणे ०१ - भाग -०२

जगणं म्हणजे खाणं - मु. पुणे ०१ - भाग -०२

सदर्न स्पाइस

मागच्या वेळी सदर्न स्पाईस मधील जेवणा बद्दल बोललो होतो, तर आज नाष्ट्याविषयी.
येथे इतर उडुपी हॊटेल प्रमाणे मुख्यत: दक्षिण भारतीय पदार्थच मिळतात, पण त्यात ही वेगळेपणा आहे. इथे विशेष आहे ते चटण्यांचं. वेगवेगळ्या आणि मुबलक. उडिदाची चटणी तर वेगळी वाढतच नाहीत, एका वाडग्यात भरुन टेबलवर ठेवलेली असते,घ्या हवी तेवढी. अजुन एक खास पदार्थ म्हणजे लाल तिखट किंवा मसाला न घालता केलेलं सांबार. याच्या पिवळ्या रंगावर जाउ नका, चव घेउन पहा. ही खास चव बहुधा फक्त हळद, हिंग, कडिपाला आणि मोहरी /मेथि दाणे एवढयाचीच असते.

बाकी इडली,मेदुवडे,डोसे असतातच, पण त्या बरोबरच बॊम्बे उत्तप्पा हा प्रकार थोडासा पिझ्झाच्या जवळ जाणारा असतो. मस्त कांदा उत्तप्पा खरपुस भाजलेला,त्यावर लावलेली दाळ्य़ांची चटणी व बटाट्याची भाजी. हे सगळे लावुन त्यावर भरपुर लोणि लावुन हा उत्तप्पा दोन्हि बाजुनी पुन्हा खरपुस भाजला जातो आणि मग तुमच्या समोर येतो तो सांबार व चटणी सोबत. पण या उत्तप्प्याचीच चव एवढी सुंदर असते की त्या बरोबर काहि नसेल तरी चालेल.

साधा उत्तप्पा किंवा डोसा घेतला तर आल्याची चटणी जरुर मागुन घ्या, या झणझणीत चटणी बरोबर शिळा ब्रेड पण छान लागेल इतकी ही चटणी चांगली असते. अजुन एक खास बात म्हणजे की, दक्षिण भारतीय स्वयंपाकाच्या पद्धती प्रमाणे प्रत्येक पदार्थावर बाहेरुन घातलेली फोडणी, ती पण उड्दाच्या दाळिची. ह्या फोडणीत केलेलं उप्पीट, ज्याला इकडे उपमा म्हणतात व बटाट्याची भाजी ह्या पण चवीला पुण्यातील इतर तथाकथित उडुपी हॊटेल पेक्षा कितितरी छान लागतात.

रविवारी थोडंसं निवांतच उठावं, आवरुन इथं यावं आणि भरपुर नाष्टा करुन सरळ अलका किंवा मंगलाला जाउन एक पिक्चर पाहावा किंवा बाल्गंधर्व नाहीतर यशवंतराव चव्हाणला एखादं नाटक पहावं आणि पुन्हा दुपारी इथेच जेवायला यावं हा कार्यक्रम दोन महिन्यांत एकदा तरी होतोच.

तर मग मंडळी केंव्हा जातांय वॆशाली व रुपाली सोडुन एकदा वेगळं पण खरंखुरं साउथ इंडियन खायला.

हर्षद.

Thursday, December 2, 2010

जगणे म्हणजे खाणे - मु. पुणे. - ०१

नमस्कार आणि  अतिशय  धन्यवाद आपणा सर्वांना.
काल माझ्या ब्लॉग पहाणा-यांची  संख्या १००० ओलांडून गेली. हां फार मोठा भाग नाही पण मी जे काही लिहिले  ते इतक्या लोकानी वाचल याचा आनंद आहे. या पुढेही मी असेच लिहित राहेन आपण वाचत राहावे ही नम्र विनंती. 


या निमित्ताने माझ्या गा आणि खा पैकी खा वर आज लिहितोय. 
पुणे हे माझ्यासारख्या खाणा-यांचे शहर म्हणून प्रसिद्द आहेच, या  मालिकेत मी काही माझ्या आवडत्या होटल्स बद्दल लिहिणार आहे. मानून मालिकेचे नाव आहे जगणे म्हणजे खाणे - मु. पुणे. - ०१ 


काही व्याखा - खर्च - हां नेहमी दोन व्यक्तींसाठीच असेल आणि तो सुद्धा पोटभर म्हणजे  खुर्चीतून उठायला अंमल जड़ होइल एवढे ( डायेट मात्रा गुणिले 3 (किमान))  
नाश्ता- न्याहारी व चहा / कोफी 


तर मंडळी आजचं होटल आहे - सदर्न स्पाइसेस -
पत्ता - होटल आनंद कर्वे रोड च्या लेन मध्ये - शारदा सेंटर कड़े जाताना डावीकडे. 
प्रकार - प्युअर  व्हेज.   ---  वेळ - सकाळी ७ ते रात्रि ११ पर्यन्त. 
खाण्याचे प्रकार - नाश्ता व जेवण दोन्ही.  ---  मालक - श्री प्रसाद (माझ्या माहिती प्रमाणे)
खर्च - नाश्ता - रु ६० व जेवण रु १३०.
तर या तांत्रिक माहिती नंतर मुख्य विषयाकडे येवू,


ही जागा होटल पेक्षा ही मेस जास्त आहे. मुख्य मेनू  राईस प्लेट आणि ती सुद्धा फक्त राईस प्लेटच, उगाच ग्राहकांची मागणी म्हणून १/२ एमएम पेक्षा पातळ दोन चपाती वगेरे नाटक नाहित. आतल्या काउंटर वर पेसे देऊन कूपन घेतली की मोकळ्या टेबल मागच्या खुर्चीवर जाउन बसले की ५-६ कप्पे असलेली ताटं समोर येतात. त्यांत चटणी,भाजी, दाळ, दही वाटी व बोब्बी, म्हणजे फिंगर्स वाढले जातात. तो पर्यन्त आपण आजुबाजुला  पाहतो, इतर  गिर्हाईक बहुतेक आंध्रचे आणि बहुतेक टेक महिंद्रा वाले.  (मला पहिल्यांदा हे त्यांचेच केंटिन वाटले होते.)  तेवढ्यात वाढपी एका मोठ्या टोपल्यातुन घेउन छोट्या टोपल्याने भात वाढतो आणि त्यानंतर दूसरा त्यावर सांबार किंवा रस्सम. हवे असेल तर हे दोन्ही वाटीत पण मिळेल पण भाताच्या मानाने त्या खुपच छोट्या आहेत, अगदी आनंद / सुयोग वगेरे कार्यालयात श्रीखंड किंवा बासुन्दिला देतात ना तेवढ्याच. असो एखादा पक्का पुणेरी श्री.कोवेगे ना सांगुन मला पुण्याबाहेर काढायचा( आणि माझ्या कंपनीला माझी फार गरज आहे हो, दया करा तिच्यावर). आता चमचा वगेरे विसरा व हाताने तो भात कालवा आणि सुरु करा, चव अगदी  सेम तू सेम आंध्रा जेवणाची.  सांबाराचे कोतुक करे पर्यंतच भात संपला तर पुन्हा घ्या आणि यावेळी  रस्सम घ्या. याची ही चव भन्नाट आहे. जोडीला हिरव्या टोमिटोची लाल काळी चटणी, वांगे किंवा कोबीची भाजी व दही. पण दही आत्ताच न खाता शेवटी मद्राशी पद्धतीने पुन्हा भात घेउन त्यात दही व वरून थोड़े पाणी घालून ताक भात खाऊन बघा, त्यात थोड़ी पुड चटणी घाला एका अतिशय सुन्दर जेवणाची तेवढीच सुन्दर सांगता. 


इथल्या नाश्य्त्याबद्दल पुढच्या भागांत.
आपल्या प्रतिक्रिया जरुर नोंदवा.


हर्षद