Saturday, November 12, 2011

चपला आणि सत्कार - भाग ०७


आजचा दिवस बहुधा बायकांसाठी चांगला नव्हताच, कसब्यात जोशीवाड्याच्या अंगणात मदनच्या अंत्ययात्रेची तयारी चालली होती, पोस्ट मार्टेम करुन बांधुन आणलेल्या त्याच्या बॉडीवर पडुन त्याची आई धाय मोकलुन रडत होती. इकडं सरवदे डॉक्टरच्या दवाखान्यात त्याची नर्स ड्रेसिंग करताना कपाळाची जखम दुखत असल्यानं नाथाची बायको दोन्ही पाय झाडुन ओरडत होती. तिचं आरडा ओरडा कमी होईना हे पाहुन सरवदे डॉक्टर केबिन मधुन बाहेर आली अन तिच्यावर ओरडली ' ए बये, एवढं का ओरडतीय एवढंसं लागलंय तर, उद्या पोर होताना तर ओरडुन ओरडुन जीव देशील की मग, गप जरा अन सहन कर उगा. दोन मिनिटात दुखायचं कमी होईल.' तिचं बोलणं ऐकुन नर्स सुद्धा हसायला लागली. बरोबर दहा वाजता बांगरेची बायको अन मुलगी जेंव्हा पोलिस स्टेशनला बांगरेची चौकशी करायला गेले तेंव्हा त्यांना तिथं चव्हाणवहिनी दिसली, बांगरेची बायको रडतच तिच्याकडं गेली.बांगरे गायब झाल्याचं वहिनीला माहित नव्हतं, आणि आता कळाल्यावर तिला बांगरेच्या बायकोला समजावयचं का तिचा नवरा रात्री घरी न आल्याची तक्रार करायची हेच कळेना. सकाळी माननियांच्या घरी जाउन काही फायदा झालेलाच नव्हता, माननिय अजुन गेस्ट हाउस वरुन घरीच आलेले नव्हते आणि त्यांचा फोन नंबर द्यायला कुणी तयार नव्हतं. नाईलाज होउन ती सरळ पोलिस स्टेशनला आली होती, तर इथं ही तिच्या गळ्यात पडुन रडत होती.
आणि पोलिस इन्स्पेक्टर जाधव चौपाडात सापडलेली एक अल्टो उचलुन घेउन जाण्याची तयारी करत होते. त्या गाडीच्या दोन दरवाज्यांवर रक्ताचे डाग होते. तसंच समोर गेलेल्या गल्लीत एक दोन ठिकाणी रक्ताचे डाग होते. गणपती विसर्जनाच्या बंदोबस्ताचं टेन्शन संपल्यावर जाधव दोन दिवस रजा घेउन घरीच बसले होते. आज ड्युटिवर आल्या आल्या हे लफडं म्हणजे त्यांचं डोकंच सरकलं होतं. त्यांनी तालिम मंडळाच्या कार्यालयात बसुनच चौकशी सुरु केली होती. त्यांचे असिस्टंट व हवालदार घराघरात जावुन सापडेल त्याला पकडुन आणत होते. अरगडे वाड्यात मात्र पोलिसांना फक्त बायकाच सापडल्या, शेवटच्या दोन खोल्या तर कुलुपबंदच होत्या. जाधवांना अजुन विनाचौकशी झडतीची ऑर्डर मिळाली नव्हती त्यामुळं ती कुलुपं तोडणं त्यांना शक्य नव्हतं. नाथाच्या शेजारच्या खोलीतल्या बाईनं, त्याची बायको सकाळी पाणी भरताना अंगणात पडल्यानं डॉक्टरकडं गेली असल्याचं सांगितलं होतं, आता ती परत येईपर्यंत तिथंच बसुन राहणं त्यांना भाग होतं. बाकी मंड्ळात, कार्यालयात, तालमीत आणि गणपतीच्या शेडमध्ये संशयास्पद असं काहीच न सापडल्यानं त्यांचा तिळपापड होत होता. नाही म्हणायला कार्यालयातल्या तिजोरीत चार शोभेच्या तलवारी अन चार भाले सापडले होते. मात्र ती चांदीची पाणी दिलेली शोभेची शस्रं गणपती उत्सवात स्थिर व विसर्जन मिरवणुकीत मुर्तीबरोबर घेउन जाण्याची परवानगी मंडळ गेली २३ वर्षॅ दरवर्षी घेत होतं. तशी ती या वर्षी पण घेतलेली होती, आणि पुन्हा ती शस्त्रं कपाटात ठेवताना दोन साक्षीदार व ड्युटी हवालदारानं पंचनामा करुन मंडळाला दिलेला होता. शिवाय ज्या कप्प्यात ती शस्त्रं होती त्याला तीन ठिकाणी सिल केलेलं होतं. त्याची रजिस्टर मध्ये नोंद होती. अगदी आता तपासासाठी कपाट उघडताना सुद्धा कार्यालयातल्या मॅनेजरनं रजिस्टरला नोंद करुन त्यावर जाधवांचीच नाव लिहुन सही घेतली होती.
हणमंता रात्री दोन वाजल्यापासुन गाडी चालवत होता, कालची रात्र पण गाडीत गेली आणि आज सकाळ दहा वाजेपर्यंत तो बसवकल्याणच्या पुढं आला होता. काल त्यानं एक जिवंत माणुस परत आणला होता, आणि आज ज्याला घेउन चालला आहे तो जिवंत आहे का मेलेला आहे हे कळायला त्याला मार्ग नव्हता आणि विचारायची गरज पण नव्हती. शेजारच्या सीटवर नाथा बरोबर बसला होता हेच त्याला पुरेसं होतं. रात्रीपासुन गाडी दोन वेळा पेट्रोल भरायला थांबवली होती, तेवढंच. बसवकल्याणच्या पुढं हणमंताची सासुरवाडी होती. तशी एका बाजुला असलेल्या वस्तीच होती ती, पण त्याचा मेव्हणा तिथल्या एका सामाजिक संघटनेचा अध्यक्ष होता त्यामुळं हे ठिकाण तसं सुरक्षित होतं, असं त्याला वाटत होतं. नाथा सोलापुर जिल्हा हद्द ओलांडल्यानंतर थोडा झोपला होता, गाडी एका बाजुला थांबल्यावर त्याला जाग आली. हणमंता गाडीच्या मागच्या बाजुला धार मारायला गेला होता. नाथानं गाडीत मागं वाकुन पाहिलं. आनंदच्या पायातुन बरंच रक्त गेलं होतं. त्याला गाडीत टाकलं तेंव्हा तरी तो जिवंत होता पण आता काय झालंय ते पहायला तो उतरुन बाहेर आला, गाडीतली पाण्याची बाटली घेउन त्यानं आनंदच्या तोंडावर पाणी मारलं, काही हालचाल दिसेना, मग त्याला थोडं हलवुन पाहिलं तसा आनंद ग्लानीतुन जागा झाला. डोळे किलकिले करुन त्यानं पाहिलं, पायातुन प्रचंड वेदना त्याच्या डोक्यापर्यंत जात होत्या, ओरडावं म्हणलं तर ओरडता येत् नव्हतं. पोत्यात बांधलेला पाय हलवता उयेत नव्हता. नाथानं पुन्हा एकदा ठेवणीतल्या शिव्या दिल्या, ते ऐकुन चेन लावत लावतच हणमंता गाडीकडं आला, ' जिवंत हाय ना भडवा, तिच्यायला असं मरायला पाहिजे ना की हेच्या पोराचं पोरगं बी मुतायला पाहिजे याचा फोटो बघुन. ह्यांच्यायला अवलादच हरामी याची ' नाथानं तोंड धुता धुता हणमंताला विचारलं, ' अजुन किती वेळ आहे रे पाहुण्याकडं जायला, आणि फोन केला आहेस ना नक्की' हणमंता स्टार्टर मारता मारता म्हणाला ' हे काय अजुन १५- २० मिनिटंच -हायलीत' नाथा आता पुर्ण जागा होता, आता त्याला बिनलग्नाच्या बायकोची आठवण आली. त्यानं फोन काढला आणि फोन लावला.
मलमपट्टी करुन दवाखान्यातुन नाथाची बायको बाहेर पडली, या तरटी नाक्याच्या एरियात यायला तिला कधी आवडायचं नाही पण नाथानं गेल्या सहा महिन्यात प्रत्येक वेळी तिला काहीही झालं की इथंच आणलं होतं आणि काल रात्री पण शेजारच्या काकुला तिला इथं घेउन यायला सांगितलं होतं. रात्रीतुन तो गेल्यापासुन त्याचा फोन नव्हता. तिला फोन लावायचा नाही असा दम दिला होता, ती बाहेर येउन रिक्षात बसत असतानाच तिच्या बरोबर आलेल्या काकुचा फोन वाजला, दोन शब्द बोलुन तिनं फोन नाथाच्या बायकोला दिला. तिथुन घर जवळ येईपर्यंत दोघं बोलत होती. रिक्षा बोळाजवळ आल्यावर काकुनं फोन काढुन घेतला बंद केला. दोघी वाड्यासमोर रिक्षातुन बाहेर पडल्या, आणि लगेच समोर उभ्या असलेल्या लेडिज हवालदारानं दोघींना ढकलत खोलीकडं नेलं. खोलीचा दरवाजा उघडल्यावर त्या तिघी आत गेल्या, तोपर्यंत लेडिज पोलिसानं, एक फोन करुन अजुन दोघांना बोलावुन घेतलं होतं. आता त्या खोलीत बरीच गर्दी झाली होती. किचन कट्टा व कपाट पहाटेच आवरुन ठेवलेलं होतं, लेदरच्या पाकिटात पैसे भरुन ठेवलेले होते. तिन्ही पोलिसांनी जवळपास अर्धा तास घरात हुडकाहुडकी केली. संशयास्पद म्हणावं असं काहीच सापडलं नाही, फक्त लाखभर रुपयांची कॅश सापडली. हे पैसे कुठुन आले हे नाथाच्या बायकोला न सांगता आल्यानं ते जप्त करुन घेतले. पंचनामा आटोपला आणि जाधव साहेबांना बोलावलं. जाधव आत आले, पुन्हा एकदा घरात थोडं वरखाली केलं, आरडाओरडा केला, शिव्या घातल्या अन एक गोष्ट केली ती म्हणजे नाथाच्या बायकोचा मोबाईल चेक केला. काल दुपारनंतर एकपण फोन केला नव्हता किंवा आलेला नव्हता. हे जरा अवघडच होतं, एसेमेस चेक केलं तिथंही काही नव्हतं. अजुन थोडी चिड्चिड करुन जाधव साहेब बाहेर पडले. आता इथं करण्यासारखा काही फार तपास राहिला नव्हता, बाहेर आल्यावर दोन हवालदारांची तिथं सिव्हिल ड्रेसमध्ये ड्युटी लावुन तिथुन ते पोलिस स्टेशनला परत आले.
हणामंतानं गाडी गराडे वस्तीवर घातली, त्याचा मेव्हणा, प्रशा वस्तीच्या सुरुवातीलाच त्यानंच लावलेल्या संघटनेच्या बोर्डाजवळ उभा होता. गाडी थांबल्या थांबल्या त्यानं आधी हणमंताला बाहेर घेउन तो बोर्ड दाखवला.दोघांचं कन्नड मध्ये बोलणं झालं. हणमंता पुन्हा गाडीकडं आला, त्यानं नाथाला मागं बसणार का असं विचारलं, खरंतर नाथाच्या जीवावर आलं होतं पण तो मागं गेला. पुढं हणमंता आणि प्रशा बसले आणि गाडी सुरु झाली. तिथुन पुढं दहा मिनिटं कच्च्या रस्त्यावरुन गेल्यावर ते एका शेतातल्या खोपटाच्या समोर थांबले, ते खोपटं तिथुन जवळपास १०० मीटर होतं. मागचा दरवाजा उघडुन नाथा बाहेर आला आणि त्यानं बेशुद्ध आनंदला बाहेर ओढलं. गाडीतुन बाहेर येताना पाय जमिनीवर आदळल्यावर आनंद एवढ्या जोरात किंचाळला की प्रशाला वाटलं तो मेलाच आता. त्यानं लगेच हणमंताला बाजुला घेउन ओरडुन काहीतरी सांगितलं, त्यानं नाथाला तेच मराठित सांगितलं, आनंद जिवंत असेल तरच त्याला इथं ठेवता येईल, तो मेला तर प्रशा त्याला सरळ नेउन हायवेला टाकेल. नाथाकडं दुसरा उपाय नव्हता. शेवटी त्यानं आणि हणमंतानं खांद्यावर घेउन आनंदला खोपटात नेलं. आत नुसता कडबा आणि करडीची पेंड भरुन ठेवलेली होती. पडलेलं एक फाटकं पोतं घेउन नाथानं आनंदचा पायाची जखम बांधली. नावं कळेपर्यंत त्याला आनंद जिवंत हवा होता, नंतर प्रशानं त्याला हायवेवर टाकलं काय अन नायतर विहिरीत टाकलं काय नाथाला काही घेणं देणं नव्हतं.
दुपारचे दिड वाजले तरी, पोलिस स्टेशनला आनंदच्या बायकोची तक्रार लिहुन घेतली गेली नव्हती, ब-याच ठिकाणी लागेबांधे असलेल्या माणसाबद्दल तक्रार घ्यायची का नाही याबद्दल तिथं कुणाचंच एकमत होत नव्हतं. कागदावर लिहुन सगळं तयार होतं, पण त्याची कुठं नोंद करायला कुणी तयार नव्हतं. पुणे नाक्याला मारुती शोरुमाच्या बाजुला असलेल्या स्मशानभुमीत मदनच्या बाप खाली बसलेला उठतच नव्हता, मग त्याच्या भावानंच सगळं उरकलं. नातेवाईक, मंडळाचे फुटकळ कार्यकर्ते आणि एक मोठी व्यक्ती माननीय स्वतः हजर होते, ब-याच जणांना हा मोठा धक्का होता. अगदी श्रद्धांजलीची भाषणं वगैरे झाली. तिथलं सगळं आटोपुनच माननीय थेट पोलिस स्टेशनला आले, त्यांना बघताच आनंदची बायको उठुन त्यांच्याकडं गेली. रात्री त्यांना भेटायलाच आनंद गेला होता,आणि नंतर गायब झाला होता. आनंदची बायको शिव्या देत अंगावर आल्यावर त्यांना थोडं अवघड झालं, पण त्यांना बघुन तिथल्या लेडिज हवालदार पुढं झाल्या अन त्यांना आत घेउन गेल्या. मागं मागं आनंदची बायको पण गेली. दोन दिवसात, आपली दोन माणसं घालवुन माननीय आधीच चिडले होते, त्यात ही बाई त्यांच्या मागं मागं ओरडत येत होती. शेवटी अर्धा तास गोंधळ झाल्यावर आनंदच्या बायकोची तक्रार नोंदवुन घेतली गेली तेंव्हा, बांगरेच्या बायकोचा हे पोलिस आपल्या नव-याला हुडकुन आणतील यावरचा विश्वास उडुन गेला होता, मुलीबरोबर ती गुपचुप तिथुन निघुन गेली. दोन दिवस तिच्या धुणी भांड्याच्या कामाला ती गेली नव्हती, अजुन एखादा खाडा झाला असता तर आठ पैकी चार घरं तरी हातातुन गेलीच असती, तिला असं इथं बसुन दुख: करुन चालणार नव्हतं.

Print Page

0 comments:

Post a Comment