Wednesday, December 5, 2012

अंकोदुहि - ०१



मी, बाई होते म्हणुनी. म्हणुन लग्न झाल्यावर नव-याच्या घरी यावं लागलं, पुरुष असते तर मला घर नसतं बदलायला लागलं. कसली मज्जा लग्नात, किती लोकं, किती माणसं, मित्र, शत्रु, जवळ्चे,लांबचे सगळे आले होते. आई बाबा किती आनंदात होते. तशी कधी बाबांनी किंवा आईनी आमच्या, म्हणजे आम्हा बहिणींच्या लग्नाची काळजि केल्याचं आठवत नाही मला. एकत्र कुटुंब आमचं. माझे आईबाबा, मोठे काका काकु, त्यांची मुलगी, सगळं किती मस्त होतं. सगळ्याजणी एकत्र राहायचो, एकच मोठं घर होतं आमचं. घर कसलं राजवाडाच होता तो. पण घर म्हणलं की जीवाच्या जवळचं वाटतं.
आम्ही सगळ्या जवळपास एकाच वयाच्या, एक दोन वर्षांचा फरक असेल . घरात खाण्यापिण्याची ददात नव्हती पण शिस्त देखील तेवढीच, तसं आमचं घर जुन्या वळणाचं, संस्कारांचं होतं. सकाळी लवकर उठणं, आवरणं, मग देवघरात जाउन बसणं, कधी मोठे काका तर कधी  बाबा पुजा करत असायचे. म्हणजे ब्राम्हण असायचे पुजा सांगायला, ते सांगतील तसं काका,बाबा करायचे, मध्ये मध्ये ते मंत्र म्हणायचे. आम्ही परकर पोलक्यात गप्प मागं बसुन राहायचो, समोरच्या प्रतिमेच्या गळ्यातले  हार, पायातले पैंजण बघत. त्यांना म्हणे पैंजण म्हणायचं नाही असं आई सांगायची, ते तोडे आहेत. पायात म्हणजे पैंजण आणि हातात म्हणजे कंगन एवढंच कळायचं वय होतं आमचं.   देवाच्या घरात, आम्हाला सगळीकडं फिरता यायचं नाही. तिथं सगळ्यात पुढं ब्राम्हण मग पाठमोरे बाबा किंवा काका आणि त्यामागं थोडं अंतर सोडुन आम्ही असायचो.
मध्ये मध्ये आई नाहीतर काकु यायच्या, देवाच्या जेवणाचं घेउन, त्याला म्हणे नैवेद्य म्हणायचं पण असायचं काय त्या ताटात, छे काय नसायचं ते विचारा, पार ताज्या ताज्या फळांपासुन गरम गरम पु-या अन दाट खीर असायची. त्या खिरीवरच्या तुपाचा असा मस्त वास यायचा की कधी एकदा पुजा संपते आणि आम्हाला प्रसाद मिळतो असं व्हायचं. देवघराच्या आत उजव्या बाजुला एक दरवाजा होता, त्याला मात्र नेहमी कुलुप असायचं. त्या दरवाज्यावर एक मोठी प्रतिमा होती, जिची पुजा केली जायची दररोज त्या लालभडक कुंकुवानं अन लालभडक फुलांनीच. पण दरवाजा उघडलेला आम्ही ती कधीच पाहिला  नव्हता. मला तर त्या प्रतिमेतल्या साधु बाबाचीच भीती वाटायची, म्हणुन मी कधी कुणाला विचारलं देखील नव्हतं त्या दरवाज्याबद्दल. पण एके दिवशी मात्र, आम्ही नेहमीप्रमाणे पुजा झाल्यावर नमस्कार केला आणि बाहेर निघणार प्रसाद घेउन तेवढ्यात काकांच्या मुलीनं विचारलं ' बाबा, त्या खोलीत काय आहे ? अजुन मोठे देव आहेत का आत ? तुम्ही पाहिलेत का ते ? ' आणि क्षणांत तिथले सगळेच जण स्तब्ध झाले. काका, पुजा सांगायला आलेले ब्राम्हण, काकु,  माझी आई सगळेच जण, आम्ही तर हातातला प्रसाद खायचं देखील विसरलो. काही वेळाच्या शांततेनंतर काकांचा आवाज आला ' बाळा, आपण ती खोली वर्षातुन एकदाच उघडतो, आतले देव ज्या दिवशी आपल्या घरी आले ना, त्या दिवशीच. आणि या एक दोन वर्षात वर्षी तुम्हाला कळेलच आत काय आहे ते, या गोष्टी समजण्याएवढं मोठ्या व्हालच तुम्ही तोपर्यंत, ठीक. चला पळा आता, गुरुजी येतील ना शिकवणीला, पळा.'
काका एवढ्या सहजी ती खोली उघडुन दाखवायचं म्हणतील असं मला तरी वाटलं नव्हतं, पण ताईचा, म्हणजे काकांच्या मुलीचा चेहरा एकदम आनंदला होता, ती चालताना देखील उड्याच मारत होती. माझ्या मनात मात्र उत्सुकतेपेक्षा भीती जास्त होती त्या खोलीत काय असेल याची. एवढे दिवस त्या साधुबाबाची भीती आणि आता आत काय असेल याची भीती याचा अजुन जास्त गोंधळ माझ्या मनात व्हायला लागला. मी त्यादिवशी रात्री आईला विचारलं देखील, पण तिनं नुसतीच उडवाउडवीची उत्तरं दिली. म्हणे आमचं वय नाही अजुन, लहान आहोत असलंच काही. मला काही समाधान वाटलं नाही पण आईनं तिच्या कुशीत ओढलं तेंव्हा ती रडेल असं वाटत होतं, म्हणुन मी पण फार काही न विचारता झोपुन गेले. मला नाही आवडायचं  आईनं रडलेलं. कारण तिला पण नाही आवडायचं मी रडलेलं. बाबा किंवा काका जरी रागावले तरी आई आणि काकु किती समजुन घ्यायच्या. पण कधीतरी आई सुद्धा रागावायची मग मात्र मी काकुमागं जाउन लपायची. आणि आईला पण हे माहित होतं, ती यायचीच नाही काकुच्या खोलीत. मग काकु बोलता बोलता काय झालं ते माझ्याकडुन काढुन घ्यायची, आणि मग माझी समजुन काढुन परत पाठवायची  आईकडं. खरंच किती मजा यायची त्या वेळी.
मला वाटतं बहुधा दोन वर्षे गेली, आणि आमचं बालपण संपलं आम्ही मोठ्या झालो. निसर्गाचा जादुचा पिसारा उमलायला सुरुवात झाली होती. आमची खेळ्णी बदलली, खेळ बदलले, हल्ली घरात बसुन रहायला आवडेनासं झालं, बाहेर बागेत फिरावं,लांब कुठंतरी फिरुन यावं असं वाटायला लागलं. आणि एवढी वर्षे हे करत नाही म्हणुन ओरडणा-या आई आणि काकु आता हेच करु नका म्हणुन रागावायाला लागल्या. आम्हा चौघींचे बोलायचे बिषय बदलले, या घरापलीकडच्या जगाची स्वप्नं हळुहळु आकार घेत होती. एवढी वर्षे आम्ही सगळ्या मैत्रिणींच्या घरी जायचो खेळायला आता त्यावर पुर्ण बंदी आली, त्याच आमच्या घरी यायच्या. तेंव्हा देखील गप्पाच जास्त व्हायच्या. आणि खरंतर अशा गप्पांना जास्त वेळ मिळायाचाचं नाही. सकाळी उठुन आवरलं की आई आणि काकुला मदत करायला स्वयंपाकघरात जावं लागायचं, अजुन पदार्थ शिजवणं आम्हाला करावं लागत नव्हतं पण सगळी छोटी छोटी कामं आम्हाला करायला लागायची,तसं तर हे सगळं करायला नोकर चाकर होते, पण ' या वयात सगळं यायला हवं' या एका सुचनेखाली सगळं करावं लागायचं. तिथं देखील आम्ही चौघी नेहमी हसत खिदळतच असायचो, आमच्या गप्पा ऐकुन बरोबर काम करणा-या बायका देखील हसायच्या, मग आई नाहीतर काकु ओरडायच्या. लहानपणी त्या ओरडण्याची भीती वाटायची, हल्ली गंमत वाटायची. मुद्दाम असं काहितरी करावं वाटायचं ज्यामुळं त्या रागावतील.
दर चार दिवसांत ताईच्या बोलण्यात मात्र त्या खोली उघड्ण्याचा विषय यायचा, मग माझा तो दिवस घाबरुनच जायचा, माझा पडलेला चेहरा बघुन ताई धीर द्यायची पण मनातली भीती काय अशी जाते काय छे...
क्रमश :

0 comments:

Post a Comment