Tuesday, November 15, 2011

चपला आणि सत्कार - भाग ०८


फोनची रिंग वाजल्यावर नाथा चकित झाला, फोन मंडळाच्या कार्यालयातुन आला होता. तिथल्या मॅनेजरनं सकाळपासुन काय काय झालं ते सगळं सांगितलं आणि सगळ्यात महत्वाची बातमी दिली ती म्हणजे विजापुरचा पत्ता मिळाला होता. कुणाला संशय येउ नय म्हणुन आजचा दिवस इथंच काढणं त्याला भाग होतं. प्रशा वस्तीकडं जाउन जेवण घेउन आल्यावर, तिघांनी बसुन पोटभर जेवण केलं, आनंद थोडा शुद्धीत आला होता, नाथानं जेवण केलेल्या प्लेटमध्येच हात धुतला अजुन थोडा रस्सा त्यात घालुन ते पाणी आनंदला पाजलं, त्यात राग पण होता आणि त्याला जिवंत ठेवायची गरज तसं तर नव्हती पण त्याला उगाच लफडं वाढवायचं नव्हतं. तो मनात आता त्याच्या सोलापुरातल्या मुसलमान मित्रांची नावं आठवत होता. वेळ तर अशी होती की मिरवणूकीच्या रात्री मशिदीसमोर नाचुन जो दंगा केला होता, त्यामुळं सगळेच थोडे टेन्शनमध्ये होते. हणमंता गाडी धुवायला बोअरकडं घेउन गेला होता. तो आल्यावर, त्यानं गाडीतुन एक पाकीट काढलं, त्यातुन एक सिमकार्ड काढुन आपल्या फोन मध्ये घातलं, एक फोन लावला. दोन तीन वेळा लावल्यावर फोन उचलला गेला आणि नाथानं आदरानं बोलणं सुरु केलं ' उस्मानमियां है क्या घर पे, मैं नाथा बात कर रहा सोलापुरसे' फोनमध्ये एका बाईचा आवाज घुमला ' बडे अब्बा सुनो, सोलापुरसे फोन हंये, नाता की कौन है, लेते क्या अंदरसेच फोन, लिये क्या, हां मैं रखती इदर' , मग तिथं शिवारात फिरत फिरत नाथा अर्धा तास त्या उस्मानमियांशी बोलत राहिला. फोन बंद झाल्यावर त्याच्या लक्षात आलं होतं की हे प्रकरण वाटतंय तेवढं सोपं नाही, विजापुरातल्या पत्याचा काही उपयोग नाही. त्याला हवा असणारा तिथुन कधीच पुढं निघुन गेला असेल तर, गोव्यात किंवा मुंबईत जाउन त्याला हुडकणं अवघड होणार होतं. फोन बंद केला, सिम बदललं आणि पुन्हा फोन चालु केला तेंव्हा लगेच फोन आला. शेजारच्या काकुचा...
जाधवना या स्टेशनला येउन वर्ष झालं होतं, गेल्या वर्षात असं काही खास घडलं नव्हतं, जुगार आणि दारु गुत्यांवर होणारी भांडणं, त्यातुन झालेले एक दोन खुन, ७-८ घरफोड्या, एक मोठा अपघात, एक बलात्कार आणि बरेच किरकोळ गुन्हे, पण गँगवॉर सारखं असं काहीतरी पहिल्यांदाच होत होतं. त्यांनी स्टेशनच्या रेकॉर्ड मधुन सगळ्या जुन्या फाईल काढायला सांगितल्या. एका कागदावर सगळी नावं लिहुन धागे जोडत बसले होते. आज जेवण घरुन आलेलं होतं. स्पेशल डायट फुड, उकडलेल्या भाज्या आणि त्यामुळंच आता चहावाल्यानं आणलेल्या गरम गरम अण्णा भजी जास्तच भारी लागत होत्या. तीन चार वेळा सगळी नावं वाचुन झाल्यावर त्यांच्या डोक्यात एक चित्र तयार होत होतं, एक जिगसॉ पझल, ज्याचे दोन तीन तुकडं मिळतच नव्हते. ते सोडुन बाकी चित्र जुळल्यासारखं त्यांना तरी वाटत होतं, एक तुकडा त्यांनीच बाजुला ठेवला होता, तो लावायला त्यांनाच भीती वाटत होती. टेबलावरचा फोन वाजला म्हणजे खात्यातल्याच फोन असणार होता. फोन मोदी पोलिस स्टेशन मधुन होता, एक कार हरवल्याची तक्रार होती, त्याची काही माहिती आहे का असं पलीकडुन विचारलं गेलं, नंबर ऐकल्यावर तर, उत्तर द्यायच्या आधी जाधवांनी तो तुकडा त्या जिगसॉ मध्ये बसवुन टाकला आणि तो अगदी फिट्ट बसला पण, जाधव साहेब लगेच खुश झाले, त्यांच्या असिस्टंट्नं सकाळी अकरा ते आता पाच वाजेपर्यंत खपुन सगळा रिपोर्ट तयार केलेलाच होता. तो रिपोर्ट आणि बाकी सगळ्या फाईल घेउन जाधव कमिशनर ऑफिसला निघाले. ते बाहेर पडेपर्यंत मोदि पोलिस स्टेशनमधुन गाडी पाहायला एक कॉन्स्टेबल, एक लेडिज कॉन्स्टेबल आणि अजुन एक बाई आल्याचं कळालं, मग त्यांच्याबरोबर ते बाहेर ठेवलेल्या गाडीकडं गेले. आनंदच्या बायकोनं गाडी लगेच ओळखली. सकाळी गाडीत कागदपत्रं काही सापडली नव्हतीच, आणि आनंदच्या बायकोनं काही बरोबर आणली देखिल नव्हती.
नाथानं पुन्हा एकदा सिमकार्ड बदलुन उस्मानमियांला फोन केला, पुन्हा जवळपास अर्धा तास चर्चा झाली. ह्यावेळी फोन बंद केल्यावर नाथा थोडा टेन्शन फ्री होता. सिम कार्ड बदललं, बोळाच्या टोकाला असलेल्या पानटपरीवर फोन केला, तिथुन कार्यालयातुन एकाला बोलावलं. पुन्हा पाच मिनिटानी फोन केला. मग जवळपास पंधरा मिनिटात दहा गोष्टी सांगितल्या. सगळ्यात महत्वाचं होतं, ते बांगरेला विजापुरला घेउन जाणं आणि औरंगाबादला बावडी मशीद इलाक्यात उस्मानमियांच्या घरी पैसे पोहोचवणं. त्यानं पुन्हा अर्धा तासानं फोन केल्यावर त्याला कळालं की त्याच्या घरातले लाख रुपये पोलिसांनी जप्त करुन नेले होते, आता पुन्हा त्या पैशाची सोय करणं भाग होतं. परेशायनम:, दुसरा रस्ता आतातरी दिसत नव्हता. आणि त्याला राग आला होता की त्याच्या बायकोनं याबद्दल त्याला काहीच सांगितलं नव्हतं. सिम कार्डची बदला बदली करुन पुन्हा परेशला फोन केला. परेश तसा चिडलाच, कारण आता येणा-या दसरा दिवाळीच्या सिझनचा माल भरायला त्यानं पैसे बाजुला काढुन ठेवले होते, ते आता नाथाला दिल्यावर सिझन सुरु होण्याच्या आधी ते मिळायची शक्यताच नव्हती. त्यानं नाथाला एक तासानं फोन कर, बाबांना विचारतो असं सांगितलं. आता बाबांना विचारतो म्हणजे सोय होणार नाही याची पंच्याण्णव टक्के खात्री होती. नाथानं पुन्हा दुस-या पानटपरीला फोन केला आणि तिथं मॅनेजरला बोलावुन पैशाची सोय करायला सांगितलं. पुन्हा सिम बदललं, या बदलाबदलीत त्याच्या फोनची बॅटरी कमी होत होती. मग त्यानं अगदी खास नंबर फिरवला, ही त्याची शेवटची आशा होती, आणि त्याचं दैव बलवत्तर तिथं काम झालं. उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत पैसे औरंगाबादला पोहोचण्याची खात्री त्याला मिळाली, तसं ही बीड ते औरंगाबाद अंतर फार जास्त नव्हतंच.
माननीय दिवसभरातल्या भानगडी आवरुन हॉटेल महाराजाला आले, सोलापुरातला एक फार जुना बार आणि लॉज. वर जातानाच त्यांनी खास विजापुर वेस खिम्याची ऑर्डर दिली आणि आपल्या नेहमीच्या खोलीत आपल्या खास लोकांसोबत बसले, प्रत्येकाचे दोन दोन पेग झाल्यावर माननीयांनी त्यांना रजा दिली आणि रुम मधला फोन उचलुन रिसेप्शनला स्पेशल ऑर्डर पाठवायला सांगितली. खास खिमा घेउन खास व्यक्ती रुममध्ये आल्यावर माननीय दिवसभराचं टेन्शन विसरले. अंगातला नेहरु शर्ट काढुन बाजुला टाकत खुर्चीवरुन उठले अन बेडवर जाउन पडले. आता पहाटे चारपर्यंत रुममध्ये कुणी येण्याचा प्रश्नच नव्हता, त्यामुळं ते निवांत झाले. दोन्ही मोबाईल बंद केले अन खिम्याचे तुकडे अन तोंडात टाकायला सुरुवात केली.
जाधव साहेब यावेळी कमिशनरसाहेबांच्या समोर बसुन आपला रिपोर्ट दाखवत होते, रिपोर्ट वाचुन झाल्यावर कमिशनर साहेब पाच मिनिटं डोळे मिटुन सोफ्यावर मागं डोकं टेकुन बसले. ' जाधव, तुम्ही असं करा, केस टाकायची तयारी करा, पण कुणालाच यात घेउ नका. वरुन पक्का आदेश येईपर्यंत कुणाला काही कळालं नाही पाहिजे. मी वाडकरांना मुंबईहुन बोलावतो, या भागातल्या गँगवॉरला जरब बसवणारा माणुस आहे तो. ते इथं होते तेंव्हाच्या पाच वर्षात गुन्हेगारी फक्त भुरट्या चो-या, अपघात आणि दारुड्यांच्या मारामा-या यापर्यंतच राहिली होती, त्यांची बदली मुंबईला झाली अन पुढच्या तीन महिन्यात दोन मर्डर झाले, ज्या केस आम्हाला पुढच्या तीन वर्षे पुरल्या कोर्टापर्यत न्यायला. आरोपी किरकोळ शिक्षेवर सुटले ते वेगळंच. पण नंतर फार गोंधळ वाढला. अर्थात तुम्ही रिटायरमेंटला आलात, तुमच्या कडुन अगदी तशीच अपेक्षा नाही पण मला वाटतं, तुमचे तीनच महिने उरले आहेत म्हणजे, या अशा केस करण्याची रिस्क तुम्ही घेउ शकाल. केस कोर्टात जायलाच एक वर्ष लागेल, तोपर्यंत तुम्ही रिटायर्ड होउन एखाद्या मोठया कार्पोरेट मध्ये चिफ सिक्युरिटि ऑफिसर म्हणुन जॉइन केलेलं असेल, एसि केबिन, गाडी, लॅपटॉप एकदम ऐश होईल तुमची, बरोबर ना जाधव.' जाधव हसले चहाचा कप टेबलवर ठेवला आणि डोक्यावर हात फिरवत म्हणाले ' होय सर, नागपुरची एक कोल इंडस्ट्री आहे तिथं झालंय बोलणं.' आपला दगड नेमका बसल्यानं कमिशनर खुश झाले.' मग आम्हाला बोलवा कधीतरी एसि केबिन मध्ये बसुन ऑरेंज ज्युस प्यायला' हसत हसत ते बोलले. फाईल बंद केली याचा अर्थ तुम्ही निघा असा होतो हे समजुन जाधव केबिनच्या बाहेर पडले. त्यांना ही केस करणं अगदी जीवावर आलं होतं सगळं आयुष्य त्यांनी लो प्रोफाईल आणि लो रिस्क पड्धतीनं काढलं होतं, आता जाता जाता त्यांना ह्या भानगडीत पडायचं नव्हतं.
प्रशा पुन्हा रात्री जेवण आणि बरोबर दोन बाटल्या देशी घेउन आला, आल्या आल्या त्यानं हणमंताकडुन आनंद जिवंत असल्याची खात्री करुन घेतली. हणमंतानं त्याला उद्या सकाळी १५ लिटर पेट्रोल आणायला पैसे दिले, नाथा गाडीचं इंजिन सुरु ठेवुन त्याचा मोबाईल चार्ज करत होता. दर पंधरा मिनिटाला सिम बदलुन एखादा फोन करायचा. आज येताना बायकोचा फोन घेउन आलो असतो तर फार बरं झालं असतं, पण रात्रीच्या गडबडित तेवढं सुचणं शक्य नव्हतं. रात्री आनंदनं हत्यार बाहेर काढल्याची शंका येताच त्याच्या मागं उभ्या असलेल्या महेशनं लुंगीत लपवलेल्या गुप्तीनं आनंदच्या उजव्या पायावर एवढ्या जोरात वार केला की, आनंदच्या हातातलं पिस्तुल तिथंच पडलं अन त्याच्याबरोबरचे लोक पळायलाच लागले. कॅरम क्लबमधल्या दारुड्यांवर दादागिरी करणारी लोकं ती, खाउन पिउन तालीम घुमणा-यांच्या समोर थोडीच उभी राहणार होती. आनंदच एकटा काय तो पाच सहा वेळा असल्या हातातोंडाच्या भानगडीत पडलेला,सकाळी बांगरेच्या बायकोनं दिलेल्या शिव्या, संध्याकाळीच मारलेले दोन पेग, अन रात्री माननीयांनी प्रदेशाध्यक्षांसमोर केलेली हजामत, ह्या सगळ्याची राख डोक्यात घेउन तो समोर दिसलेल्या चार सहा जणांना घेउन तो आला होता, याच्या उलट नाथा त्याच्याच एरियात होता, पुर्ण तयारीत होता. आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट, जी सकाळपासुन प्रशाच्यापण डोळ्यात खुपत होती, तो बिनचपलेचा होता.

Print Page

0 comments:

Post a Comment