Thursday, December 15, 2011

चपला आणि सत्कार - भाग १३ - अंतिम.

नाथा अन बाकीचे चार जण केगांव पासुन निघाले, तिथुन बार्शी रोडला येउन ते मधल्या रस्त्यानं तामलवाडीला आले, तिथं बाउंड्रीच्या हॉटेलजवळ गाडीत अजुन थोडी भाजी भरुन घेतली, पुढं जाउन एकाआडवाटेला अंधारात थांबुन दोघांनी गाडीच्या नंबरप्लेट बदलल्या, समोरचे शो चे लाईट काढुन टाकले, आणि लटकणारा हनुमान, डॅशबोर्डावरचा गणपती काढुन ठेवला. त्या दोघांपैकी एकजण अंधारातच चालत पुन्हा सोलापुरच्या दिशेनं यायला निघाला. मध्ये एका बाजुच्या शेतात जाउन त्यानं दोन्ही नंबर प्लेटवर बरोबरच्या बाटलीतलं थिनर टाकलं अन दोन्ही प्लेट जमेल तेवढ्या स्वच्छ केल्या, द्गडानं वेड्यावाकड्या केल्या, एक तिथंच मातीत पुरली अन दुसरी पुढं चालत येउन एका वाहणा-या नाल्यात भिरकावुन दिली.
टेम्पो सुसाट पुढं निघाला,पहाटे पर्यंत लातुर - औसा रोडवर असलेल्या एका मठात पोहोचायचं होतं, पण त्याआधी बरोबर घेतलेली भाजी उस्मानाबाद मार्केटला टाकुन तिथं पोहोचायचं होतं. आता हा मठ या चार जणांचा पुढचा दोन महिने सांभाळ करणार होता. रात्री तुळजापुरनंतर एका ठिकाणी जेवायला थांबले होते तिथं फार कुणीच बोललं नाही, एखाद्याचा जीव घेउन नुसतं वावरणंच खरंतर अवघड असतं आणि इथंतर चार तासातच सगळे एकत्र बसुन जेवण करत होते, किंवा जेवण्याचा प्रयत्न करत होते, समोर आलेल्या तंदुरी चिकनच्या जागी वेगळंच काही दिसत होतं. नाथा ओरडला ' अबे बारक्या, हिरवी भाजी नाय का काय, त्ये घेउन ये काय वातड झालंय हे चिकन ' खरंतर हे बोलताना त्याच्या डोक्यात काल पोत्यात बांधताना आनंदच्या पायाला आलेला वातडपणा होता. आनंदला पाणी पाजुन निघतानाच त्याच्या लक्षात आलं होतं की हा टिकणार नाही, प्रशाच्या गोठ्यातच त्याच्या पँटवर मुंग्या चढताना त्यानं पाहिल्या होत्या. तेवढ्यात वेटरनं पालक पनीर आणुन दिलं, त्याला गार झालेल्या रोट्या बदलुन द्यायला सांगितल्या. अजुन दोन तासाचा प्रवास बाकी होता.
अप्पा बराच वेळ फोन लावत होते, पण तो स्विअ ऑफ येत होता. मग कंटाळुन ते घरी आले. घरी बाकी सगळ्यांनी जेवुन घेतलेलं होतं. सुनेनं आणुन दिलेलं दुध पिताना अप्पा गप्पच होते. सुनेनं त्यांच्या उशा आणि पांघरुणं आणुन दिली तसे अप्पा झोपायच्या तयारीला लागले. झोपेचं सोंग घेतलं अन पडुन राहिले. यावेळी जाधव घराच्या गच्चीवर बसुन दोन घोट व्हिस्की आणि तांब्याभर पाणी घेउन बसले होते. त्यांना घरुन पाणी हवं तेवढं मिळायचं पण व्हिस्की मात्र दररोज दोन घोटच आणि बरोबर मोजुन पाच काजु आणि अर्धी वाटी शेंगा टरफलासहित. आज त्यांचं जिगसॉ पुर्ण होत आलं होतं. फक्त एकच तुकडा बसत नव्हता, म्हणजे त्याचा आकारच होता गोल, त्या जिगसॉतली जागा पण होती गोलच पण तो तुकडा कसा ही फिरवुन बसवला तरी चित्र पुर्ण होत नव्हतं, प्रत्येक वेळी एक वेगळाच अर्थ दाखवत होतं. दोन घोट व्हिस्किनं रोज किमान लांबच्या चांदण्या जवळ दिसायच्या पण आज ही समोरची डिझाइन लांब चालली होती. कंटाळुन जाधव उठले, व्हिस्की संपलेलीच होती. घरात झोपायला आले, गुपचुप बेडरुममध्ये येउन बेडवर अंग टाकुन दिलं.
पहाटेला स्वामी श्री अवतारी बाबा आश्रमाच्या कुष्ठरोग विभागार तीन जण सेवेकरी म्हणुन भरती झाले, कुणी फारसं बोललं नाहीच. तिघांनी आंघोळी आटोपल्या आणि आश्रमातले कपडे घालुन कामाला लागले. झाडलोट आणि तिथल्या रुग्णांचे कपडे धुणं ही कामं त्यांच्याकडं होती. सगळा प्रकार मुक्यानंच चालायचा, सुपरवायझर तसा पोरगेलासा तो यांना पाहुनच घाबरला. एका रजिस्टर मध्ये त्यानं यांची नावं लिहुन घेतली. जेंव्हा ते कपडे धूण्याच्या जागेकडं निघाले तसं सुपरवायझरनं त्यांना गमबुट घालायला सांगितले, तिघांनी नकार दिला अन कामाला लागले. इकडं सोलापुरात दोन मोठ्या व्यक्ती सिव्हिल मध्ये अ‍ॅडमिट झाल्या एक अप्पा अन दुसरे माननीय. अप्पा सकाळी नेहमीप्रमाणे उठले नाहीत म्हणुन त्यांना दबाखान्यात आणलं गेलं रात्री कधीतरी एक माईल्ड हार्ट अ‍ॅटॅक येउन गेला होता असं अनुमान काढला गेला, तालमी घुमलेलं शरीर म्हणुन वाचले होते. तिकडं माननीय अ‍ॅडमिट झाले ते कायदा अन राजकीय आजारापोटी, त्यांच्या वकिलानं अटकपुर्व जामीनाची तयारी सुरु केली होती. पोलिसांनी तालीम, मंडळ कार्यालय पुन्हा पिंजुन काढलं, काहीच मिळालं नाही.
दोन दिवसांनी अनपेक्षितपणे जाधवांच्या हाती एक धागा आला, आनंद बरोबर रात्री तिथं गेलेला त्याचा एक चेला, जखमी झाल्यावर तो गावाकडं जाउन राहिला होता एवढे दिवस आणि आता सगळं शांत झालं असेल असा विचार करुन तो परत आला होता. त्याला बोलता करायला दुपारचे चार वाजले, पुन्हा एकदा पोलिसांनी तालीम, मंडळ कार्यालय पुन्हा पिंजुन काढलं, काहीच मिळालं नाही. दुस-या दिवशी सकाळी अकरा वाजेपर्यंत जाधवांचा रिपोर्ट कमिशनर साहेबांच्या समोर होता. एकुण अठरा जण सोलापुरातुन गायब होते, प्रत्येकजण संशय घेण्यासारखा होता पण सगळ्यांची नावं कधी कुठं आलेली नव्हती, काही नावं मात्र या असल्य भानगडीत नेहमीच असायची. आता या सगळ्यांना हुडकणं अन चौकशी करणं बरंच वेळ खाणारं काम होतं. जाधवांनी त्याची परवानगी मागितली पण कमिशनर साहेबांनी दोन चार दिवस थांबायला सांगितलं. मनात थोडं निराश होउन जाधव बाहेर आले, ऑफिस समोरच्या बागेत थोडा वेळ उभारले आणि मग घरी गेले.
केगांव रोडवरच्या खड्ड्यात पडलेली बॉडी ही दै.संचार,केसरी अन तरुण भारत ची हेडलाईन झाली ती बरोबर तीन दिवसांनी.पोलिस प्रेस फोटोग्राफरना जागेवर घेउन गेले तेंव्हा तिथं मुंग्या लागलेल्या होत्या, बाजुला उभं राहवत नव्हता. बॉडी कुणाची हे न माहित नसल्यानं गर्दीत फारशी रडारडी नव्हती, दोन ठिकाणी दगडानं ठेचुन मारण्या मागच्या उद्देश नक्की समजत नव्हता, तरीसुद्धा धार्मिक तणाव होउ नये म्हणुन पोलिसांनी बॉडी लगेच हलवली. पुढचा तपास चालु झाला, वायरलेस वरुन ह्या सगळ्याबद्दल जाधवांना समजलं होतं, पण त्यांच्या समोर आनंदच्या माणसानं दिलेला जबाब असल्यानं यावर आता जास्त विचार केला नाही, पण आपल्या जिगसॉ मध्ये ह्या तुकड्याला सुद्धा एखादी जागा द्यावी लागेल याचा अंदाज त्यांना आला होता. उद्यापासुन जाधव रजेवर जाणार होते, त्यांना नागपुरला जाउन नविन नोकरीच्या काही प्रोसेस पुर्ण करायच्या होत्या. मग आज यात जास्त अडकायचं नाही असा सोयिस्कर विचार करुन ते नेहमीप्रमाणे राउंडला निघुन गेले.
आठ दिवसांनी जाधव नागपुरला जाउन परत येईपर्यंत प्रत्यक्ष केसमध्ये काही विशेष घडलेलं नसलं तरी बॅकग्राउंडला बरंच काही झालं होतं, त्यांच्या जिगसॉचं चित्रच बदलायची वेळ आली होती, अप्पांना हॉस्पिटलमधुन डिसचार्ज मिळाला होता,माननियांनी अटकपुर्व जामीन मिळवला होता, कमिशनरनी सगळी फाईल होम सेक्रेटरींकडे पोहोचवली होती, तिथुन त्याची एक कॉपी पक्ष प्रदेशाध्यक्षांकडे गेली होती. तालीम, मंडळाचं कार्यालय पुन्हा कार्यकर्त्यांनी भरुन गेलं होतं, तरीही त्या अठरापैकी कुणीच परत आलेलं नव्हतं.नवरात्र शांततेत पार पडलं होतं. जनसामान्य आपापल्या रोजच्या जगण्यात गढुन गेले होते, मदनचा भाउ आणि वहिनी पुन्हा आपल्या गावाला निघुन गेले, जाताना मदनच्या आईला बरोबर घेउन गेले. त्याच्या बापानं आपलं दुकान पुन्हा सुरु केलं, दुकानात एक फुटभर फोटो लावला होता मदनचा, त्याला रोज हार गंध करायचा, आणि बास. एका दोघांच्या जाण्यानं जगरहाटी थांबत नाही. बांगरे घरी आले होते पण आल्यापासुन आजारीच होते. काडादी चाळीतला डॉक्टर दररोज येउन औषध देउन जायचा पण त्यामागं माणुसकी कमी अन त्यांच्या मुलीचं हातात हात देउन थँक्यु म्हणणं जास्त होतं असं तिच्या आईला वाटायचं.
मोठा फरक पडला होता तो आनंदच्या घरी, घरचा कमावता असा गेला होता की त्याची बायको एकदमच विनाधार झाली, आणि मरणाच्या बरोबर पोलिस केस असल्यानं नातेवाईक पण दिवसपाण्यापर्यंतच घरी येत होते, नंतर कुणी फिरकलंच नाही ना सासरचं ना माहेरचं. कॅरम क्लब चालवणं तिला शक्य नव्हतं, दहावी पास या कुवतीवर कुठं नोकरी लागायची शक्यता नव्हती, घरची गाडी विकावी म्हणलं तर ती पोलिसांनी जप्त करुन ठेवलेली, ती सोडवायलाच जमादारानं चाळीस हजार मागितले होते. ज्या वस्तीत ' वहिनि' म्हणुन मिरवली होती, तिथंच चार घरी धुणी भांडी करुन जगायची वेळ आली होती, माननीयांच्या घरी दोन तीन वेळा जाउन आली, त्यांच्या आईनं अन बायकोनं दोन्ही वेळ पाच दहा हजार दिले पण, ते संपायला फार वेळ लागला नाही, पण ज्या दिवशी अप्पांना डिसचार्ज मिळाला त्या दिवशी अनपेक्षितपणे एकजण घरी येउन दोन लाख देउन गेला होता, तो नाथाचा माणुस होता. अप्पांनी हे करायला त्याला मुश्ताकला मारलं त्याच दिवशीच सांगितलं होतं. या पैशातुनच शेवटी तिनं आपल्याला जे जमेल ते करायचं ठरवलं, कॅरम क्लबच्या जागेत एक टपरी काढायची चहा भजीची.
कोजागिरी पौर्णिमेदिवशी अवतारी बाबा आश्रमात बरीच गडबड होती, उत्सव होता, जेवणं होती. सगळे जण गडबडीत कामाला लागले होते, पार संध्याकाळी सात वाजेपर्यंत सगळे कार्यक्रम संपले. संध्याकाळची आरती झाल्यावर महाप्रसादाची गडबड बाहेर चालु झाली तेंव्हाच मठाच्या प्रमुखांच्या खोलीत आठ जण जमले , त्यात नाथा, हणमंता आणि त्याच्याबरोबरचं दोघं जण होते. मठप्रमुखांनी समोर ठेवलेल्या ताटातुन अरगजा मुठीनंच उचलला अन या चौघांच्या कपाळाला मळवटासारखा लावला, 'आई भवानीचा उदो उदो' असा गजर झाला, चौघांनी सगळ्यांकडं आनंदानं पाहिलं, मठप्रमुखांनी इशारा केल्यावर त्यांच्या बाजुला बसलेले अप्पा उठले, खुर्च्यांमागं ठेवलेल्या पोत्यातनं चार खोकी काढ्ली, त्यावर थोडा अरगजा लावला अन प्रत्येकाच्या हातात एकेक खोकं दिलं. चौघांनी खोकं घेउन अप्पांच्या पायावर डोकं ठेवुन नमस्कार केला, अप्पांनी नाथा अन हणमंताला जवळ घेतलं, दोघांच्या डोक्यावरुन हात फिरवला ' बाबांनो, आता सहा महिने तरी दिसु नका इकडं, निघा लगेच, आणि चपला घाल की बे आता, मानाच्या आहेत म्हणजे काय कोनाड्यात ठेवणार का काय घरी निउन.' चौघांनी खोकी उघडली अन त्या नव्या को-या चपला कपाळी लावुन पायावर चढवल्या. मठातला पुजारी शोभावा असा एक इसम तिथं होता त्यानं एक तांव्या बरोबर दिला आणि सांगितलं इथुन थेट अहमदपुरवरुन नांडेड्ला जा गोदावरी माईत यांचं विसर्जन करा आणि मगच पुढं जा' त्या तांव्यात मदनच्या भावाकडुन घेतलेल्या राख अन अस्थि होत्या. मठाच्या बाहेर एक अवतारी बाबांच्या पोस्टरनी सजवलेली ट्रॅक्स उभीच होती,विश्वशांतीचा संदेश देण्यासाठी ती संपुर्ण भारतात यात्रा करणार होती.सगळेजण ट्रॅक्सजवळ आले, मठप्रमुखांनी नारळ फोडला, चारी चाकांखाली लिंबं ठेवली होती ती फोडुन हणमंतानं गाडी पुढं घेतली, गाडी कचकचतच चालवतोय हे बघुन नाथा त्याला म्हणाला,'अबे पहिल्यांचा चालवतोय का भाड्या,नीट चालव की'यावर हणमंता बोलला'पैलवान, महिना झाला असंल ना बिनचपलेचं फिरतोय, आज एकदम चपला घालुन जमेना बगा, हुईल एक दोन दिवसात सवय, जरा दम धरा'
समाप्त --
चपला आणि सत्कार बद्दल --
सत्कार हा एक मान असतो, सन्मान असतो, एखाद्यानं केलेल्या चांगल्या मोठ्या कामाची दिलेली पावती असते. हार, पुष्पगुच्छ एखादं मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं याचं सर्वमान्य स्वरुप असतं. पण ब-याच ठिकाणच्या गँगवॉर मध्ये अशा ब-याच या परंपरा असतात . त्यापैकीच ही एक, एका गँगवाल्यांनी दुस-या गँगमधल्या एखाद्याला उडवलं की, याचा बदला घेण्यासाठी त्या गँगमधल्या दोन चार जण पुढं येतात अन हा बदला पुर्ण होईपर्यंत ते पायात चपला घालत नाहीत,अनवाणी राहतात. ब-याचदा याची सुरुवात जवळपासच्या एखाद्या देवळात देव देव करुन होते, म्हणजे कुणी विचारलंच तर 'देवाचं' असं सांगता येतं. आणि हो भले हा बदला महिन्यात घेतला जाउदे नाहीतर त्याला वर्षे लागुदे,अगदी स्वताचे लग्नकार्य मध्ये येउदे नाहीतर उन्हाळ्यात रस्त्यावरचं डांबर वितळायला सुरु होउ दे पण पायावर चप्प्ल चढत नाही यांच्या. जेंव्हा हा बद्ला घेउन होईल, तेंव्हा त्या सर्वांचा गँगकडुन नव्या को-या चपला देउन सत्कार केला जातो.
याच मध्यवर्ती कल्पनेवर आधारलेली ही संपुर्णपणे काल्पनिक कथा आहे, यातील व्यक्ती, स्थळ, घटना, संवाद यांचा कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्ती, घटना वगैरेशी कोणताही संबंध नाही, आणि तसे झाल्यास तो केवळ योगायोग आहे.
Print Page

Saturday, December 10, 2011

चपला आणि सत्कार - भाग १२

पहाटेच कारखान्याच्या बाजुला मोकळं व्हायला गेलेल्यांना भिंतीजवळ कुणी बसल्याचं दिसलं. सात आठ जण जमा झाल्यावर पोलिसांकडं जायचं ठरलं, कारखानाच्या आउट्पोस्ट्वर खबर गेली. तिथल्या ड्युटि हवालदारानं कारखान्याच्या सिक्युरिटीच्या मदतीनं आनंदला कारखान्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणलं. प्रथमोपचार केल्यावर आनंदला तिथुन सोलापुरला सिव्हिलला हलवलं गेलं. तिथं गेल्यावर पण आनंदनं त्याचा नाव पत्ता एवढंच सांगितलं. जखमा कशा झाल्या, कुठं झाल्या ह्या बद्दल त्यानं एकच स्टोरी चालु ठेवली, तो मित्राकडे चालला होता, त्याची मोटारसायकल एका जीपला धडकली, त्याचं भांडण झालं अन मग तो बेशुद्ध झाला. मग तिथुन तो कारखान्याजवळ कसा आला त्याला माहित नव्हतं. त्याच्या जखमा बघुन पोलिसांनी पण चौकशी वैद्यकीय कारणांसाठी तहकुब ठेवली. आनंद सापडला हे माननीयांना अन जाधव इन्सेपक्टर दोघांना एकदमच कळालं, पण सिव्हिलमध्ये येउन माननीयांना ह्या भानगडीत अजुन अडकायचं नव्हतं. जाधवना मात्र जाणं भाग होतं. त्यांनी जाउन पुन्हा एकदा चौकशी केली, पुन्हा तेच प्रश्न पुन्हा तीच उत्तरं. त्याच्या जखमा आणि त्याला असणारा डायबेटिसचा त्रास पाहता तिथेअल्या डॉक्टरांना त्याला जिवंत ठेवा असं सांगुन जाधव ही बातमी सांगायला कमिशनरांकडे आले. त्यांना हा अपडेट देणं फार गरजेचं होतं, त्यांच्या जिगसॉ मधल्या उरलेल्या जागा भरत येत होत्या. नोकरीतुन बाहेर पडता पडता ही एक केस त्यांच्या नावे आली आती तर बरं झालं असतं.
नाथानं आनंद सापडल्यावर तोंड उघडेल याची शंका येउन घोळसगावमध्ये(अक्कलकोट तालुक्यातील एक गाव), हणमंताला दिवसभर थांबायला सांगितलं, अन तिथुन एस्टी पकडुन एकटाच पुढं निघाला. आता त्याच्या फोनची बॅटरी एकच दांडकं दाखवत होती. अक्कलकोटमध्ये येउन त्यानं बाजारातुन नवे कपडे घेतले, भक्तनिवासात जाउन आंघोळ वगैरे आटोपली अन मंदिरात दर्शनाला गेला. बदललेले कपडे एका पिशवीत भरुन त्यानं एस्टी स्टँड जवळच्या एका जीपमध्ये टाकले अन तो एस्टिनं तुळजापुरला निघाला. त्यानं सकाळपासुनचा पहिला फोन केला तो तुळजापुरला पोहोचल्यावरच. अप्पांच्या घरी फोन करुन त्यानं सगळ्या गोष्टींची खातरजमा करुन घेतली. देवीचं दर्शन घेतलं अन तिथुन सोलापुरला निघाला. हे सगळं होईपर्यंत दुपारचा दिड वाजला होता, तामलवाडीला उतरुन त्यानं एक जीप पकडली केगाव कडं जाणारी. बरोबर चार वाजता तो केगावला पोहोचला होता. केगांवच्या तालमीत आधीच तो येणार असल्याचा निरोप आलेला होता. त्यामुळं तालीम समोरुन बंद होती अन मागच्या दरवाज्यानं नाथा आणि अजुन दोन तीन जण आत आले. आज रात्री अंधार होईपर्यंत आणि इथुन निघायला गाडीची सोय होईपर्यंत त्यांना तिथंच गप्प बसुन राहायचं होतं. सहा वाजता हणमंतानं बोरी धरणावर गाडी धुवुन निघाल्याचा फोन केला. तसा नाथा निश्चिंत झाला. दीड तासात हणमंता घरी सोलापुरात जाउन लगेच एस्टिनं औरंगाबादला निघणार होता. त्यानं तुळजापुर ओलांड्लं की तो फोन करणार होता आणि मग नाथा तालमीतुन निघुन त्या खड्ड्याकडं जाणार होता.
कमिशनर जाधवांची बातमी ऐकुन खुश झाले अन त्यांनी होम सेक्रेटरींना फोन लावला. होम सेक्रेटरींनी प्रदेशाध्यक्षांना. मोहोळ-पंढरपुर भागात दौरा करत असलेले प्रदेशाध्यक्ष लागलीच सोलापुरला परत यायला निघाले, त्याचवेळी त्यांनी माननीयांना गेस्ट हाउसला येउन थांबायला सांगितलं. होम सेक्रेटरींनी कमिशनरना पुढच्या चौकशीची परवानगी दिली आहे हे कळाल्यावर जाधवांना फार आनंद झाला, पण' जाताना बनसोडेला घेउन जा' ही कमिशनरांची ऑर्डर ऐकेपर्यंतच टिकला. ' मरता क्या न करता' म्हणत ते निघाले, बनसोडेंना डायरेक्ट सिव्हिलला येण्यास सांगितलं. जाधव सिव्हिलला पोहोचेपर्यंत बनसोडे तिथं आलेच होते. दोन दिवसापुर्वी लंचला त्यांचं या केसवर बोलणं झालेलं होतंच. दोघंही जण मग 'सि' बिल्डिंगमधल्या आयसियु वॉर्डकडं निघाले. आत जातानाच त्यांना आनंदला स्ट्रेचरवर नेत असल्याचं दिसलं, तिथंच अड्वुन त्यांनी चौकशी केल्यावर, त्याच्या पायातुन होणारा रक्तस्त्राव थांबत नसल्यानं त्याला ऑपरेशनसाठी नेत असल्याचं समजलं. म्हणजे संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तरी काही काम होणार नव्हतं. थोडावेळ थांबुन बनसोडे निघुन गेले, जाधव तिथल्या ड्युटि हवालदाराला सुचना देउन परत आले.
माननीयांना सकाळपासुन सिव्हिलमध्ये काय होत आहे याची माहिती मिळतच होती. येणा-या प्रत्येक फोनबरोबर ते जास्त अस्वस्थ होत होते आणि इकडं प्रदेशाध्यक्ष सुद्धा दौरा अर्धा सोडुन परत येत होते, फोनवर काही बोलायला तयार नव्हते. बांगरेबद्दल काही माहिती अजुनही मिळाली नव्हती. आनंदची अवस्था पाहता तो किती वेळ जगेल याची खात्री नव्हती. सकाळपासुन तीन ऑपरेशन आणि २ बाटल्या रक्त त्याला देवुन झालेले होतं. त्यातच त्यांनी सिव्हिलमध्ये बसवलेल्या त्यांच्या माणसाचा फोन आला की, पोलिस आनंदच्या घरी जाउन त्याच्या बायकोला तिथं घेउन आले होते. आनंदनं पोलिसांना काही सांगितलेलं नव्हतं पण त्याच्या बायकोनं जर हे सांगितलं की गायब झाला त्या रात्री आनंद गेस्ट हाउसवर यांनाच भेटायला गेला होता तर पोलिसांनी लगेच काही केलं तरी असतं किंवा या माहितीच्या आधारे नंतर कधीतरी अडकवलं असतं. त्यांनी लगेच घरी फोन करुन बायकोला या गोष्टी किती महत्वाच्या आहेत याची कल्पना दिली आणि तिला ताबडतोब सिव्हिलला जाउन आनंदच्या बायको गप्प बसेल असं बघायला सांगितलं, त्यांची बायको कशीबशी तयार झाली. आता प्रदेशाध्यक्षांचं काय लफडं आहे ते मिटल्यावरच त्यांचं टेन्शन कमी होणार होतं.
साडेपाच वाजले तसं आनंदला थिएटरमधुन बाहेर आणलं गेलं, त्याला पुर्ण भुल दिलेली असल्यानं आयसियु मध्ये हलवलं गेलं. तो उद्या सकाळपर्यंत तरी काही बोलणार नव्हता. ड्युटि हवालदारानं जाधव आणि बनसोडे दोघांना हे कळवलं तसे दोघंची रात्रीपुरतं निश्चिंत झाले. तोपर्यंत आनंदच्या बायकोला कुणाला काही बोलायचं नाही हे समजवण्यात सौ.माननीय यशस्वी झाल्या होत्या. झालेलं बोलणं माननीयांना कळवुन त्या सिव्हिलमधुन निघाल्या. इकडं त्याचवेळी गेस्ट हाउसवर प्रदेशाध्यक्ष आले होते. त्यांनी माननीयांना आपल्या रुममध्ये बोलावलं व अर्धा तास रुममध्ये ते दोघंच होते. माननीय बाहेर आले ते संपुर्ण शरणागती पत्करुनच. ज्यानं कुणी केली होती त्याची चुक शेवटी माननीयांना फार महागात पडली होती. प्रदेशाध्यक्षांनी त्यांना हे सगळं प्रकरण कोणत्या थराला गेलं आहे आणि ते दडपण्यासाठी किती खर्च येईल याची कल्पना दिली होती. आकडे ऐकुन त्यांचं डोकं गरगरत होतं, हे ज्याच्यामुळं झालं असं त्यांचं मत होतं तो आनंद पण बेशुद्द्ध पडला होता. त्याला आजच्या दिवशी तरी काही बोलणं शक्य नव्हतं. सगळ्या गोष्टी फार संयमानं हाताळणं भाग होतं. ते पुन्हा एकदा रुममध्ये जाउन प्रदेशाध्यक्षांना भेटुन आले. आता बाहेर गर्दी जमा झालेली होती. संध्याकाळी पत्रकार परिषद होती, कार्यकर्ते येउन बसलेले होते. त्यांनी ड्रायव्हरला गाडी मागच्या बाजुला घेउन यायला सांगितली अन मागच्या बाजुनं निघुन गेले. ज्या एक दोन पत्रकारांच्या हे लक्षात आलं ते सोडुन कुणी त्यांच्या मागं गेलं नाही.
हणमंता तालमीपासुन एवढा लांब रहायचा की त्याचा पोलिसांना एवढा संशय यायचा प्रश्न नव्हता आणि अजुन आनंदनं काही माहिती दिलेली नव्हती त्यामुळं तो निवांत निघाला होता. वळसंगला आल्यावर त्यानं गाडीत मागं एका धनगराला त्याच्या बक-यासोबत बसवलं आणि अजुनच निवांतपणे सोलापुरला निघाला. अक्कलकोटनाक्याला त्याला कुणी अडवलं नाही, मात्र जकात नाक्यावर मात्र बक-यांची जकात करायला त्याला थांबावं लागलं. तिथं त्यानं हुशारी करत बरोबर आणलेला प्रसाद तिथल्या लोकांना थोडा थोडा दिला. गावात आल्यावर धनगराला विजापुर वेशीत सोडुन तो घरी आला.गाडी लावली, घरी जाउन बायकोला पैसे दिले, तिनं जेवण केलं, पोटाची अन शरीराची भुक भागवुन तो निघाला. निघताना इतके दिवस बिनचपलेच्या फिरणा-या नव-यानं आता चपल्या पिशवीत का घालुन घेतल्यात हे त्याच्या बायकोला कळालं नाही. पण नवरा घरी येउन जेवुन चाललाय याचा तिला आनंद होता. जास्त काही विचारणं तिनं टाळलंच कारण आपला नवरा काही सरळ उत्तर देइल याची तिला अपेक्षाच नव्हती. हणमंता चालत चौकात आला, पानटपरीवरुन गुटखा घेतला, तीन दिवस त्याला काहीच मिळालं नव्हतं. मग टमटमनं त्यानं स्टँडवर न जाता तु़ळजापुरनाका गाठला आणि तुळजापुरला जाणारी जीप पकडली. तुळजापुरनाक्यावर पोलिसांनी नाकाबंदी केलेली होती, हणमंता बसला ती जीप पण चेक केली, पण कुणाकडंच काही सापडलं नाही. इथुन पुढं त्याला अंडरग्राउंड होउन औरंगाबाद गाठायचं होतं, पण त्याच्या डोक्यात वेगळेच विचार होते. तो तामलवाडीला जीपमधुन उतरला. बाउंड्रीच्या हॉटेलात चहा भजी खाल्ली. मग तामलवाडीत गावात जाउन केगावला जाणारा एक टेम्पो पकडला. अर्ध्या तासानं केगावच्या पंचायतीसमोर उतरला आणि नाथाला फोन केला.
नाथानं त्याचा फोन पुर्ण चार्ज करुन घेतला होता, एक दोन वेळा त्या खड्ड्याजवळ बसलेल्या लोकांशी त्याचं बोलणं झालं होतं. तो आता फक्त हणमंताच्या फोनची वाट पाहात होता. केगाव बार्शी रोडवरुन चार जणांची बार्शी मार्गे पुढं उस्मानाबाद - लातुर -नांदेड - हैदराबाद अशी निघुन जाण्याची तयारी करुन ठेवलेली होती. हणमंताचा फोन आला तसा नाथा सावध झाला. फोन उचलला आणि दोन चार शब्द बोलल्यानंतर नाथानं कचकचुन शिव्या दिल्या. ठरलेल्या प्लॅननुसार न जाता हणमंता इथं का आला याचा त्याला राग आला होता. पण आता शेवटच्या क्षणी काही करणं शक्य नव्हतं. त्यानं हणमंताला पुन्हा तामलवाडीला जाउन थांबायला सांगितलं.
हणमंता हो म्हणाला खरं पण कुठंही न जाता तो तिथंच थांबला अर्थात हे नाथाला न कळु देता. नाथाकडं आता जास्त वेळ नव्हता, तो तालमीतल्या मारुतीच्या पाया पडला, मुर्तीवरचा थोडासा शेंदुर आणि समोरचा अरगजा एका पुडीत घेतला, आपली पिशवी पुन्हा एकदा तपासली. सोलापुरहुन घेतलेलं दुसरं सिमकार्ड नीट पाकिटात ठेवलं अन तो निघाला. त्या खड्ड्याकडं. तो निघाल्यावर तालमीतल्या एकानं त्या खड्ड्याजवळच्या खोपटात फोन केला, ते दोघंही निघायच्या तयारी करु लागले. तालमीतुन नाथा बाहेर पडल्या पडल्या तालमीच्या पुढच्या बाजुला उभी असलेली एक ४०७ टेम्पो निघाली. मागं भाज्यांची पोती भरलेली होती. नाथाला चालत खड्ड्यापर्यंत जायला १५-२० मिनिटं लागली असती, तेवढ्या वेळात खोपटातले तिघं जण तिथं येउन वेगवेगळ्या बाजुनं आत उतरत होते. त्या अर्धवट खोदलेल्या खाणीच्या एका कोप-यातच मुश्ताक पडुन होता.
संध्याकाळचे साडेपाच झालेले, जाधव ऑफिसमधलं सगळं आटोपुन घरी निघायची तयारी करत होते, तेंव्हाच त्यांना सिव्हिलमधुन फोन आला आणि त्यांना जी नको होती तीच बातमी त्यांना ऐकावी लागली. त्यांनी फोन ठेवला आणि सिव्हिलला फोन करुन ह्या बातमीची खात्री करुन घेतली. त्यांचं जिगसॉ पुर्ण फिसकटलं होतं, आनंद त्याला झालेल्या आणि दोन दिवसात चिघळलेल्या जखमांसमोर टिकाव धरु शकला नव्हता. जाधव सिव्हिलला पोहोचेपर्यंत आनंदच्या बायकोनं आकाशपाताळ एक केलं होतं. तिथं पत्रकार जमले होते, लोकल चॅनलवाले आले होते, आनंदची बायको त्यांच्यासमोर नुसता आक्रोशच करत नव्हती तर माननीयांचं नाव उघड उघड घेत होती. त्यामुळं जमा झालेल्या पब्लिकला आणि पत्रकारांना आयताच विषय मिळाला होता. आनंदची बॉडी अजुन वॉर्डातुन पोस्ट मार्टेमसाठी गेली नव्हती. बाहेर जमलेली गर्दी बघुन डॉक्टरांनी पोलिस फोर्स मागवला होता. त्या गर्दीतल्या एकानं मंडळाच्या कार्यालयात फोन केला.
नाथानं मोबाईल स्विच ऑफ केला मग तो आणि बाकीचे तिघे त्या खड्ड्यात उतरले, दुपारपासुन खड्ड्याकडं कुणी येणार नाही याची काळजी घेतली गेली होती. चौघं जण आत उतरले तेंव्हाही मुश्ताक पुर्णपणे बेशुद्ध पडुन होता. कुणीच काही बोललं नाही, बोलण्याची गरज नव्ह्तीच. पुढच्या पाच मिनिटात एक धडाप असा आवाज झाला जे काम करायला आले ते काम झालं. नाथानं बरोबरच्या अरगाजाच्या पुडीतला अरगजा सगळ्यांना लावला. पिशवीतले जुने कपडे काढुन एकाच्या हातात दिले, 'कपडे बदल रे या **घाल्याचे,जुनी कापडं अन बाकीचं सगळं बरोबर घ्या, वाटेत जाळुन टाकायचं सगळं, आणि तु बे पाणी आणलंयस ना, हात पाय लांब जाउन धु आणि अबे तो दगड उचल धु तो पण, जुन्या कपड्यानं कोरडा कर अन त्या दुस-या टोकाला नेउन टाक तिकडं, इथली माती सगळी खालीवर करा, ते पलीकडं शेण पडलंय ते आणुन पसरा बाजुला इथं, लवकर मुंग्या लागतील,' दोघांनी कपडे बदलायला घेतले,सगळे शांततेत चाललं होतं, कपडे घालुन होतानाच एकानं नाथाला विचारलं ' पैलवान, याचं काय करायचं धरम समजंल ना ?'मग सगळे जण एकमेकांकडं पहायला लागले, याकडं आधी कुणाचा लक्ष गेलं नव्हतं किंवा याचा कुणी विचार केला नव्हता. पाच मिनिटं सगळेच सुन्न होते, ' तोड ति**ला अन आटपा दना दना, तिच्यायला मंडपात न्यायला सजवताय का *************, ' सुड घेतला गेला तरी नाथाचा राग कमी होत नव्हता, त्याच्या शिव्या कमी होत नव्हत्या.
मंडळाच्या कार्यालयात, माननीयांच्या मोबाईलवर, जाधवांच्या टेबलवर आणि अप्पांकडे फोन वाजले ते एक दोन मिनिटांच्या अंतरानंच. यापैकी जाधव निराश झाले, माननीय जवळपास उद्धवस्त झाले, मंडळाच्या कार्यालयात टेन्शन पसरलं, गल्लीतल्या अजुन काही पोरांना आहात तसे आहात तिथुन बाहेर पडायच्या सुचनांबरोबर शंभरच्या नोटांची बंडलं वाटली गेली. बोळाच्या दोन्ही बाजुला असलेल्या पानटपरींवरुन नाथाला फोन लावायचा प्रयत्न सुरु झाला,तो स्वीच ऑफ लागत होता. आता यातच अप्पांच्या घरच्या फोनची पण भर पडली, त्यांच्या घरी फोन त्यांच्या सुनेनं घेतला होता तिनं अप्पांना निरोप दिल्यापासुन ते अस्वस्थ झाले होते. अप्पांना आनंद एवढ्या लवकर हार मानेल असं वाटलं नव्हतं, तालमीतला नव्हता तरी खात्या पित्या घरचा होता. आणि आता नाथाला निरोप देता येत नव्हता, त्याचा फोन स्विअऑफ होता याचा अर्थ तो काम करत होता.
केगांव रस्त्यावर खड्ड्यापासुन पाचशे मिटर वर एक ४०७ टेम्पो भाजी भरुन उभा राहिला होता, त्यात मागच्या बाजुनं कट्टाकट्टी भाजीची पोती भरलेली होती तरी, आत फार काही नव्हतं. त्याच्या ड्रायव्हरला नाथा खड्ड्यातुन वर येताना दिसला तसा तो टेम्पो चालु करुन तो तयारीत राहिला. मग नाथाच्या मागंच अजुन तिघं जण आले, मग त्यानं लगेच गाडी पुढं घेतली, सगळेजण पळत गाडीकडं आले, मागची एक दोन पोती काढुन आत गेलं आणि पुन्हा नाथानं शिव्या द्यायला सुरुवात केली अगदी नॉनस्टॉप, आत हणमंता होता. त्याचा प्लॅन फेल झाला होता, यावेळी हणमंता किमान माजलगांवच्या पुढं जायला हवा होता, पुढच्या सगळ्या व्यवस्था चार लोकांसाठीच केलेल्या होत्या. आता ऐनवेळी काहीतरी करणं भाग होतं, त्यानं गाडी सुरु होताच त्याचा फोन न सुरु करता हणमंताचा फोन घेतला, त्यातलं सिमकार्ड बदललं आणि पहिला फून अप्पांना केला. फोन एंगेज होता अन नाथाला हे समजायला काहीच मार्ग नव्हता की तो एंगेज त्याच्यामुळंच आहे.
अप्पा फोन लागत नसल्यानं चिडले होते, नाथावर आणि तो समोर नव्हता म्हणुन फोनवर, रागानं त्यांनी फोन आपटला अन त्याचवेळी रिंग वाजली, चिडुनच त्यांनी फोन उचलला' अप्पा, मी नाथा बोलतोय' अप्पा तसे शांत पण आता प्रचंड भडकले, आपण घरात आहोत अन समोर सुना आणि नाती आहेत हे विसरुन त्यांनी नाथाला शिव्या द्यायला सुरु केलं, हा भार ओसरल्यावर त्यांनी नाथाला बातमी सांगितली, नाथानं फोन बंद ठेवल्यानं अप्पांचा शब्द खाली पडला होता, चुक करणाराच नाही तर चुक करायला लावणारा पण गेला होता. आता ही चुक ना नाथाची होती ना अप्पांची, पण एका चुकीची शिक्षा होता होता अजुन एक चुक होउन गेली होती. अप्पांनी अजुन एक दोन गोष्टी विचारल्या, एक नंबर लिहुन घेतला अन् ती चिठ्ठी घेउन कपडे करुन अप्पा बाहेर निघाले, इथुन पुढचं बोलणं घरातल्या फोनवरुन करणं योग्य नव्हतं.

Print Page