Thursday, December 15, 2011

चपला आणि सत्कार - भाग १३ - अंतिम.

नाथा अन बाकीचे चार जण केगांव पासुन निघाले, तिथुन बार्शी रोडला येउन ते मधल्या रस्त्यानं तामलवाडीला आले, तिथं बाउंड्रीच्या हॉटेलजवळ गाडीत अजुन थोडी भाजी भरुन घेतली, पुढं जाउन एकाआडवाटेला अंधारात थांबुन दोघांनी गाडीच्या नंबरप्लेट बदलल्या, समोरचे शो चे लाईट काढुन टाकले, आणि लटकणारा हनुमान, डॅशबोर्डावरचा गणपती काढुन ठेवला. त्या दोघांपैकी एकजण अंधारातच चालत पुन्हा सोलापुरच्या दिशेनं यायला निघाला. मध्ये एका बाजुच्या शेतात जाउन त्यानं दोन्ही नंबर प्लेटवर बरोबरच्या बाटलीतलं थिनर टाकलं अन दोन्ही प्लेट जमेल तेवढ्या स्वच्छ केल्या, द्गडानं वेड्यावाकड्या केल्या, एक तिथंच मातीत पुरली अन दुसरी पुढं चालत येउन एका वाहणा-या नाल्यात भिरकावुन दिली.
टेम्पो सुसाट पुढं निघाला,पहाटे पर्यंत लातुर - औसा रोडवर असलेल्या एका मठात पोहोचायचं होतं, पण त्याआधी बरोबर घेतलेली भाजी उस्मानाबाद मार्केटला टाकुन तिथं पोहोचायचं होतं. आता हा मठ या चार जणांचा पुढचा दोन महिने सांभाळ करणार होता. रात्री तुळजापुरनंतर एका ठिकाणी जेवायला थांबले होते तिथं फार कुणीच बोललं नाही, एखाद्याचा जीव घेउन नुसतं वावरणंच खरंतर अवघड असतं आणि इथंतर चार तासातच सगळे एकत्र बसुन जेवण करत होते, किंवा जेवण्याचा प्रयत्न करत होते, समोर आलेल्या तंदुरी चिकनच्या जागी वेगळंच काही दिसत होतं. नाथा ओरडला ' अबे बारक्या, हिरवी भाजी नाय का काय, त्ये घेउन ये काय वातड झालंय हे चिकन ' खरंतर हे बोलताना त्याच्या डोक्यात काल पोत्यात बांधताना आनंदच्या पायाला आलेला वातडपणा होता. आनंदला पाणी पाजुन निघतानाच त्याच्या लक्षात आलं होतं की हा टिकणार नाही, प्रशाच्या गोठ्यातच त्याच्या पँटवर मुंग्या चढताना त्यानं पाहिल्या होत्या. तेवढ्यात वेटरनं पालक पनीर आणुन दिलं, त्याला गार झालेल्या रोट्या बदलुन द्यायला सांगितल्या. अजुन दोन तासाचा प्रवास बाकी होता.
अप्पा बराच वेळ फोन लावत होते, पण तो स्विअ ऑफ येत होता. मग कंटाळुन ते घरी आले. घरी बाकी सगळ्यांनी जेवुन घेतलेलं होतं. सुनेनं आणुन दिलेलं दुध पिताना अप्पा गप्पच होते. सुनेनं त्यांच्या उशा आणि पांघरुणं आणुन दिली तसे अप्पा झोपायच्या तयारीला लागले. झोपेचं सोंग घेतलं अन पडुन राहिले. यावेळी जाधव घराच्या गच्चीवर बसुन दोन घोट व्हिस्की आणि तांब्याभर पाणी घेउन बसले होते. त्यांना घरुन पाणी हवं तेवढं मिळायचं पण व्हिस्की मात्र दररोज दोन घोटच आणि बरोबर मोजुन पाच काजु आणि अर्धी वाटी शेंगा टरफलासहित. आज त्यांचं जिगसॉ पुर्ण होत आलं होतं. फक्त एकच तुकडा बसत नव्हता, म्हणजे त्याचा आकारच होता गोल, त्या जिगसॉतली जागा पण होती गोलच पण तो तुकडा कसा ही फिरवुन बसवला तरी चित्र पुर्ण होत नव्हतं, प्रत्येक वेळी एक वेगळाच अर्थ दाखवत होतं. दोन घोट व्हिस्किनं रोज किमान लांबच्या चांदण्या जवळ दिसायच्या पण आज ही समोरची डिझाइन लांब चालली होती. कंटाळुन जाधव उठले, व्हिस्की संपलेलीच होती. घरात झोपायला आले, गुपचुप बेडरुममध्ये येउन बेडवर अंग टाकुन दिलं.
पहाटेला स्वामी श्री अवतारी बाबा आश्रमाच्या कुष्ठरोग विभागार तीन जण सेवेकरी म्हणुन भरती झाले, कुणी फारसं बोललं नाहीच. तिघांनी आंघोळी आटोपल्या आणि आश्रमातले कपडे घालुन कामाला लागले. झाडलोट आणि तिथल्या रुग्णांचे कपडे धुणं ही कामं त्यांच्याकडं होती. सगळा प्रकार मुक्यानंच चालायचा, सुपरवायझर तसा पोरगेलासा तो यांना पाहुनच घाबरला. एका रजिस्टर मध्ये त्यानं यांची नावं लिहुन घेतली. जेंव्हा ते कपडे धूण्याच्या जागेकडं निघाले तसं सुपरवायझरनं त्यांना गमबुट घालायला सांगितले, तिघांनी नकार दिला अन कामाला लागले. इकडं सोलापुरात दोन मोठ्या व्यक्ती सिव्हिल मध्ये अ‍ॅडमिट झाल्या एक अप्पा अन दुसरे माननीय. अप्पा सकाळी नेहमीप्रमाणे उठले नाहीत म्हणुन त्यांना दबाखान्यात आणलं गेलं रात्री कधीतरी एक माईल्ड हार्ट अ‍ॅटॅक येउन गेला होता असं अनुमान काढला गेला, तालमी घुमलेलं शरीर म्हणुन वाचले होते. तिकडं माननीय अ‍ॅडमिट झाले ते कायदा अन राजकीय आजारापोटी, त्यांच्या वकिलानं अटकपुर्व जामीनाची तयारी सुरु केली होती. पोलिसांनी तालीम, मंडळ कार्यालय पुन्हा पिंजुन काढलं, काहीच मिळालं नाही.
दोन दिवसांनी अनपेक्षितपणे जाधवांच्या हाती एक धागा आला, आनंद बरोबर रात्री तिथं गेलेला त्याचा एक चेला, जखमी झाल्यावर तो गावाकडं जाउन राहिला होता एवढे दिवस आणि आता सगळं शांत झालं असेल असा विचार करुन तो परत आला होता. त्याला बोलता करायला दुपारचे चार वाजले, पुन्हा एकदा पोलिसांनी तालीम, मंडळ कार्यालय पुन्हा पिंजुन काढलं, काहीच मिळालं नाही. दुस-या दिवशी सकाळी अकरा वाजेपर्यंत जाधवांचा रिपोर्ट कमिशनर साहेबांच्या समोर होता. एकुण अठरा जण सोलापुरातुन गायब होते, प्रत्येकजण संशय घेण्यासारखा होता पण सगळ्यांची नावं कधी कुठं आलेली नव्हती, काही नावं मात्र या असल्य भानगडीत नेहमीच असायची. आता या सगळ्यांना हुडकणं अन चौकशी करणं बरंच वेळ खाणारं काम होतं. जाधवांनी त्याची परवानगी मागितली पण कमिशनर साहेबांनी दोन चार दिवस थांबायला सांगितलं. मनात थोडं निराश होउन जाधव बाहेर आले, ऑफिस समोरच्या बागेत थोडा वेळ उभारले आणि मग घरी गेले.
केगांव रोडवरच्या खड्ड्यात पडलेली बॉडी ही दै.संचार,केसरी अन तरुण भारत ची हेडलाईन झाली ती बरोबर तीन दिवसांनी.पोलिस प्रेस फोटोग्राफरना जागेवर घेउन गेले तेंव्हा तिथं मुंग्या लागलेल्या होत्या, बाजुला उभं राहवत नव्हता. बॉडी कुणाची हे न माहित नसल्यानं गर्दीत फारशी रडारडी नव्हती, दोन ठिकाणी दगडानं ठेचुन मारण्या मागच्या उद्देश नक्की समजत नव्हता, तरीसुद्धा धार्मिक तणाव होउ नये म्हणुन पोलिसांनी बॉडी लगेच हलवली. पुढचा तपास चालु झाला, वायरलेस वरुन ह्या सगळ्याबद्दल जाधवांना समजलं होतं, पण त्यांच्या समोर आनंदच्या माणसानं दिलेला जबाब असल्यानं यावर आता जास्त विचार केला नाही, पण आपल्या जिगसॉ मध्ये ह्या तुकड्याला सुद्धा एखादी जागा द्यावी लागेल याचा अंदाज त्यांना आला होता. उद्यापासुन जाधव रजेवर जाणार होते, त्यांना नागपुरला जाउन नविन नोकरीच्या काही प्रोसेस पुर्ण करायच्या होत्या. मग आज यात जास्त अडकायचं नाही असा सोयिस्कर विचार करुन ते नेहमीप्रमाणे राउंडला निघुन गेले.
आठ दिवसांनी जाधव नागपुरला जाउन परत येईपर्यंत प्रत्यक्ष केसमध्ये काही विशेष घडलेलं नसलं तरी बॅकग्राउंडला बरंच काही झालं होतं, त्यांच्या जिगसॉचं चित्रच बदलायची वेळ आली होती, अप्पांना हॉस्पिटलमधुन डिसचार्ज मिळाला होता,माननियांनी अटकपुर्व जामीन मिळवला होता, कमिशनरनी सगळी फाईल होम सेक्रेटरींकडे पोहोचवली होती, तिथुन त्याची एक कॉपी पक्ष प्रदेशाध्यक्षांकडे गेली होती. तालीम, मंडळाचं कार्यालय पुन्हा कार्यकर्त्यांनी भरुन गेलं होतं, तरीही त्या अठरापैकी कुणीच परत आलेलं नव्हतं.नवरात्र शांततेत पार पडलं होतं. जनसामान्य आपापल्या रोजच्या जगण्यात गढुन गेले होते, मदनचा भाउ आणि वहिनी पुन्हा आपल्या गावाला निघुन गेले, जाताना मदनच्या आईला बरोबर घेउन गेले. त्याच्या बापानं आपलं दुकान पुन्हा सुरु केलं, दुकानात एक फुटभर फोटो लावला होता मदनचा, त्याला रोज हार गंध करायचा, आणि बास. एका दोघांच्या जाण्यानं जगरहाटी थांबत नाही. बांगरे घरी आले होते पण आल्यापासुन आजारीच होते. काडादी चाळीतला डॉक्टर दररोज येउन औषध देउन जायचा पण त्यामागं माणुसकी कमी अन त्यांच्या मुलीचं हातात हात देउन थँक्यु म्हणणं जास्त होतं असं तिच्या आईला वाटायचं.
मोठा फरक पडला होता तो आनंदच्या घरी, घरचा कमावता असा गेला होता की त्याची बायको एकदमच विनाधार झाली, आणि मरणाच्या बरोबर पोलिस केस असल्यानं नातेवाईक पण दिवसपाण्यापर्यंतच घरी येत होते, नंतर कुणी फिरकलंच नाही ना सासरचं ना माहेरचं. कॅरम क्लब चालवणं तिला शक्य नव्हतं, दहावी पास या कुवतीवर कुठं नोकरी लागायची शक्यता नव्हती, घरची गाडी विकावी म्हणलं तर ती पोलिसांनी जप्त करुन ठेवलेली, ती सोडवायलाच जमादारानं चाळीस हजार मागितले होते. ज्या वस्तीत ' वहिनि' म्हणुन मिरवली होती, तिथंच चार घरी धुणी भांडी करुन जगायची वेळ आली होती, माननीयांच्या घरी दोन तीन वेळा जाउन आली, त्यांच्या आईनं अन बायकोनं दोन्ही वेळ पाच दहा हजार दिले पण, ते संपायला फार वेळ लागला नाही, पण ज्या दिवशी अप्पांना डिसचार्ज मिळाला त्या दिवशी अनपेक्षितपणे एकजण घरी येउन दोन लाख देउन गेला होता, तो नाथाचा माणुस होता. अप्पांनी हे करायला त्याला मुश्ताकला मारलं त्याच दिवशीच सांगितलं होतं. या पैशातुनच शेवटी तिनं आपल्याला जे जमेल ते करायचं ठरवलं, कॅरम क्लबच्या जागेत एक टपरी काढायची चहा भजीची.
कोजागिरी पौर्णिमेदिवशी अवतारी बाबा आश्रमात बरीच गडबड होती, उत्सव होता, जेवणं होती. सगळे जण गडबडीत कामाला लागले होते, पार संध्याकाळी सात वाजेपर्यंत सगळे कार्यक्रम संपले. संध्याकाळची आरती झाल्यावर महाप्रसादाची गडबड बाहेर चालु झाली तेंव्हाच मठाच्या प्रमुखांच्या खोलीत आठ जण जमले , त्यात नाथा, हणमंता आणि त्याच्याबरोबरचं दोघं जण होते. मठप्रमुखांनी समोर ठेवलेल्या ताटातुन अरगजा मुठीनंच उचलला अन या चौघांच्या कपाळाला मळवटासारखा लावला, 'आई भवानीचा उदो उदो' असा गजर झाला, चौघांनी सगळ्यांकडं आनंदानं पाहिलं, मठप्रमुखांनी इशारा केल्यावर त्यांच्या बाजुला बसलेले अप्पा उठले, खुर्च्यांमागं ठेवलेल्या पोत्यातनं चार खोकी काढ्ली, त्यावर थोडा अरगजा लावला अन प्रत्येकाच्या हातात एकेक खोकं दिलं. चौघांनी खोकं घेउन अप्पांच्या पायावर डोकं ठेवुन नमस्कार केला, अप्पांनी नाथा अन हणमंताला जवळ घेतलं, दोघांच्या डोक्यावरुन हात फिरवला ' बाबांनो, आता सहा महिने तरी दिसु नका इकडं, निघा लगेच, आणि चपला घाल की बे आता, मानाच्या आहेत म्हणजे काय कोनाड्यात ठेवणार का काय घरी निउन.' चौघांनी खोकी उघडली अन त्या नव्या को-या चपला कपाळी लावुन पायावर चढवल्या. मठातला पुजारी शोभावा असा एक इसम तिथं होता त्यानं एक तांव्या बरोबर दिला आणि सांगितलं इथुन थेट अहमदपुरवरुन नांडेड्ला जा गोदावरी माईत यांचं विसर्जन करा आणि मगच पुढं जा' त्या तांव्यात मदनच्या भावाकडुन घेतलेल्या राख अन अस्थि होत्या. मठाच्या बाहेर एक अवतारी बाबांच्या पोस्टरनी सजवलेली ट्रॅक्स उभीच होती,विश्वशांतीचा संदेश देण्यासाठी ती संपुर्ण भारतात यात्रा करणार होती.सगळेजण ट्रॅक्सजवळ आले, मठप्रमुखांनी नारळ फोडला, चारी चाकांखाली लिंबं ठेवली होती ती फोडुन हणमंतानं गाडी पुढं घेतली, गाडी कचकचतच चालवतोय हे बघुन नाथा त्याला म्हणाला,'अबे पहिल्यांचा चालवतोय का भाड्या,नीट चालव की'यावर हणमंता बोलला'पैलवान, महिना झाला असंल ना बिनचपलेचं फिरतोय, आज एकदम चपला घालुन जमेना बगा, हुईल एक दोन दिवसात सवय, जरा दम धरा'
समाप्त --
चपला आणि सत्कार बद्दल --
सत्कार हा एक मान असतो, सन्मान असतो, एखाद्यानं केलेल्या चांगल्या मोठ्या कामाची दिलेली पावती असते. हार, पुष्पगुच्छ एखादं मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं याचं सर्वमान्य स्वरुप असतं. पण ब-याच ठिकाणच्या गँगवॉर मध्ये अशा ब-याच या परंपरा असतात . त्यापैकीच ही एक, एका गँगवाल्यांनी दुस-या गँगमधल्या एखाद्याला उडवलं की, याचा बदला घेण्यासाठी त्या गँगमधल्या दोन चार जण पुढं येतात अन हा बदला पुर्ण होईपर्यंत ते पायात चपला घालत नाहीत,अनवाणी राहतात. ब-याचदा याची सुरुवात जवळपासच्या एखाद्या देवळात देव देव करुन होते, म्हणजे कुणी विचारलंच तर 'देवाचं' असं सांगता येतं. आणि हो भले हा बदला महिन्यात घेतला जाउदे नाहीतर त्याला वर्षे लागुदे,अगदी स्वताचे लग्नकार्य मध्ये येउदे नाहीतर उन्हाळ्यात रस्त्यावरचं डांबर वितळायला सुरु होउ दे पण पायावर चप्प्ल चढत नाही यांच्या. जेंव्हा हा बद्ला घेउन होईल, तेंव्हा त्या सर्वांचा गँगकडुन नव्या को-या चपला देउन सत्कार केला जातो.
याच मध्यवर्ती कल्पनेवर आधारलेली ही संपुर्णपणे काल्पनिक कथा आहे, यातील व्यक्ती, स्थळ, घटना, संवाद यांचा कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्ती, घटना वगैरेशी कोणताही संबंध नाही, आणि तसे झाल्यास तो केवळ योगायोग आहे.
Print Page

3 comments:

साधा माणुस... said...

waah...

एक्दम मज्जा आली राव... वाचताना..!!!!
खुपच मस्त लिहिता की तुम्ही..!!
असे वाट्त होते कि अजुन भरपूर भाग असते तर आजुन बरे वाट्ले असते..!
:-)
__________________
साधा माणूस
http://saadhamaanus.blogspot.com/

Unknown said...

Liked the information...
picturebite.com

shirin goel said...

Interesting…
mumbaiflowerplaza.com

Post a Comment