Sunday, November 20, 2011

चपला आणि सत्कार - भाग - ०९


दुस-या दिवशी सकाळ झाली तसं, दक्षिण कसब्याच्या जोशीवाड्यातुन चार जण दोन गाड्यांवर राख सावडायला निघाले, सगळेच बाहेरगावचे. तसा स्मशानभुमीचा रस्ता सरळच होता, कुणाला काही विचारायची गरज नव्हती. स्मशानभुमीत पोहोचले तर तिथं दोघंजण तिथंच थांबलेले होते, आत कट्ट्यावर चार जण बसलेले होते, मदनला बघुन सगळे जण उठुन त्याच्याकडे आले, तिथल्या ऑपरेटरनं चार अस्थी,थोडी राख काढुन ठेवलेलीच होती, काय अजुन ब-याच जणांना मुक्ती मिळालेली असावी. सगळ्यांच्या नावच्या वेगवेगळ्या पिशव्या करुन त्यानं बाजुला ठेवल्या होत्या.
तिथं थांबलेल्या त्या लोकांपैकी दोघांनी त्याच राखेतली थोडी राख बरोबरच्या पिशवीत काढुन घेतली अन लगेच निघाले. मदनला अन बरोबरच्यांना हा प्रकार जरा विचित्रच वाटला. न राहवुन मदननं त्यातल्या एकाला विचारलंच, ' ओ भाउ, हे कायय, तुमी काय करणार माज्या भावाची राख घेउन ? ' त्याच्या विचारण्यात राग पण होता अन उत्सुकता सुद्धा होती. ते सगळे बाहेर निघाले होते, त्यातले दोघेजण परत आले. ' तु मदनचा मोठा भाउ ना बे, फुकटची गेम केली त्याची त्या भड्व्यांनी आमच्या तालमीच्या माणसाची अन आमी गप बसु असं समजु नको,' पुढं गेलेल्या दोघांकडं हात दाखवुन म्हणाले, ते पाहिलंय का, असे अजुन तिघं जण हायत त्यांच्यासाठी पायजे राख' हा ही प्रकार मदनच्या लक्षात आला नाही. आपल्या भावाची राख अन यांचा संबंध त्याला कळाला नाही. पण अजुन काही विचारुन उगा गोंधळ नको असा विचार करुन त्यानं गप्प बसणं पसंत केलं.
नाथा अन हणमंताला जाग आली, तेंव्हा उजाडलं होतं, रात्री दोघंजण बराच वेळ बोलत बसले होते, दीड वाजता तर नाथानं फोन केला होता बीडला. जाग आल्या आल्या त्यानं पुन्हा तोच नंबर लावला आणि तसाच बनियन,अंडरवेअर वर बाहेर आला, चार पाच रिंग झाल्यावर फोन उचलला गेला अन पलीकडुन आवाज आला, ' पैलवान, आपला माणूस कवाधरनं उभाय पैसं घेउन कुणी दरवाजाच उघडंना घराचा, किती वक्त उभारणार असं कॅश घेउन चौकात, जरा तुमीपण लावा कॉल पार्टीला अन सांगा कॅश घ्यायला.' फोन कट झाला, अन नाथा निश्चिंत झाला. त्याला आता उत्साह आला होता. पुन्हा पानटपरीला फोन करुन त्यानं बांगरेची चौकशी केली, दररोज सातला उघडणारी पानटपरी आज पाचपासुन फक्त फोनसाठीच उघडी होती. बांगरे अर्ध्या तासात विजापुरला पोहोचणार होता, आणि त्याच्याकडुन त्या ट्रॅक्सच्या ड्रायव्हरचा फोन नंबर पण मिळाला होता. हणमंता सकाळची कामं आटोपुन आला, बाहेर नाथा फोन करत होता त्याच्याकडं हसुन बघत तो खोपटात गेला, अन एकच किंकाळी त्या माळरानावर घुमली. नाथा झटक्यात वळुन खोपटाकडं जायल लागला.
कमिशनर साहेबांनी रात्री जाधव गेल्यावर, सगळा मामला सेक्रेटरींना समजावला होता, आज सेक्रेटरी सकाळीच मंत्र्यांशी बोलुन निर्णय कळवणार होते. बंगल्याच्या बागेत राउंड मारता मारता कमिशनर परमिशन येणं आणि न येणं या दोन्ही शक्यता आणि त्याच्या परिणामांचा विचार करत होते, तसं ही फाईल अजुन कुणाला देउन आपले काही स्वार्थ या परमार्थात साधुन घेता येतील हा विचार पण पॅरलली चालु होता. सेक्रेटरी सकाळी दहावाजेपर्यंत फोन करणार होते. त्या आधी, कमिशनरांच्या डोळ्यासमोर दोन नावं होती. एक सोलापुरचे महापौर आणि दुसरे अक्कलकोटचे आमदार, या दोघांपैकी एकाकडं या फाईलची कॉपी देउन ठेवणं त्यांना सेफ वाटत होतं. पण सेक्रेटरींच्या फोन पर्यंत वाट पाहायचं त्यांनी ठरवलं, त्याचवेळी त्यांच्या मुलानं चहा तयार झाल्याचं हाक मारुन सांगितलं अन साहेब बंगल्यात आले. मोबाईल चेक केला, कुणाचा फोन आलेला नव्हता पण एक एसेमेस आलेला होता. त्याचा नंबर त्यांनी आपल्या डायरीत चेक केला, काही खास नंबर त्यांनी मोबाईल मध्ये सेव्ह केलेले नव्हते. महापालिकेतले विरोधी पक्षनेच्याचा नंबर होता तो, मेसेज उघडुन त्यांनी वाचायला सुरुवात केली, नंबर बघितल्यावर आलेलं टेन्शन एक्दम उतरलं. गणपती उत्सव कोणत्याही अनुचित प्रसंगाविना योग्य रितिने पार पाड्ल्याबद्दल त्यांचे व त्यांच्या खात्याचे आभार मानणार मेसेज होता तो. कमिशनर साहेबांचं टेन्शन एकदम कमी झालं.
पहाटे माननीयांना जाग आली तेंव्हापासुन ते आपले फोन शोधत होते, बेडवर झालेल्या चादरींच्या घोळात त्यांचा फोन सापडत नव्हता आणि बंद करुन ठेवल्यानं दोन्ही फोन नक्की कुठं आहेत हेच कळतच नव्हतं. त्याचा राग त्यांनी बरोबर असलेल्या पोरीवर काढला होता. शेवटी फोन सापडल्यावर आंघोळ आवरुन ते थेट गेस्ट हाउसला आले. प्रदेशाध्यक्ष अजुन उठले नव्हते. हे असं वाट बघत बसणं त्यांना कधीच पटायचं नाही. वेळ जाण्यासाठी त्यांनी तिथंच नाष्टा मागवला. आज ग्रामीण भागातले पक्ष पदाधिकारी भेटायला येणार होते, त्याची तयारी करायची होती. त्यांच्या संपर्क कार्यालयातुन अजुन माणसं आली नव्हती. ज्या दोघांना त्यांनी आनंदच्या घरावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं त्यांना फोन लावला. रात्रभरात आनंदचे वडील सोडले तर दुसरं कुणी घरी आलं किंवा गेलं नव्हतं, नेहमीच्या लोकांकडुन आनंदचा काही पत्ता लागत नव्हता. एक आख्खा दिवस एक माणुस सापडत नाही याचं फार मोठं नुकसान त्यांना भविष्यात सोसावं लागणार होतं. जुने नवे सगळे संबंध वापरुन झाले होते. तालमीतल्या ज्या लोकांशी अजुन चांगले संबंध होते त्यांच्याशी पण काँटॅक्ट करुन झाला होता, पण काही फायदा झाला नव्हता. साडेआठ झाले तरी प्रदेशाध्यक्ष रुममध्येच होते,एव्हाना निघायला हवं होतं, अक्कलकोटला मठात एक कार्यक्र्म ठरवुन ठेवलेला होता, पण तिकडं आत रुममध्ये प्रदेशाध्यक्ष फोनवर शांतपणे समोरच्याचं बोलणं ऐकुन घेत होते.
नाथा, खोपटाजवळ येईपर्यंत हणमंताच बोंबलत बाहेर आला, त्याचं तोंड भुत पाहिल्यासारखं झालं होतं. दुस-या बाजुनं प्रशा येत होता तो पण खोपटाकडं पळायला लागला. नाथानं खोपटाकडं पाहिलं, पहाटे तो आणि हणमंता उठल्यावर आनंदनं उठुन नाथाचा शर्ट घ्यायचा प्रयत्न केला होता. त्याला त्यातलं हत्यार हवं असावं, पण पोत्यात बांधलेल्या पायानं त्याला दगा दिला होता, आणि अवध्या दहा मिनिटात सगळं होत्याचं नव्हतं झालं होतं. गुप्तीच्या वारानं केलेली जखम खुपच खोल गेली होती. आनंदचा उजवा पाय पिंडरीतुन तुटल्यासारखा झाला होता आणि वरचा तुट्लेला भाग पोत्याच्या बाहेर आला होता. ' नाथा, माफ कर अन जीवे मार मला एकदाचा, काल पन बोललो तुला चुक झाली माफ कर, सोड मला अरे शुगर हाय मला, ही असली जकम जिंदा नाय ठेवणार मला सोडव बाबा सोडव.' नाथा थोडासाच घाबरला, त्यानं असले सीन याआधी त्यानं पाहिले होते, नुसतं रक्त वाहुन मेलेली माणसं त्यानं ९३ च्या भुकंपाला सिव्हिलमध्ये पाहिली होती. आता आनंद वर दया दाखवावी का कसं याचा त्याला निवाडा करता येत नव्हता. प्रशा मात्र हणमंता एवढाच हादरलेला नव्हता, सणा-जेवणाला कोंबडे बकरे मारणं वेगळं आणि जिवंत माणसाचा रक्ताळलेला तुटका पाय बघणं वेग़ळं हे त्याला जाणवत होतं. त्याच्या हातातला चहाचा तांब्या कधीच गळुन पडला होता. हातातल्या मोबाईलची रिंग वाजल्यावर नाथा तिथुन बाहेर आला, येताना त्यानं हणमंताला आनंदचं तोंड बांधायला सांगितलं. आनंदचं तोंड बांधुन झाल्यावरच त्यानं फोन घेतला,
गप्प झालेला मदनचा भाउ अन बाकीचे घरी आले, लगेच पंढरपुरला जायचं असल्यानं घरातली मंडळी लगेच निघायची तयारी करत होती. ही मंडळी घरातुन बाहेर पडली मग घरात एक दोन म्हातारे अन बाकी बायकाच होत्या. सगळे पुढच्या तयारीला लागले, जाणारा जातो पण मागच्यानं तर जगावं लागतंच, जगण्यासाठी लागणारं सगळं करावं लागतंच. घरातली लोकं बाहेर पडुन दहा मिनिटं झाली असतील तोच जोशीवाड्याबाहेर पोलिसांची जीप उभी राहिली. जाधव साहेब, दोन हवालदार व एक महिला हवालदार एवढे जण जीपमधुन उतरले, साहेबांनी लेडिज हवालदारासोबत एकाला आत पाठवलं. पाच मिनिटात दोघांबरोबर एक तरुण विवाहित स्त्री बाहेर आली. ती मदनच्या भावाची बायको होती. तिनं तिला जेवढी माहिती होती तेवढी दिली. त्यानं जाधवांचं समाधान झालं नाही पण त्यांचा नाईलाज होता.घरात अजुन कुणी नसल्यानं त्यांनी चौकशी आवरती घेतली आणि निघाले. त्यांच्या नंतर दहा मिनिटात कोप-यावरच्या पानटपरीतुन एक फोन केला जो दुस-या बाजुला इरिगेशनच्या गेस्ट हाउस मध्ये वाजली. फोन वर झाल्या प्रकाराची माहिती देवुन फोन करणा-यानं फोन ठेवला आणि ताबडतोब तो जोशीवाड्यात गेला. मदनच्या वहिनीकडं त्यानं एक पाकिट दिलं. माननियांचं नाव सांगुन तो तिथुन निघाला. तिनं पाकिट उघडुन पाहिलं, आत वीस हजार होते, तिला हा संबंध कळाला नाही पण तिनं गुपचुप ते पाकिट ठेवुन घेतलं अन घरात गेली.
बांगरेनं त्याला घेउन गेलेल्या गाडीच्या ड्रायव्हरला ते हॉटेल दाखवलं जिथं मुश्ताकला सोडलं होतं, बांगरे जाउन हॉटेलात जाउन मुश्ताकला भेटला, तुम्हाला मुंबईला सोडायला गाडी आणल्याचं सांगितलं. अचानक झालेल्या बदलानं मुश्ताक चिडला होता. तो काही ते हॉटेल सोडुन यायला तयार नव्हता. शेवटी कसंतरी बांगरेनं मुश्ताकला पटवलं. सामान असं काही मुश्ताककडं नव्हतंच. जे होतं ते एका मोठ्या झोळ्यात बांधुन घेउन तो बांगरेबरोबर निघाला. तो गाडीत येउन बसला, तिकडं बांगरे हॉटेलचं बिल देत होता. या कामाला फार झालं पाच मिनिटं लागली असती, पण जसा वेळ जास्त व्हायला लागला तसं मुश्ताकला संशय यायला लागला. गुन्हेगाराची एक वेगळीच मानसिकता असते, त्याला तो स्वतः सोडुन प्रत्येकजण त्याच्या जीवावर उठलेलाच वाटत असतो. मुश्ताक चुळबुळ करायला लागला, तसं ड्रायव्हरनं त्याला मागच्या सीटवरुन पुढं यायला सांगितलं आणि विजापुरमधुन बाहेर पडण्याच्या आधी मौला दर्ग्यात जायचं असल्याचं सांगितलं. दोन दिवस जीवाच्या भितिनं आणि आनंदचा काहीच संपर्क होत नसल्यानं मुश्ताक हॉटेलच्या बाहेर जास्त पडलाच नव्हता. त्याला पण दर्ग्यात जायचा विचार पटला. तो आपला झोळा घेउन पुढच्या सीट्वर आला, त्याला त्या सीट्वर नीट बसता येत नव्हतं, सीट एक्दमच पुढं होती, आणि काही केल्या ती मागं व्हायला तयार नव्हती. बांगरे तेवढ्यात मागं येउन बसला अन मुश्ताकनं बाहेर निघायच्या विचार करायच्या आत गाडी निघाली. ' मुश्ताक भाई, आपका बॅग दे दो पिछेको, काय को तकलीप उगाच तुमे' आधीच अवघडलेल्या मुश्ताकनं बांगरेची ऑफर स्विकारली अन झोळा त्याच्याकडं देउन टाकला.

Print Page

0 comments:

Post a Comment