Tuesday, June 28, 2011

स्टेट ऑफ द आर्ट - भाग ०८


स्टेट ऑफ द आर्ट - भाग ०८
पुन्हा दोन मिनिटांचा गॅप गेला आणि ओळी दिसु लागल्या, ’ हर्ष्या माफ कर, काल खोटं बोललो म्या तुला, अरं माणुस माणसाला निस्तं चेह-यानंच नाय ओळखत, आत्म्याचं आम्यालापण कनेक्शन असतंच कि, अन त्याच्यातला आत्मा तर माझाच एक तुकडा हाय ’ , मी चमकलो, हा काय बोलतोय, काल खोटं बोलला, याच्या आत्म्याचा तुकडा काय, अरे काय चाललंय हे, कशाचा कशाला धरबंद्च नाही. मग टाईपलं,’ ते सोड, आजच्या बैठकीबद्दल सांगणार होतास त्याचं काय ते बोल, उशिर झाला की, पुन्हा सगळ्यांना संशय, आधीच शकुताईला जरा जरा शंका येते आहेच’ यावेळी बहुधा हेम्याकडे उत्तर तयारच होतं,’ आता फक्त आखाडाचं राह्यलंय ना, मग असं कर मंद्या जो रेट बोलंल त्याच्या दुपटीनं तु घ्ये विकत आखाड, अन त्याच्या म्हणण्यानुसारच सा हिस्सं कर अन देतो म्हणं पैसं सा महिन्यात समद्यास्नी,’ मंद्या म्हणेल त्याच्या दुप्पट, म्हणजे मंद्या दोन लाख एकराला म्हणला तर मी चार लाखाची ऑफर द्यायची, हे गणित माझ्या डोक्यात उतरत नव्हतं.
मी पुन्हा विचारलं,’ अरे एवढे पैसे कुठुन आणु, तु फक्त सॅलरी स्लिप पाहिलिस, तिथुन पुढं फुटणारे खर्चाचे फाटे नाहिस पाहिलेले, काहि तरि धोंड नको बांधु माझ्या गळ्यात. उगा तो हो म्हणाला तर, नको त्यापेक्षा जे मिळतात ते घेउन मी मोकळा होतो, असु दे तुझे हिशोब आणि तुझे पैसे मिळवायचे मार्ग तुझ्याचपाशी, उगी तुझ्या सारख्या अडाण्याच्या नादाला लागुन मी आहे ते घालवुन बसायचो, नको.’ त्यावर हेम्या बोलला ’ असं, काल रात्री लई गप्पा मारत होता अन आता शेपुट गांडीत घालतोस का काय भाड्या, अरं चोरचुकाळिच्या, तुझ्या जिंदगीवरच थु तिच्यामायला, जर तु न्हाई केलंस ना तर बग मी काय करतोय ते, थांबच आता, एक डाव गम्मत दाखवल्याबिगार न्हाय सुदरायचा तुमि माणसं तिच्यायला, थांब आता.’ हि स्क्रिनवर दिसलेली शेवटची अक्षरं, पटकन वर्ड फाइल बंद झाली, काहि सेकंदच गेले असतील, कमांड विंडो उघडली आणि एका मागं एक उलट्या सुलट्या कमांड दिसायला लागल्या, नुसतं स्क्रोल होत होतं, मी सवयीनं अल्ट+कंट्रोल+डिलीट दाबलं, काहि फरक नाहि, आता कमांड विंडो बंद झाली आणि रिसायकल बिन उघडला, त्यात हळु हळु सगळं सिलेक्ट होत होतं, सगळं सिलेक्ट झाल्यावर, डाव्या बाजुला डिटेल्स मध्ये दाखवत होतं १६७८ फाईल्स सिलेक्टेड, टोटल फाइल साइझ ७६.२३ जिबी, राईट क्लिक मेन्यु आला आणि वर्ड फाइल पुन्हा उघडली, फॉंट साईज पण मोठि झालेलि होति आणि लिहिलं होतं, करु काय डिलिट कायमच्या, व्हय रं, बोल आता, हा एवडा कचरा काडला ना की मला इथं जागा पण लई भेटंल मोकळी, सांग की भाद्या करु का डिलीट? ’ नाही, नको’ , हो म्हणायला मला काय चान्सच नव्हता, नक्की काय काय गेलं आहे ते पण कळालं नसतं, रिकव्हर करुन काहि थोडंफार मिळालं असतं पण हेम्यानं ते रिकव्हरच होवु दिलं नाहितर काय करणार.
दहावी पास होवुन शिक्षण थांबलेला हेम्या एवढा हुशार एक दिवसात होईल असं वाटलंच नव्हतं. त्याला विचारलंच ’ हेम्या, एका दिवसात तुला एवढं कसं कळालं रे सगळं. दहावी पास झालास कसाबसा, का गावात काही करत होतास कोर्स वगैरे? , माझा पराभव मान्य केल्यामुळं फॉंट पण लहान झाला अन शब्द आले ’ अरं मेला तो हेम्या, ती बॉडि अन त्या मेंदुत तेवडंच बसलं व्हतं, अजुन बसलं असतं पण तुज्या बापानं इथंच कुजवलं त्याला, आता मी आत्मा हाय फक्त. मला ना मेंदु ना बॉडी, कशाची लिमिट नाय का भिती नाय, फक्त एकच हाय म्हंजे ही फ्रिकेन्सी, तिच्यायला त्यानंच तर इतं अडकलोय, नायतर आख्ख्या दुनियेत काय बि अडचण नाय मला.’ लिहिता लिहिता त्याची एक कमजोर कडी मला उमगली होती, पुढं मागं याचाच उपयोग करुन घेणं मला फायद्याचं होतं. पुन्हा पुढचे शब्द आले. ’ बोल आता काय करु का डिलीट समदं, का घेतोस आखाड विकत? पैशाला अडू नको, त्ये सावरायला म्या हाय इतं, सया कराया अन अंगटे लावाया तुमि रव्हा म्हंजे मिळवलं’ ७६.२३ जिबि डोळ्यासमोर नाचत होतं, हो म्हणण्याशिवाय पर्यायच नव्हता. हेम्याला हो सांगितलं, म्हणजे टाइपलं अन सगळं घेउन बाहेर आलो.
हॉलमध्ये तयारि कालच्यासारखिच होति, फक्त आज लोकं कमी असणार होती, अण्णा आणि जग्गनाथकाका कागदपत्रं घेउन बसले होते, मंद्या आणि गण्या एकमेकांत कुजबुजत होते. आत्या येउन बसली होति, शकुताई, सुरेखा अन ज्योती नाष्टा, चहा घेउन आल्या. मी गावात असतो तर माझेही लग्न असं मुली बघुनच झालं असतं,पण जाउदे तो विषय नंतर कधीतरी. मस्त पैकी पोहे दोन डिश खाल्ले अन चहा घेउन सगळे तयार झालो. अण्णांनी सुरुवात केली’ पहा, पोरांनो काल बाकी सगळ्या जमिनिचा निकाल लावला आहे, आज फक्त आखाडाचा विषय आहे, तर मंदार बोल बाबा तुझं काय म्हणणं आहे ते सांग, झालं सगळ्यांना मान्य तर विषयच संपला, मग उरलेली कागदपत्रं करुन जेवणं आटोपु, कसं पुणेकरांना पण रात्रीच्या आत घरी पोहोचायला येईल रात्रिच्या आत, होय ना रे हर्षद, बरोबर ना?’ अण्णा थांबले, मी आपलं उगाच ’ हो हो, बरोबर आहे’ एवढं बोलुन मोकळा झालो. घसा खाकरत मंद्यानं सुरु केलं, ’ काल म्हंलो ना तसं करन मी, समदा आखाड अडिच एकराचा हाय, चार लाख एकराला देतो, हात धुवा पैसं घ्या अन मोकळं व्हा.’ उगा पडिक जमिन ती कशापायी जिव लावताय, का येउन कसणार हाय कुणि’ तो थांबला, काही वेळ सगळे गप्प होते, आधी आत्याचा आवाज आला’ ठिक आहे बाबा, मला चालेल, पण पैसं लगेच पाहिजेत, नाहरकतीला सह्या झाल्या की लगेच, म्हणजे इकडं पैसे अन तिकडं सह्या, मला कबुल.’
एक विकेट पडलि, म्हणजे शेवटपर्यंत टिकायची आशा नव्हतीच, पण जरा लवकरच पडली. अगदी अनपेक्षितपणे जग्गनाथकाकानं पण सेम स्टेटमेंट टाकलं, सगळं कसं अगदि ठरल्यासारखं होत होतं. मी शकुताई कडं पाहिलं, तिचा चेहरा कावरा बावरा होत होता, धीर सुटत चालला होता. मी तिला डोळ्यानं गप्प रहा असा इशारा केला. उरला गण्या, तो तर काल रात्रिच्या आमच्या बोलाचालिंनंतर निश्चिंतच होता. तरी, आता बैठकीला बोलणं भाग होतं, म्हणुन त्यानं सुरु केलं ’ काय हाय अण्णा, नाय म्हंजे आता आखाडाच्यापासुन रस्ता जाणार हाय, पन त्येला अजुन तरि १०-१५ वर्स लागायची बगा, तोवर कोन हाय कोन नाय, देवाला ठाव, तवा लै पुडचा विचार नाय करत म्या, तरि पण काय म्हंतो, मंद्या जर समदा आखाड तु घेनार तर तु नाय तुजी पोरं टोरं तर मिळिवतिल्च कि पोत्यानं पैसा, न्हाय का काका, मग असं कर तु आता थोडा ढिला कर कि हात, चार लाख का एकरि सात दे, कसं बी गेली ५-६ वर्षे टॅंकरचा धंदा त्या आखाडाच्या हिरिवरच चालतोय ना तुजा, त्यातलं कदि भागिदारी नाय मागितली कुनि का कधि तु हुन दिली नायस. अण्णा ह्याचा बि विचार करा.
हे बोलणं अजुनही खेड्यात राहणा-या आत्याला पेटवुन गेलं ’ व्हय रं, कवाच्या वर्षी पोतं दोन पोतं जवारी नाय, पायलि शेर तुर नाय, कारखान्याची फुकट मिळतीय ती साखर नाय, कदि काय आलं नाय या लेकिच्या वाट्याला,माय व्हति तर निदान दिवाळसणाला तरी साडी चोळी बगाया मिळाची, ति गेल्याधरनं निस्तं आमच्या पोरा बाळिच्या लग्नाला तेवडं येताय, एक चिरगुट, एक शर्टाचा पिस अन एक टोपि घेउन, बाकि समदं सण वार सगळं म्हायेरच सुटलंय जणु.’ वातावरण वाटण्यांवरुन एकदम ’माहेरची साडी’ टाईप झालं. आता आत्याचा नातु अन नात इकडं गावातच शिकायला होते, घरीच रहात होते हे बोलायचं ती टाळत होती. अगदी शकुताई, सुरेखा अन ज्योती सगळ्यांच्या नजरा थोड्या बदलल्या, पण असलं बोलणं ऐकुन मुद्दा सोडतील ते अण्णा कसले?, पुन्हा चर्चा व्यवस्थित वाटेला लावत ते म्हणाले ’ आं गण्या, एकदम सात लाख एकराला, अरं उजनिच्या बॅकवाटरला सोडलं तर आख्या जिल्ह्यात तरि हाय कारं असला भाव जमिनीला, बोलाचाली व्हायच्याच असल्या वक्ताला पण एकदम सात लाख, अन त्ये बी चुलत भावाला, अरं असं करु नका, काय तर मधला मार्ग काढा.’ यावर गण्या लगेच उत्तरला ’ काय नाय अण्णा मदला बिदला काय न्हाय, द्याचे असतिल तर सात द्यावं नाय तर राव्हदे आखाड समद्यांचा, जमिन हाय, पाणि हाय, आताशा काय ते माती परीक्षण करुन भेटतोय रिपोर्ट काय तरी उगवेलंच कि तिथं, जे येइल ते येउद्या समदे मिळुन खाउ, इतं कुणाचा काय अड्लं न्हाय पैशावाचुन, नकोच असला पैसा मला.’
त्यानं पुढं चालुच ठेवलं ’ अन तुमि ओ काका, काय करणार पैसा घेउन एकुलता एक लेक गेला, कोन हाय मागं सांबाळायला, डोइला छप्पर हाय, करुन घालायला एकाला दोन सुना हायत, करुन घालतेत तिन टायमाला, बरोबर नात-नातु हायत, त्यास्नी जीव लावा, का उगा पैसा पैसा करायलात या म्हातारकाळात.’ त्याचं बोलणं कितीहि सत्य, जळजळीत सत्य असलं तरी त्यानं जग्गनाथकाकाला असं सगळ्यासमोर बोलायला नको होतं, हेम्या गेल्यावर जग्गनाथकाका माझ्याकडं होता तेंव्हाची त्याची अवस्था मला आठवली, दिवसभर बिचारा हेम्याचा एक फोटो अन त्याची पत्रिका घेउन बसायचा, समोर आलो कि दाखवायचा पत्रिका अन म्हणायचा ’ बग रे, त्या दात्यानं लिहुन दिलंय, इतं खाली, द्विभार्यायोग म्हंजे दोन दोन बायकाचा योग आहे म्हनुन, एक तरी मिळलि का होती रं त्याला,सांग बाबा तुच सांग, त्यो दाते समद्या दुनियेत पिक पाणी ते दिवाळ संक्रात बरोबर बिनचुक सांगतोय मग माज्या लेकाची पत्रिका लिवतानाच काय चुकला रं त्यो.?’
अण्णा आता शेवटचे वाटेकरी म्हणुन माझ्या आणि शकुताईकडं पहात होते,मी होता नव्हता तेवढा धीर गोळा केला अन सुरु केलं बोलायला’ हे बघा अण्णा, आम्हाला गाव सोडुन झाली १०-१५ वर्षे, आता नाही राहिला काहि संबंध पण आम्हाला पण कधितरि वाटतंच की एक शेत असावं,दोन म्हशी, दोन बैलं, चार कोंबड्या असाव्यात. उगा निवांत उठावं सकाळी ८-९ ला, घराबाहेर बसुन दात घासत शेजारच्या बरोबर दोन गप्पा हाणाव्या, मग उठुन त्याच्याकडंच जावं चहा प्यावा,मग निवांत तासाभरानं घरी येउन डायरेक्ट जेवण करुन मगच आंघोळ करावी, निवांत शेतात जाउन, गडी काय करताहेत काय नाहि पहावं. उगा चार दोन जणांना शिव्या घालाव्या, मालकिचा माज दाखवावा, पण काय शक्य होत नाही,या जन्मी तरी असं वाटतंय. आता ह्या वाटण्या झाल्यावर तर काय पुन्हा इकडं येणं होईल ते या लेकरांच्या लग्नाकार्यालाच. जशी इथली आशा सुटत नाही तशीच तिथली कामं पण सुटत नाहीत. काही झालं तरी हे घर, ही माणसं तरी आहेतच आपली, कधि वाटलंच तर येउन डोकं टेकवावं असे काका आहेत, तुम्हि आहात. ६०-६५ मैलाला आत्या आहे, हो कि नाहि ग आत्या?, मग एवढं सगळं असताना पुन्हा वेगळा जमिनिचा तुकडा काय करायचा ओ? असला काय नसला काय सारखाच ना? काय ग शकुताई बरोबर म्हणतोय ना मी, बोल की तु, हो तर म्हण नाहि तर म्हण.’ एवढं बोलुन मी थांबलो. शकुताई माझ्याकडे बघत बघतच बोलली, ’ होय बाई, खरंच आहे सगळं, इथं कुणाला वेळ आहे हो सगळं करायला, आहे त्या घरातल्या तुळशीला अन मनिप्लॅंटला पाणी घालणं होत नाही म्हणुन ड्रिप करुन घेतलंय घरात अन हे शेतीचं कोण बघणार, एवढ्या लांब येउन’
’अगदी बरोबर बोललीस, ताई तु’ मी पुढं सुरु केलं ’ त्याचबरोबर आता गण्या म्हणला ना ते पण खरंच आहे, कसंही झालं ना तरी आपलं ते आपलंच असतंय मग ते लेकरु असेल नाहीतर,जमिन. म्हणुन आखाडाची जमिन मी घेतो विकत एकरी १० लाख देतो.’
अण्णा, मंद्या अन गण्या गडबडले होते, जग्गनाथ काका नुसताच माझ्याकडं पहात होता, आत्या बिपि वाढल्यासारखि दिसत होती, तर शकुताई फक्त पांढरीफटक पडायची राहिलि होती. एक-दोन मिनिटं कुणिच काहि बोललं नाही. या धक्क्यातुन सावरत अण्णा बोलले ’ अरे, ह्ये काय लिलाव चाललाय का काय जिल्हा सहकारी बॅंकेचा, एकजण चार म्हणतंय, दुसरा सात म्हणतोय अन आता तु दहा, चक्क दहा, समजतंय का काय बोलतोस ते, चालु बाजारभावाच्या पेक्षा अडीचपट भाव बोलतोस तु. आहेत का एवढं पैसं तुझ्याकडं ? कुणालाही येईल तसा माझ्या ऐपतीचा प्रश्न आल्यावर मला पण राग आला,’ अण्णा, गावातलं मोठे म्हणुन तुम्हाला बोलावलंय, बाजारभाव काय आहे अन काय नाही ते आम्हाला पण कळतंय. आणि कुणाकडं किती पैसा आहे अन नाही याच्या उचापती तुम्ही करु नका, कागदोपत्री व्यवहार होणार आहेत ना मग जेवढा द्यावा लागेल तेवढा पैसा आहे माझ्याकडं, बिनपैशाचं बोलत नाही मी उगा गमजा म्हणुन. जे व्यवहार चाललेत त्यावर फक्त थोडं लक्ष द्या तुम्ही, नस्या चवकशा नका करु उगा.’
माझं हे ऐकुन अण्णा अन मंद्या चिडलेच होते अन त्याच रागात मंद्या बोलला’ चल, हाय माजि तयारी,टाक पैसं अन घे नाहरकत लिहुन, बगुयातच कोण येतंय त्या आखाडात कसायला अन खायला. चल टाक पैसं अन घे आखाड तुला.’ त्याचं ऐकुन गण्या त्याला बोलला’ अरं मंद्या अन टॅकर कशानं भरणार मग, विकणार का काय सगळं एक हाती.’ गण्याचा प्रश्न ऐकुन मंद्या अजुनच चिडला, बोलताना त्याच्या अंगावर जायचाच बाकी होता,’ जा रे मोठं आलं माझ्या टॅंकरला हात लावणारे, आरं दुष्काळी भाग हाय आपला तितं, चार - आठ गावात पाणी पुरवुन पुण्याचं काम करतुया तर कोन अडवतोय तेच बगायचंय मला. देवाची देन हाय ते पाणी, समद्या गाववाल्यांचा हक हाय त्येच्यावर, ह्यो कोन आला पैसं टाकुन ते विकत घेनारा, हात तर लावु द्ये हिरीला, तिथंच मुडदा पाडीन हात लावणा-याचा’ मंद्याचा आवेश पाहता तो असलं काहितरी करेल याची मला भिती वाटायला लागली, जग्गनाथकाका पण हादरले होते, शकुताई अन आत्या आता खुपच घाबरल्या होत्या. शकुताई मला म्हणाली’ मुर्ख आहेस का रे, काय बडबड करतो आहेस समजतंय का तुझं तुला, तिथं घराचे अन गाडिचे हफ्ते भरता भरता दम लागतोय अन हे काय नसती स्वप्नं पाहतोयस, कुठुन आणणार आहेस एवढा पैसा अन आणलास तरी काय करणार आहेस त्या आखाडाचं ? उगाच का घरातच दुष्मनी ओढवुन घेतो आहेस, सांग सगळ्यांना की तुला काही ईंटरेस्ट नाही म्हणुन, अण्णांना सांगुन थोडा भाव वाढवुन द्यायला लावु मंद्याला, अन झालं.’
माझा राग अजुन उतरला नव्हताच, शकुताईवर जरा जोरातच ओरडलो ’ तु गप ग शकुताई, इथं सोन्याचा भाव आलाय जमिनीला अन हे आपल्याला काही कळत नसल्यासारखं समजुन मातीच्या भावानं पैसे देताहेत अन उगीच गप्प बसायचं का आपण? काल चौकशी केली मी आजुबाजुला, गेल्या ५-६ वर्षात मंद्यानं पाण्याच्या धंद्यात लाखो कमावलेत, १५ लाखाचा एक टॅंकर पडतो, आणि आता सहा टॅंकर आहेत त्याच्याकडं त्यातले चार बिनकर्जाचे, अजुन एक सोलापुरला पडलाय अडकुन पोलिस स्टेशनला तो वेगळाच. यातला काय हिस्सा दिलाय का कधी आपल्याला? दहा दहा टक्के जरी दिले असते ना तर तुला मला घरासाठी कर्ज काढायची गरज पडली नसती तिथं, कॅशमध्ये घरं झाली असती, पोरांना चांगल्या शाळेत घालता आलं असतं आज. उगा व्यवहार कळत नाहीत तर बोलु नकोस मध्ये मध्ये.’ हिस्सा न देणं याला आत्याचा पुर्ण पाठिंबा होता, तिनं लगेच तसं बोलुन पण दाखवलं. आत्या मध्ये पडली म्हणल्यावर शकुताईला थोडं बरोबर वाटलं, पण अजुनही आखाड विकत घेणं तिच्या डोक्यात घुसत नव्हतं हे निश्चित. तिकडं अण्णांचे हिशोब चुकत चालल्यानं अस्वस्थता वाढत होती, या सगळ्या व्यवहारात त्यांचा काहीतरी फायदा होता हे निश्चित होतं, त्यामुळं त्यांना सगळं मंद्याच्या बाजुनं व्हायला हवं होतं, जे कालपर्यंत होत होतं पण आताच्या बदलाची त्यांनी कल्पनाच केलेली नसावी, त्यामुळं त्यांच्याकडं प्लॅन बी असा काही रेडि नव्हता.
स्वताला सावरत ते म्हणाले’ बरं असं करा, मग तुम्हीच ठरवा काय ते मी यात पडतच नाही तुमच्या मध्ये, उगा गावात माझी अब्रु नको जायला घरात भांडणं लावली असं, काय बरोबर ना जग्गनाथा, बोल की रे तु का असा गप्प बसलायस’. जग्गनाथकाका खरंच काही बोलायच्या अवस्थेत नव्हता, त्याला जशी इथली परिस्थिती माहित होती, तशीच माझ्या परिस्थितीची कल्पना होतीच. तरी आता मोठंपण आलंय म्हणल्यावर बोलणं भाग होतं ’ ह्ये बग मंदारा, अरं काल बी तुमी जमिनीचे भाव जरा कमतीच लावले, म्या काय बोललो नाय, त्याचा भाग निदान आखाडात तर द्या की रं, शेवटी काय आपल्यालीच हायतं की सगळी, तुला पाण्याच्या धंद्यात पैसं मिळालं की न्हाय ह्ये काय लपुन उपेग हाय का?, समद्यांस्नी कळतंच बाळा ते, अन हर्षद काय पुना इतं येनार नाय का जमिन कस्नार नाय, मग त्येला बी थोडं जास्तीचं मिळालं तर काय बिगडालय तुजं, ती शकु अन माया, दोगी लेकी या घरच्या, आपल्या आपल्या घरी गेल्या सुखात हायत, कदी तर सणावाराला येणार कायतर दोन चार दिस राहणार अन जाणार, का उभ्या राह्यल्यात कदी दारात पदर पसरुन, न्हाय ना, मग मिळलं त्यानाबी चार पैसं तर तुजं काय चाललंय, का तुज्या तोंडचा घास तर नाय ना मागत कुणी, असं करा तुजं बी ठिव बाजुला अन त्याचंबी, गण्या म्हणतोय तसं करा सातावर मोकळं करा सगळ्यास्नी, एकच मुद्दा राह्यलाय तो सोड्वा अन मोकळं व्हा’ घरातल्या सगळ्यात मोठ्या माणसाचा शब्द मोडणं सगळ्यांनाच अवघड होतं.
नाही म्हणायला अण्णा थोडं नाराज होते ऐनवेळी झालेला बदल त्यांना रुचला नव्हता. मनात हिशोब केला तर मला तरी काही वाईट वाटत नव्हतं सातच्या हिशोबानं साडेसतरा लाख म्हणजे अंदाजे अठरा लाख आणि त्याचा सहावा हिस्सा म्हणजे मला तीन लाख अन कालच्या हिशोबातले अडीच लाख असे एकुण साडेपाच लाख मिळाले म्हणजे माझं होमलोन निम्याला आलं असतं एकदम, शकुताईकडं पाहिलं तिनं बरोबर आहे अश्या अर्थानं मान हलवली,मला आता एकदम मगाशीची भुमिका बदलुन दुस-या टोकाची भुमिका घेणं भाग होतं, व्यवहारी होतं, घसा खाकरुन मी बोलायला सुरुवात करणार तेवढ्यात दरवाज्यातुन मंद्याचा धाकटा आत आला, कालपासनं तापला होता म्हणुन शाळेत नव्हता गेला, आत येउन माझ्याकडं पाहिलं अन ओरडायला लागला ’ काका आलाय तिथं काका आलाय, आई चल चल काका आलाय तु बी चल जाउ चल’ त्याच्या
चेह-यात मला आता हेम्याची झाक जाणवत होती आणि त्याचा कालचं टायपिंग आठवत होतं, ” हर्ष्या माफ कर, काल खोटं बोललो म्या तुला, अरं माणुस माणसाला निस्तं चेह-यानंच नाय ओळखत, आत्म्याचं आम्यालापण कनेक्शन असतंच कि, अन त्याच्यातला आत्मा तर माझाच एक तुकडा हाय’
क्रमशः

Print Page

Wednesday, June 15, 2011

स्टेट ऑफ द आर्ट - भाग ७.


स्टेट ऑफ द आर्ट - भाग ७.
आता मात्र पटकन खालि बसत गण्या म्हणाला’ हर्ष्या पह्यिल्या झटदिनी फोन विकुन नविन घे, लै बाराचा हाय ह्यो एकतर सुकाच गेला अन आता सगळ्यांना सुकवायलाय. पोरां-गुरांना उतरवलाय का निस्त्याच गप्पा हाणताय इथं बसुन दोघी बी .
इथुन पुढं सुरु -----
शकुताई आणि सुरेखा झटकन आत गेल्या, हातात काहितरी घेउन आल्या आणि मुलांच्या दोन्हि खोल्यात जाउन आल्या, नंतर सुरेखा एकटीच मागं गोठ्यात जाउन आली. तोपर्यंत ज्योति चहा घेउन आली होती. तिनं मोजुन दोनच कप चहा केला होता, मी आणि गण्यानं चहा घेतला मग थोडावेळ सगळॆच शांत होते, एकदम खुप ताणलेलं प्लॅस्टिक फट्कन फुटावं तसा शकुताईचा फोन वाजला, फोन जवळच होता तरी घेताना ती धडपडली, नितिनचा फोन होता. त्याला अनु आईकडं गेल्याचं सांगितलं आणि फोन कट केला. आम्ही दोघं, मी आणि गण्या खोल्याबाहेरच्या पॅसेज मध्ये बसलो होतो. आजोबांनी सगळ्या घरात हट्टानं शहाबाद घालुन घेतली होती, त्या खडबडीत फरशा आमच्या घरातल्या गुळगुळीत टाईल्स पेक्षा जास्त उबदार होत्या,आणि आमच्या टाईलस वर कर्जाची सावली होती आणि इथं या शहाबाद एका खुनाच्या सावलीत होत्या. तो विषय डायरेक्ट काढणं शक्यच नव्हतं पण डोक्यातुन जात पण नव्हता.
शेवटी, सुरेखानं बोलायला सुरु केलं ’ गणेशभावजी, झालं का ओ सगळं म्हंजे हिशोब झाले का तुमचे, मी आले आत स्वयपाकाचं बगाया, पोरं बी भुक भुक करति होति, माजं काय बाय लक्षच नाय राहिलं’ वेड घेउन पेडगावला कसं जावं ह्याचं उदाहरणासहित स्पष्टीकरण होतं हे बोलणं. गण्या पाच मिनिटं गप्प राहिला मग थेट मलाच म्हणाला ’ हर्ष्या, ह्ये बग जमेल का तुला, आखाडाचे सा भाग करु, तुझा, माझा, मंद्याचा, जग्गनाथकाकाचा, शकुताईचा अन आत्याचा, ज्येला जिमिन हवी जिमिन घ्या, ज्येला नको असंल त्येनं ज्येन्ला हवीय त्यानला विका. बाकीचं तर सगळं जमलेलं आहेच, थोडं कमीजास्त. बग म्हणजे काय उगा घरातला मामला घरातच मिटलेला बराय नव्हं, उगा गावगाड्यात चर्चा नको निस्ती.’
मी विचारात पडलो, आखाडाला सगळ्यात जास्त भाव असणार, बाकीच्या जमिनीत झाला जरा मागं पुढं तरी इथं भरुन निघंल. हिशोब करायचा प्रयत्न केला पण हातावर काही जमेना. चेहरा गोंधळला होता, गण्याला वाटलं आला आता जाळ्यात, मी थोडासा चाचरत त्याला म्हणलं ’ अरे पण बाकी जमिनीचे भाग तुम्ही फार कमी सांगता आहात रे, बाजारभावापेक्षा निम्याला रेट लावताय तुम्ही, आमच्या जमिनी विकत घेताना. ते भाव वाढवत असाल तर हा विचार करता येईल, नाहीतर....’ मी वाक्य पुर्ण करण्यापुर्वी गण्या बोलला ’ नाहीतर असं करा तुमी घ्या जमिनि आमच्या वाट्याच्या,मग विका बाजारभावानं जमिनी. आमि काय मदे नाय येणार तुमच्या, टाका पैसं.’ गण्या इतक्या लगेच जमिनी विकायला तयार होईल याची कल्पनाच नव्हती त्यामुळं मी गांगरुन गेलो. ’ छे रे तेवढे पैसे कुठेत माझ्याकडे आता, असते तर घेतल्या असत्या जमिनी मी, काय म्हणतोय तुम्हिच जरा भाव वाढवा की, अगदी बाजारभाव नको पण निदान त्याच्या जवळपास तरी द्या की’ मी बोलायला नेहमिच चुकतो आणि आता हि न चुकता चुकीचं बोलुन गेलो हे बोलुन झाल्यावर लक्षात आलं माझ्या.
शकुताईचा चेहरा मात्र शांत होता, तिच्या मनात काहितरी वेगळंच होतं हे नक्की. आता मात्र मला झोप येत होती, मी उठलो, तसा गण्या पण उठला, लुंगी जरा वर करुन झटकली आणी खोलीकडं गेला, तशी ज्योती कपबशा घेउन लगेच किचनमध्ये गेली आणि परत येउन दरवाज्यात उभी राहिली, केला इशारा जाता जाता समजुन मि आणि शकुताई आमच्या खोलिकडं निघालो, सुरेखा गडु घेउन आत गेली, मागं ज्योती चटकन खोलित गेल्याचं मला जाणवलं, आत येउन गप्प पडलो. आता झोप येईना, आणि त्यात शकुताईचं बॅग काढुन बसणं, त्यामुळं लाईट चालु. थोडावेळ या कुशिवरुन त्या कुशीवर अर्धवट पेंगत होतो, तेवढ्यात शकुताईकडं नजर गेली आणि एकदम ओरडलोच,’ अगं हे काय करतेस, कशाला चालु केलास लॅपटॉप, बंद कर आधी’ ती चिडलीच, तसाच माझ्या हातात दिला आणि म्हणाली’ घे, जरा हिशोब करावे म्हणलं की सुरु तुझं, दुपारी पण असाच ओरडलास माझ्यावर’ असं म्हणुन पांघरुन घेउन झोपली
आणि मी, पुन्हा उघडलेलि वर्ड फाइल पाहुन काय करावं हा विचार करत होतो. तेवढ्यात अक्षरं उमटली ’ झोप आता भाड्या, उद्या बसाल ना चर्चेला तेंव्हा मी सांगतोय तसंच वागायचं, एकदा का मंद्याचा बदला घेतला ना का मग मोकळा मी, तुला काय बी होणार नाय हि माझि जबान हाय जबान. फक्त मी सांगतोय तसं कराचं नी तसंच बोलाचं.’ आता पुन्हा झोप उडाली, विचार केला एकदा या हेम्याशी वाद घालुच आता,त्याला म्हणलं म्हणजे टाईप केलं ’ काय रे तो गण्या म्हणतोय घ्या जमिनी विकत, आणायचे कुठुन पैसे त्याला द्यायला.उगा तुझा बदला बदला माझ्या अंगाशी यायचा, इथं आहेस तोपर्यंत गप्प रहा, तुझं संपलय आयुष्य आता आम्हाला जगु द्या सुखानं, उगा तुझ्या नादाला लागुन जे दोन घास खातोय सुखाचे ते पण सोडावे लागतील या जमिनी घेण्याच्या नादात अन तुझा बदला घेण्याच्या नादात.’ थोडा वेळ काहीच झालं नाही, माझा नैतिक विजय झाला असं समजुन आडवा पडलो.
स्क्रिनसेव्हर सुरु झालं होतं,डोक्यातुन विचार बाहेर निघत नव्हते पण डोळे बंद करुन पडलो होतो, किति वेळ झाला माहित नाही, पण जाग आली तेंव्हा शकुताई हलवुन जागी करत होती, उठल्यावर विचारलं ’ हे काय रे गोळी घेतली होतीस का काय, केवढा गाढ झोपला होतास, उठ साडेआठ झालेत, दहा पर्यंत येतील सगळे, आणि काल रात्रिसारखं काहितरि अर्धवट बडबड करु नकोस, हातात आलेला पैसा सोडु नकोस. हवं तर ह्यांच्याशी बोलुन घे एकदा. मी चालले आवरायला.’ ती निघुन गेली, उठुन बॅगमधुन ब्रश पेस्ट घेउन दात घासत बाहेर आलो, घरातली पोरांची गडबड चालली होती, शाळेला जायची, मंद्याचा धाकटा दिसत नव्हता. बाहेर अंगणात तोंड धुतलं, खोलित येउन पाहिलं,लॅपटॉप चालुच होता, हायबर्नेट मधुन बाहेर आल्यावर हेम्याचीच वर्ड फाइल होति, आणी आता लिहिलं होतं ’ घे तु जमिनि मी इथं बसुन लै काय काय करंन,अन तुला पैसं मिळाची सोय करतो, आता एक दोन ठिकाणी वाचलं काय ते डाटा थेप्ट काय अन ते हाकिंग का काय, एकडाव बघुया जमंल असं दिसतंय, मला जे समजल्या ना ते म्हंजे इकडचं तिकडचं एक आणि शुन्य पकडायचं अन बाहेर काडायचं, दुस-याला द्यायचा, रातभर तुज्याच प्रश्नावर विचार करत होतो, मग या वायरीतुन त्यात असं करता करता या मोठ्या खोक्यात आलोय आता, इथं तर लैच गर्दि हाय एक शुन्य शुन्य ची, जरा जरा समजाया लागलंय मला बी,’ आता नुसता घाबरलो नव्हतो तर ओरडुन रडावं वाटत होतं,डोक्याच्या भुग्याचा भुगा होत होता. आत बसुन हेम्या असं काहि करेल असं वाटलंच नव्हतं.
पण दोनच मिनिटात पैशाचा विचार केला, बाकी जमिनि सोडल्या अन आखाडाची विकत घेतली तरी दोन वर्षात दुप्पट झाली असती किंमत, आणि पुन्हा विहिरिच्या पाण्याचं उत्पन वेगळंच होतं, माझे पैसे त्यातच वसुल झाले असते. पैसा माणसाला काहीही करायला लावतो म्हणतात तसं झालं माझं, या विषयावर सगळे येण्याच्या आधी एकदा हेम्याबरोबर बोलायचं होतं, खोलीचा दरवाजा लावला आणि बसलो समोर लॅपटॉप घेउन,
हेम्या होताच, त्याला विचारलं ’ काय रे तुला कसं काय जमेल हे, तु तर एक आत्मा म्हणा किंवा भुत आहेस, तुला काय कळतंय या कॉंम्पुटरमधलं, तु तर जिवंत असताना पण काहि शिकला नाहीस, काहीतरि झालं अन इथं आत आलायस.’ पाच मिनिटं गेली, फेसबुक किंवा जिटॉकला खाली एक किबोर्ड दिसतो समोरचा टाइप करताना तसं इथं काही नव्हतं, त्यामुळं कळत नव्हतं काय होतंय ते. पण एकदाचं अक्षरं यायला सुरुवात झाली ’ हर्ष्या, तुला जरा डिटेलवार सांगतो आता ऐक, आत्मा मंजे काय असतंय माह्य्तेय का, अरं एक पुंजका असतोय, शेवरिचा कापुस उडवायचो ना ल्हानणी आप्ण तसं, फक्त त्यो पुंजका असतोय विशिष्ट लांबिचा, काय ते म्हणता तुम्हि त्येला फ्रिकेन्सि ना, तेच त्ते प्रत्येकाचा आत्मा एका खास अश्या लांबिचा असतोय, बोटाच्या ठसासारख्यारं, कोणतंबि दोन आत्मे सारखे नसतेत, म्हणुन तर असं भटकतोय कारण एकदा का एका शरिरातनं मोकळा झाला कि त्या आत्म्याला बरोबर फिट बसेल असं शरिर मिळेपर्यंत त्येला भटकावंच लागतंय, आता बघ तुझ्याकडं एरटेलचा फोन हाये मंग त्ये कार्ड रिलायन्स मध्ये बसलं का? नाय, त्येला त्येचं वेगळं असतंय, पन एका मोबाइल मधुन दुस-या मोबाइल मधं मात्र ते कार्ड बरोबर जातंय कारण त्येची लांबी बरोबर जुळतिया तिथं म्हणुन.’
दहावि पास हेम्याच्या तोंडुन हे असले टेक्निकल ऐकुन मी अजुनच भैताडलो, त्याला विचारलं, अरे मग तु कसा इथं आलास, हा काय फोन नाही’ त्यावर तो म्हणाला ’ अरे तुला बोललो नाय का भावड्या, तुला लै पहावासा वाटला म्हनुन त्या झाडाकडं येत होतो, अरं हरेक झाडाचा बी आत्मा असतोय आणि झाडाचा आत्मा कोणालाबी जवळ करतोय, लै चांगली असत्येत झाडं, झाडं संपली ना सगळी तर हे माझ्यासारकं भटके आणि भरित भर झाडांचे आत्मे सगळे फिरत राहतील अन लै गोंधळ होइल, त्ये जाउदे, तर मि काय म्हणत होतो, मि असा त्या झाडाजवळ आलो, अन थेट माझ्या फ्रिकेन्सिच्या एका लाइनला धडकलो, अन झाडाच्या आत्म्याच्या फ्रिकेन्सिला जुळवुन घेउन होइपर्यंत ह्या ड्ब्याकडं ओढलो गेलो, कायतरि पांढरं होतं, त्यावर एक लाइट व्हति लुक्लुक करालेलि अन घापाकदिशि आत ओढला मला त्या आइघाल्या लाइटनं, आजिला लै हाका दिल्या तसं ति आली व्हती पण तिची फ्रिकेन्सि काय जमली नाय, मग ति गेलि परत आखाडाच्या हिरित, इतं आत आल्या आल्या ह्या डबितच अडकलो होतो, इथं कुटंच काही जुळेना, जे जुळतंय असं वाटलं तिथं जाउन आलो, तर नविनच कायतरी होत होतं. घुंई घर घट्ट्क कसले कसले आवाज आले, ते तलाठि बोंबलायला लागला तुज्या नावानं, तु पण आलास पळत, तवा आजिच होती तिथंच, तुला निट पाहुनच गेलि परत.’ म्हणजे जर त्या तलाठाच्या टाटा फोटॉन स्टिक जर हेम्याचा आत येण्याचा मार्ग होता तर तिच स्टिक त्याचा बाहेर जाण्याचा मार्ग होती, पण असं असतं का प्रत्येक स्टिकची व्हेवलेंग्थ वेगवेगळी असते का आख्खि सर्विस एका व्हेवलेंग्थवर असते. माझं हे क्षेत्र नसल्यानं मला फार माहिती नव्हती, नित्याला विचारायला पाहिजे होतं,
पण ते नंतर,इकडं फिजिक्स्चा क्लास सुरुच होता, ’ तर असा आत आलोय, ह्ये जे बारिक पिनापिनाचं हाय ना तिथं जरा जुळतंय माझं, पण बाकि ठिकाणी लै उपटल्यावानि होतंय, बरं ते जाउदे तुमच्या बैठकिचि वेळ होत आलियं जा आता, घाबरु नको मर्दा, अरं भिड बिन्धास्त काय व्हईल ते बघुन घेव रे’ आता मला खोटा का होइना आत्मविश्वास आला होता, तेवढ्यात एक शंका आली ’ हेम्याला विचारलं,’ अरे पण काल संध्याकाळी मंद्याचा धाकटा आला होता खोलित, मग घाबरुन पळत काय गेला, नंतर ओरडत काय होता ?’ पुन्हा दोन मिनिटांचा गॅप गेला आणि ओळी दिसु लागल्या, ’ हर्ष्या माफ कर, काल खोटं बोललो म्या तुला, अरं माणुस माणसाला निस्तं चेह-यानंच नाय ओळखत, आत्म्याचं आम्यालापण कनेक्शन असतंच कि, अन त्याच्यातला आत्मा तर माझाच एक तुकडा हाय.......
क्रमशः

Print Page

Tuesday, June 7, 2011

स्टेट ऑफ द आर्ट - भाग ०६


स्टेट ऑफ द आर्ट - भाग ०६
हेम्याच्या म्हणण्यानुसार, हे दोघं जमिनिचा फार कमी भाव सांगत आहेत आणि त्यांनी अण्णाला पण पटवलं आहे,त्यामुळं भाव जास्त सांग किंवा त्याच भावात जमिनी तु विकत घे आणि नंतर विक बाजारभावाने.हे त्याला सांगायला फार सोपं होतं आणि जर खरंच ते विकायला तयार झाले तर काय घ्या, कुठुन देणार इतके पैसे हे कळत नव्हतं, तसं हेम्याला विचारलं तर तो म्हणाला’ अरं नसती चिंता नकं, काय विकत न्हायत जमिनी तुला, काय करणार विकुन, फिरणार दारोदारी भीक मागत, तुला एक हाय नोकरी पगार येतोय महिन्याचा महिन्याला मग काय वाटत नाय, इथं कसं जगतोय आमालाच ठाव.’
मी ह्सुन त्याला म्हणलं, ’तु अजुन जगतोयस, कसं काय रे?’ बरं ते जाउ दे उद्या काय ते सांगतो, मी फक्त भाव वाढवुन मागणार पण जमिनी विकत घेतो हे काही बोलणार नाही तिथं, आणि आता सगळं झालंय की रे फक्त आखाडाचाच प्रश्न आहे, उगा तेवढ्याकरता का ओढाताण करायची, शेवटी सगळे आपलेच कि, ताटात सांडलं काय वाटीत सांडलं काय एकच ना’
बराच वेळ स्क्रिनवर काहीच उमटलं नाही, मला पण झोप येत होती,म्हणुन मीच टाईप केलं झोपतोय रे आता, पहाटे उठेन परत. वर्ड फाईल बंद करणार तेवढ्यात अक्षरं उमटली ’ भाड्या, सकाळपर्यंत मेली तुझी बायको अन पोरगी तर म्हणशील का सगळं आपलंच की, अरं बोडाच्या ताट ताट असतंय अन वाटी वाटी असतीय, उद्या उठलास की जा बाबाच्या खोलीत, घे त्याची पोथी अन बघ त्यात, काय बी नाय रं माज्या म्हाता-याच्या पोथीत, देव न्हाय, धर्म न्हाय फक्त दोन फोटोयत, एक माझा दहावी पास झाल्याव काढलेला अन दुसरा माज्या बॉडीचा,अंगातलं समदं पाणि डोळ्यातुन भायर येईपतुर बघत असतोय रोजिला, त्याबिगार जेवण जात न्हाय त्याला आणि तु आला मोठा तालेवार म्हणे ताट अन वाटी’ ही धमकी नव्हती तरी पण माझा थरकाप उडाला पटकन अनुला फोन लावावा वाटला म्हणुन पाहिलं तर फोन खालीच राहिला होता, चटकन उठलो आणि खाली आलो फोन घ्यायला, पाह्तो तर शकुताई, सुरेखा आणि ज्योती मध्ये अंगणात खाटांवर झोपुन बोलत होत्या, मला बघताच ज्योती सावरुन बसली पण सुरेखा तशीच झोपुनच बोलली’ का वं हर्षद भावजी, भिती वाटती का काय वर, लगोलग खाली आलास?’ कुणी हवंय का सोबतीला,? मी म्हणालो ’ नाही माझा फोन राहिला होता खाली तो घ्यायला आलो होतो.’ त्यावर ती म्हणाली, ’ बग ग ज्योते, बायको नाय तर झोप येतीय पण फोन नाय तर कसं व्हायला लागलंय ’
मी हसुन खोलीत गेलो, फोन हुडकला कुठं सापडला नाही, मग बाहेर येउन शकुताईला विचारलं तर ती म्हणाली ’ मला नाही माहीत रे, बघ आत नीट, बॅग मध्ये टाकला आहेस का ते’ पुन्हा आत येउन बॅग तपासली, फोन एकदम खाली होता आणि त्यावर थोडी माती आणि विटाचा चुरा होता, मी तर जेवण करुन हात धुतले होते, मग हे डाग कुठुन आले, परत बाहेर येत शकुताईला विचारलं ’ तायडे फोन आला होता का ग कुणाचा, केवढा घाण झालाय, कुणी घेतला होता का पोरांनी वगैरे ?’ ताई काहि बोलायच्या आत सुरेखा उठुन बसत बोलली ’ घाण म्हणजे माती अन विटकुरं हायत का ’ त्याबरोबर ज्योती पण जास्तच सावरुन बसली आणि भेदरल्या सारखी माझ्याकडे बघायला लागली. मी म्हणालो ’ होय बरोबर,जाउ दे कोणी पोरानी घेतला असेल’
तेवढ्यात सुरेखा उठली, किचनकडे जाताना बडबडत गेली ’ गंगेत नेउन बुडवल्याखेरीज ह्ये माडके मोकळं व्हायचे नाय, पुरा पिच्छा सोडणार नाय असा’ अन बाहेर येताना देवघरातला गंगेच्या पाण्याचा गडु घेउन आली आणि मला म्हणाली’ आणा इकडं ते फोन तुमचं, दोन थेंब टाकल्याशिवाय हात लावु नका त्येला, काय ठिवा इथं खाली पायरीला’ मला काहीच समजत नव्हतं, पण भारावल्यासारखा मी फोन खाली ठेवला, समोर सुरेखा उभी होती हातात गडु घेउन म्हणाली ’ हात फुडं करा अन घ्या ह्ये गंगेचं पाणि अन टाका त्या माड्क्याच्या मुडद्यावं, जा म्हणावं त्याला इथुन नाय तर येईल तुमच्या संग पुण्यापत्तुर अन समदं आयुष्य उकिरडा करुन टाकंल,ब्रहमचारी मेला की लई बाराचा होतोय, मेला तवाबी हातात फोनच व्हता त्याच्या, लोकं म्हणत्यात बोलत होता म्हणं त्या सटवी सुनितासंग, आधी माझ्या नव-याला नागवलं अन याला तर पुरतंच उठवलं दुनियेतुन, अन आता हाय तुमच्या पुण्यातच, कुठं मोरे शाळा का काय तिथंच जवळपास असतीय, ब्युटी पार्लर काढलंय कुत्रीनं ’
माळेतले फटाके उडावे तसे माझ्या डोक्यात फटाफट विचार येउन गेले, ही हेम्या बद्दल बोलतेय, आणि अपघात झाला तेंव्हा हेम्या फोनवर बोलत असेल अशी शक्यता निश्चितच होती. आता त्या फोनला हात लावायचीच मला भिती वाटत होती. मी तसाच उभा होतो, ज्योती एका खांबाला धरुन उभी होती तर शकुताई थरथरत होती. त्याच अवस्थेत मी फोनवर पाणी टाकलं, त्यावेळी सुरेखा कन्नड मध्ये काहीतरी मंत्र म्हणत डोळे झाकुन उभि होती. तिचं ते पुटपुटुन झालं कि डोळे उघडुन म्हणाली ’ घ्या आता फोन अन जपुन ठेवा’ फोनकडं पहात मी तिला विचारलं’ हे सगळं..’ तिथंच माझं बोलणं तोडत ती म्हणाली, दर महिन्या दोन महिन्याचा कार्यक्रम हाय हा, कधी ह्यांच्या तर कधि गणेशभावोजीच्या फोनला असतेतच हे माती अन विटाचं हळदी कुंकु, रातभर समदे जागंच, फक्त ते म्हातारं मात्र घोरत असतंय खोलीत’
मी घाबरत घाबरत फोन घेतला,चालुच होता, लगेच अनुचा नंबर लावला, रिंग होवुन संपल्या तरी कुणी उचलला नाही, पुन्हा लावला पुन्हा कुणी उचलला नाही, ४-५ वेळा असं झाल्यावर माझा धीर सुटला, हे मोबाईलचं प्रकरण, मगाशी हेम्यानं सुनावलेलं त्यामुळं अजुनच भिती वाटत होती. शकुताईनं विचारलं ’ का रे काय झालं, अनु नसेल उचलत तर ह्यांना लाव फोन, त्यांना सांग घरी जाउन पहायला’ मी तसं केलं नितिनचा पण फोन उचलला जात नव्हता. आता शकुताई पण घाबरली होती. तिनं धावत जाउन तिचा फोन आणला त्यावरुन नितिनला फोन लावला, दोन-तीन रिंग झाल्यावर त्यानं उचलला, शकुताईनं घाईघाईनं सगळं सांगितलं आणि त्याला माझ्या घरी जाउन अनुला फोन करायला सांगितलं.
इकडं सुरेखा आता नॉर्मल दिसत होती पण ज्योती अजुन घाबरलेलीच होती. माझा घसा कोरडा पडला होता, सुरेखाला पाणि मागितलं, तिनं पाणी आणुन दिलं ते पिउन वर गच्चिवर जायला निघालो, मागुन सुरेखाचा आवाज आला ’ भावजी खालीच झोपा, उगा वर कुठं एकटं झोपताय.’ तिचं बरोबर होतं, मी म्हणालो’ आलोच माझा लॅपटॉप घेउन येतो फक्त’ एवढं बोलुन वर आलो, लॅपटॉप उचलला, चालुच होता, वर्डफाईलच्या लिखाणात शेवटी लिहिलेलं होतं,’ चला मुलावो प्रार्थना झाली, आता गणिताचा पिरियड सुरु, म्हणा एका एकराला ३ लाख तर अडीच एकराला किती ?’
ते वाचुन तिथंच खाली बसलो, लॅपटॉप जवळपास पडलाच होता,लगेच पुढच्या ओळी दिसल्या ’ अरं घाबरला का काय इतक्यात, काय भावा असं कसं व्हायचं रे, आणि असं एकदम हेलकावं नको देउस की इथं आत किती बोच-या सुया हाय्त, मधल्या मधल्या गरमबी झाल्यात, आन भायर काय पंका फिरतोय जनु मधुनच अंगात आल्यावानी घुर्र्र्र्र्र आणि मग बंद होतुय खटाक करुन. मला काय भ्या नाय या सगल्याचं पन उगा कुठं काय लागलं बिगलं म्हंजे तुजा खोळंबा नको उगा, व्हय ना. म्हणुन तुला सांगितलं जरा दमानं घे.
मध्येच हे एक अन शुन्य मग मध्ये एक शुन्य शुन्य असं होतंय मग नुसतंच शुन्य येतय बराच वेळ मग पुनांदा एक बराच वेळ मग पुनांदा शुन्य, कसलं रे हे दोन, तीन ,चार काय पुडं जाईनाच गाडं तिच्यायला, बग नीट बिगड्ला पिगडला न्हाय नव्हं, पैला डाव सांगतोय म्या काय बि केलं नाय, उगा नंतर फुकटचा आळ नको गळ्याला आपल्या समजलं का नाय. हां, नायतर समदे एक अन शुन्य धरुन ठेवीन एकाबाजुला मग बगु काय करतोयस ते तु.’
मगाशी पर्यंत मला त्याची कथा सांगुन रडवणारा हेम्या आता चक्क धमक्या देत होता, डोकं भरकटलेलं होतं, सरळ पॉवर ऑफ केलं, सिस्टिम शटिंग डाउन होता होता पुन्हा पॉवर ऑन झाली, मगाची वर्ड फाईल सेव्ह केलेली नव्हती तरी उघडली, एक मिनिट्भर लागलं, हेम्यानं लिहिलं होतं ’ह्यो डब्बा तुला भायेरुन चालु बंद करायला येत असेल, पन म्या आत हाय ह्ये धान्यात असुद्या काय, लै छळ केलाय माजा तुमि समद्यास्नी समदी परतफेड करायची हाय जनु मला, तिच्यायला बायाची नुसती पुस्तकं बगुनच मेलोय, समाधान कशाचं ते न्हाई, लक्षात ठिव धर्म,अर्थ,काम आनि मग मोक्ष असतोय, डायरेक्ट उडी नाय येत मारायला एकावरनं दुस-याला’
आता मात्र मला खरंच काही सुचेना झालं, हा हेम्या आता मला ह्याच्या हातातलं बाहुलं बनवणार आणि नाचवणार अशी चिन्हं दिसत होती आणि या क्षणाला तरी माझ्याकडे काहि उपाय नव्हता. खिशात फोन थरथरला, नितिनचा फोन होता,’ अरे अनु घरात नाहीये,तुला बोलली होती का कुठं जाणार आहे ते?’ हा सगळ्यात मोठा धक्का होता मगापासुनचा, आता तर काही बोलता पण येईना, तरी धीर करुन विचारलं ’म्हणजे, घराला कुलुप आहे आणि तिची गाडी आहे का खाली?’ नित्या बोलला ’ होय घराला कुलुप आहे आणि खाली गाडी पण नाहीये, मी संध्याकाळीच पाहिलं होतं पण मला वाटलं तुला माहित असेल म्हणुन तुला काहि बोललो नाही तेंव्हा.’
भर रात्रीच्या गार वा-यात पण माझ्या अंगाला घाम फुटला, फोन बंद करुन पुन्हा अनुला फोन लावला, ७-८ रिंग झाल्यावर उचलला, पण आवाज अनुचा नव्हता आणि प्रश्न तर ’कोण बोलताय, कोण हवंय तुम्हाला, एवढ्या रात्री फोन काय करताय’ असे होते. मी म्हणालो ’ मी हर्षद बोलतोय, तुम्ही कोण बोलताय?’ तिकडुन आवाज आला ’ हर्षदराव, अच्छा तुम्ही का, अहो चश्मा नाही लावला म्हणुन नंबर कळाला नाही, मी अनुचि आई बोलतेय, का हो इतक्या रात्री फोन केलात काय झालंय.’ अनु तिच्या माहेरी गेलिय म्हणल्यावर मला जरा धीर आला होता, आवाज पण नॉर्मल झाला होता, मी विचारलं ’ अनु कुठंय आत्ता, कधी आली इकडं?’ त्या म्हणाल्या ’ अहो, सकाळीच आलीय, आज जरा बरं वाटत नाही म्हणाली मग आली इकडंच, आता झोपलिय बेडरुम मध्ये संध्याकाळी फिरुन आल्यावर पर्स इथं हॉलमध्येच टाकली आणि झोपली, उठवु का तिला?’ आता दुसरं कुणी असतं तर नव-याचा फोन आहे म्हणल्यावर उठवलं असतं पण इथं या विचारत होत्या उठवु का? नसते लाड अजुन काय? ’ मी म्हणालो’ नको, अहो नितिनला पण सांगुन नाही आली म्हणुन काळजी वाटत होती जरा, ठीक आहे मी करतो उद्या सकाळी फोन’ असं म्हणुन फोन ठेवुन दिला आणि मग खाली निघालो, लॅपटॉप फोल्ड केल्यानं हायबर्नेट मोड मध्ये गेला होता आणि सकाळपर्यंत बॅटरी संपली असती, पुण्याला गेल्यावर नित्याला सांगुन गुपचुप लॅपटॉप कुणाबरोबर तरी बदलुन घ्यायचा म्हणजे हेम्याचा ससेमिरा सुटेल असा एक साधा विचार केला.
खाली आलो, लॅपटॉप बॅग मध्ये ठेवला, चेन जरा घट्टच बंद केली आणि खोलीत एकटं झोपायला भिती वाटलि म्हणुन बाहेर अंगणात आलो. शकुताई, सुरेखा आणि ज्योती अजुन बसुनच होत्या आणि आता गप्पा नव-याचे दुर्गुण या विषयावर आल्या होत्या. मला पाहुन सुरेखानं विचारलं ’ का व भावजी, लागला का बायकोला फोन.... तुमच्या का न्हाई अजुन?’ मी ’ हो लागला, तिच्या आईकडं गेलीय ती रहायला’ त्यावर सुरेखा म्हणाली ’ ह्ये ब्येस्ट हाय, उठ्लं कि चाल्ले म्हायेरात, शकुवन्सं तुमचं त काय एकाच बिल्डिंगात ना दोन्ही सासर बि म्हायेर बी’ जरा माझं पण टेन्शन जाईल म्हणुन मी बोललो, छे ग, तिचं सासर मोठं आहे बाबा सहा खोल्यांचा महाल आहे तो माहेर काय बाबा ३ खोल्या आहेत फक्त आणि परत स्वताचे घर आहे ४ खोल्यांचं, तालेवार पार्टी आहे तुमची वन्संबाई, काय समजलीस तु?’ आता शकुकडुन परत उलटवार होईल याची अपेक्षा होती पण तसं काही झालं नाही, ती गप्पच राहिलि.
मगाच पासुन ज्योती गप्प होति म्हणुन मी तिला विचारलं ’ ज्योती आई बाबा कसे आहेत गं, आणि तुझा भाउ एमपिएससिची परिक्षा देत होता ना काय झालं त्याचं?’ तिला याची अपेक्षा नव्हती त्यामुळं गडबडुन म्हणाली ’ बरि हाय्त, अन दादा एक परिक्षा झालाय पास आता तोंडी का काय ते हाय पुढच्या महिन्यात, ते झालं की मग झालं, त्येचंबी लग्न करायचंय यंदा.’ आपल्या भावाचं लग्न हा प्रत्येक स्त्री साठी अतिशय नाजुक विषय असतो. त्यावर मी काही बोललो नाही.
घड्याळात अडिच वाजले होते, गण्या त्याच्या खोलीतुन बाहेर येत म्हणाला ’ आरं भाडीच्यानो झोपा की आता का उगा दळण चाललंय, अन तु ये काय लहान मोठं समजतय का उगा कुटं बी बसाचंच पदर पाडुन, होय. तिच्यायला स्न्स्कार्च नायेत कुटं, जा चा टाक जरा आणि दोन बिस्किटं टाक त्यात’ असं म्हणुन माझ्याजवळ येउन उभा राहिला. गणु मालक, रात्री अण्णाना सोडायला गेले तेंव्हा थोडी टाकुन आले होते, मला अडचण हीच होती की मला बरोबर नेलं नव्हतं. बरीच वर्षे झाली हातभट्टी घेतली नव्हती आणि आज अनुपण नव्हती. गण्या बोलला ’ नशीब तुज्या घरी न्हाई आणलं हिला अजुन, तिच्यायल तुज्या बायकोला ते रातीला गाउन अन सकाळी घट पॅंट घालुन फिरताना पायलं ना इथं गावाला नाद लावंल तसली कापडं घालुन, ते मागच्यावेळचं तुज्या बायकोनं दिलं ना काय ते बबली ड्रेस घालुन येतिय कधितरी माझ्याबरोबर तर लोकं मला सोडुन हिलाच नमस्कार करत्येत माहिते का तुला ? बस खाली उभा का दावा मांड्ल्यासारखा उगा’
असं बोलुन खाली बसतानाच त्याचं लक्ष गंगेच्या गडुकडं गेलं, अर्धा बसलेला उठत म्हणाला ’ हे का आनलंय इथं, काय झालं आज, ओ रेखा वहिनी बोला की काय झालं हे का आलं देवघराच्या भाईर रातच्याला?’ सुरेखा शांतपणे बोलली ’ नेहमीचंच हळदिकुंकु होतं, जरा नवी माणसं आलीत त्यांना पण परंपरा नको का समजाया घरच्या, समजल्याय का कसं ओ भावजी परंपरा घरच्या’ पुन्हा टेन्शन झालं, आता मात्र पटकन खालि बसत गण्या म्हणाला’ हर्ष्या पह्यिल्या झटदिनी फोन विकुन नविन घे, लै बाराचा हाय ह्यो एकतर सुकाच गेला अन आता सगळ्यांना सुकवायलाय. पोरां-गुरांना उतरवलाय का निस्त्याच गप्पा हाणताय इथं बसुन दोघी बी


Print Page

Thursday, June 2, 2011

स्टेट ऑफ द आर्ट - भाग ५


स्टेट ऑफ द आर्ट - भाग ५

मंद्याची बायको, त्याच्या धाकट्याकडं पाहुन हसत हसत मला म्हणाली’ भावजी, कवा तरी येतास आणि जाताय लगेच दोन दिसात, पोरं वळक विसराला लागली, नुसतं भाचेच नसतेत पुतणं बी हायत, ध्यान द्या जरा. तुमचा लेक तर आमाला वळक बी द्यायाचा न्हाई कधि भेटला कधी तर’ त्याचवेळी मागुन शकुताई येत होती, भाचा-पुतण्याचा उल्लेख तिला खटकला ’ वहिनी माया दोन्हि कडुन लावावी लागते, उगा एकानं हात पुढं करुन होत नाहि, अडल्या पडल्याला मागं उभं राहिलं पाहिजं नुसतं पुजेला प्रसाद घ्यायला पुढं येउन नाती सुधारत नाहीत’. मी मात्र मंद्याच्या बायकोकडं बघत होतो, ती वाकुन पोराला उचलुन घेत असताना तिच्यावरुन नजर वळवु शकलो नाही. यांच्या लग्नात केवढ्या होत्या आणि आता कसल्या झाल्या होत्या, नाहितर आमचं दिव्य गेला बाजार ४०-४२ किलो असेल आणि वर्षातुन कमितकमि ३ आजारपणं व्हायची. तेवढ्यात शकुताई खोलीकडं निघाल्याचं लक्षात आलं आणि पटकन तिच्याआधी आत गेलो, स्क्रीनवर पाहिलं तर हेम्या निबंध लिहित होता, अवध्या १५-२० मिनिटात ८ पानं भरली होती. शकुताई तिची बॅग आवरता आवरता बोलली, ’हर्षद, तु काहीतरी वेगळं वागतो आहेस दुपारपासुन,काय झालंंय? ह्यांचा फोन आला होता ऑफिसमध्ये काही गोंधळ आहे का घरी काही झालंय? एवढ्या महत्वाच्या प्रसंगी असं वागुन चालणार नाही तुला हे समजत नाही का तुला? एकटाच लॅपटॉप बघत काय बसतो, पोट खराब झालंय काय म्हणतो,तिथं बाहेर सुरेखावहिनीकडं काय पाहतोय टक लावुन, काय चाललंय नक्की?’ मी सुरेखाकडं पाहतोय हे हिच्या नजरेतुन सुटलं असेल असं मला वाटलं, आता थोडं अपराध्यासारखं वाटत होतं पण माझं काय चालु आहे हे तिला सांगणं शक्य नव्हतं आणि सांगितलं तरी तिचा विश्वास बसला नसता.  

हेम्यानं लिहिलेलि १-२ पानं वाचुन शकुताईला बोललो ’ तायडे, ही लोकं जमिनीचा भाव फार कमी सांगत आहेत, मी उद्या उलटा पर्याय ठेवणार आहे, ज्या भावात ते आपल्या हिश्याच्या जमिनी घेणार आहेत त्याच भावात त्यांच्या जमिनी आपल्याला देतात ते का ते बघुया?’ शकुताई एकदम उखडली, तिच्या डोळ्यासमोर घरासाठी घेतलेली भरमसाठ कर्जे आणि जमिनीच्या पैशातुन होणारी त्यांची परतफेड हेच होतं, एका अर्थी ते बरोबर होतं, कर्जे आणि हफ्ते यांच्या भितिनं ती आणि नितिन गेली दोन वर्षे दुस-या मुलाचा विचार करत नव्हते आणि माझा पण यावरुन अनुशी नेहमी वाद व्हायचा. आता इकडे येताना तिनं घातलेली अट हीच होती, हे व्यवहार झाले की लगेच चान्स घ्यायचा आपण. पैसा आपल्या आयुष्याला असा सगळीकडं बांधुन ठेवतो, खरं तर आम्ही घरं घेताना या गोष्टीचा विचार केलाच नव्हता, स्वताचं घर आणि आयसिआयसिआयच्या माणसाची गोड गोड बोलणी याला भुलुन जास्त कर्ज घेतलं पण त्या रेटनं आमचे पगार नाही वाढले, त्यात मागच्या वर्षीची रिसेशन, म्हणजे या वर्षी पण पगार काही फार जास्त वाढणार नव्हता, सगळं अवघड होतं. ’आणि काय तु आणि अनु गाणं म्हणणार काळया मातीत मातीत,इथं बसुन’ मुर्ख कुठला, अरे कोण सुखी झालंय शेती करुन इथं, ह्यांचा जातो ना निम्मा पगार कर्जाचा हफ्ता आणि गावाकडं पाठवायला, १ वर्ष झालंय फ्रिज आणि टिव्ही बदलायचाय ते पण होत नाहिये, आणि अनुची गाडी पण बदलायची आहे ना, दोन वर्षे झाली तिच्या गाडिला, किती जुनं वाटतं ते मॉडेल आता, पार्किंग मधुन काढताना पण किती लोग्रेड वाटतं तिला तुला काय माहीत.?’ शकुताईनं जुना बॉम्ब नविन विमानातुन टाकला. पण हेम्या जे लिहित होता ते वाचता वाचता मला शकुताईच्या बरोबर वाद घालणं शक्य नव्हतं म्हणुन मी गप्प बसलो.

गण्याची मुलगी आत येउन म्हणाली ’ शकुत्या आणि काका, चला जेवायला लै भुक लागलिय आणि तुम्ही बसल्याशिवाय आम्ही जेवायचं नाही म्हणतीय आई, चल की लवकर’ असं म्हणुन तिनं शकुताईला धरुन ओढायला सुरुवात केली, शकुनं तिला पटकन उचलुन घेतलं आणि म्हणाली ’ हो गं बाई चल जाउ आपण, म्हणतात ना ’सासवा सुना लोकाच्या अन आतभाच्या एकाच्या’ तेच खरं. आणि तु पण ये रे लगेच. बास झालं आता उठ लवकर सगळी लेकरं खोळंबलीत आपल्यासाठी.’ इकडं हेम्या गेल्या ३ वर्षाचा इतिहास सांगत होता आणि ह्यांना जेवायचं पडलं होतं, हेम्याला थांबवुन मी मध्येच टाईप केलं ’मी जेवुन येतो, थांब तो पर्यंत, रात्री सगळे झोपले की मग बोलु आपण दोघं’ मग बाहेर जेवायला आलो, गण्या अण्णांना सोडुन आला होता, जग्गनाथ काका रात्री देवाचं काहितरी वाचायचे ते आटोपुन आले होते. मधल्या अंगणातच आम्ही जेवायला बसलो, पोरं एका बाजुला आणि आम्ही एका बाजुला. आता वातावरण बरंच निवळलं होतं. गप्पा मारत जेवणं झाली, मंद्याचा धाकटा जरा टरकल्यासारखाच होता, माझ्याकडे पाहायचं पण टाळत होता. नेहमीपेक्षा दोन घास जास्त जेवलो, हात धुताना मंद्याला विचारलं ’गच्चीवर प्लग आहे का रे? मी आज वरच झोपणार आहे,थोडं ऑफिसचं काम करायचं आहे. तो म्हणाला ’आहे, पण डास लै झालेत, पार दोन चादरी घेतल्यास तरि काय नाय, येतंतच आत, पण तु झोपणार असशील तर झोप की वर, पाणि द्या ओ वर गच्चीवर तांब्या भांडं भरुन’आणि घरच्या गड्याला वर गच्चीवर अंथरुण टाकायला सांगितलं.

मी सगळं आवरुन वर आलो, जिन्याच्या बाजुलाच झोपायची सोय केलेली होती, मी पटकन लॅपटॉप जोडला आणि पुन्हा वाचायला सुरुवात केली. आमच्याच घराविषयी मला नसलेली बरीच माहिति मला कळत होती. बराच भाग आखाडाच्या अवतीभवतिच घुटळमत होता, आखाड, विहिर आणि कोनाड्यातली देविचि मुर्ति, आजी हे त्या स्टोरिचे मेन कॅरेक्टर होते, हेम्याच्या मते, तो त्या दुनियेत अजुन बच्चाच होता, आजी होती म्हणुन त्याचं निभावुन जात होतं नाहीतर फार अवघड होतं. मला सगळ्यात मोठा धक्का होता तो म्हणजे हेम्याच्या अपघाताची गोष्ट वाचुन, हे घर बांधायला काढलं तेंव्हाच जग्गनाथ काकाला वाटणी करुन हवी होती, त्यावरुन त्याचा आजोबांशी वाद झाला होता, बरीच भांडणं झाली होती घरात. अशीच एक दिवस भांडणं झाली, हेम्याला घर हवं होतं, पाण्याच्या धंद्यातला हिस्सा सोडायचा नव्हता आणि काकाला आखाडाशी काहीही संबंध ठेवायचा नव्हता, यावरुन त्या दोघात पण बरेच वाद झाले होते, एका रात्री घरी काका, हेम्या , मंद्या आणि गण्या या सगळ्यांची बरीच भांडणं झाली, सुरेखा आणि ज्योती दोघी मध्ये पडल्या, हेम्या त्यांना काहीतरी बोलला, त्यावरुन मंद्या आणि गण्यानं त्याला मारलं आणि नंतर ४ दिवसांनी हेम्याच्या अपघात झाला, बुलेटवरुन तो घरी येत होता, तेंव्हा एका पाण्याच्या टॆंकरनं त्याला उडवला, गावापासुन बरंच लांब असल्यानं टॆंकर काहि सापडला नाहि पण त्याचा नंबर हेम्याच्या लक्षात होता, त्यानं तो इथं दिला होता आणि खाली लिहिलं होतं, सोलापुरात पोलिस स्टेशनला अजुन आहे गावठी दारुच्या वाहतुकीत पकडला म्हणुन जा ये बघुन.

हेम्याच्या संशय नव्हता तर त्याला खात्रीच होती मंद्याच ह्याच्या मागं होता, त्याच्यामते दोन कारणं होती, एक आखाडाच्या जमिनिचा आणि पाणि धंद्याचा वाद व दुसरं म्हणजे सुनिता, कोळीकाकाची मुलगी. हेम्याच तिच्याबरोबर लग्न ठरत होतं आणि तिचे मंद्याबरोबर संबंध होते, मंद्याचं लग्न झालेलं असुन सुद्धा आणि ते सोडायला ती तयार नव्हती. बिनाआईची बाढलेली लेक म्हणुन बापानं लाडावलेली आणि वळसंगची ब्युटी क्विन, तिला हेम्याबरोबर लग्न करायचं नव्हतं पण आजोबा, जग्गनाथ काका आणि तिच्या वापासमोर ती काही बोलु शकत नव्हती. हा घोळ निस्तरण्यासाठी एक मार्ग होता म्हणजे हेम्याला रस्त्यातुन हटवणे, आणि मंद्यानं त्याचा बरोबर गेम केला. मी सुन्न झालो होतो, हे प्रकरण या थराला गेलं असेल याची कल्पना नव्हती, कारण हेम्याच्या दिवसपाण्याला आईच आली होती, आणि परत येताना जग्गनाथ काकाला ट्रिटमेंट साठी घेउन आली होती, त्यामुळं या गोष्टीवर कधी चर्चा झालीच नव्हती. सहा महिन्यात काका परत गेला, वर्षभरानं आई गेली,एक महिन्यात रियाचा जन्म या सगळ्यात पुन्हा इकडं येणं झालं नाही आणि आमचं घर सोडुन बाकी कुणाशी गावात संबंध नाही, त्यामुळं काही समजत नव्हतं, आम्ही आमच्या जगात सुखी आहोत असं होतं.


Print Page