Tuesday, April 19, 2011

तुमचं आमचं सेम नसतं - भाग १२


तुमचं आमचं सेम नसतं - भाग १२

लग्न, सत्यनारायण आणि तुळजापुरचं देवदेव सगळं व्यवस्थित पार पडलं. आज सकाळी लाडोबा तिच्या कॉलेजच्या शिबिराला गेली आणि दुपारी आई पंढरपुरला. मी ऑफिसात बसलोय. शनिवारचं फारसं काम नाहीये, पण पाच वाजेपर्यंत तरी बसुन रहायला पाहिजे. आज लेबर पेमेंटचा दिवस आहे त्यामुळं. सगळे पैसे चार वेळा मोजुन झालेत. दोनदा चुकीचे आणि दोनदा बरोबर.८ वेळा घरी फोन करुन झालाय.मैत्री ते प्रेम ते लग्न हा प्रवास फार थोडक्यात आटोपला आमचा. मैत्री तर कधी नव्हतीच असं वाटतंय, प्रेम झालंय असं वाटेपर्यंत आम्ही लग्न केलं. आता हा मैत्रि आणि प्रेमाचा गाळलेला पोर्शन कसा पुर्ण करणार आहोत काय माहिती.  

संध्याकाळी फिरायला जाणार आहोत, स्कुटी टाकलीय आज रिपेअर करायला, मला एकट्याला पिकप घेत नाही दोघांना काय होईल काय माहित. चला, चार झालेत आता सगळॆ मुकादम यायला सुरु होतील. आठ सत्तर, लेबर पेमेंट माझ्याकडे आल्यापासुनचं सर्वात मोठं पेमेंट आहे आज. तरी बरं  हिशोबाप्रमाणे नोटा वेगळ्या काढुन ठेवल्या आहेत तरी शेवटी आहेतच घोळ. बरं झालं मी लगेच जॉईन झालो आता याच्या परसेंट मधुन काही देणी उडवता येतील, का ऑफिसने गिफ्ट दिलंय म्हणुन काहीतरी घेउन जावं घरी का कुठंतरी फिरुन यावं, घराच्या कर्जाला तर भरता येणार नाहीच.उगी भावनेच्या भरात डोळ्यावर यायला नको. आणि माधवीला कुठं जायचं नाही हे समजवता समजवता जाम त्रास झालाय आणि आता एकदम जायचं म्हणलं तर तिला पण नसत्या शंका यायच्या. या अशा वेळी पैसे नाहीत म्हणुन कुठं जाता येत नाही हे वाईटच पण काही उपाय नाही. बाजारात फक्त नोटाच चालतात, भावना नाही. साहेबाचा बंगला आहे पण तो कुठं टिटवाळा का शहापुर आणि तिथं असल्या उन्हाळ्यात जाउन काय करणार, परत त्यानं हो म्हण्लं पाहिजे ना, लग्नाहुन यायला गाडी दिली हेच पुढची ४ वर्षे ऐकवणार आहे.

सगळी कामं संपवुन घरी फोन केला, माधवीला तयार व्हायला सांगितलं, ऑफिस बंद करुन स्कुटी घेतली गॅरेज मधुन आणि घरी आलो.दोन तीन वेळा बेल वाजवल्यावर माधवीनं दार उघडलं, माझं आवरुन होईपर्यंत चहा केला होता तो घेउन निघालो. साडी नेसल्यानं ति एका बाजुला बसणार होती, मला असं गाडी चालवायची सवय नव्हती, एकदा पडल्यानंतर आई कधी गाडीवर बसलेली नव्हती आणि लाडोबा ड्रेस घालुन बसायची. बिल्डिंगच्या पार्किंगबाहेर आलो आणि जमलं एकदाचं. हे जमलं म्हणजे संसार करायला पण जमेलच. पैसे खिशातच होते, घरी ठेवले तर कशाचे म्हणुन सांगणार माधवीला हा प्रश्न होता.हुतात्मा बागेत गेलो,फिरलो बोलणं आजच्या पेक्षा कालच्या बद्दलच जास्त. तसे दोघांकडे बरेच कॉमन मुद्दे होते , बाबांचं जाणं, आईनं ठाम उभं राहणं वगैरे. आपल्या आपल्या पालकांबद्दलचा हा अभिमान कधीतरी मुद्द्यावरुन गुद्द्यावर येणार आहे याची जाणिव होत होती. पण बहुधा यालाच संसार म्हणतात. बागेतुन बाहेर येउन चव्हाणकडं कचोरी, भेळ खाउन घरी आलो. दुपारी स्वयंपाक जास्त झालाय तो संपवणं भाग होतं, कारण घरातलं अन्न वाया घालवण्यावरुन मार खाल्लेला असणं हा एक कॉमन मुद्दा आत्ताच चर्चिला होता.

घरी आलो, आता पैसे काढुन ठेवणं भागच होतं, लाडोबाच्या खोलीतल्या कपाटात पैसे ठेवतानाच माधवीनं विचारलं ’अन्याच्या खोलीत काय करतोस?’ ’घरातली सगळी महत्वाची कागदपत्रं, पैसे वगैरे याच कपाटात असतं’ तिला सांगितलं. तिनं जेवायला घेतलं होतं, आता जास्त जेउ नये असं वाटत होतं पण ’आमच्याकडं’ या सदराखाली जगातल्या बहुतेक चांगल्या गोष्टींची यादी ऐकवल्यानंतर न जेवणं म्हणजे माघारी होती, जी मला पहिल्याच दिवशी नको होती. करपलेल्या मोहरीची आमटी आणि भात खाउन ’मी जरा जाउन येतो’ असं सांगुन बाहेर पडलो. स्कुटी काढली आणि घरापासुनच्या जरा लांबच्या मेडिकलमध्ये जाउन आलो. एवढ्या रात्रीपण जाम गर्दी असते मेडिकल दुकानात. घरी येताना ५-६ गजरे घेउन आलो.

घरी आलो, दरवाजा उघडुन माधवी आत पळाली आणि अत्तराचा घमघमाट जाणवला. आत जाउन पाहिलं तर माधवी स्प्रेच्या फुटलेल्या बाटलीचे काचा गोळा करत होती, ’अरे मी खुर्चीवर उभं राहुन उडवत होते तर पडलीच खाली’ हे सांगताना तिचा चेहरा जाम लाडिक+त्रासिक झाला होता. तिचं काचा गोळा करुन होईपर्यंत कॉटवर बसुन होतो, सगळा कचरा टाकुन ती पुन्हा आत आली, आमच्या आयुष्याच्या खरी सुरुवात का ख-या आयुष्याची सुरुवात काही सुचत नव्हतं. कारण माधवी पुढं आलीच नव्ह्ती दारातच उभी होती खाली बघत. अक्षरक्ष: काही मिनिटं गेली अशीच, एकदम भानावर आल्यासारखं झालं मीच उठुन तिच्याकडं गेलो, तिचे हात हातात घेतले, दोघंही कॉटकडं आलो. बाजु बाजुला बसलो, एक शब्द नाही फक्त पंख्याचा आवाज होता. अजुन ही दोघात बरंच अंतर होतं यापेक्षा जवळ लग्नात बसलो होतो. तिचे हात सोडुन टेबलावरचा गज-याचा पुडा उघडुन तिच्यासमोर धरला, तिची काहीच हालचाल नाही,हे क्षण काय करावं हे कळु नये असेच असतात का काय करावं हे कळत नाही म्हणुन असे असतात. दोन गजरे काढुन तिच्या समोर धरले, तिनं घेतले आणि तसेच हातात ठेवुन बसली ’घाल ना’, कोरड्या घशातुन कसाबसा आवाज आल्या माझ्या. तिनं हात मागं घेउन केसात अडकवले.  अगदी माधवीला स्वप्नात कल्पुन पण बरीच स्वप्नं पाहिली होती, पण आता ती खरी होत आहेत असं वाटतानाच खुप दुर आहेत असं वाटत होतं. तिचं गजरे घालुन झालं पुन्हा हात खाली घेउन बसली,हसली पण नाही माझ्याकडे बघुन. हळुच मागं सरकुन डोक्याखाली हात घेउन एका कुशीवर झोपलो. तिनं मागं पाहिल्यावर ये ना इकडं असा हातानंच इशारा केला.


माधवी -

कशी असते सुरुवात संसाराची अशीच की वेगळी, सुमतीचे बाकी सल्ले आठवत नव्हतं,नको म्हणु नकोस एवढंच आठवत होतं. मागं सरकले, पाय वर घेउन हळुच झोपले, त्यानं वाकुन गज-याचा पुडा घेतला आणि उरलेले गजरे तोडुन फुलं सगळ्या कॉटवर पसरली, काही माझ्यावर सुद्धा. मी चेह-यावरची फुलं बाजुला करायला लागले तर म्हणाला ’ थांब मी टाकलीत मीच काढतो’ पटकन एका बाजुला वळले, त्याचा हात माझ्या हातावर येत होता, बोटात बोटं गुंतत होती, कानात काहीतरी बोलला आणि...

पहाटे जाग आली तेंव्हा जेवढं रात्रीचं आठवतंय तशीच झोपले होते, त्याच्या डाव्या हातावर माझा डावा हात ठेवुन त्यावर डोकं ठेवुन,  मानेच्या खाली पाठीवर त्याचे श्वास अजुन जाणवत होते. माझा उजवा हात धरुन त्यानं मला घट्ट धरुन ठेवलेलं. म्हणजे सुमतिचा सल्ला डावलुन मी नको म्हणाले होते  तिथंच तो थांबला होता. त्याच्याकडं पहावं म्हणुन वळायला गेले, लगेच त्याची पकड अजुन घट्ट झाली. अजुन थोडी हलले तर त्याला जाग येईल म्हणुन तशीच पडुन राह्यले, डोक्यावरच्या खिडकितुन गार वारं येत होतं. एवढा वेळ वाजली नाही पण आता थंडी वाजत होती, आपसुकच मागं त्याच्याकडं सरकले, त्याला जाग आलीच, मान वर करुन त्यानं मला जागा करुन दिली आणि पुन्हा हात घट्ट पकडला. उजव्या  हातानं मंगळसुत्राशी खेळत होते. दहा मिनिटानी हॉलमधल्या घड्याळाचा अलार्म वाजला, पाच वाजले असावेत. हात सोडवुन उठत तो म्हणाला ’अलार्म बंद करु दे सरक’ थोडं कोरडंसच. उठुन खाली पडलेली साडी गोळा करत होते तेवढ्यात तो आला आणि दरवाज्यात थांबुन माझ्याकडं बघत होता, रात्री त्याला नाही म्हणलं होतं पण आता त्या नजरेला नाही म्हणायची हिम्मत माझ्यात उरली नव्हती आणि गरज पण वाटली नाही.

दुधवाला ४-५ वेळा बेल वाजवुन निघुन गेला, मी तशीच त्याच्या मिठित पडुन होते. चांगलंच उजाडलं होतं आता, त्याचा हात ढकलुन उठले, पुन्हा झटक्यात ह्यानं हात पकडला आणि परत मागं ओढली, अजुन अर्धा तास तसंच बोलत होतो. फोन वाजल्यावर उठणं भागच होतं. मी त्याच्या अंगावरची चादर ओढुन घेतली तसं तो उठुन गेला बाहेर. मि पण उठुन आवरलं, केसाची पिन आणि टिकली सोडुन सगळं सापडलं. बाहेर गेले, हा फोनवर बोलत बसला होता, मी हातानंच कुणाचा आहे विचारलं ’बहिणाबाई आहेत तुझ्या, घे फोन’, असं म्हणुन फोन पुढं केला. मी फोन घेतला हा समोरच बसलेला, त्याला हातानंच आत जा म्हणलं तर गाल फुगवुन हुप्प केलं आणि नाही अशी मान हलवली. तिकडुन ताइ हॅलो हॅलो करत होती, आता मला दोन महिन्यापुर्वीचं तिचं चिडणं समजत होतं. मी पुन्हा त्याला ’ आत जा प्लिज’ असं खुणेनंच सांगितलं,त्यावर त्यानं २ बोटं ओठांवर ठेवली आणि मला एकदम हसु आलं, तो उठुन आत गेला. मी जरा थांबुन ’ हॅलो बोल ग तायडे’, अशी सुरुवात केली. तायडीचा पहिला प्रश्न ’ काय ग कीति बिस्किटात पटला सौदा?’ ’दोन’ मी पटकन बोलुन गेले, तेंव्हा हा दारात उभा राहुन हसत होता.

-- --- --- -- -- --- गोडी अपूर्णतेची लावील वेड जेंव्हा


सर्व वाचकांना,

हर्षद आणि माधवीचा नमस्कार,गेले आठवडाभर असे बरेच नमस्कार घातलेत आम्ही, पण तुम्हाला हा खास कारण आमच्या आयुष्याच्या ह्या एका तुकद्याबद्दल आम्ही जे सांगितलं ते तुम्ही आवडुन घेतलंत. हा प्रवास इथं सध्या थांबवतोय, कारणं तुम्हाला कळालीच आहेत. नवं आयुष्य सुरु झालंय, ही नव्याची नवलाई संपेल आणि संसार सुरु होईल. तुमच्या सारखाच,काही वेगळा नसेल फारसा, मग तेच तेच काय सांगायचं तुम्हाला.

तुमचं जे प्रेम मिळालं त्याबद्दल अतिशय आभार. काही वेगळं,विशेष सुखाचं मजेचं होईल तेंव्हा येउच सांगायला परत.

आम्ही आनंदी राहु हे आमचं वचन, तुम्ही पण तसंच वचन द्या. एवढं बोलुन, आज सकाळीच दोघांना मिळुन सुचलेल्या चार ओळी आपल्या समोर ठेवुन रजा घेतो, कळावे लोभ असावा. टाटा बाय बाय.

दु:ख अपमान माळ्यावरची गाठोडी ।
जनांपुढे काय उघडावी ती ॥
सुख सन्मान फुलल्या फुलांची करंडी।
घेउनी येउ तुम्हासाठी लुटावया॥

हर्षद-माधवी.

Saturday, April 16, 2011

आभार १०००० हिट्स साठी.


१७ ऑक्टोबरला मी हा ब्लॉग सुरु केला, कधीतरी काहीतरी सुचलेलं लिहावं आणि ते कुणितरी वाचावं म्हणुन.  लोकं वाचत गेली,  प्रतिसाद देत गेली, मी लिहित गेलो.  आज सहा महिने झाले. मागं वळुन पाहताना एक जाणवलं, की मी सुरुवात स्वान्तं सुखाय अशी केलेली असली तरी, वाचणारी लोकं आहेत. पुन्हा पुन्हा येणारे पण आहेत.

आणि दुसरं म्हणजे, कालच माज्या ब्लॉगवर येउन जाणा-यांची संख्या १०००० चा आकडा पार करुन गेली. मग जरा सावरुन बसलो आणि मनात आलं हा आपल्या आंतरजालीय लिखाणाचा एक मैलाचा दगड आहे. जरा मागं वळुन पाहु काय काय झालंय गेल्या सहा महिन्यात ते.  हे खालचं लिखाण हे या सहा महिन्यांनाच गोषवारा.

एकुण पोस्ट  - ३८  त्यापैकी , प्रवासवर्णन -  ०७ , खाणं - ०२ , दिर्घकथा (भाग)- ११ , गाण्यांबद्दल - ०६ ,इतर  -०७ ,छायाचित्रं - ०५
अशी साधारण वर्गवारी आहे.

महिना                             पोस्ट           ब्लॉग हिटस                              
----------------------------------------------------
१७ ऑक्टोबर २०१० -          ०४                ३५३                                        
नोव्हेंबर २०१० -                  ०६                ७१७                                        
डिसेंबर २०१० -                   ०८               १४९५
जानेवारी  २०११ -                ०६               १५४३
फेब्रुवारी २०११ -                  ०६               १७४८
मार्च २०११ -                        ०५              २४५२
१६ एप्रिल २०११ -                ०३                १७६६

एकुण वाचने आणि प्रतिसादांची संख्या पाहता, ''तुमचं आमचं सेम नसतं'' ही दिर्घकथा सगळ्यात जास्त लोकप्रिय झाली, तर सगळ्यात जास्त प्रतिसाद याच पोस्टवर आले.  याच्या अकरा भागांपैकी दहा भागांना १५० पेक्षा जास्त हिटस मिळाल्या तर ५ भागांना २०० पेक्षा जास्त आणि एका भागाला ३०० पेक्षा जास्त हिटस मिळाले.

ब्लॉग पाहणारे सगळ्यात जास्त भारतातले आहेत, जवळ्पास ७५०० तर दुसरा नंबर अमेरिकेतील नेटिझन्सचा आहे. याखेरीज इंग्लंड, जर्मनी,  यु.अ. अमिरात व कॅनडा हे पश्चिमेकडचे देश तर ऑस्ट्रेलिया, मलेशिया, हाँगकाँग व सिंगापुर इथल्या नेटिझन्स्नी पण माझा ब्लॉग पाहिला.

या माझ्या ब्लॉगची प्रसिद्धी होण्यात मोठा वाटा या २ रेफरिंग साईटचा आहे  - १. http://marathiblogs.net/ आणि
२ http://misalpav.com/. या साठी या साईटसच्या चालक / व्यवस्थापकांचा मी अतिशय आभारी आहे.

यानंतर, http://blogkatta.netbhet.com/ आणि http://www.mimarathi.net/ या साईटस मुळे पण बरेच जण माझ्या ब्लॉगवर येउन गेले, त्यामुळे यांची मदत पण मोलाची आहे.

आणि आता फेसबुक वरचा मराठी ब्लॉगर्स हा ग्रुप http ://www.facebook.com/home.php?sk=group_102652033152863&ap=1, जो मला या प्रवासात हातभार लावतो आहे, त्याचे व इथल्या सगळ्या सह ब्लॉगर्सचे आभार.

http://www.indiblogger.in/ या भारतीय ब्लॉगसना रेटिंग देणा-या साईट्कडुन माझ्या ब्लॉगचं रेटिंग आता ७० /१०० पर्यंत आलंय.

सहा महिन्यात मला १४ फॉलोअर मिळाले, त्यांचे पण विशेष आभार. तुम्हाला खास विरोप पाठवत आहेच.

एकुण इथं येणा-या सर्वांचे मनापासुन धन्यवाद आणि यापुढं ही इथं येउन असेच मला भेटत रहाल आणि  माझा उत्साह वाढवत रहाल ही नम्र अपेक्षा.

आपल्या अपेक्षांचं ओझं पेलण्याची ताकद   माझ्या लेखणित येउ दे ही प्रार्थना.

हर्षद छत्रपति.







Monday, April 11, 2011

तुमचं आमचं सेम नसतं -- भाग ११


तुमचं आमचं सेम नसतं -- भाग ११

खरं सांगु का लग्नाआधीची रात्र फार अवघड जाते,उद्याची सकाळ नेहमीसारखीच उगवणार असते,पण त्यानंतरच्या सगळ्या सकाळी बदलुन टाकणारी असते. या अशाच सकाळी मी उठलो, म्हणजे झोपलो असं नव्हतोच पण आडवा पडलो होतो तो उठलो. बरोबर आलेल्या व-हाडाचे लाड पुरवुन घेणं चालु होतं, आम्ही प्रमुख भुमिकावाले आतच आवरत होतो. आठ वाजले असावेत. कोणितरी चहा घेउन आलं, चहा घेतला, सकाळची सगळी कामं आवरली. आज चॊकात आंघोळी होत्या त्यामुळं निदान मला आणि लाडोबाला काही गडबड नव्हती, ती सकाळीच माधवीची मेहंदी किती रंगली आहे हे बघायला निघुन गेली होती. ति येईपर्यंत आई, मावशी, आत्या सगळ्यांनी आवरुन घेतलं होतं.  तयार झालेले व-हाडी लग्नाच्या मंडपात चालले होते, नाष्ट्याची सोय तिकडंच होती.मी एका पोराला पेपर घेउन यायला सांगितलं. त्याच्याबरोबर गौरीताईचे सासरे आणि महादेवकाका आले. जरा आवराआवरी केली. काय, कसं विचारपुस झाली. पुन्हा एकदा चहा झाला. त्या दोघांच्या  चेह-यावरुन अंदाज बांधता येत नव्हता नक्की कशासाठी आलेत.  

मग एकदाची महादेवकाकांनी सुरुवात केली, ’आई काय आहे, आपलं ठरल्याप्रमाणे मानपानाची सोय केली आहे, तुमच्या आग्रहाप्रमाणे स्त्री पुरोहित बोलावले आहेत, पण काय आहे अजुन हे गाव फार सुधारलेलं नाही. काही गोष्टी आम्हाला पण पाळाव्या लागतील, त्याबद्दल बोलायचं होतं.’ एक  पॉज घेउन पुढं बोलायला लागले,’ तसं आम्ही बोललो आहोत माधवीच्या आईला पण आता तुम्हाला सांगावं असा विचार आहे, त्या आणि तुम्ही थोडावेळ घरातच थांबलात तर बरं होईल. काका-काकु आहेतच सगळं करायला, काय देवण्णा पाटील, बरोबर ना?’ असं बोलुन त्यांनी गौरीताईच्या सास-यांना यात ओढलं. ’ हो तर, काय आहे, तुम्ही, ही पोरं,शिकली सवरली आहेत पण इथं खेडेगावात येणारे लोकं, काय तोंडानं बोलतील कुणी सांगावं, आणि पुन्हा आपण हे लेकरांच्या सुखासाठीच करायचं की.’ महादेव काकांनी विषय पुढं नेला ’ तसं काही फार वेळ नाही लागणार नाही का, वैदिक पद्धतीनं म्हणजे २ तासात आटपेलच.’ - ’ मग काय आमच्याकडं लातुरात बघा सगळं मोजमापात करुन ३ तासात संपवलं होतं, तेंव्हा पण विहिणबाई आत घरातच बसल्या होत्या, पण काका काकुंनी सगळं व्यवस्थित केलं, अगदि पोटच्या पोरीसारखं. खुप माया करतात दोघींवर.’ देवण्णा पाटील, गौरीताईचे सासरे म्हणाले. मी, मावशी आणि आत्या सगळे आईकडं पाहात होतो, आमच्या घरातलं हे पहिलंच मोठं कार्य, घर घेतलं तेंव्हा फक्त सत्यनारायण केलेला त्यामुळं असा काही प्रश्न आलेला नव्हता. ’ बरं आम्ही जरा बोलुन कळवतो तुम्हाला’ मावशीनं तिढा तात्पुरता सोडवला. ते दोघंही निघुन गेले, आता मलाच आईकडं पहायला नको वाटत होतं. सगळेच गप्प होतो. ’दाद्या, माधवी वहिनीनं सांगितलं आहे तिची आणि आपली आई मंडपातच थांबेल,म्हणजे कुठं जाणार होता का तुम्ही दोघी ?’ एखाद्या विषयाचं गांभिर्य माहित असुनही, आपण त्या गावचेच नाही हे दाखवणं लाडोबाला फार छान जमायचं. प्रश्न सुटला असला तरि एक मळभ सोडुन गेला. पुन्हा मनं होतील तेवढी ताजी करुन आम्ही पुढ्च्या कामाला लागलो. गौरीताई आणि एक दोन बायका, हळद घेउन आल्या होत्या. गौरीताईच्या लक्षात काय झालंय ते आलं असावं पण जर बिनलग्नाची लाडोबा सावरुन घेउ शकत होती तर ति एक पाउल पुढंच असणार होती.

मग हळद लावायचा कार्यक्रम झाला, कालचे साखरपुड्याचे कपडे बदलुन आल्यावर मला एका चौरंगावर बसवलं आणि हळदिचा अक्षरश: लेप चढवण्यात आला माझ्यावर. दिवाळीला उटणं लावलं तर बोंबाबोंब करणारा मी गुपचुप हळद लावुन घेताना विचारलं ’संपवता का काय सगळी इथंच, उष्टी हळद घेउन नाही का जायची परत?’ गौरीताई हसत म्हणाली ’ करुन द्या की मग थोडी उष्टी, चव घेउन बघा जरा’-’अहो म्हणजे तशी उष्टी नाही हो’ मी सावरुन घेतलं.थोडा ताण कमी होईल असं वाटलं. तेवढ्यात पुन्हा महादेवकाका आणि आता आईपण बरोबर होत्या. गौरीताई आणि बाकीच्या बायका पटकन निघुन गेल्या. तिची आई आणि माझी आई आतल्या खोलित गेल्या, पाच मिनिटात बाहेर आल्या.’महादेवकाका,चला झालं बोलणं आमचं’ आईचा चेहरा आता बराच खुलला होता, माझ्याकडं पहात म्हणाली’ काही नाही चल आवर तुझं, कोणि काही बोललं तर तुझं नाव पुढं करणार आहेत तुला काही बोलणार नाही आज कोणी’ अर्थात मला कोणी काही विचारणार नाही हे खरंच होतं.

एक पोरगा ओरडत आला,’ जिज्याजी आंघोळीला थांबलेत सगळे’.निघालो तसाच अंगावर अंगभर हळद घेउन पुन्हा चादरीच्या खालुन. माधवीच्या घराच्या मागच्या बाजुला फरश्या घातलेल्या होत्या तिथंच अंगणात चार तांबे ठेवुन त्याला धागा गुंडाळुन चौक केला होता, आत ५-६ पाट ठेवले होते. बाजुला ३-४ बादल्या वाफा येणारं पाणि होतं, आता येवढ्यात ५-६ जणांना हात पाय पण धुवायला आले नसते हे असल्या हळदिच्या अंगाच्या आंघोळी कशा व्हायच्या असा प्रश्न मला पडला. मग एका बाजुला लाडोबा आणि मी बसलो तर माझ्या शेजारी काका, काकु आणि शेवटच्या पाटावर पिवळी माधवी येउन बसली अगदि पिवळी धमक साडी आणि डोक्यपासुन पायापर्यंत जिथं दिसत होतं तिथं हळद होती, म्हणजे मला हळद लावली होती तर इकडं हळद खेळले होते. मागं पुढं चार-आठ बायका गोळा झाल्या आणि साबण नाही का काही नाही, भडाभडा पाणि ओतायल्या लागल्या, आणि अचानक माझ्या डोक्यावर कुणितरी झम्म गार पाण्य़ाची बादली उपडि केली, मि एकदम ओरडलो आणि तेवढ्यात हाच प्रयोग माधवीवर पण केला ती एकदम चिडुन उठली आणि निघुन चालली.’ए मधे,थांब ग ओवाळु दे, बस खाली’ गौरीताईचा खास ताईगिरी टाईपचा आवाज आला.’हे काय ग तायडे कसलं गार पाणी माहितिय का? माधवी चिडक्या आवाजात म्हणाली.’आम्हाला काय माहित, विचार ज्यांच्या अंगावर टाकलं त्यांनाच, काय हो गार होतं का काय पाणि?’ गौरीताई माझ्याकडे वळत म्हणाली. मी कुडकुडत कुडकुडणा-या पिवळ्या माधवीकडं पाहात होतो रागानं नाक लाल होतं पण आता तिचं नाक पिवळं दिसत होते आणि तोच चिडवण्याचा सुर ठेवुन बोललो,’नाही गार नाही पाणि, ठिक आहे’, ’बघ तुलाच काय मुद्दाम घालतो का काय गार पाणि, बस खाली.’गौरीताईच्या आवाजानं माधवी खाली बसली,ओवाळणं झालं, आता नंतर मात्र व्यवस्थित आंघोळीचं पाणि होतं. ५-६ तांबे घेउन पंचा गुंडाळुन मि परत व-हाडाच्या घरी आलो, पुन्हा आंघोळी केल्या.

पुन्हा एकदा चहा व नाष्टा आवरुन लग्नाचा मोतिया कलरचा झब्बा सरवार घालुन मंडपात आलो,हातात पुन्हा मोतीवाला नारळ होता, हा नारळ नक्की कशाला होता ते मला अजुन कळालं नव्हतं.मंडपात गेल्यावर सगळ्या मोठ्यांच्या पाया पडुन स्टेजवर गेलो, बसायला पाट मांडलेले. सकाळी आंघोळीला दोन्ही गुडघे समोर घेउन पाटावर बसणं सोप्पं होतं पण आता थोडीशी तंग अशी सरवार घालुन पाटावर मांडी घालुन बसणं जरा अवघडच होतं. तरी कसा बसा बसलो मी आणि सरवार दोन्ही सुरक्षित, म्हणलं आता सगळं झाल्यावरच उठवा एकदाच. मी पाहिलेल्या लग्नांपेक्षा हा प्रकार बराच सुटसुटीत होता, व्यबस्थित मांडणी, डाव्या उजव्या बाजुला लागणारं सामान एका ओळीत ठेवलेलं. पाटावर बसल्यावर मंडपात नजर फिरवली, लग्नापेक्षा एक बाई लग्न कशी लावतेय याचीच सगळ्यांना नवलाई होती. परांडेकर गुरुजी पण येउन बसले होते. पुरोहित बाईंनी काही मोजक्या नातेवाईकांना स्टेजवर आणि इतर काही नातेवाईकांना समोरच्या रांगेत बसायला सांगितलं. सगळ्यांना पुस्तकं दिली, कुणि, काय, कधी आणि कसं म्हणायचं आहे त्याची कल्पना दिली. आता काका काकु पण येउन बसले स्टेजवर, महादेवकाका आणि गौरीताईचे सासरे थोडे नाराजच होते. जिजाजी, मागे पुढे ओरडाओरडी करुन बसलेल्यांना कामाला लावत होते आणि कामात असलेल्यांना पकडुन आणुन मंडपात बसवत होते. स्टेजवर माझ्याबरोबर लाडोबा आणि मावशी होती. माझी आई आणि माधवीची आई समोर शेजारी शेजारी बसल्या होत्या.

पुरोहित बाईंनी मी आणि काका काकु, आमचे जे कार्यक्रम चालु केले. पुढे काही तरी करता करता, मध्येच पुस्तक बघुन काहीतरी वाचायचं यात काकांची धांदल उडत होती. काकु पुस्तक धरायची आणि मग काका वाचायचे असा प्रकार चालु होता, एक वेळ अशी आलि की सगळा उद्योग पुरोहितबाईंच्या हाताबाहेर जाईल असं वाटत होतं, परांडेकर गुरुजी लगोलग वर आले आणि त्यांच्या पद्धतीनं काका काकुंना समजावुन सांगायला लागले. आता सगळं सुरळीत होतं. २०-२५ मिनिटं झाली आणि जेवढं आम्ही करु शकत होतो तेवढं करुन झालं, एवढ्या वेळात होमातली लाकडं आणि अग्नी,आणि पुरोहित बाई व परांडेकर गुरुजी यांनी एकमेकांशी जुळवुन घेतलं होतं. आता पुरोहित बाईंनी पुकारा केला ’वधुला बोलवा, मुहुर्ताची वेळ जवळ येत आहे’. आत्तापर्यंतच्या होमाच्या धुरानं माझे डोळे स्वच्छ झाले होतेच ते आणखी मोठे करुन घराच्या दरवाज्याकडे पहायला लागलो, मागुन लाडोबा मला कोपरानं ढोसत होती.

दोनच मिनिटात केशरी रंगाचा शालु नेसलेली माधवी बाहेर येताना दिसली,भाजपच्या झेंड्याला मॅचिंग केलेलं होतं, केशरी साडी अन हिरवा ब्लाउज फक्त डोक्यात एक कमळ हवं होतं, मागं गौरीताई अन मैत्रिणि होत्या. शालु तिला जड होत होता हे नक्की, त्यात तिला स्टेजवर आल्या आल्या पुरोहित बाईंनी काका काकुंना नमस्कार करायला लावला. मी पाहिलं तर एका रात्रीत तिचे केस बरेच लांब झालेले,त्यावर मोत्यांची वेणी,वर गजरे. आमच्या घरी आल्यापासुन आजपर्यंत, साडी नेसुन नमस्कार करायची बरीच प्रॅक्टीस झालेली होती बहुतेक. माझ्या बाजुला येउन उभि राहिली खरी पण आता पंचाईत होती पाटावर बसायची, त्याची प्रॅक्टिस करणं शक्य झालं नसावं. एका हातात फुलांचा गुच्छ, दुस-या हातात रुमाल आणि त्याच हातानं शालुचा ताठ आणि ति स्थिती सोडत नसलेला भरजरी पदर सरळ करण्याची धडपड, बहुधा त्या पदरावरच्या मोराचा कणा फार ताठ असावा. एकदा वाटलं पटकन हातानं सरळ करावा, पण मोह आवरला, तो माझा अधिकार माधवीनं मानला असता पण असं आत्ता बरं दिसलं नसतं आणि हो,तो मोर चावला बिवला चिडुन तर काय करा.

पुरोहित बाईंनी त्याच वेळी बोलावल्यामुळं तिकडं लक्ष द्यावं लागलं. पुन्हा एकदा कालच्या सारखेच फारसे न कळुन घ्यावेत असे विधी चालु झाले, काहि मंत्र आधी कुणाच्या तरी लग्नात ऐकल्यासारखे होते, पण एकुणच त्याकडे लक्ष जरा कमीच होतं. मध्येच एकट्यानं तर कधी दोघांनी तर कधी ब-याच जणांनी म्हणायचे काही मंत्र असं सगळं छान चाललं होतं. त्यात एक झालं,मी आणी माधवी दोघंही एकमेकांच्या स्पर्शाला सरावलो,लाज गेली नव्हती पण मोकळेपणा आला होता. आता हात पुढं करताना मागं पुढं पाहात नव्हती. मंगळसुत्र घालायची वेळ आली, हे म्हणजे कसं आपला हक्क स्थापित झाल्यासारखं वाटतं. बसुनच मंगळसुत्राचे मळसुत्रं फिरवायचा अयशस्वी प्रयत्न केल्यावर उठणं भाग होतं, आता माधवीच्या मागं उभा राहुन मंगळसुत्र घातलं,वर पाहताना तिच्या आईकडं लक्ष गेलं, त्यांचे डोळे भरले होते आणि त्यांनी माझ्या आईचा हात घट्ट धरुन ठेवला होता. एक क्षण उगाचच अपराध्यासारखं वाटलं. कुणाचं तरी काही तरी त्याच्या परवानगीनं का होईना पण आपण आपलं करतोय, त्याच्यापासुन लांब घेउन जातोय ही भावना कुठंतरी खुपत होती. पण या खुपण्याला माझ्याकडं या वेळेला तरी उत्तर नव्हतं. ती सल तशीच मनात ठेवुन पुढचॆ विधि पुर्ण केले.

मंगलाष्ट्कांसाठी उभं राहिलो, समोरचा अंतरपाट हा शेवटचा अडसर आम्हां दोघांच्या एक होण्यातला. तो दुर झाला की ती माझी अन मी तिचा. मंगलाष्टकं सुरु झाली, त्या मंगल अष्टकांना साथ मात्र अंतरपाटाच्या त्या बाजुच्या ह्ळुवार हुंदक्यांचीच होती. स्टेजवरुन खाली पाहिलं, सगळे उभे होते, तिच्या आईनं माझ्या आईचा हात अजुनही धरलेलाच होता. डाव्या बाजुला परांडेकरांच्या मागे काका माधवीच्या बाबांची भुमिका जगत होते. मागं लाडोबा पण कसंबसं रडणं आवरत होती, आणि सगळ्याच्या मध्ये मी, मला या सगळ्याचं काहीच वाटत नव्हतं? का माधवी आता माझी होणार या मोहानं माझ्या सामान्य भावनाच दडपुन टाकल्या होत्या,मी एवढा स्वार्थि झालो होतो? आणि झालो होतो तर का? पुरा अभ्यास करुन परिक्षेला जावं आणि ऐनवेळी प्रश्नांची उत्तरंच आठवु नयेत तसं होत होतं. ५ मंगलाष्टकं झाली, अंतरपाट बाजुला झाला, माधवीचा चेहरा खालीच होता ती रडतेय हे कळत होतं. नशीबवान आहे, मोकळेपणानं रडु शकत होती. मी त्या बाबतीत कमनशिबी, पुरुष ना. असो, मागुन गौरीताई आणि तिच्या मैत्रिणींनी आपले डोळे कोरडे करत तिला सावरलं,तिच्या पण मोहानं आसवांना मागं सारलं, चेह-यावर बळेच हसु आणलं, ते हसु ओठांपर्यंतच येउन थांबलं, तिथुन डोळ्यांचा रस्ता त्याला सापडला नव्ह्ता. तिनं तसाच हार माझ्या गळ्यात घातला, त्याबरोबर तिची सगळी स्वप्नं आणि ती पुर्ण करायची जबाबदारी पण. माझी स्वप्नं मी तिच्या गळ्यात मगाशीच मंगळसुत्राबरोबर बांधली होती. फरक एवढाच होता हा हार मी थोड्या वेळानं काढुन ठेवणार होतो, मंगळसुत्र तिच्या गळ्यात कायमचं राहणार होतं. आता हार घालायची पाळी माझी होती, तिचा चेहरा पुन्हा खालीच होता, पुन्हा गौरीताईनं तिला चेहरा वर करायला लावला मी पटकन हार घातला. तिच्या एवढीच हसण्याची उसनवारी केली, तिच्या नजरेला मी फार जास्त वेळ नजर देउ शकलो नसतो,हे समजुन तिनंच पटकन नजर खाली केली.

बाहेर लोकांनी फटाके उडवले, बार उडाल्याचं जगजाहीर झालं. आम्ही न मागता अन कुणी प्रत्यक्ष न देता आमच्या या नात्याला एक पावित्र्य आलं, समाज मान्यता मिळाली. एकमेकांवर प्रेम करणारे आम्ही आतापर्यंत वधु वर होतो आता पति पत्नी झालो. पुन्हा एकदा त्या पाटांवर बसायची कसरत केली. आणि सप्तपदी चालताना लक्षात आलं की त्या पाटावर बसणं एक वेळ सोपं होतं त्याच पाटांवरुन माझा आणि मागुन येणा-या माधवीचा, तिच्या शालुसहित तोल सांभाळणं थोडं जास्तच कठीण आहे. पण हा ही भाग पार पडला. उरलेले विधी पुर्ण झाले आणि आमच्या लग्नाचा धार्मिक भाग संपला.

आता एका बाजुला आहेर देणं घेणं चालु होतं, आम्हांला दोघांनाही मोजणं शक्य नव्ह्तं एवढे नमस्कार करुन झाले होते, अजुन बरेच करायचे होते. पोटात भुक लागली होती. कुणितरी दया दाखवली पाणि आणि एका ताटलीत गुलाबजामुन व भजी आणुन दिल्या. मंडपातली पोरं शक्य तिथुन पडलेल्या अक्षता गोळा करुन आणुन आमच्या अंगावर उडवत होती. आज गर्दी बरीच होती. कारण दोन पंगती एकदम बसल्या तरी मंडप भरुन माणसं होती. मी माझ्या नातेवाईकांची ओळख माधवीला करुन देत होतो आणि ती पण. कुणाला नुसताच हात जोडुन नमस्कार करावा आणि कुणाला वाकुन हे दोघांनाही कळत नव्हतं, किंवा मुद्दाम मी वाकलो की माधवी निवडणुकत उभी राहिल्यासारखी उभी राहायची अन ती वाकली मी माझं लक्ष कुणीकडं दुसरीकडंच असायचं. तिची एक मैत्रिण तिच्यापेक्षा जरा आधि भेटायला पाहिजे होति असं पण वाटुन गेलं एकदा. पण अर्ध्या तासापुर्वी बायको झालेली माधबी हे लक्षात घेउन म्हणाली’ ती मीना बडवे, तिचं लग्न आहे १८ तारखेला सोलापुरलाच, जाउयात आपण.’

प्रथेप्रमाणे जवळपास सगळ्यांची जेवणं झाल्यावर आम्ही जेवायला बसलो. पुन्हा ताटाभोवती मोत्यांच्या पट्टुया. समोर उदबत्त्या. नाव घेणं आणि घास घालणं हे प्रकार करुन २०-२५ मिनिटांत होणारी जेवणं चांगली तासभर चालली. दोन वाजले होते. जेवण झाल्यावर चिसौकां मीना आणि इतर अशा ४-५ जणी मला रुखवत बघायला घेउन जायला आल्या. माधवीला आत घरात जायचं होतं,तिनं लगेच लाडोबाला माझ्या मागं लावलं’अन्या, तुला बघायचं होतंं ना ते साखरेचं महादेव अन तुळशी व्रुंदावन कसं केलंय,मीने सांग ग जरा तिला प्लिज.’ मी आपलं जाउन रुखवत बघुन आलो. मग अजुन एक कसली तरी पुजा होति घरात ती केली, आणि या आमच्या लग्नाच्या दिवसाच्या सगळ्यात अवघड गोष्टीसाठी तयारी सुरु केली. व-हाडाच्या घरी येउन कपडे बदलले. आमचं सामान बांधुन झालं होतं. माझे साहेब जाताना ईंडिका ठेवुन गेले होते, त्यामुळे आम्ही तरी निवांत घरी जाणार होतो. जिजाजींनी एक दोन समज असलेल्या पोरांना गाडीला फुलं चिकटवायला लावलं होतं.

आमच्या व-हाडाचं सामान आणि एक टेम्पो भरुन व-हाडी पुढं गेले, दुसरा टेम्पो आमच्याबरोबर यायचा होता. पुन्हा घरी गेलो. माझी आत जायची तयारीच नव्हती, आता मी रडलोच असतो. मी लाडोबाला तसं बोललो, तशी ती माझ्याआधीच रडायला लागली. साडेचार होत आलेले, पाचपर्यंत निघायलाच हवं होतं. जिजाजी आणि परांडेकर गुरुजींनी घाई घाई करण्याचं आपलं काम पुन्हा सुरु केलं. मावशी, आई आणि लाडोबा घरात गेले. दहा मिनिटं गेली. हळूच लाडोबा दारात आली, मला आत बोलावलं. आत गेलो, माधवी तिच्या आईजवळ बसलेली, बाजुला गौरीताई, तिची सासु उभ्या होत्या. ’माधवी,चला आता किती वेळचं खोळंबुन बसलेत सगळे, असा हट्टीपणा करुन कसं चालेल.’ गौरीताईच्या सासु तिला समजावत होत्या. ती बळंबळंच उठली.’जा तोंड धुवुन ये बरं,जा ग गौरी तिच्याबरोबर’.हा त्यांच्या अनुभवाचा खेळ होता.मला काय होतंय कळत नव्हतं, तिचा चेहरा पाहुन तर वाटत होतं, बाई इथंच रहा पण रडु नकोस पण असं म्हणावसं अजिबात वाटत नव्हतं. गौरीताईच्या सासुबाई मला व आईला बाहेर घेउन आल्या ’येईल ती चला तुम्ही’ आणि खरंच पाच मिनिटात माधवी,गौरी ताई, तिची आई, काका, काकु सगळे बाहेर आले. पुन्हा एकदा गळाभेटी झाल्या, आणि एकदाचं आम्ही गाडीपर्यंत आलो पुन्हा चादरीखालुन. मी सगळ्य़ात मागं होतो. ईंडिकात मागं तिघी बसल्या मला पुढं बसण्याशिवाय पर्यायच नव्हता. गाडित बसल्यावर पुन्हा एकदा पाच मिनिटं सगळ्यांना टाटा बाय बाय करण्यात गेली. मी ड्रायव्हरला चला म्हणालो, तसा त्याने स्टार्टर दिला आणि निघता निघता माधवीला म्हणाला ’ वहिनी तुम्हाला बोललो होतो ना, चहा काय पुन्हा आल्यावर घेउ, बघा आता जेवुनच चाललोय.’ आम्ही निघालो, गाडी सोलापुर रोडला येई पर्यंत मागं त्या तिघी अ‍ॅडजेस्ट झाल्या होत्या, फक्त मला एका बाजुला ठेवुन.

भाग ११/१२.


Thursday, April 7, 2011

तुमचं आमचं सेम -- भाग १०

तुमचं आमचं सेम -- भाग १०

लग्न ठरल्यानंतर माधवी एकदाच भेटली होती, गदग मध्ये डोसा खाल्ला आणि मग प्रभातला डिडिएल्जे पाहिला होता. मी पहिल्यांदाच एखाद्या तरुण मुलीच्या एवढा जवळ बसलो होतो. सगळा पिक्चर हात तिच्या खुर्चीच्या पाठीवर ठेवुन पाहिला होता. जाम मुंग्या आल्या होत्या हाताला, आणि हात तिच्या खांद्यावर ठेवायचा काय जवळ न्यायचा पण धीर झाला नाही. तिनंच एक दोन वेळा ओढणी मागं पुढं करताना माझ्याकडे टाकली होती.एवढाच काय तो रोमान्स, नंतर वाटलं यापेक्षा माझ्या स्कुटीवर फिरुन आलो असतो तर बरं झालं असतं. पण नंतर भेटायचा काही चान्सच आला नाही. माझ्यापुढे प्रश्न होता हनिमुनबद्दल, माधवीला विचारायची सोय/डेअरिंग नव्हती,आईकडं एकदा महाबळेश्वरच्या बुकिंग बद्दल विषय काढला तर तिनं साठेकाकांच्या मार्फत मला इशारा दिला होता. साठेकाका म्हणाले होते ’ अरे तुमच्या नव्या आयुष्याची सुरुवात, अशी कुठंतरी घाणेरड्या नको तसल्या लोकांनी वापरलेल्या भाड्याच्या खोलीत काय करायची रे स्वताचं घर आहे,तुझ्या स्वताच्या कष्टानं घेतलं आहेस,त्याच्या वास्तुपुरुष आशिर्वाद देईलच.या तोडग्याला माझ्याकडे काहि पक्का उपाय नव्हता आणि त्यानंतर आईनं दोन दिवसात ती लग्नानंतर ८ दिवस भागवतसप्ताहासाठी पंढरपुरला जाणार असल्याचं सांगितलं होतं, लाडोबा पण राष्ट्रिय सेवा योजनेच्या शिबिराला जाणार होती १५ दिवस. हा माझ्यासाठी जवळपास चक्रव्युह होता, फक्त दुस-या बाजुनं उघडा असणारा.  लाडोबा मात्र नियमित बातम्या पुरवायचं काम करायची.तिला हे सगळं थ्रिलिंग वाटत होतं.

माधवीच्या जिजाजींनी पाठवलेल्या टेम्पो मधुन आम्ही निघालो, तसं माझे साहेब तर त्यांची इंडिका देत होते,डिझेल घाल अन घेउन जा म्हणाले, पण ऐकलं नाही आईनं.’लग्न त्यांना घरासमोर करायचं आहे तर करु दे प्रवासखर्च त्यांना नाहीतर करा म्हणावं इथं’ या तिच्या म्हणण्याला माझ्याकडे काही उत्तर नव्हतं. का असुन मला द्यायचं नव्हतं? शक्यतो मी आईच्या कोणत्याच गोष्टीला जास्त विरोध केला नव्हता आणि ती पण मला ’मुलगी निवडलीस ना तुझी तुच आता बाकी काही बोलायचं नाही’ या मुक वाक्यानं गप्प करत होती प्रत्येक वेळी.अर्थात काही ठिकाणि मी लाडोबाच्या हट्टीस्वभावाचा फायदा घेत बरंच काही काढुन घेतलं होतं.

समोरुन माधवीचे जिजाजी व अजुन २-३ जण येताना दिसले, मागं एक दोन बायका पण होत्या, हातात पाण्याचा तांब्या, ताटात काहितरी होतं . आता मी आणि आई खाली उतरल्यानं कोणालाच काही बोलता आलं नाही.’या या स्वागतम सुस्वागतम मंड्ळी, या या, आई या, हर्षद्रराव या इकडं या, आणि सुकन्याताई कुठं दिसत नाहीत, या तुम्ही पण या सुकन्याताई.’त्या बरोबरच्या बायकांनी आमच्या पायावर पाणी घातलं, भाकर तुकडा ओवाळुन टाकला. तेवढ्यात अजुन चार जण एक चादर घेउन आले, आमच्या डोक्यावर धरायला. लाडोबाला मजा वाटत होती, जिजाजींनी चार माणसं सामान उतरायला लावली अन ते पण आमच्या मागं घराकडं आले. मी दुस-यांदाच येत होतो,कंपाऊंडवरचे भालदार-चोपदार नव्यानं रंगवलेले होते,आतल्या भिंतीवर पुन्हा शुभ विवाह लिहिलं होतं.

घराच्या बाहेर पोहोचलो, तेवढ्यात बहुधा ताईच्या सासु आणि अजुन एक दोन म्हाता-या बाहेर आल्या, पुन्हा पायावर पाणि टाकलं, आमच्या डोळ्याला पाणी लावलं, ओवाळलं आणि आम्ही आत गेलो. बाकीचे व-हाडी व सामान उतरायची सोय केली होती तिकडं परस्पर जात होतं. लाडोबा कशीतरी चुळबुळत दोन मिनिटं बसली असेल, हळूच आईकडं पाहुन पटकन आत निघुन गेली. मला पण असंच वाटत होतं, पण आता मी नवरदेव होतो, हातात मोत्याच्या माळा लावलेला नारळ आणि डोक्यावर टोपी होती. चहा पाणी झालं, एक दोन मोठ्या लहानांच्या ओळखि करुन दिल्या. माझ्या किती लक्षात राहतील याची मलाच खात्री नव्हती. मी आपलं उगा नमस्कार नमस्कार करुन पुन्हा खाली बसायचो.

तेवढ्यात ताईचे सासरे म्हणाले ’ आता बघा उद्या तुमचं लग्न होय ना ?’ मी थोडासा लाजतच म्हणालो ’ होय’ . मग म्हणाले ’ मला एक सांगा तुम्हाला नवरा करायचा का नवरी ?’ मी गोंधळलो, च्यामारी ही काय नवी भानगड ’ नवरा करायचा का नवरी? ’ पटकन म्हणलं ’ नवरी’. ते उलटुन म्हणाले ’ अहो तुम्हाला नवरी केलं तर माधवीशी लग्न कसं लागायचं तुमचं, आं, सांगा की ओ असं कसं होणार ? बावचळुन मी लगेच उत्तर बदललं ’ नाही,नवरा ’ म्हातारबुवा बहुधा वकील असावेत अशा थाटात पुन्हा बोलले ’ अरारा, काय ओ हे विहिणबाई, ऐकलं का, तुम्ही म्हणताय ह्यांच्याशी माधवीचं लग्न करायचं अन हे तर मला नवरा करा म्हणायलेत की ओ, छ्या छ्या काय शाण्या सुरत्याच्या काळ नव्हं हा, रे गोविंदा.’ दोन मिनिटं गेल्यावर मायमराठीनं माझी विकेट दोन्हीकडुन काढल्याचं माझ्या लक्षात आलं आणि जास्तच लाज वाटायला लागली,पण आता मुर्खपणाची.  

सुटका झाली,ती आईच्या हाकेनं, ती मगाशीच आत गेली होती. आत जाउन बघतो तो ज्ञानप्रबोधिनीच्या पुरोहित बाई आल्या होत्या,माधवीच्या आई होत्या त्यांना नमस्कार केला. तिथंच थांबलो, घरात आत पहिल्यांदाच येत होतो, चोरनजरेनं इकडं तिकडं पाहिलं. सगळं सामान ऒषधांच्या खोक्यात भरलेलं. माधवी, गौरीताई कुठंच दिसल्या नाही. परत बाहेर आलो, काका आले होते. त्यांच्या पाया पडलो, थोडं काय कसं बोलणं झालं. मागुन लाडोबापण आला होता. जिथं उतरायची सोय होती त्या घराकडं निघालो. बाहेर पडताच लाडोबानं सांगितलं,’मधु तिच्या मैत्रिणिकडं गेली आहे,मेकप करायला आणि मेंदी काढायला.’ मला सहसा लाडोबाचा राग येत नाही पण आता आला, नुसतंच हं म्हणुन चालायला लागलो, तशी मागुन येउन लाडोबा म्हणाली ’ बरं बाबा, माधवी वहिनी, ठीक आता’ आई बाबांच्या थोड्या वेगळ्या स्वभावामुळं आम्ही दोघं काही बाबतीत फार जवळ आलो होतो. एकमेकांचे राग ओळखणं ही त्यातलीच एक होती. आमच्या या त्रिकोणी घरात हा नवा कोन कसा बसवायचा हा विचार करायला लागलो. प्रत्येक गोष्ट बदलणार होती, ब-याच आपल्या गोष्टी बदलाव्या लागणार होत्या, ब-याच शेअर कराव्या लागणार होत्या, आणि वस्तु काय करतात माणसं शेअर आपलेपणानं काय किंवा सक्तीनं काय, एक आख्खा जिवंत माणुस कसा शेअर करणार, आणि ते सुद्धा तीन वेगवेगळ्या लेवलला. बरं शेअर करणा-या तिघी बायकाच. एक आई म्हणुन, एक बहिण म्हणुन आणि आता एक बायको म्हणुन.

व-हाडाचंं घर आलं. आम्ही प्रमुख भुमिकावाले तासाभरात आवरुन बसलो होतो. मी,मावशी,आत्या आणि आई आमचं झालं होतं,लाडोबाला दोन वेळा हाक मारुन झाली होती. जिजाजी बोलवायला आल्यावर मात्र सगळेजण पुढं गेले आणि पाच मिनिटांनी आम्ही पण निघालो पुन्हा दुपारसारखं एका चादरीखालुन, आता उन नव्हतं चांगले सहा वाजले होते. साखरपुड्याला गोरज मुहुर्त धरला होता.

त्यांच्या घराच्या अंगणात गेलो,आणि पहिल्यांदाच प्रचंड सजवलेली माधवी दिसली.वायझेड,या पेक्षा जिपमध्ये यायची तेंव्हा फार चांगली दिसायची ती. तेंव्हा जेवढी धुळीनं माखलेली असायची तेवढीच आता मेकपनं माखलेली होती. हिरव्या आणि गुलाबी रंगाच्या लोकरच्या कशानं तरी सजवलेली हेअर स्टाईल,गुलाबी केलेले गाल, साडिला मॅच होईल अशी निळी टिकली पण या सगळ्या गोष्टी माफ करायला लावेल असं हसणं. हाय हाय इसी अदापे तो यार मिट गये थे हम. असो, हळुच लाडोबाला हे सांगितलं, ती माधवीला घेउन आत गेली. मी समोरच्या स्टेजवर बसलो आणि गुरुजी मंत्र जरा जोरात म्हणात होते . एक- दोन आचमनं, आहेर देणं,घेणं,नमस्कार असल्या गोष्टी पार पडल्या. मग साधारण १५ मिनिटं असले मला काही सुचत नसलेले क्षण गेल्यावर पुन्हा माधवी बाहेर आली.डोक्यावरची लोकरी जाळी तशीच होती पण बाकी मेकप बराच कमी होता आणि आता मीच तिला शोभतो की नाहि अशी शंका मला येत होती. आपल्यासाठीचं कार्य म्हणलं ना की माणसाच्या चेह-यावर एक वेगळीच झाक येते, जशी अभिषेक करताना देवाच्या मुर्तीवर असते ना तशी, आता तीच झाक माधवीच्या डोळ्यात होती. सगळयांसमोर काही तिच्याकडं बघणं बरोबर वाटेना, म्हणुन हात पुसायला दिलेल्या नॅपकिनशी खेळत होतो, ते पाहुन गुरुजी म्हणाले’बघा बघा बघुन घ्या जी पाहीली, पसंत केली तीच आहे ना का दुसरी आहे कोणि ?’ ज्यांना ऐकु गेलं ते हसले, बाकीचे जेवण कधी वाढताहेत याची वाट पहात असावेत. मला वाटत होतं मी सगळ्यांनी माझ्याकडं पहावं, मी लग्न करतोय, त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दल कौतुक असावं, पण वर स्टेजवर बसलं की कळतं आपल्या लग्नात फक्त आपल्यालाच ईंटरेस्ट आहे, बाकीचे काही जवळचे सोडले तर सगळे जेवायला अन मजा करायलाच आलेत.

माधवीचं असं नव्हतं, तिच्याकडच्या सगळ्यांना तिचं कौतुक असावं,बायका बोलताना तिच्याकडं हात वगैरे करायच्या. ते बघुन मलाच बरं वाटलं, आता बोलत काय होत्या कुणाला माहित चांगलं का वाईट ते, जाउ दे. पुढच्या पाच मिनिटात परांडकरांनी अजुन काही मंत्र संपविले. आता आम्ही दोघं समोरासमोर बसलो होतो. माझ्यामागं आई, लाडोबा आणि मामा होता. तिच्या मागं आई. गौरीताई, जिजाजि होते. काका काकु स्टेजवर बाजुला बसले होते. ’ आता, हा रुपाया घ्या आणि लावा तिच्या कपाळाला’ गुरुजी म्हणाले तसं मी केलं, रुपाया घेतला तिच्या कपाळाला लावला आणि खाली ठेवला, नाण्याच्या बाजुनी दोन बोटं पण लावुन घेतली हळुच. ’ अहो लावा म्हणजे, चिकटवा तिच्या कपाळाला, शकुनाचा आहे तो’ गुरुजी म्हणाले. माझ्या डोळ्यासमोर एकदम पोस्टातली डिंकाची बाटली आली. मग पुन्हा उगाच सभ्यतेच्या मर्यादा पाळत थोडं पुढं वाकुन तो रुपाया चिकटवल्यासारखा केला, तो काही चिकटेना. ’ अहो डोकं धरा की मागुन, असा कसा चिकटेल एका हातानं,ते काय तिकिट आहे पोस्टाचं.’ माधवी आणि मला, दोघांना या प्रकाराची आता गंमत वाटत होती, मी तिच्या डोक्यावरची लोकरी जाळी सांभाळत डाव्या हातानं तिचं डोकं धरलं आणि कपाळाला लावलेल्या गंध, पावडर, कुंकु आणि तिला आलेला घाम या सर्वांनी जो चिकट्पणा आला होता त्याच्या जोरावर ते नाणं चिकटवलं एकदाचं.

मग एकमेकांना अंगठी घालायचा कार्यक्रम पार पडला,पहिल्यांदाच तिचा हात हातात घेत होतो, तिच्याएवढाच माझाही हात थरथरत होता. अंगठी घालताना तिच्या बांगड्यात माझी बोटं अडकली, म्हणजे अडकवायची नव्हती पण अडकलेली सोडवायची पण नव्हती पण सोडवावी लागली.अंगठ्या मापं वगैरे न देता व्यवस्थित बसल्या.सगळ्यांनी टाळया वाजवल्या, तिच्या हातात साखरेचा पुडा दिला, आणि कार्यक्रम संपला. लोकं लगेच जेवायला गेली. आम्ही काही मोजकी मंडळी आत गेलो. घरातच आमची जेवायची व्यवस्था होती. पोळी,भाजी,भात, आमटी, भजी. कुरड्या आणि गोडाला श्रीखंड असा साधा पण खास बामणी मेन्यु होता. थोडी चेष्टा मस्करी, आग्रह यात जरा जास्तच जेवण झालं. मग आम्ही पुन्हा    व-हाडाच्या ठिकाणी आलो. तिथं बरीचशी मंडळी झोपली होती. आम्ही आत जाउन, उद्या सकाळची आवराआवर केली, म्हणजे मी बसुनच होतो, आई, मावशी, आत्या आणि लाडोबा याच आवरत होत्या. अकरा वाजले, आता सगळेच झोपलो. माझ्या डोळ्यासमोर मात्र माधवीच्या बांगड्यात अडकलेली माझी बोटं दिसत होती, तशीच अजुन थोडा वेळ  अडकवायला हवी होती, थोडाच्च वेळ.



Tuesday, April 5, 2011

तुमचं आमचं सेम -- भाग ०९

तुमचं आमचं सेम -- भाग ०९


कालचा रविवार माझ्या आयुष्यातला एक महत्वाचा रविवार ठरला, माझं लग्न ठरलं. म्हणजे नक्की काय झालं? कळत नकळत मी त्याच्यावर प्रेम तर केलं होतंच, फक्त त्याला एक अर्थ मिळाला, एक संमती मिळाली.या संमतिशिवाय त्या प्रेमाला काही अर्थच उरला नसता ना, त्याचं महत्व माझ्या आणि त्याच्या मनातच राहिलं असतं. मनोमनी मी त्याची आणि तो माझा झाला असता पण, शरीरानं आम्ही वेगळेच राहिलो असतो. मग जुळलेल्या मनांची कथा या समाजानं मान्य करावी म्हणुन हा शरीरं जुळवुन येण्यासाठी परवानगी देण्यासाठी केलेला उद्योग.एखाद्या दुस-या मुलाला तास - अर्धा तास भेटुन, घरातल्या सगळ्या मोठ्या समजुतदार मंडळीनी घेतलेल्या निर्णयानुसार लग्न झालं असतं तरी पण नंतर प्रेम करता आलंच असतं ना, का ते प्रेम नसतं झालं ? ती फक्त एक कर्तव्यापुर्तता झाली असती. आलिया भोगासी असावे सादर अशी. प्रेम करणं ही लग्न करण्यासाठि आवश्यक गोष्ट आहे की, लग्नाबरोबरच प्रेम आपोआप येतं. एकावर एक फ्री. 


सकाळी सकाळी उठुन, गच्चीवर येउन गुलमोहोराचा कचरा काढ्त हे असं काहीतरी डोक्यात येत होतं, कालपर्यंत तो हवा होता आणि आज मिळणार आहे याची खात्री झाल्यावर ही अशी चिरफाड चाललीय. काल संध्याकाळी परत येताना ताईला असंच काहीतरी विचारल्यावर ती म्हणाली ’ मधे, अजुन गद्धेपंचविशी यायचीअ तुझी, असलं काहीतरी डोक्यात आणु नकोस. आता लग्न होणार आहे तुझं, थोडी मोठ्यासारखी वाग आता.’ तरी बरं हे मोठ्यासारखं वागायला शिकवायला ती येणार आहे इथं, आणि या मोठं होणं प्रशिक्षणवर्गाचा कालावधी पण थोडाच आहे, मोजुन ३३ दिवस. मग दुसरा अंक सुरु. ’मधे, गधडे वर काय करतेस सकाळी सकाळी, खाली ये पटकन’ आईच्या हाकेला ओ देखील न म्हणता खाली गेले. महादेवकाका आले होते, आज ते थांबले होतं,काल काय काय ठरलं त्या चर्चा झाल्या. मी आत आले ’नमस्कार कर काकांना’ नमस्कार केल्यावर.काकांनी डोक्यावर हात ठेवला, असाच हात ते दर पाड्व्याला, दस-याला आणि दिवाळीला ठेवायचे, एक मिनिट्भर. त्यांच्या अंगात गावाकडचे कोणि बाबा यायचे म्हणे. हात काढुन महादेवकाका म्हणाले ’ तुझ्या मनासारखं होतंय सगळं, पण एक सांगतो आईची जबाबदारी तुझीच आहे, कमी पडलीस तर बघ, बाबा फार रागावेल तुझ्यावर,आणि आता त्याचा मार कसा बसेल तुला कळणार सुद्धा नाही’. महादेवकाका, मला समजायला लागलं तेंव्हापासुन बाबांच्या बरोबर होते. घरातल्या प्रत्येक निर्णयात सहभागी होते, ब्रम्हचारी असल्यानं त्यांना एक वेगळंच महत्व घरात होतं, त्यांच्याही आणि आमच्याही. 


लग्न रजिस्टर करायचं ठरलं होतं, पुण्याच्या कुण्या शाळेच्या स्त्रीपुरोहित वैदिक पद्धतीनं लग्न लावणार होत्या. मला असल्या तपशीलात फार इंटरेस्टच नव्हता. पण या मागचं महत्वाचं कारण दोन्ही घरची आर्थिक परिस्थिती होती हे खरं. घेणं देणं असं काही नव्हते. कपडे ज्यांनी त्यांनी करायचे होते फक्त एकमेकांच्या पसंतीनं, हे कलम मी घुसवलेलं, अन्याच्या आडुन. त्याची कपड्यांची निवड माझ्याएवढीच अन्याला पण नापसंत होती. माझ्याच वयाचं त्या घरात कुणितरी असणं खुप फायद्याचं होतं माझ्यासाठी. महादेवकाकांच्या बरोबर आई चर्चा करत असताना मी  पोहे करत होते, आणि एक एक अडचणी समजत होत्या. लग्न आमच्या घरासमोरच करायचं होतं, तरीपण मांडव, जेवणं, पाहुणे, ओळखीचे सगळं मिळुन खर्च ७०-८० हजारात जाणार होता. पुन्हा आग्रहाचे आणि मानापानाचे आहेर करणं भाग होतं. आम्हां दोघींच्या लग्नासाठीच्या सोन्याची तयारी बाबांनी करुन ठेवलेली होती. साठवलेला पैसा पुरेसा पडणार नव्हताच, त्यामुळं पैशाची जुळवाजुळव कशी करायची ते ठरत होतं. काका, काहीतरी देणारच होते. कन्यादान तेच करणार होते ना, मामा काही आला नसता, आणि आला तरी आईला ते आवडलं नसतं. 


दोन-तीन दिवसांनी ताई आली, जिजाजीपण आले होते. एक रात्र थांबले. त्यांनी स्वताहुन ५ हजार रुपये दिले, वर पाहुण्यांसाठी दोन टेम्पोची व्यवस्था करतो म्हणाले. सकाळी ते गेल्यावर आई त्यांचं कौतुक काका-काकुंना सांगत होती, तेंव्हा ताई मला आत सांगत होती ’मग, काय झालंय न द्यायला, लग्नात चांगले २० हजार घेतलेत की सरकारी नोकरी आहे म्हणुन’. पुढच्या काही दिवसात अशा ब-याच गोष्टी ऐकायला आणि शिकायला मिळणार याची ही सुरुवात होती. प्रेम आणि लग्न सोपं असलं तरी, सासरी ते सासर आपलं होईपर्यंत नांदणं फार कठिण आहे, असा माझा समज होत होता. 


दररोज, सकाळी न चुकता येणारा अन्याचा फोन. काय काय झालं याची उजळणी. दोन -तीन दिवसातुन एक फोनवर चर्चा आईची व त्याच्या आईंची. यात पंधरा दिवस गेले. कपड्यांची खरेदी आम्ही इकडंच केली होती, त्यांच्या खरेदीच्या दिवसाचा प्रत्येक तासाचा रिपोर्ट मला अन्याकडुन कळाला होता, तिला एकदा लाडोबा म्हणाले तर त्याचा मात्र तिला राग आला होता. स्त्री पुरोहित या प्रकाराची आमच्याकडे थट्टाच जास्त होत होती, ते सगळं त्याच्या आईच पाहात होत्या, त्या पुण्याला जाउन ठरवुन आल्या होत्या. घरातलं मंडप, आचारी हे सगळं महादेवकाका व काका करत होते. माझी पसंती फक्त शालु व पाच साड्यांपुरती विचारण्यात आली होती. मला शालु त्याच्या कोटाच्या रंगाला मॅच होणारा घ्यायचा होता, पण इथंही तायडिचा अनुभव मध्ये आला. ’ दोन महिन्यात त्याला कोट लहान व्ह्यायला लागेल, काही मॅचिंग बगैरे पाहु नकोस. तुला जो आवडेल तो घे.’ इति ताई. मग त्यातच गुपचुप त्याला एक शर्ट घेउन आले होते. पण तो त्याला द्यायचा कसा हा प्रश्न होताच. शेवटच्या चार पाच दिवसात तर जाम गडबड होती, कारण काका बाहेरच्या कामातुन कटाप होते, देवदेवक त्यांना व काकुला करावं लागणार होतं, म्हणुन ते तिकडं  परांडेकर गुरुजींच्या हाताखाली नाचत होते. 


ताई घरातलं सगळं पाहात असल्यानं आई दुकान व बाह्रेरचं सगळं पहात होती. महादेवकाका, त्यांच्या पुतण्याला घेउन आले होते. तो आणि त्याची बायको, हाताखाली होते त्यामुळं काही वाटत नव्हतं, आणि मला तसंही काही काम नव्हतं. त्याच्याशी दोन -तीनदा फोनवर बोलणं झालं होतं आणि एकदा भेटलो आणि  दिदिएलजे पहिला होता . पण जसजसा लग्न दिवस जवळ जवळ येत होता, तसं तसं मला अजून अवघड होत होती. हे सगळं सोडुन जायचं, का? त्याच्यासाठी का माझ्या स्वार्थासाठी ? माझ्या प्रेमासाठी मी हे आई बाबांचं घर का सोडायचं? तो जर मला प्रेम देणार असेल तर हया घरानं पण मला प्रेमच दिलं होतं ना. उलट प्रेम म्हणजे काय ते या घरानंच मला शिकवलं होतं. 


तीन वर्षांपुर्वी जेंव्हा मागचा गुलमोहोर वादळी पावसांत वेडावाकडा झाला होता, रात्रभर आम्ही सगळे हॉलमध्येच बसुन होतो. सकाळी उठुन पाहिलं तर त्याची एक मोठी फांदी भिंतीवर टेकली होती पण त्यामुळं खिडकीच्या काचा  फुटायच्या वाचल्या होत्या. ते पाहुन बाबा म्हणाले होते ’ तुझ्या आईच्या गुलमोहोराचं घरावर प्रेम आहे, भिंतीला तडा गेलाय पण काच नाही फुटु दिली नाही लेकरानं ’. 


आता दररोज रात्री मी, ताई व आई एकत्रच झोपायचो.लहानपणी सारखं, इकडं मी, तिकडं ताई आणि मध्ये आई, आणि आईनं तोंड कुणाकडं करायचं यावरुन भांडण व्हायचं आमचं. पण आता भांडण होत नव्हतं. ताईच आता आईकडं पाठ करुन झोपायची.     


लग्न चार दिवसावर येउन ठेपलं, त्याचा रात्री फोन आला. खुप पाहुणे आलेले, त्यामुळं फोनवर काहीच ऐकु येत नव्हतं. शेवटी आई सगळ्यांना रागावल्यावर सगळे शांत झाले. जिजाजी,काहीतरी सिरियस बोलत होते, शेवटी बरं बघतो मी म्हणुन फोन ठेवला. ’काही नाही. बारातियोंका स्वागत पानपरागसे होना चाहिये। अशी फर्माईश आहे तिकड्ची.’ असं बोलुन टाळलं. नंतर जेवण झाल्यावर कळालं की आजिचिर नावाचा जो काही प्रकार असतो, तो आहेर आमच्याकडुनच व्हायला हवा होता,त्याची एकुलती एक आत्या जी हैदराबादकडं कुठंतरी राहायची तीचा आहेर आणि पोटझाकण पण आम्हीच घ्यावं असं त्यांचं म्हणणं होतं. असले बरेच प्रकार ताईच्या लग्नात झालेलं असल्यानं फारसं काही टेन्शन नव्हतं पण ते जमवलेलं लग्न होतं आणि हे प्रेमातुन झालेलं त्यामुळं इथं हे असलं काही  होणार नाही असं आम्हाला वाटत नव्हतं. आम्ही तर याद्या वगैरे पण केलेल्या नव्हत्या, सगळं तोंडिच ठरलं होतं. 


यानंतर मात्र कोणत्याही गोष्टित मी लक्ष घालायचं नाही असं ताईनं बजावल्यावर मी सुद्धा माझ्याच विश्वात रमुन गेले. माझी मेंदी, मैत्रिणिंनी आणलेले मेकपचं सामान. साखरपुड्याची साडी, तिच्यावर पडलेला सुपारीचा डाग नि-यात लपवायची धांदल, एक ना दोन. माझ्या मैत्रिणिंच्या मध्ये लग्न झालेली एकच सुमति आणि आता कॅरिंग सुद्धा, त्यामुळं  गच्चीवर सुमतिबरोबर बोलत बसले की, ताई येउन विचारायची ’ झाली का २१ अपेक्षितची उजळणी,पाठ करा पुन्हा एकदा मोस्ट आयएमपि, ऐनवेळी घोळ नको.’ त्यावर सुमति हसत म्हणायची ’ होय तायडे,फक्त डायग्राम काढायच्यात येतिय का काढायला? आणि दोघी जाम हसायच्या मी मात्र हसु येत असुन हसु का नको या गोंधळात पडायची. त्यातच अजुन एक अनुभवी मैत्रिण आली, सोलापुरची अनघा. तिचं लग्न होवुन दिड वर्ष झालेलं. आणि मग तर या तिघी मिळुन रात्री गच्चीवर झोपायला गेल्यावर बराच वेळ गप्पा मारत बसायचो. मला मात्र ’ उघड्या आभाळाखाली झोपु नको, ये खाली’ या महादेवकाकांच्या आदेशानुसार खाली घरातच झोपायला जावं लागायचं.


आज दुपारी व-हाड येणार होतं काल जिजाजी पण आले होते, ताईचे सासु सासरे पण आले होते, आमचं घर पुन्हा एकदा लग्नघर झालं होतं, एका वर्षातच. आमच्याकडचे मुक्कामी येणारे सगळे पाहुणे आले होते. आता तर मी घराच्या बाहेरच पडायचं नव्हतं, त्यामुळं आलेल्या पाहुण्यांबरोबर गप्पा, आहेर दाखवणे,बघणे मंगळसुत्राच्या डिझाईनचं कॊतुक, शालुचा रंग, मॅचिंग चपला, मला सगळं सगळं ताईच्या लग्नासारखंच हवं होतं,आणि ताईला तिच्या लग्नात राहिलेल्या काही गोष्टी पुर्ण करायच्या होत्या. 


संध्याकाळी साखरपुडा,आणि परवा लग्न. साखरपुड्याला परांडकर गुरुजी येणार होते पण लग्नाला ज्ञानप्रबोधिनीच्या ज्या स्त्रिपुरोहित येणार होत्या, त्या दुपारीच आल्या, त्यांनी आई,काका,काकु,जिजाजी,ताई, तिचे सासु सासरे,महादेवकाका आणि मी असं सगळ्यांना बसवुन लग्न कसं लावणार आहेत ते १ तासभर समजावलं.त्यांच्या पुस्तकाच्या ५-१० कॉप्या देउन त्या गेल्या. मी ते पुस्तक वाचत होते, तेवढ्यात जिजाजी येउन म्हणाले ’ छे, फार अवघड आहे हा प्रकार. आधि त्या बाई काहितरी सांगणार मग हे दोघं काहितरी म्हणणार, मग आपण काहितरी म्हणायचं. मॅडम तुमचा नटुन थटुन मिरवायचा चान्स गेला बरं का वाया, आता गप्प बसायचं एका ठिकाणि.’ शेवटचे वाक्य ताईला उद्देशुन होतं. तसं तर ताईच्या सासु-सासरे, महादेवकाका, काका-काकु आणि आई कोणालाच हे फारसं पसंत नव्हतं, पण या सगळ्यांच्या तोंडावर पैशाची बचत हा हुकुमाचा एक्का त्याच्या आईनं टाकल्यानं सगळे गप्प होते.


दुपारीची जेवणं झाली, आता फायनल तयारी चालु होति. सगळं घरासमोरच असल्यानं कुठं उचलुन न्यायचं नव्हतं पण तरी खास लग्नघराचा जो असतो तो गोंधळ होताच. हळदीकुंकु सापडलं तर ओटीच्या सुपा-या सापडत नव्हत्या, चिवडा लाडुचे पाकिट सापडले तर आहेराला आणलेले पिस सापडत नव्हते. आलेले पाहुणे, शेजार-पाजारचे सगळे मदतीला होते. व-हाडाची आज रात्री रहायची सोय,कॉलनीतल्याच एक-दोन रिकाम्या घरात केली होती. आमचे ३०-४० पाहुणे आलेले होते, इथले सगळे उद्याच येणार होते, लग्नाला. साखरपुड्याचं सामान काढता काढता ताईच्या सासुनं विचारले ’ किती जण येणार आहेत ग तिकडुन’ ताई म्हणाली ’ साधारण ३०-४० च असतील येणारे.’ ’ का ग ? एवढेच का?’ ताईची सासु. ’ अहो फक्त नातेवाईक यायचेत,ओळखीच्या पाळखिच्यांसाठी सोलापुरला रिसेप्श्न करणार आहोत आम्ही, तळ्याच्या काठावर हो किनई ओ चिसॊकांमाधवी.


फोन वाजला,काकांनीच घेतला,मग तिथुनच जोरात ओरडुन सांगितलं’ निघालं बरं का व-हाड, बाळ्याला खंडोबाला जाउन येतील पुढं,चला आवरा आवरा आवरा, आणि घराचि घाई घाई अजुन वाढुन आता  खरोखरीची लगीनघाई झाली.