Monday, March 28, 2011

तुमचं आमचं सेम नसतं ... भाग ०८

Print Pageतुमचं आमचं सेम नसतं ... भाग ०८

रविवारी लवकर उठले, आईबरोबर चहा घेतला, जिजाजिंचा फोन आला ते निघत असल्याचा. काका काकु आले घरी तेंव्हा माझंच आवरायचं राहिलं होतं. मला आज वेळ लागणारच होमला, ताईच्या लग्नानंतर आज पहिल्यांदाच साडी नेसत होते, एकतर मी काढलेल्या दोन्ही साड्यांचे ब्लाउज अंगात बसत नव्हते आणि मला ती गुलाबी साडी नेसायची नव्हती, खास दाखवायची साडी होती ती. ताईनं दोन्ही वेळा तीच नेसली होती. मला काही दाखवायला न्यायचं नव्हतं, आम्ही भेटणार होतो. आणि त्यात त्या साडिला मॅचिंग बांग्ड्या, कानातले काहीच नव्हते माझ्याकडं. शेवटी काकुनं सोलापुरात घेउ असा तोडगा काढला आणि मला साडी नेसवली. त्यात काकु उगा काही पण बोलुन चिडवत होती, आता मी का लहान आहे असलं काही सांगायला, कळत नाही का तेवढं मला? पदर कसा घ्यायचा दोन्ही खांद्यावरुन, बसुन उठताना साडी कशी नीट पकडायची, पाय नि-यात अडकु द्यायचा नाही, शी काही पण मी तर आताच ठरवलं आहे, सरळ सांगायचं नव-याला की मला जमणार नाही साड्या नेसायला, मी फक्त ड्रेस घालणार.
सगळं आवरुन निघेपर्यंत घरीच पावणॆदहा झाले होते, काकांचं उशीर होण्यावरुन किरकिर करणं सुरु झालं. सगळे एकत्र निघालो, तेवढ्यात शेजारच्या निर्मलाकाकुंनी विचारलंच ’ काय पाटिलवहिनी, तो परवा आला होता तोच का मुलगा, तिकडंच निघालाय वाटतं ?’ अस्सा राग आला होता, मलाही आणि आईलापण.’ तोंड दाखवण्यापुरतं आई हसली आणि आम्ही निघालो. बार्शी सोलापुर तास सव्वा तासाचं अंतर. मी तर आधी हॉस्टेलला राहिलेली त्यामुळं काही विशेष वाटत नसे,पण आज जास्त खुशीत होते. प्रवास कसा झाला कळालंच नाही, जिजाजी स्टॅंडवरच होते आणि आश्चर्य बरोबर गौरीताई पण होती. माझा आनंद अजुनच वाढला, आता उगा काकुच्या सुचना ऐकाव्या लागणार नव्हत्या. मी लगेच ताईच्या बरोबर जायला लागले. जाताना नव्या पेठेत एका ठिकाणि सगळ्यांनी चहा पाणि केलं, आईनं पुन्हा एकदा सगळं थोडक्यात सांगितलं. हॉटेलमधुनच त्याच्या घरी फोन करुन आम्ही दोन रिक्षानं निघालो. घर फार लांब नव्हतं आणि गावातच त्यामुळं सापडायला काही त्रास झाला नाही. रिक्षातुन उतरताना मात्र माझे हात पाय कापायला लागले. ताईच्या लक्षात आलं, माझ्याजवळ येउन म्हणाली ’ काळजी करु नकोस, हे बोलले आहेत काल काकांशी आणि इकडं पण’. मला कळेना ही काय सांगतीय ते.
त्याच्या घराच्या समोर उभे होतो, जुना वाडा पाडुन तिथं अपार्टमेंट केलेली असावी, कारण हा भाग मी कॉलेजात असताना पाहिलेला होता, पहिल्या मजल्यावर घर होतं. दार उघडंच होतं. बाजुच्या खिडकीतुन आत टिव्ही, मोठा टेप दिसत होता. मधल्या खोलीत जाणा-या दाराला पडदा होता, राधेक्रुष्णाचं भरतकाम केलेला. आम्ही येणार हे माहित असल्यानं चाहुल लागताच त्याची बहिण बाहेर आली, चेहरेपट्टीवरुनच लक्षात येत होतं त्याची बहीण आहे हे.’ या ना आत, या’ एवढं बोलुन ती आत गेली. आम्ही सगळे आत जातोय तो पर्यंतच त्याची आई बाहेर आली. एखाद्या मराठी चित्रपटात कर्तबगार आई म्हणुन शोभुन दिसेल अशी. ’ नमस्कार , मी वंदना कुलकर्णी, बसा ना आपण उभे का सगळे ? ’ आई, काका, काकु, जिजाजी बसले आणि आता बसायला जागाच नव्हती.
तो प्रश्न त्याच्या बहिणिनं सोडवला, ’ तुम्ही या ना आत, आपण आतच बसु’ म्हणजे हा घरी नव्हता. आत गेलो तर दोन छोट्या छोट्या खोल्या होत्या किचन सोडुन. , डाविकडच्या खोलीत आम्हि गेलो, दुस-या खोलीचा दरवाजा पुढं केलेला होता. ’ तुझं नाव काय गं ’ ताइनं तिला विचारलं ’ सुकन्या, पण मला घरी सगळे अन्याच म्हणतात. आणि तुझं माधवी ना, दादा म्हणाला मला, तु माझ्याच वयाची आहेस असं’ अन्या माझ्या वयाची असली तरी दिसायला कितीतरी उजवी होती आणि उंच पण. ती पाणि आणायला आत गेली, तेवढ्यात मी खोली पाहुन घेतली, अगदी माझ्या हॉस्टेलच्या खोलीसारखी. माधुरी दिक्षितचे दोन मोठे पोस्टर्स, एक उर्मिलाचं. बाकी एक टेबल त्यावर पुस्तकं, वह्या, पर्स पडलेल्या. कपाट बंद होतं, पण दरवाज्यामागं अडकवलेल्या कपड्यावरुन परिस्थितीची थोडीफार कल्पना येत होती. अन्या पाणि घेउन येण्याच्या आधीच बाहेरुन आवाज आला, ’ हा माझा मुलगा, हर्षद. अन्या एक खुर्ची आण गं दादाला’. ताई मला चिमटा काढत होती,आणि समोरच्या खोलीचं दार उघडुन खुर्ची घेउन जाताना अन्या सांगुन गेली ’ आला हं दादा’. मी उगीचच लाजले. ताईचं सुरु झालं, ’ बघ जमलं ना सगळं तर ती समोरची खोली तुझी बरं का ? ’ त्या खोलीकडं पाहिलं दरवाज्याच्या समोरच कुणातरी कमरेखाली लाल फडकं गुंडाळलेल्या निग्रो बॉडीबिल्डरचं भितीदायक पोस्टर लावलेलं. त्याच्याखाली अजुन एक दोन तसलीच छोटी पोस्टर्स होती. अन्या आत आली, ’ तुम्ही काय घेणार, चहा की कॉफी ?’ ’ चहा’ माझंही उत्तर ताईनंच दिलं. मी आता काही बोलायच्या अवस्थेत नव्हते. माझी नजर उगाच त्या समोरच्या खोलीच्या न दिसणा-या भागात फिरत होती, काय असेल आत, कसं असेल ? तेवढ्यात बाहेरुन आलेल्या आवाजावरुन साठेगुरुजी आल्याचं कळालं. आणि आता खुर्चीसाठी तोच आत आला. मला पाहुन एक क्षण दरवाज्यात थांबला, ताईला पाहुन थोडं हसला आणि खुर्ची घेउन गेला.
१० मिनिटानी काकु आत येई पर्यंत तायडी मला चिडवत होती. अन्या पण आत येत नव्हती. काकु येउन म्हणाली ’ मधु चहा घेउन ये बाहेर’ पुन्हा मगासारखेच माझे हात थरथरायला लागले. ताई उठली’ चल मी पण येते बाहेर. मी किचन मध्ये आले, आमच्या किचनपॆक्षा कितीतरी जास्त स्वच्छ होतं हे, सगळं कसं जागच्याजागी अगदी पिक्चरमध्ये असतं तसं. पांढ-या शुभ्र कपबशात अन्या चहा गाळत होती, मला बघुन म्हणाली ’तु का आलीस, बस गं निवांत’, मागुन काकु म्हणाली ’ नाही देईल ती नेउन’. मला ताईनं ढकलल्यासारखं केलं, मी पुढं गेले, ट्रे हातात घेतला, माझ्या हाताच्या थरथरीनं त्या नाजुक कपबशा पण थरथरत होत्या. ताईनं पुढं येउन ट्रे धरला आणि म्हणाली,’ चल बाहेर मी आणते’ ताईच्या मागं मागं बाहेर गेले, माझ्या मागं अन्या होती. हळुच वर पाहिलं, समोर दाराजवळ एका स्टुलावर तो बसला होता. ’इथं पण दाराजवळच का ?’ मी मनात म्हणलं. हळू हळू ताई पुढं जात होती, मी एक एक कपबशी उचलुन देत होते, ते दोन सेकंद पण कपबशी थरथरत होती. दोघांना चहा द्यायचा राहिला एक तो आणि ते साठे काका. अन्या आत किचन मध्ये गेली होती चहा आणायला.
’तशी पत्रिका जुळतीय, पण बाकी गोष्टी पाहुन घ्या असं मी सांगितलं होतं वंदना ताईंना, आणि बरं झालं तुम्ही लगेच आलात ते.’ साठे काका बोलत होते ’ बरं किती महिने झालेत तुमच्या भावाचं निधन होवुन, आणि काही शांती पंचक वगैरे होतं का त्यावेळी ?’ मी काकांकडे पाहिलं, ते काही बोलणार तेवढ्यात जिजाजी बोलले’ ते सगळं व्यवस्थित केलं होतं काटिकरांनी, आणि त्यानंतर आमचं लग्नकार्य झालंय घरात’, काकांनी आपलं नेहमीप्रमाणे हो हो असा पाठिंबा दिला. ’ तुमचं लग्न नंतर झालं ना, मग तुम्हाला काय माहित सगळं व्यवस्थित झालं ते?’ साठेंनी जिजाजिंना विचारलं.’ अहो मीच केलंय सगळं अण्णाचं, आणि वैरागचे काटिकर गुरुजी म्हणजे काही बाकी ठेवतील का ते ? ’ आता काका जरा जोरात बोलत होते. मी त्याच्या आईकडं पाहिलं, माझ्या आईकडं पाहिलं, दोघी गप्प होत्या. अन्या चहा घेउन आली होती, मी साठेंना जरा रागानंच चहा दिला आणि त्याला चहा देताना, यावेळी थरथर नाही जाणवली.
तेवढ्यात अन्याचा आवाज आला ’ काकु, या ना आत, आपण आतच चहा घेउ.’ आईलाही या वातावरणातुन बाहेर जायचं होतं, ती उठली तशी त्याची आई पण उठली, दोघी आत आल्या. मला अन्यानं आत बोलावलं खुणेनं. आता आत फक्त आम्ही बायकाच होतो. सगळ्याच उभ्या. अन्यानं पाट ठेवले तीन चार. आई, काकु, त्याची आई सगळ्या बसल्या. आता बाहेरचं काहीच ऐकु येत नव्हतं. मला काही ईंटरेस्ट्पण नव्हता त्यात. नुसता राग आला होता. राग नक्की कशाचा आहे ते कळत नव्हतं, बाबांबद्दल असं विचारल्याचा, जिजाजिंना उलटं विचारल्याचा की काका न बोलल्याचा ? त्याच्या आईनं आम्हाला, म्हणजे अन्या, ताई आणि मी आम्हाला आत खोलीत जायला सांगितलं. अन्या जाताना म्हणाली ’तुम्हाला दादाची खोली दाखवते’. ’ नको आपण तुझ्याच खोलीत बसु ना’ ताई म्हणाली.’
पाच मिनिटांनी चहा घेत असतानाच ’मधु, गौरी, इकडं या गं’ आईची हाक आली. लगेच त्याच्या आईची हाक’ अन्या, ये इकडं’. आत गेलो तशी काकु म्हणाली’ मधु सगळ्यांना पाया पडुन ये जा.’ मी गोंधळले, मनात म्हणाले म्हणजे खेळ खल्लास का काय? बरं विचारणार तर कसं काय झालंय ते. गुपचुप बाहेर गेले, सकाळी सांगितल्याप्रमाणे पदर हातात धरुन सगळ्यांच्या पाया पडले, मग लक्षात आलं साठे काकाच नाहीत इथं. पुन्हा मी, ताई आणि अन्या आत आलो तिच्या खोलीत.
दोन पाच मिनिटं बाहेर काहीतरी चर्चा चालु होती आणि मग जिजाजी त्याला घेउन आत आले.’ लाडोबा, आई काय म्हणतीय बघ जरा’ तो म्हणाला, अन्या पटकन उठुन गेली. एक मिनिट शांततेत गेलं,’ हे बघा आपण तुमचं दोघांचं लग्न ठरवायला जमलो आहोत, तुम्ही दोघं एकमेकांना किती ओळखता, कसं ओळखता मला माहित नाही, तर आता तेच तुम्ही दोघं सांगा तुम्हाला एकमेकांबद्दल काय माहिती आहे ते.’ माझी तर जीभच जड झाली, घसा कोरडा पडला, तो पण काही बोलत नव्हता, ताईच्या खांद्यावरुन मागच्या माधुरीकडं पाहात होता. ’ हे बघा हा तुमच्या आणि दोघांच्या कुटुंबाच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तेंव्हा जेवढा विचार आम्ही करु तेवढाच तुम्ही पण केला पाहिजे, आता दोघंही लहान नाहीयेत.’ तुमचं खरंच एकमेकांवर प्रेम आहे का? असेल तर आता सांगा मला स्पष्ट, आणि नसेल तरी काही बिघडत नाही, होय ना ओ मॅडम.- इति जिजाजी. ’ पण जुळवुन घेउन कराल का संसार नीट ? काय काय विचारतोय मी ? अजुन पण काही तुमची लग्नाची वयं नाहीत गेलेली तु २१-२२ ची असशील अन हा २४-२५ चा. काही घाई नाही ये, नीट विचार करा आणि सांगा. काय ? ’ जिजाजींच बोलुन झालं, माझी तर जीभ टाळुला चिकटली होती, त्यानं नुसती मान हलवली, हो का नाही, काहीच अर्थ निघत नव्हता. ’ चला मधु , मॅडम चला,निघुयात आपण’ जिजाजी म्हणाले.
आम्ही बाहेर आलो, माझी आई अन त्याची आई चक्क निवांत बसुन सरबत घेत होत्या, जिजाजी पुढं जात म्हणाले ’ आई, मी अजुन ताणलं ना तर रडेल मधु अन मग तिच्या बहिणाबाई मारतील मला घरी गेल्यावर, बास झालं आता, सांगुन टाका सगळं’ किचन मधुन बाहेर येत अन्या पण हसत होती, तिच्यामागं काकु पण. मी मागं वळुन पाहिलं, हा पण हसत होता आता आणि ताई पण. म्हणजे मलाच वेड्यातच काढलं होतं सगळ्यांनी मिळुन . आता खरंच रडु आलं मला, पळत आईकडं गेले, तिच्या गळ्यात पडुन रडायला लागले. ताई पण आली मागं मागं आणि अन्या पण. आता सगळेच निवांत होते. तेवढ्यात काका आत आले, हातात मिठाईचा पुडा होता, आईच्या हातात देत म्हणाले ’ दोन दोन कन्यादानाचं पुण्य माझ्या फाटक्या झोळीत टाकुन गेला बघा अण्णा.’ आई, काकु, तायडी सगळयांचेच डोळे भरुन आले. शेवटी जिजाजी पुढं होवुन त्याच्या खांद्यावर हात टाकत म्हणाले ’ चला हो तुम्ही आणि चिसॉकां मधु पहिला देवापुढं पेढा ठेवा आणि मग सगळ्यांना द्या, चला पटपट मग जोडिचा पहिला नमस्कार करा, आणि सुकन्याताई चहा टाक बरं पुन्हा एकदा. काका तुम्ही घेणार ना चहा.’
’ नको टाकु ग चहा’ त्याच्या आईचा आवाज आला. मी आत जाता जाता थांबले. त्यांच्याकडं पाहिलं, हातात पेढ्याचा पुडा तसाच धरुन ठेवला होता. ’ कुकर घे लावायला, जेवायची वेळ झाली अन चहा काय पिताय हो ’.सगळं वातावरण अजुन थोडं हलकं झालं. मी आणि तो देवघरापुढं उभं राहुन दोन पेढे ठेवले, नमस्कार केला. ’ काय पण कंजुषी रे दाद्या, अरे लग्न ठरलं की तुझं,ठेव ना दोन पेढे जास्त देवाला’ अन्या हसत हसत म्हणाली. सगळेच किचनमध्ये आले होते, तिथंच पाया पडलो सगळ्यांचा.
जिपच्या सिटवरुन हात काढुन घेणारा तो मी ज्या पायाला हात लावुन नमस्कार करत होते त्याच पायाला हात लावत होता. ताईला नमस्कार करणार, एवढ्यात तिनं थांबवलं, मला मिठी मारली आणि म्हणाली ’ मला दोन पाय आहेत बरं का, नीट करा नमस्कार. '

Tuesday, March 22, 2011

तुमचं आमचं सेम नसतं ... भाग ०7

Print Pageआई चहा घेउन आली तोपर्यंत कोणिच काही बोललं नाही, तो इकडं तिकडं पाहात होता, मी कॉटवर बसुन होते, हातातली बांगडी फिरवत होते. आई चहा घेउन आली, तिच्यासाठी सरबत केलं होतं. मला वाटलं सगळ्यानांच सरबत करायला हवं होतं. चहा घेताना त्याच्या मनात हेच आलं असणार म्हणुन त्यानं काहि विचारायच्या आधीच मी बोलले ’ बाबा गेल्यापासुन आईनं चहा सोडलाय’ त्याला काहितरी बोलायचं होतं, किंवा त्यानंच काहीतरी बोलणं सुरु करावं असं मला वाटत होतं. मला असं सगळं गप्प बसुन असले की फार भिती वाटते. आता काय होईल काय नाही असं वाटत राहतं. अगदि परवा परवा पर्यंत आई माझ्याशी बोलायची नाही माझ्याशी शिक्षा म्हणुन, त्यामुळं कुणि बोलत नसलं की मला माझंच काही चुकलं आहे असं वाटायला लागतं. आत्त्ता ही तसंच झालं होतं. काय चुकलं असावं याचा विचार करत होते. याच्यावर प्रेम केलं हे का आईला सगळं सांगितलं ते का याला घरी बोलावलं ते का अजुन काही. छे कालपासुन नुसते प्रश्न पडताहेत आणि कशाचीच उत्तरं मिळत नाहीयेत.
’तुम्ही मुळचे बार्शिचेच का?’ त्याचा आवाज आला आणि मी हुश्श केलं. लगेच संवाद पुढं नेला, थोडी माहिती दिली. पण आईला आवड्लं नसावं. तिनं मला कप बशा घेउन आत जायला सांगितलं. किचनमध्ये येउन खिडकीपाशी उभी राहिले, मी त्याला बघु शकत होते तिथुन पण त्याला मी दिसणार नव्हते किंवा तसं दिसेन हे त्याच्या लक्षात यायला हवं. हे सिक्रेट गौरीताईचं होतं. तिनं लग्नाआधी अशी काही सिक्रेट माझ्याबरोबर शेअर केली होती. आता पुन्हा तिलाच शरण जायची वेळ येईल का ? पुन्हा प्रश्न. बाहेर आईनं उलटतपासणी सुरु केली होती. जे काल मी सांगितलं होतं ते वेगळया प्रकारानं त्याच्याकडुन काढुन घेत होती. हा असा प्रकार बाबा करायचे, मला आणि गौरीला एकएकटीला विचारायचे आणि मग नंतर मार खावा लागायचा, कुणाला तरी एकीला,बहुधा गौरीताईलाच. ’ मधु फार काही बोलली नाही कधी, पण ठिक आहे, तिच्यावर विश्वास आहे माझा, काही वेडंवाकडं नाही करणार ती.’ हे आईचं बोलणं ऐकुन एकदम भरुन आलं. आपलं कुणितरी कौतुक करावं बाहेरच्या समोर ह्याचा सारखा आनंद नसतो. पण तो बाहेरचा होता का आता का अजुन होता बाहेरचा? वाटलं जर एवढा विश्वास आहे तर काल उगाच मला का बोलली एवढं.
’चला मी निघतो, अजुन साईटवर जायचं आहे’ त्याचा आवाज आला, आता बराच नॉर्मल होता पण चक्क खोटं बोलत होता. आई आत आली, दोन मिनिटं देवासमोर उभी राहिली,मग बेडरुम मध्ये जाउन काहितरी घेउन बाहेर गेली, मागं मागं मी पण. तो दरवाज्याजवळ उभा होता, आई बोलायला लागली ’आता आम्ही दोघिच आहोत एकमेकिंना, हिचे बाबा गेले आणि आत्ता गॊरीचं लग्न झालं मागच्या महिन्यात,वर्षात करायचं असतं म्हणुन आटोपलं. तुम्हाला मधु आवडली असेल तर आधी तुमच्या घरी बोला आणि कुणा मोठ्यांना घेउन या पुन्हा येताना, पत्रिका पाहणार असाल तर हि घ्या, बाकी मागे फोन नंबर लिहिला आहेच.’
त्याच्या चेह-याकडं बघुन मला खुप हसु येत होतं, पण कशीबशी गप्प होते. तो आपला बळेबळेच हसला आणि बाहेर पडला. आई आत गेली, मी काय करु मलाच कळेना. हळुच मी पण दरवाज्याजवळ गेले, तो बुट घालत होता. एका पायावर उभं राहुन बुट घालताना गंमतशीर धडपडत होता, पटकन वर पाहिलं. एकदम बावरले, आत पाहिलं आई मागं नव्हती. ’ मी बोलतो आईला आणि फोन करतो तुला ’ तो म्हणाला, एकदम बोलुन गेले’ चालेल पण लवकर कर’. तो निघत होता, आणि वळुन विचारलं ’ रस्ता सांगशील का मेन रोडवर जाईस्तोवर’ आणि लहानपणी शाळेतुन आल्यावर द्प्तर टाकुन खेळायला जायचे तशी आईला सांगुन ती काय म्हणते ते न ऐकताच चपला घालुन निघाले. त्याला जिपपर्यंत सोडुन परत आले.
आई हॉलमध्येच उभी होती, खिडकीत. म्हणजे मला येताना तिनं पाहिलं होतं. मी सरळ आत गेले. कपडे बदलुन दुकानात जाउन यावं असा विचार केला. आई पण आत आली आणि विचारलं ’ कुठं निघालीस? ’ मी - ’ दुकानावर, तु येणार आहेस ? आई’नकोस जाउ, बोलायचंय मला तुझ्याशी. थांब इथंच’ जे मला टाळायचं होतं तेच होत होतं. आई बाहेर जाउन कॉटवर बसली, बाबांच्या स्टाईलमध्ये. मी गुपचुप एका बाजुला बसले. आता कालच्या पेक्षा जास्त टेन्शन आलं होतं. परिक्षेच्या आधीचं टेन्शन पेपर कसा असेल हे असतं तर नंतरचं निकाल काय लागेल याचं. दोन्ही वेगळे पण टेन्शनच.दोन मिनिटं गप्प राहुन आई बोलली ’ बोलाचालायला ठिक वाटला मुलगा, कमावता आहे पण घरची सगळी जबाबदारी आहे त्याच्याबर, एक बहीण आहे लग्नाची,घराचं कर्ज फेडायचं आहे.’ ह्या गोष्टी चांगल्या का वाईट हेच कळत नव्हतं. नक्की आईला काय म्हणायचं आहे. ती पण माझ्यासारखंच याची तुलना काकुच्या बहिणिच्या मुलाशी करते आहे असं जाणवलं. तो एकटाच होता, स्वताचं घर, नोकरी होती आणि घरचा धंदा, शेती होती आणि सगळ्यात महत्वाचं इथं बार्शितच होता.
दोन दिवस गेले, आईनं माझं कारखान्याच्या शाळेत जाणं बंद केलं होतं, मी तिच्याबरोबरच दुकानात जायचे. तिस-या दिवशी सकाळी आई पुजा करत होती, फोन वाजला. आई ’ मधु उचल तायडीचा असेल तर मला दे’ . चहाचा कप एका हातात आणि खारी दुस-या हातात घेउन मी फोन घेतला,’ पाट्लांचं घर ना ? मालतीबाई आहेत का ? ’ मी फोन खाली ठेवला आणि आईला हाक मारली ’ तुझा फोन’ - आई ’ कोण आहे ?’ तो पर्यंत मी किचन मध्ये आले होते, ’ माहित नाही’ असं म्हणुन अजुन एक खारी घेउन बेडरुम मध्ये गेले. एकदम डोक्यात प्रकाश पडला, इथं बार्शीत आईला मालतीबाई कोणिच म्हणत नाही, मग कोण असेल विचारायला हवंय, म्हणुन परत बाहेर गेले, जाता जाता आईला धडकले. ती ओरडलीच ’ पारुषे, शिवलीस का तशीच बिन आंघोळीची ’ मी लक्ष न देता फोन उचलला ’ आपण कोण बोलताय ?’ आता आई मागं उभी होती. पलिकडुन आवाज आला ’ मी हर्षद बोलतोय, तु ....... ’ . फोन आईला दिला आणि गुपचुप किचनमध्ये जाउन कालच्या जागी उभी राहिले.
आई - ’ हो मी मालती पाटिल बोलतेय, आपण कोण ?
तिकडुन - ....
आई - हो हो, नमस्कार ...
तिकदुन - .....
आई - मधु बोलली आहे मला सगळं, तसंच हर्षद पण येउन गेला आहे इथं, तुम्ही आलात तर बरं होईल. या मुलांच्या हातात असे निर्णय द्यावेत एवढी मोठी नाहीत ती अजुन. निदान माझी मधु तरी.
तिकडुन - ....
आई - ठिक आहे, दुकानाचं सगळं पाहुन वगैरे आणि दिरांना, मोठ्या जावयांना बोलुन कळवते तुम्हाला, ठेवु आता. नम्स्कार.
कट
आई आत आली, मी गप्प होते. ’ त्याची आई होती, आधी विचारता नाही आलं आणि मला सांगितलं ही नाहीस कोण बोलतंय ते ?
मी विचारलं ’ काकांना काय विचारयचंय, मी जाउ निरोय सांगायला कारखान्यावर ’ आणि आई हो म्हणाली ’ भावोजींना घेउन ये तु काही बोलु नकोस जास्तीचं’ चल आणि आता ताईला फोन लावुन दे प्रकाशराव परत जातील बाहेर त्याआधी बोलुन घेते. ’
मी लगेच फोन लावला तायडीला, तिनंच उचलला, मला काही बोलायच्या आधीच आवाज आला ’ अहो सोडाना, फोन घेतलाय मी, जा बरं आंघोळ करुन घ्या असंच बसु नका. ’ मग ताईचा आवाज आला ’ हॅलो, कोण आहे’ मी ’ झालीस का मोकळी, सकाळच्या कामातुन ’
ताई - ’ ए गढडे, नीट बोल’ ’ एक नाही दोन नाही, आधी आंघोळ करा मग बघु’ - शेवटचं वाक्य बहुधा जिजाजिंना असावं.
मी - ’ आईला बोलायचंय जिजाजींशी, दे त्यांना. तुला बघते नंतर’
मी फोन आईला दिला, ती जिजाजींशी डिटेल बोलली, दुपारी काका-काकु आले परत चर्चा झाली. काकुचं थोडं रागराग झालं. काका शांत होते, हे सगळं बहुधा अपेक्षित होतं. संध्याकाळी पुन्हा जिजाजींशि बोलुन कार्यक्रम पक्का झाला. आम्ही सगळे रविवारी सोलापुरला जाणार होतो.
म्हणजे उद्याचा एकच दिवस उरला मध्ये. दुपारी दुकानात गेले तेंव्हा आई महादेवकाकांशी बोलत होती, मी गेल्यावर एकदम सगळं शांत झालं. मग संध्याकाळ पर्यंत दुकानात होतो. आईनं आमच्या सोलापुरच्या सप्लायरला माहिती काढायला सांगितलं होतं. रात्री घरी आले, जेवणं झाली. काही केल्या झोप येइना, सारखं सकाळचे दोन फोन डोक्यात वाजत होते, एक त्याचा आणि दुसरा ताईचा. वाटत होतं काय करत असेल त्यावेळी ती आणि जिजाजी. ताई असंच बसु नका म्हणाली होती म्हणजे ते तसंच. शी कसले घाणेरडे विचार करतेय मी, पण माझ्याबाबतीत पण हे असंच होईल तेंव्हा मला आवडेलच ना ते ? तायडी एक नाही दोन नाही म्हणाली ते काय , चहा बिस्किटं तर नसणार निश्चित. का उद्या आई दुकानात गेली की विचारावं तिलाच. असले भलते सलते विचार मनात घेउनच पडले होते.
शनिवार उजाडला तो उद्या सोलापुरला जायचंय या कल्पनेनंच, सकाळी काका आले तेंव्हाच विषय निघाला होता, ते सांगत होते सकाळी ९ च्या गाडीनं निघु म्हणुन. जिजाजी लातुरहुन थेट येणार होते तिकडं. तायडीचं काय माहिती नव्हतं. दुकानातली आवराआवरी करण्यात दिवस पटकन गेला. आज रात्री मात्र आई माझ्या जवळच झोपली, मी अगदि कुशित नव्हते पण कुठल्याही क्षणि जाउ शकत होते. झोप आज पण नव्हती. थोड्या वेळानं आईनंच कुशीत घेतलं आणि ’ लाडाची गं बाई माझी, कशी मोठी झाली ग एवढी एकदम. दोघी चाललात एका मागं एक, जा ग बायांनो आपापल्या घरी सुखी राहा गं, त्यातच माझं सगळं आलं ग बाई.’ ह्या पुढं काय बोलली मला ऐकवेना, मी रडायला लागले आणि मग आई पण.

Sunday, March 20, 2011

सांदण दरी - एक प्रवास वेगळाच.

Print Pageभुमाता अजुन वाट पाहते आहे आपल्या लेकीची, तिच्यावर झालेला अक्षम्य अन्याय पाहिलाय तिनं, त्या कष्टांना दुर करुन त्या लाडाच्या लेकीला पुन्हा एकदा काळजाशी लावुन घेउन झोपवायचं आहे तिला. त्या पराक्रमी राजाच्या वंशाच्या दिव्यांना जोजवुन निजवताना तो प्रचंड पाळणा हलवुन हलवुन थकलेले हात आपल्या हातात घेउन काळजातुन वाहणा-या गार पाण्यात त्या हातांच्या जखमा थोड्या शांत करायच्या आहेत. या साठी त्या आईनं आपल्या काळजाची वाट उघडुन ठेवली आहे, आता फक्त वाट आहे ती लाडकी लेक येण्याची. ती आली की या उघडलेल्या काळजातली ही कुपी बंद करुन घ्यायची अन या दुष्ट जगापासुन आपल्या नाजुक लाडक्या लेकीला दुर घेउन जायचं आहे.

हे चित्र आहे माझ्या मनातल्या भावनांचं. वेळ होती भर दुपारची सुर्य पुर्ण डोक्यावर आला होता, आणि आम्ही होतो मुखापाशी सांदण दरीच्या. दरीच्या सुरुवातीला एक दिशादर्शक दगड आहे. 
इथपर्यंत न चुकता आलात तर पुढं चुकायची संधीच नाही. जाणार कुठं हो, फक्त एकच रस्ता एकच दिशा. रस्ता जमिनिच्या पोटात खोल खोल उतरत जाणारा. क्षणात असं वाटावं की जणु त्या भुमातेच्या काळजापर्यंत घेउन जाणारा राजरस्ता तो हाच.
रतनवाडीला श्री अम्रुतेश्वराचं दर्शन घेउन पुढं ५-६ किमीवर एक छोटी वाडी आहे, साम्रद नाव तिचं आणि या वाडीवरची एक छोटी वाट घेउन येते या दरीच्या मुखाशी. मुखापाशीच्या दाट झाडीजवळ येउन स्व:ताभोवती एकदा डाविकडुन उजवीकडे फिरलं की दिसतात ते रतनगड, त्याच्या खुट्टा, समोर आजोबा, त्याच्या टोकाचा सितेचा पाळणा, मग अलंग, मदन, कुलंग आणि नंतर कळसुबाई.

सगळा धीर गोळा करुन यांना हात जोडुन नमस्कार करायचा आणि चालायला लागायचं. तसं एका सपाटीवरुन चालणं फार थोडं आहे. वाट खाली खाली जात राहते, विश्वास बसु नये असे शिलाखंड समोर दिसतात.


त्यांच्या मागुन पुढुन वर खाली जाताना गारवा जाणवायला लागतो. हा गारवा वा-याचा नाही, पाण्याचा नाही तर इथपर्यंत सुर्यकिरणंच पोहोचु शकत नसल्यानं गार असणा-या पथ्थरांचा आहे. या गारव्यात संगमरवराच्या गारव्याची शिरशिरी नाही तर एका गुढ रम्य खोलात घेउन जाणारी आश्वासक धुंदी आहे.
एक आकर्षक उत्सुकता आपल्याला पुढं ओढत राहते आणि आपण ओढले जात राहतो. एखादा डाव्या बाजुनं जातोय तर पुढचा त्याला उजव्या बाजुची सोपी वाट दाखवतोय.

एकाच्या अनुभववावर दुस-याची नवलाई मात करु पाहते आहे तर दुस-याच क्षणाला अनुभव भारी पडतोय. अशातच एका मोठया शिलाखंडाच्या बाजुनं खाली उतरलो की दोन पाणीसाठे आहेत.

अलिखित नियम असा की जो मोठा आहे तो पिण्यासाठी वापरायचा तर दुसरा हात पाय धुण्यासाठी. आपण शांतपणे नियम पाळतो. गार पाण्यानं तोंड धुवुन एकदम ताजं वाटतं, पुढचा उतार जरा जास्तच आहे, आता जपुन. विश्वासुन आणलेली साधनं दगा देताहेत तेंव्हा सकाळपासुन ३-४ तासांचीच ओळ्ख असलेले हात पुढं येत आहेत. मग असंच पुढं जात जात ऐकुन वाचुन ओळखीचा झालेला तो पाणसाठा येतो. आतासुद्धा पार गळ्यापर्यंत येईल इतकं पाणि आहे तिथं. आम्ही बॅगा पुन्हा व्यवस्थित पॅक केल्या आणि त्या पाण्यात उतरलो. कल्पनेच्या पलीकडे थंड असलेले पाणि, आणि खाली स्वच्छ दिसणारे तळाचे दगड यावरुन एक एक जण पुढं सरकतो. अर्थातच एकमेकांच्या मदतीनं. ज्यांना जन्मजात पाण्याचं आकर्षण आहे ते दोन चार बुड्या मारुन घेतात, बुडायची भिती नाही अन कुणि बुड्वायची पण नाही. सगळे जण मान वर करुन आपण किती खाली आलोय हे पाहताहेत. नेहमी उंचीवरुन खालची छोटी छोटी वस्ती, घरं, झाडं पाहायची सवय आता उपयोगची नाही हे कळालेलं आहे.

प्रत्येकवेळी उंचीवर जाउनच काहीतरी मिळतं असं नाही. बापाच्या खांद्यावर बसुन जत्रा बघायचा जो आनंद आहे तोच आईचा पायामागं लपुन पोळ्याची बैलपुजा बघण्यात आहे हे जाणवतं. पाण्यात भिजायची नशा करुन झाल्यावर आम्ही पुढं सरकतो,



आता वाट एका पातळित आहे असं वाटत असताना पुन्हा काही मोठे मोठे दगड ओलांडुन पुढच्या उतारावरुन खाली जातो. इथं एक मोठा दगड आहे, त्यावर आडवं झोपुन वर पाहिलं तर आकाश फक्त ५-१० फुटांचंच दिसतं.



अजुन थोडं पुढं गेलं की समोरचा डोंगर खुणावतो, बोलावतो ये ये म्हणुन. सांभाळुन इथुन पुढं जाणं शक्य नाही.

एक प्रचंड शिलाखंड दोन छोट्याश्या दगडांच्या आधारानं उभा आहे.

बहुधा पंढरीच्या विठठलाला युगे अठ्ठावीस सोबत करत असावा. इथं सुरक्षित दरीची वाट संपते, थोडावेळ तिथं बसुन आम्ही परतायला सुरु करतो.
एसीच्या गारव्यात बसुन फक्त बोटं चालवायची सवय असल्यानं आज भुक जरा जास्तच जाणवते आहे. त्यामुळं थोडं भराभर चालत पुन्हा पहिल्या पाणवठयाला येतो. पोटातल्या भुकेला थोडं शांत करुन, पुन्हा निघतो, आता वरुन आम्ही किती खाली उतरलो होतो ते पाहायला.
दरीच्या फार जवळ जाता येत नाही पण टोकाला आल्यावर जाणवतं ते फक्त आपलं खुजेपण. पटते ती निसर्गाची अफाट शक्ती, साद घालतो तो नव्या साहसाचा आवाज.
१४ फेब्रुवारीचा खादाडि कट्टा, सांदण दरीचं स्वप्न जागवुनच संपला होता. बरोबर २९ दिवसांनी १३ मार्चला पहाटे साडेचार वाजता घरुन मिंटीमधुन निघालो, धमु, गणेशा, मनराव व शेवटि वल्ली, असे एकुण पाचजण बरोबर सहाला पुण्याच्या बाहेर पडलो.

मोशीमार्गे नाशिक हायवेला लागलो. आधी सिओसिओ पंप दिसल्यावर मिंटीची पोटापाण्याची व्यवस्था करुन पुढे नारायणगावापर्यंत थेट गेलो. इथं राजकमल या प्रसिद्ध मिसळ जाईंट्वर थांबलो.

पोटभर मिसळ हादडुन निघालो ते थेट रतनवाडीलाच थांबलो. मध्ये वाटेत गणेशाचा मित्र ह्रुषीकेश, त्याच्या बहिणिसह आम्हाला जॉईन झाला होता.
रतनवाडीचं अम्रुतेश्वराचं देउळ,समोरची पुष्करिणि इथं एक तास भर घालवुन भरपुर फोटो काढले,










मग निघालो आजच्या मुख्य ठिकाणाला. - सांदण दरी, फारसा परिचित नसलेला हा एक चमत्कार आहे. त्याचं यथाशक्ती वर्णन वर आलं आहे. पर्यटकांची अजुन एवढी वर्दळ नाही. तसा हा भाग वाहतुकिच्या मानानं मागास आहे. जे खरंच चांगलं आहे.
परत येताना बराच उशीर झाला होता मग जेवण आळेफाट्याला करुन व्यवस्थित घरी आलो.
माझी ही मिपा ग्रुपची दुसरी सहल, साठा उत्तरी कहाणि ज्यांच्यामुळं द्वि उत्तरी सुफ़ळ संपुर्ण झाली आहे, त्या सर्वांना म्हणजे धमाल मुलगा, वल्ली, मनराव आणि गणेशा यांना मनापासुन अतिशय धन्यवाद.
ह्रुषिकेश आणि त्याच्या बहिणिला तर खास धन्यवाद, न विसरता केलेल्या लिंबु सरबतासाठी.
बाकी फोटोच्या लिंक खाली देत आहे.
फोटोंसाठी वल्ली,मनराव व धमु   सर्वांना अतिशय धन्यवाद. 

Sunday, March 6, 2011

तुमचं आमचं सेम नसतं - भाग ०६

तुमचं आमचं सेम नसतं - भाग ०६
बुधवार सकाळ - मी उठेपर्यंत, नेहमी प्रमाणे आईचं आवरुन झालेलं होतं. मी अंथरुणं आवरली, खोली झाडुन सकाळचं सगळं आवरुन किचनमध्ये आले. आईचा स्वयंपाक चालु झाला होता. माझी चाहुल लागताच मागे न वळता म्हणाली ’ किती वाजेपर्यंत येशील दुपारी ? तिला बहुधा आज या सगळ्याचा सोक्ष मोक्ष लावायचा होता. मी म्हणाले ’ शाळा दोनला सुटते, मला यायला अडिच-तिन होतील.’ आई ’ ठिकय, काकांना पण सांग, त्याचवेळी यायला, आणि तु पण त्यांच्याबरोबरच ये. त्याला फक्त पत्ता दे’ मी - ’पण मला त्यांची साईट माहित नाही कुठंय ते? आम्ही फक्त फाट्यावरच भेटलोय, बाकी कुठं नाही.’ ’मग काकांना पण तुझ्याबरोबरच येउ दे, उगा सोसायटित चर्चा नकोत नसत्या.’ इति आई. मी खाली मान घालुनच ’ हो’.
आई आज लवकर येणार असल्याने डबा नेणार नव्हती, माझा डबा भरला आणि ती गेली दुकानात. महादेवकाका सकाळिच येउन चाव्या घेउन गेले होते. माझी पण वेळ झाली होती, मी आवरायला बेडरुम मध्ये आले. आज कोणता ड्रेस घालावा हा प्रश्न नेहमीपेक्षा मोठा होता. कालपर्यंत सगळं कसं मजेत होतं, तो माझ्याकडे पाहायचा, मी त्याच्याकडे, काहीतरी बोलणं, हसणं असं सगळं होतं, अर्थात आमचं भेटणं हे नेहमी जिपमध्येच असल्यानं सगळं एका मर्यादेत होतं, पण काल हे सगळं माझ्या मनातुन बाहेर पडलं होतं, आईला सांगितलं होतं आणि तिनं विश्वास ठेवला होता, त्यामुळं आता एक जबाबदारी वाटत होती,भिति होती. काल पर्यंत मी माझी मीच होते पण आता मी आमच्या घराला रिप्रेझेंट करत होते.
त्याला मी तशी काही आजपर्यंत या लग्नाच्या विषयावरच काय पण प्रेमाबद्द्ल पण कधी बोलले त्याला, आमचं बोलणं व्हायचं ते नेहमी पिक्चर, हिरो हिरोईन, गाणि, शेती पार अगदि आम्हि मेडिकल दुकानात गोळया ऒषधं ठेवतो कशी आणि नंतर ते बरोबर आठवतं कसं इथपर्यंत झाली होती. बार्शीतल्या जवळपास सगळ्या डॊक्टरांच्या हस्ताक्षरांची चेष्टा करुन झाली होती. पण प्रेम आणि लग्न छे कधीच नाही बोललो या विषयावर.
खरंच, का नाही बोललो आम्ही? का माझं त्याच्यावर प्रेमच नाहीये? उगा काल आई म्हणाली म्हणुन मी पण तयार झालेय? का आहे माझं त्याच्यावर प्रेम? अशावेळी मला माझी हक्काची मैत्रिण आठवली. गौरिताई, आता सौ.गौरी. लगेच बाहेर हॊल मध्ये येउन तिला फोन लावला. तिनंच उचलला,
मी - तायडे कशी आहेस ?
गॊरी - का ग ? काय झालं, कालच तर बोलले की अर्धा तास, काय झालंय, काही झालंय का ?
लग्नाआधीच्या मुली लग्नानंतर बायको झाल्यावर एवढ्या आत्मज्ञानी कशा होतात काय ठाउक.? म्हणजे मी पण अशीच होणार की काय आता? मला भिती वाटायला लागली होती.
मी - काही खास नाही ग, सहज केला फोन
गौरी - काल आपण बोललो,त्यावेळी आई बोलली नाही, आज ती दुकानात लवकर गेली आणि तु सहज फोन केलास? खरं सांग काय झालंय घरी ?
मी - अगं काका काकु आले होते काल घरी.
गौरी - त्या काकुच्या बहिणिच्या मुलाबद्दल का? मधे गधे लक्षात ठेव उगा काकांच्या झाशात येउन हो बि म्हणालिस तर. आईला काय ते काही बाही सांगुन पटवतील पण तु फसु नकोस. आपल्या दुकानावर डोळा आहे त्यांच्या आधीपासुनच.
मी - नाही ते नाही, प्रकरण वेगळं आहे, म्हणजे..
गौरी - म्हणजे तुला तुझा अजिंक्य देव भेटला की काय ग मधे ? खरं खरं सांग हं.
मी - अगदि तसंच नाहीये, पण काका काकुंनी आईच्या डोक्यात काहीतरी वेगळंच भरवलंय, - आणि मी पुढं कालचा सगळा प्रसंग सांगितला.
गौरी - मग काय, शायद मेरी शादि का खयाल दिल में आया है’ अगं माजं शोनं गं ते, छोटूकली परी गं ती माझी, मोठी झाली आता, तिला मोठा बाहुला बघायचा आता.
हे बोलता बोलता तिचा आवाज जड झाला, तिकडं ती आणि इकडं मी रडत होते. काहितरी बोलावं हे सुचायच्या पलिकडे गेलो होतो आम्ही. दोन-तिन मिनिटांनी गौरीचा आवाज आला.
गौरी - आता आपली आई किति एकटी पडेल ना ग?
मी - तायडे, मी मुळी त्याला बोलवणारच नाही आज. मला आईला सोडुन जायला नकोच वाटतंय ग ? काल मी तिच्या कुशीतच झोपले होते, लहानपणि झोपायचे ना तिच्या तोंडात बोट ठेवुन तसं.
गौरी - किति दुष्ट आहेस ग, आणि वर सांगते आहेस सगळं मला. मी आता लांब आले ना इकडं लातुरला म्हणुन मुद्दाम सांगतेस ना. - आता तिचा आवाज पुन्हा जड झाला होता. तिला उगाच हसवायचं म्हणुन मी म्हणाले
मी - आई नसली म्हणुन काय झालं आता
गौरी - गप गं लगेच सुरु झाली तुझी बडबड, इकडं माझं आंघोळीचं पाणि गेलं ना गार होवुन.
मी - आत्ता येवढ्या उशीरा आंघोळ, हां काय करत होतीस, एवढा वेळ. पाटलांच्या घरी कसं सडा सारवण झालं पाहिजे सुर्य उगवायच्या आत. फोन करु काय मांजरसुंब्याला ?
गौरी - ए चल गं उशीर होतोय, अजुन सगळं व्हायचंय, हे येतील आत्ता, आज डबा नेला नाही त्यांनी.
मी- ठेव ठेव आता काय आम्ही परके ते जवळचे ना, ठेव.
फोन ठेवला आणि लक्षात आलं की बराच उशीर झाला आहे. शाळा कारखान्याच्या हंगामी कामगारांच्या मुलांची असल्याने वेळेचं फार बंधन नसायचंच, पण तरी वेळेवर जावं लागायचं. त्यात सध्या ही परिस्थिती, तिथं काकांना कळालं मी आली नाहिये तर लगेच आईला दुकानात फोन करतील, आणि आता दहा वाजुन गेले म्हणजे आज एस्टिनंच जावं लागणार होतं, तो नवाच्या ठोक्याला चौकातुन जिप पुढं घ्यायचा. मग पटकन आवरलं आणि लगेच निघाले. एस्टि स्टॆंडपर्यंत ट्म्ट्म्ने येउन लगेच कारखान्याकडे गेले. फाट्यावरुन आत जाताना काकु दिसली, कारखान्याच्या जिपनं बार्शीला चालली होती. मनांत विचार आला, हिला बोलावलं की काय आईनं फोन करुन घरी? पण तेवढ्यात ती खाली उतरुन म्हणाली, ’ माधवी आज सोलापुरला चालले आहे गं, काही आणायचं आहे का तुला, माझं काम चाटिगल्लितच आहे.’ मी तिला दोन ओढण्या आणायला सांगितल्या. ती गेली आणि माझं टेन्शन कमी झालं.
कारखान्याजवळ गेल्यावर आत न जाता डायरेक्ट शाळेत गेले, बाकीचे सगळे जण आपलं आपलं काम करत होते. आता खरी धडधड सुरु झाली होती, इथलं काम झालं की फाट्यावर जायचं, मग तो येणार जिप घेउन, मग त्याला सांगायचं तुम्हाला घरी बोलावलं आहे म्हणुन. जिपमध्ये सांगावं की बाहेरच बोलवावं त्याला ? त्याला वेळ असेल का आज ? तो येईल का ? पुन्हा काल रात्रीचे प्रश्न रिपिट होत होते. बरोबर काम करण-या एका मुलीच्या हे लक्षात आलं. ति पण हातातलं काम आटोपुन माझ्याकडे आली आणि विचारलं ’ माधवी, बरं वाटत नाही का ग? काही हवंय का? काही होतंय का ?’ या होतंय का चा रोख माझ्या लक्षात आला, उगाचच बावरल्यासारखं होवुन गेलं आणि मनातल्या मनात तारखा मोजु लागले.
एक तास झाला, आता मनाचा हिय्या करुन उठले, विचार केला काय होईल ते होईल, आता मागं फिरुन चालणार नाही. बाकीच्यांना सांगुन कारखान्याच्या आत गेस्ट हाउसच्या टॊयलेट मध्ये जाउन कपडे निट केले आणी तशीच बाहेर पडले, चालत फाट्यावर आले. फाट्यावर एक दोन शाळेतल्या मुली होत्या, बाकी कुणि नाही. एक-दोन मिनिटात एक पॆसेंजरची जिप आली, थांबली, एकदा वाटलं जावं यातुनच, ते विचारणं नको आणि ती नकाराची भिती पण नाही मग. पण आता मन ऐकत नव्हतं. गुपचुप उभी राहिले, जिप गेल्यावर जाणवलं की एका अनोळखी पण मोहक रस्त्यावर जातेय आता, भुलभुलैया वाट्तोय खरा पण समोरच्या झाडावरची फुलं पण बोलवतातय. आणि तेवढ्यात त्याची जिप आली. बहुधा माझं लवकर येणं त्याला अनपेक्षित असावं. धुराळा खाली बसल्यावर नीट पाहिलं, आज त्यानं चक्क पांढरा शर्ट घातला आहे, इस्त्रीचा आणि इनशर्ट. काही तरी वेगळं आहे असं वाटलं. काही न बोलता जिपमध्ये चढले, आज मुद्दाम तो पुढच्या सिटला टेकुन बसला होता, त्यामुळं चढताना जिपचा पाईप पकडताना त्याच्या खांद्याला हात लागत होता, त्याच्या अंगावरचा शहारा मला आतपर्यंत थरथरवुन गेला. आधी पण हा स्पर्श झाला होता एक दोन वेळा, पण हे असं आत कुठंतरी काही होत नव्हतं.
आत बसले, त्या दोन मुली दुस-या बाजुनं बसल्या. माझी ओढणी बाहेर उडायला लागली म्हणुन थोडी आत सरकले, आज त्यानं हात सिटच्या पाठिवर ठेवला होता, बार्शी- वैराग रस्ता हा असा, आता हात धरावा पुढं तर हाताला लागतोय नाही धरावा तर नीट बसता येत नाहि. आज सगळंच काहीतरी वेगळं होतय एवढंच फक्त जाणवत होतं बास. मधल्या शिंदेवस्ती फाट्याला त्या दोन पोरी उतरल्या आणि मागं मीच एकटी उरले. आता माझा उतरायचा स्टॊप फक्त १० मिनिटाच्या अंतरावर होता. तोंड कोरडं पडत होतं, मी पुढं हात सिटला हात धरला की तेवढ्यापुरता तो हात खाली घ्यायचा, पुन्हा वर. मला तर आता राग यायला लागला होता, पण बोललं तर पाहिजे होतं. आम्ही गावात वळणार त्याच्या आधीच त्यानं विचारलं ’ तुम्हाला घराकडं सोडु देत का ? आज आम्हाला आहे थोडा वेळ. ’ माय गॊड, माझा विश्वासच बसत नव्हता जे मी ऐकलं त्यावर. आजच आईनं त्याला बोलवायला सांगावं, आजच काकु सोलापुरला जावी, आज मी लवकर निघावं, आज याच्या जिपमध्ये कोणि जास्त गर्दी असु नये, हे सगळं काय चाललंय. आणि त्यात आजच त्यानं विचारावं घराकडं सोडु का ?
जसं सुखाच्या ओझ्याखाली स्वताला हरवुन बसायला होतं ना तशी मी आता झालं होते. तेवढ्यात त्याच्या ड्रायव्हरचा आवाज आला ’ लवकर सांगा काय ते, एकदा सिटित गेलं की लई गर्दी होतिय परत उलटं यायला.’. एकदम भानावर आले आणि मनात पहिला विचार आला, याला कसं माहित एकदा गावात गेलं की आमच्या घराकडे यायला खुप गर्दीच्या आणि बोळाबोळातुन यावं लागतंय ते ? लगेच त्याचा प्रश्न,’ सोडुना तुम्हाला घराकडं?’ माझं उत्तर गेलं अभावितपणे ’ हो, चालेल. ’ त्यावर त्याचा पुढचा प्रश्न ’ मग सांगा कसं जायचं ते, उजवीकडं की डाविकडं ?. मनात म्हणलं,(मला काय विचारताय, तुमच्या ड्रायव्हरला विचारा की माहित असेलच त्याला सगळं) आणि मग मागुनच आता उजवीकडं, त्या वखारीच्या थोडं आधी खालच्या बाजुला जायचंय सुरु झालं, एकतर ह्या इथं मागं बसुन काही दिसत नव्हतं, आणि त्यामुळं सारखं पुढं वाकावं लागत होतं. पण तो आणि ड्रायव्हर, दोघांपैकी कोणिही माझ्याकडं पाहत नव्ह्तं, ड्रायव्हरला तर शक्यच नव्हतं रस्त्यावरच्या कोंबड्या, शेळ्या आणि डुकरातुन वाट काढतानाच त्याची सर्कस होत होती, पण तो सुद्धा फक्त पुढंच पाहत होता. का जाणे मला त्याचं हे वागणं आवडुन गेलं. शेवटी एकदाचं घर आलं, म्हणजे आमचं घर रस्त्यापासुन थोडं आत आहे.
आता उतरणं भाग होतं, जिभ हलतच नव्हती तोंडात. कशीबशी उतरले, सगळा जीव गोळा केला आणि फटकन बोलुन गेले ’ चला ना घरी चहा घेउन जा’ उत्तराची वाट न पाहता किंवा तो येईलच अशा आशेनं सरळ त्याच्याकडं पाठ फिरुन घराकडं जायला लागले. पर्समध्ये किल्ली पाहिली तर नव्हती, आज त्या बरोबरच्या मुलीला शाळेत किल्ल्या दिल्या होत्या, त्या परतच घेतल्या नव्हत्या. मागे पाहिलं, अंदाज घेतला तो जिपमधुन उतरत होता, मी माझा वेग उगाच थोडा कमी केला. त्यानं दोन -चार पावलातच गाठलं मला. आता मी पुढं आणि तो मागं चालायला लागलो. कुणिच बोलत नव्हतं. माझ्या मनात निवडुंग पिक्चर मध्ये रविंद्र मंकणि आणि अर्चना जोगळेकर चालत असतात तो सिन येत होता. आता बनसोडे काकुंकडे चावी मागायला गेले, त्याला वाटलं हेच आमचं घर, म्हणुन त्यानं जरा केस नीट केले वगैरे. मी काकुंकडुन किल्ली घेतली, पुढं निघालो, मागे पाह्ते तो अपेक्षेप्रमाणे बनसोडे काका व अमित उभे होते, त्यांची बघण्याची त-हा काही वेगळीच होती, आई काल रात्री अशाच बघण्याबद्दल बोलत होती बहुधा.
घरी आले,गेट उघडुन आत आलो.आईला हाक मारली. तिनं दरवाजा उघडला, मागं त्याला पाहुन थोडी गोंधळलीच. बहुधा मी त्याला घरी बोलावेन यावर तिचा विश्वास नसावा किंवा मी असला लगा बघेन असं तिला वाटलं नसावं. होते तेंव्हाही त्याचे केस पांढरे होते थोडे पण अगदि लक्षात येण्यासारखं नसले तरी आईच्या नजरेतुन कसे सुट्तील बरे. मी आत आले, त्याला काहीच बोलले नव्हते, या वगैरे. परत मागे वळले, तेवढ्यात त्याचा आवाज आला ’ नमस्कार’ एव्हाना आई पण सावरली असावी, तिनं त्याला आत बोलावलं.
आई आत आली, हळुच म्हणाली ’ हेच का ते ? मी खाली मान घालुनच मान डोलावली. आई म्हणाली’ जा हात पाय धुवुन कपडे बदलुन ये जरा’ मी हात पाय धुतले आणि नेहमीच्या सवयीनं टॊवेल हातात घेउनच बाहेर गेले, तो अजुन उभाच होता,’ बसा ना तुम्ही उभे का ? त्याला म्हणलं. मला लागलेल्या वेळावरुन आत आईच्या लक्षात आलं की मी तशीच वेंधळ्यासारखी बाहेर आली आहे. माझ्या घरात आणि आई बरोबर असताना माझा नर्व्हसपणा पण आता गेला होता.आईनं आत बोलावलं तशी आत गेले. कपडे बदलुन बाहेर जाउन त्याला विचारलं ’तुम्ही काय घेणार, चहा की सरबत? ’चहा’ त्याचं उत्तर आणि देताना चेहरा असा की ’ चहा साठी बोलावलं ना मग सरबत काय विचारताय वेड्यासारखं?’. सवयीनं पटकन पलंगावर बसता बसता आईला सांगितलं ’ आई चहाच टाक आम्हाला’

Friday, March 4, 2011

५० फक्त,

Print Pageनाही वर्ल्ड कप चालु झाला म्हणुन नाही, पण याला थोडा क्रिकेटचा संदर्भ आहे. ४ वर्षापुर्वी पर्यंत क्रिकेटचे दोनच प्रकार होते १. कसोटी आणि २. एकदिवसीय.
कसोटि पाच दिवस चालणारा सामना, प्रत्येकाला दोन दोन संधी मिळणार, एकदा केलेली चुक सुधारता येईल, आधीच्या वेळी मिळवलेलं दुस-यांदा घालवता येईल असा हा प्रकार. आणि शेवटपर्यंत अनिश्चित, त्यात अनिर्णित हा एक अतिशय कंटाळवाणा निर्णय लागण्याची भयंकर शक्यता.
दुसरीकडे एकदिवसीय सामना, मर्यादित षटकांचा, संधी एकच, एका ठिकाणि केलेली चुक म्हणजे फलंदाजित केलेली चुक क्षेत्ररक्षणात सुधारुन घेण्याची संधी, गोलंदाजीतली चुक फलंदाजीत सावरण्याची संधी , पण ती सुद्धा एकच.
या गोष्टींचा प्रभाव पडत होताच. कुठलीही गोष्ट बोलताना क्रिकेटचा संदर्भ देउन बोललं की आपल्या क्रिकेट्वेड्या देशात लगेच कळतं , जसं मला कुणि सांगितलेलं काही कळत नसेल तर मी त्याला outside off stump म्हणुन सोडुन देतो. उगाच मध्ये बॅट घालुन ऑट कोण व्हा.
कधीतरी विचार करताना, डायरी लिहिताना वाटलं आपण टेस्ट खेळतोय का वन डे ? आजचं उद्या करु, पुन्हा केंव्हातरी बघु हे असले विचार का करु शकतो तर टेस्ट खेळतोय म्हणुन. वेळेचं भान नाही राहात मग, कुठली बंधनं नको वाटतात, कुठलं ध्येय दिसत नाही समोर नक्की. कितिही केलं तरी कमीच आहे असं वाटायला लागतं. आत्ता आपण काहितरी करायचं आणि समोरच्यानं जास्त केलं तर पुन्हा अजुन जास्त करायचा प्रयत्न करायचा आणि ते जमलं नाही तर जिंकल्याचा शुद्ध निखळ आनंद नाहीच की पुन्हा पेटुन उठवेल अशी पराभवाची भळभळती जखम नाही, उगीच वेड्यासारखं ' नेकी कर ऑर दर्या में डाल ' किंवा तुला न मला घाल कुत्र्याला ' असा प्रकार सगळा.
त्यापेक्षा वनडे जरातरी बरि, ९९% काहीतरी निकाल लागणारच, मी जिंकेन किंवा हरेन, काहीतरी होईलच. आणि जे व्हायचं आहे ते करण्यासाठी मी जे करु शकतो ते एका निश्चित वेळेत, निश्चित पद्धतिनं करायचं आहे. कुणि दिलेल्या ध्येयामागं पळायचं असेल तर गाठायला ते ध्येय आहे. कुणाला पळवायचं असेल तर किती पंळवायचं ते ठरवुन तेवढं करायला हवंय. भले ते कमी पडेल एखादे वेळेस पण जर समोरचा ते करु शकला नाही त्याच्या निश्वित वेळेत आणि निश्चित साधनांनी तर मी जिंकलो नाहीतर हरलो. पण अनिर्णिततेचा तो भयंकर पेंडुलम नाही डोक्यावर.
पण इथं, ही स्पर्धा आहे माझी माझ्याशीच, तो दुसरा कुणि नाहीच आणि असला तर मला माहित नाही. पण माझ्यातला दुसरा तर आहेच. माझी पहिली बॅटिंग आहे, काहीतरी करायचं आहे, विक्रम करायचे आहेत, केलेले मोडायचे आहेत, बळी पडतीलच, ते पडण्यासाठिच असतात, पण तरी ही पुढं जायचंच आहे. किति हे ध्येय नाही पण किती वेळात हे ध्येय आहे. मला नाही आवडत ते दिवसेंदिवस उभं राहणं आणि हा सगळा खेळ आपल्यच हातांनी अनिर्णिततेच्या भयंकर अनिश्चिततेकडं घेउन जाणं.
आणि म्हणुन मी माझ्यावर घालुन घेतलं एक बंधन, ५० फक्त, ५० वर्षे, आपलं कर्तुत्व दाखवायला, आपली ताकत सिद्ध करायला, वाढवाय्ला आणि एक ध्येय गाठायला. कोणती आहेत ही ध्येय किंवा काय मिळवायहातांनी, आर्थिक, सामाजिक, मानसिक, शारिरिक का अजुन काही ? ते मला पण अजुन कळालेहातांनी,, मग इथं मात्र मी टेस्ट्चा नियम वापरतो. take one session one time. एकदा एका ध्येयाचा विचार आणि ते मिळवलं मी मग दुस-याचा पाठलाग सुरु. कधी एकाचा पाठलाग करताना दुसरं आपसुकच मिळतं आणि कधी पहिलं मिळवताना दुस-या पासुन फार लांब जातो. मग पुन्हा वाट बदलुन नवा पाठलाग सुरु करावा लागतो.
यात मजा आहे. एक थ्रिल आहे जसं प्रत्येक ओव्हर संपली की जसं उरलेल्या ओव्हर आणि चार पाच शक्यता पकडुन एकुण होणा-या रनस दाखवल्या जातात तसं, एक दिवस संपला की झोपताना उरलेले दिवस आणि मिळवायची ध्येयं यांचा हिशोब करायला मी मोकळा होतो. मग शक्यता - अशक्यतांचे तक्ते मांडले जातात, वाटा बदलायचा निर्णय घेतला जातो. कसं आधी विकेट वाचावायच्या का रनरेट वाढवायचा ते ठरवलं जातं, आणि एकदा वनडे खेळायला सुरवात केली की हे प्रत्येक ओव्हरला करावं लागतं, त्यानं आयुष्यात काय होतं तर एक शिस्त लागते, पुढं जाण्याची विजिगिषु का काय म्हणतात ना तशी व्रुत्ती तयात होते. एक प्रकारचा लढवय्येपणा येतो, आल्या प्रसंगाला तोंड देण्याची तयारी करणं सोपं जातं.
यासाठि ५० फक्त, उगाच टिवल्या बावल्य करायला आणि प्रत्येक बॉल तटवुन खेळायला वेऴ नाही आपल्याकडे. एवढं काही करुन जायचं आहे की कोणि सहजासहजि ते पार करु नये आणि केलं तरी मला वाईट वाटु नये.
असो, जे मला वाट्लं आणि जे मी अंगिकारायचा प्रयत्न करतो आहे ते लिहिलं, कोणाला पटेल न पटेल, काय फरक पडतो. जो पर्यंत बॅट आपल्या हातात आहे तोपर्यंत कोणता शॉट खेळायचा ते आपण ठरवायचं पण एक लक्षात ठेवुन ५० फक्त.